वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
"दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?"
"आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?"
कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि दही खाण्यापेक्षा त्यापासून बनणारे ताक, लोणी आणि तूप हे उत्तरोत्तर अधिक सुपाच्य, पौष्टिक आणि जास्त चलन मिळवून देणारे अमृत असे सहजपणे शत्रुला द्यायचे ? म्हणून तर कृष्णाने मथुरेत जाणारी दुधदह्याची मडकी फोडून टाकून, डेऱ्यातील ताक, लोणी तूप मात्र, चोरून का होईना, स्वदेशातच वाटून आपल्याच बांधवाना पुष्ट केले.
आणि असे ताकद वाढवणारे ताक, लोणी आणि तूप हे प्रमेहातही अपथ्यकर नाही. उलट ताक पचायला हलके, सदा पथ्यकर, अग्निला विझू न देणारे, आणि गुणाने रूक्ष आहे. तूप हे तर पित्ताला कमी करून अग्निला वाढवणारे एकमेव द्रव्य असावे.
आमच्या राज्यातील ताक लोणी आणि तुपाचं हे अमृत शत्रुपक्षाला विकण्यापेक्षा, दुधाची आणि दह्याची मडकी फोडून टाकणारा, प्रमेहाचे प्रतिकात्मक कारण नष्ट करणारा, भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श असला पाहिजे.
आयुर्वेदानुसार डायबेटीसला म्हणे गुळ चालतो. कोणीतरी, काहीतरी चर्चेसाठी पिल्लू सोडून देतो झालं. ग्रंथकार इतक्या स्पष्ट शब्दात गुळाचा उल्लेख, प्रमेह होण्याच्या कारणांमधे करीत आहेत, त्याला कसे नाकारायचे ? केवळ गुळच नव्हे तर गुळापासून बनलेले पुढील सर्व पदार्थ देखील अपथ्यकर सांगितले आहेत.
बरं आता जो गुळ बाजारात मिळतोय, तो फुल्ल ऑफ केमिकल. पिवळा आणि पांढरट रंगाचा गुळ हा चवीला खारटही लागतो, तो त्यातील घातक रसायनांमुळे. या रसायनांमुळे मधुमेह सोडाच, कॅन्सर सारखे जीवघेणे आजार पाठी लागताहेत. हे लक्षातच येत नाही. पूर्वी गुळाला मुंगळे यायचे, गुळाच्या ढेपीवर मधमाश्या फिरायच्या. आता त्यातील विषारी रसायनांमुळे किटकसुद्धा येईनासे झाले आहेत.
तसं गुळ पूर्वी च्या तुलनेत कमीच वापरला जातोय म्हणा ! पूर्वी कसं, बाहेरून कुणी पाहुणं आलं की गुळपाणी विचारलं जायचं. आता पाणीही विचारत नाहीत, गुळ तर लांबच राहीला. पूर्वी चहामधे पण गुळ वापरला जायचा. आता गुळाचे अतिशुद्ध विषारी रूप म्हणून साखर वापरली जातेय. !
गुळ अभिष्यंद उत्पन्न करणारा म्हणजे चिकटपणा करणारा आहे. शिवाय मधुररसाचा आहे. म्हणून प्रमेहामधे अपथ्यकर सांगितलेला आहे.
मधुर चवीपेक्षा, चिकटपणा जास्त गडबड करतो. आता हेच बघा ना.
आपल्या हातावर कोणीतरी साखर ठेवली. पटकन तोंडात टाकली. हात पुसुन मोकळे. हाताला साखर चिकटत नव्हती. पण हातावर साखर ठेवली. आणि हातातील साखरेवर अर्धा चमचाच पाणी घातले आणि सांगितले, "आता फक्त साखर खा" तर ????
साखर खाल्ल्यानंतर हाताला जसा चिकटपणा उरतो, तसाच चिकटपणा पोटातही तयार होतो, जो काढायला जास्ती कष्ट पडतात. अग्नि लवकर संपतो. आणि प्रमेहाची लक्षणे दिसतात. हा चिकटपणा जेवढा कमी होईल तेवढा प्रमेह लवकर नियंत्रणात येईल.
साखरेऐवजी वापरल्या जाणाऱ्या सॅक्रीनच्या गोळ्या, साखरेपेक्षा घातक ! अमेरिकेत कधीच बंद झाल्यात. अमेरिकेची अशी काही क्रेझ निर्माण झाली आहे ना, की उदाहरण देऊन पटवायचे झाले तरी अमेरीकाच आठवते. असो.
सॅक्रीनपेक्षा दोन चिमूट साखरच परवडली. साखरेपेक्षा थोडी कमी रसायने खडीसाखरेत असतात.
एकंदरीत प्रमेह हा भरपूर गैरसमजांनी भरलेला एक गोड आजार आहे, एवढे मात्र खरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.02.2017
February 9, 2017
केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला.
October 27, 2018
केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.
April 4, 2019
सॅनफ्रान्सिस्को प्रत्येक शहराला त्याचा असा इतिहास असतो. त्याला स्वतःचा चेहरा मोहरा असतो. त्याची खास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परंपरा, पार्श्वभूमी आणि संदर्भ असतात. शिवाय त्याला जसा भूतकाळ असतो, तसाच वर्तमानही असतो.
December 16, 2023
हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही.
September 28, 2023
अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!
पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
भोगिसी त्या सकळा !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
सदानंदाचा येळकोट !!!
येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!
-- चिंतामणी कारखानीस
February 18, 2016
करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात.
February 5, 2022
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…
गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.
मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.
देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.
मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.
अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.
आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 2, 2017
अध्यात्म तीन पैलूंनी बनलेले आहे; नातेसंबंध, मूल्ये आणि जीवनाचा उद्देश हे होत. अध्यात्मात भावना, संवेदना किंवा असा विश्वास आहे की, माझ्यापेक्षा काहीतरी मोठे आहे, संवेदनात्मक अनुभवापेक्षा मानव असण्यापेक्षा काहीतरी अधिक आहे आणि ज्याचा आपण भाग आहोत.
November 23, 2022
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥
आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.
वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् - आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.
स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 30, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti