शांत व्हावे, आठवांचे मोहोळ
साठव जागवित काळीज थकले
जगायचे ते सारे जगुनी झाले
भोगण्यासारखे काही न उरले
स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी
ते भाग्य कृपाळू जगवित राहिले
ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी
स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले
भौतिक सुखाला, विटुनी जाता
ध्यास परमार्थाचे जीवास लागले
अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी
सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २७४
२८/१०/२०२२
दवडू नका आयुष्य तुम्ही, वेळ घालूनी असा तसा,
पदरी येई निराशा तुमच्या, गेला क्षण येईल कसा....१,
मर्यादेतच जीवन असूनी, गतीमान असते बघा,
स्वत: भोवती केंद्रीत होता, कसे जाणाल इतर जगा....२,
ईच्छा असते वाया न जावे, आयुष्य सारे विनाकारण,
हर घडीला विचार असावा, इतरांसाठी असते जीवन....३,
जेंव्हां तुम्ही सेवा करीता, इतर मनाचे भाव जाणूनी,
तेच अर्पण होत असते, सारे एकत्र ईश्वर चरणी .....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
शेतात टाकले
विषाक्त रसायने
तिकीट कैंसर ट्रेनचे
एडवान्स काढले.
टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा,
शब्द माझा बोलका,
नि तोच माझा किनारा,
तोलतो मापतो,वाटतो,
शब्दही सतत 'झुंज' देतो,
राखतो पूर्ण ताकदही,
सत्ताही पालटून देतो,---!!!
खेळतो खेळी कल्पनांची,
काव्यतुरेही तो खोवतो ,
राखतो बहुत अंतरे,---
नाना जिवांना सांभाळतो,--!!!
प्रकटे पण शब्दांतूनही,---
कितीक आकसनेमका,
तोच कधी जिंकून घेईल,
अनेक हृदय संपदा, --!!!
वाट दाखवी कधी,
वचन नित्य पाळतो,
'दटावे' कधी क्वचित,
गुरू होऊन सुधारतो,--!!!
शिस्त लावे 'करडी',
कठोर शिक्षणही देतो,
नेहमी जवळ घेऊनी,
आई बनुनी समजावतो,,--!!!
पित्यासमान हात देतो,
तरी जरब' वाटते बालका,-!!
वडील बनुनी धावतो,--
प्रसंगी,येतो कसा रक्षणां,--!!!
मित्र म्हणून मदत करी,
धावतो बिकट संकटा,
नातेही सगळी जपताना,
न करी विचार थोडका,---
शेजारी होऊन सख्खा
सावलीगत पाठीराखा,--!!!
अनोळखी हात देई,
प्रसंग उद्भवता बांका,
अलगद बाहेर काढतो,
त्यांतून ठरवून नेमका,--!!!
शब्द नेतो देवाजवळी,
हृदयांतर करी सारखा,
, आपल्या माणसांसाठी,
प्रसंगी नशिबाला धडका,-!!
शब्दांवाचून सर्व "निर्धन",
कवी त्याच्यावाचून पोरका,
शब्दच आमुचे अमोल रत्न,
बेलभांडार वाहते शब्दां--!!
©️ हिमगौरी कर्वे.
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आयुष्य संपत जाते, पण प्रेम संपत नाही
किती करा परमार्थ, पण क्रोध आटपत नाही
आधी कष्टे स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी
भरुन भांड ओसंडे, तरी लोभ सुटत नाही
पैसा-अडका, जमीन-जुमला, घराण्याचा गर्व
जववर असे दैव अनुकुल, मद हा हटत नाही
सकाळ, दुपार, संध्याकाळ - देई शिव्या अपार
एक दिवशीही मत्सर, केल्याविना दिसत नाही
कुणावरही विश्र्वास न करी, सर्व स्वतःच करी
वेळेस नातं तोडी, पण संशय सोडत नाही
श्री सुनील देसाई
१८/०७/२०२२
आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी
प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी....१,
प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका....२,
यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते....३,
यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई
कांहींतरी ते मिळवायचे, याच विचारी रमून जाई....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हस्तिनापुराच्या सुवर्णभिंतींमध्ये
एक स्त्री सावलीसारखी जगत होती,
न आवाज, न आक्रोश,
फक्त श्वासांच्या दरम्यान दडलेलं वादळ.
अर्थात ती म्हणजे गांधारी...
तिने डोळे मिटले नव्हते,
तिने दृष्टीला बांधून ठेवलं होतं.
अंधार हा तिचा शत्रू नव्हता,
तो तिचा निवडलेला आश्रय होता.
पतीच्या वेदनेशी एकरूप होताना
तिने स्वतःचं आकाश गमावलं.
त्यागाच्या नावाखाली
स्वतःच्या प्रश्नांना गाडून टाकलं.
राजकारण दरबारात उघडं नाचत होतं,
महत्त्वाकांक्षेच्या ज्वाळा वाढत होत्या,
पण तिच्या शांततेचा पडदा
सगळ्यावर अलगद पसरत होता.
मुलांच्या पावलांमध्ये तिने भविष्य ऐकलं,
पण त्या पावलांतला अहंकार
तिच्या मायेने झाकला गेला.
आईचं हृदय न्यायापुढे हरलं,
आणि इतिहासाने आपला निर्णय घेतला.
द्रौपदीच्या वेदनेचा प्रतिध्वनी
सभागृहाच्या स्तंभांवर आदळत होता,
तिच्या मौनात मात्र
एक खोल भीती घर करून बसली होती,
“जर मी बोलले, तर सर्व काही तुटेल.”
आणि ती न बोलल्यामुळे
सर्व काही तुटलं.
कुरुक्षेत्रावर जेव्हा रणशिंग वाजलं,
तेव्हा तिच्या अंतरात्म्यात
पश्चात्तापाचा शंखनाद झाला.
शंभर स्वप्नांचे देह पडले,
आणि तिच्या मायेचा महासागर
एका क्षणात वाळून गेला.
राख हातात घेऊन ती उभी होती,
आई, राणी, स्त्री…
तिन्ही ओळखी धूसर झालेल्या.
तिने कृष्णाकडे पाहिलं,
अनंताच्या डोळ्यांत प्रश्न ठेवला.
तो शाप नव्हता,
तो वेदनेचा भार होता.
“मी अंधार निवडला,
पण अंधाराने मला का निवडलं?”
तिच्या पट्टीत करुणा होती,
पण करुणेला कणा नव्हता.
तिच्या प्रेमात ऊब होती,
पण सत्याला सामोरं जाण्याचं तेज नव्हतं.
गांधारीची शोकांतिका
नियतीने लिहिलेली नव्हती,
ती विलंबलेल्या निर्णयांची सावली होती.
डोळे बांधणं सोपं होतं,
पण अंतर्मनाला बांधणं अशक्य.
सत्य दार ठोठावत राहिलं,
आणि तिने शांततेचं कुलूप लावून ठेवलं.
शेवटी जेव्हा कुलूप तुटलं,
तेव्हा उरली होती फक्त राख
आणि राखेत उमटलेली शिकवण.
प्रेम जर न्यायाला साथ देत नसेल,
तर ते मायेचं कवच नसून
विनाशाचं निमंत्रण ठरतं.
गांधारी अंध नव्हती...
ती प्रकाशाला घाबरली होती.
आणि जेव्हा तिने पट्टी उघडली,
तेव्हा पाहण्यास काहीच उरलं नव्हतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Copyright © 2025 | Marathisrushti