(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • आयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)

    या तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10

    वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.

    देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.

    वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.

    सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.

    या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.

    आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.

    मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.

    ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.06.2017

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग ३

    पाय आणि मांडी दुमडुन
    जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत.

    दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते.

    टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(....... आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे, हे पण कळत नाही.) त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही.

    टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड, यामधे फक्त काही इंचाचे अंतर उरते. ताटातील घास अगदी सहजपणे, विनासायास तोंडात जातो.

    पण जेव्हा मांडी दुडली जाते, तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून, ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलते, दुडते, थोडेफार चिरडते, चेपले जाते, यामुळे आतड्यातील आतील भिंतीला चिकटलेले अन्न सुद्धा घसरते, हलते, खाली पडते.

    अशा तर्‍हेने आतड्याच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न, पचनाच्या, घुसळण्याच्या प्रक्रियेमधे आणले जाते.

    अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला आहे. मधे मधे पाणी पडत, पुनः अन्न. असे थरावर थर रचले जातात. जेवायला मधेमधे पुढे वाकल्याने पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायु बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते.

    पुढे वाकून जेवल्याने उजव्या बाजुला असलेले यकृत आणि डाव्या बाजूला असलेले, स्वादुपिंड, अग्न्याशय हे अवयव पण हलकेच दाबले जातात. या ग्रंथींवर थोडासा दाब निर्माण झाल्याने त्या ग्रंथीच्या आतील पाचकस्राव आणि इन्शुलीन, सहजपणे ग्रंथीच्या बाहेर पाझरतात, पचन आपोआपच सुधारते. आंबा पिळल्यानंतर कसा रस गळतो !!

    पुढे वाकून जेवल्याचे असे काही फायदे लक्षात आले आहेत.

    ......आणि अन्नासमोर नतमस्तक होण्यात लाज ती कसली ?
    कोणाही समोर जर आपण केव्हाही नतमस्तक झालो तर समोरून आशीर्वादाचा हात सहजपणे वर उचलला जातो.

    आणि इथे तर समोर, साक्षात अग्निनारायण.! जेवताना जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, तर अग्निनारायणांना "तथास्तु" म्हणावेच लागेल. नाही का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    19.09.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा

    नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.

    शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
    याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.

    सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
    एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.

    हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )

    नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.

    या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    29.06.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग चौदा

    प्रत्येक कृतीमधे आपण भारतीयत्वापासून कसे लांब जातोय, आणि भारतीयत्वापासून लांब जाणे म्हणजे आरोग्यापासून लांब जाणे, कारण भारतीयत्व म्हणजे संपूर्ण आरोग्य हे लक्षात आणून देणारी ही लेखमाला आहे, याची एकदा आठवण करून देतो. आपण भारतीय असल्याचा आनंद नक्कीच व्हायला हवा. गेले ते दिन गेले, असे म्हणून सोडून देऊन कसे चालेल ? त्यातील जे चांगले असेल ते स्विकारण्याची तयारी हवीच.

  • किचन क्लिनीक – कारले

    हे चवीला कडू असले तरी आहे मात्र फारच पौष्टिक बरे का.ह्याच्या कडू चवीमुळे ब-याचं मंडळींना हे आवडत नाही.पण ह्यात असणा-या औषधी गुणांमुळे प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी.

    ज्यांना हि भाजी आवडते ते ह्याची तळलेली कापं,भजी,चटणी,भाजी असे विविध प्रकार करून खातात.

    कारल्याचा वर्षायू वेल असतो.व आपण खातो ते कारले म्हणजे ह्या वेलीला लागणारे फळ होय.कारले हे चवीला कडू तिखट असते व उष्ण असून त्रिदोषघ्न असते.

    ह्याचा उपयोग जसा स्वयंपाकात केला जातो तसाच घरगुती उपचारात देखील आपण कारले वापरू शकतो.

    १)संडास मधून आव पडत असल्यास कारल्याचा रस तीळ तेलात मिसळून प्यावा.

    २)ज्यांना कृमी होण्याची सवय असते त्यांनी १/४ कप कारल्याचा रस+१/४ चमचा वावडींगाचे चुर्ण सकाळी उपाशी पोटी प्यावे व त्यावर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.

    ३)छातीत कफ साचून खोकला येत असल्यास १/२ कप कारल्याचा रस +२ चमचे मध+१/४ चमचा मिरीपूड हे मिश्रण घ्यावे.

    ४)ज्या इसब व खरूज ह्यात स्त्राव होतो त्यात कारल्याचा रस व हळद एकत्र करून लावावी.

    ५)अंगात बारीक ताप,अंगदुखी,तोंडास पाणी सुटणे,भुक न लागणे ह्यात कारल्याचे बारीक तुकडे+दालचिनी+काळी मिरी+वेलची रात्रभर पाण्यात भिजत घालून दुस-या दिवशी दिवसभर हे पाणी थोडे थोडे प्यावे.

    कारले खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून संडास व लघ्वी साफ न होणे व अंगमोडून येणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ६

    मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे सत्य ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, कृष्णानी सांगितलेल्या भगवतगीतेवर गीतारहस्य लिहिले आहे. कृष्णाच्या सत्यवचनावर लोकमान्यांचा पण विश्वास होता. सत्य बोलावे, पण अप्रिय होईल असे बोलू नये. आणि जर सत्य स्थापन होणार असेल तर खोटे जरूर बोलावे.

  • मंजीष्ठा

    मंजीष्ठाची अनेक फांद्या असलेली प्रसरणशील आरोहिणी वेल असते.ह्याचे काण्ड चौकोनी व गुलाबी लाल रंगाचे असते.पाने हृदयाकृती,टोकदार ५-१० सेंमी लांब व वरच्या भागात खरखरीत व मागील भाग मऊ व लव युक्त असतो.ह्याचा देठ पानांपेक्षा मोठा व दुप्पट लांब असतो.त्याच्यावर काट्यासारखे भाग असतात.चार पानांच्या चक्रातील २ पाने लहान व २ पाने मोठी असतात.फुल ०.३-२.५ सेंमी लांब मांसल गोलाकार काळे किंवा निळसर असते.

    आता आपण मंजीष्ठाचे गुण पाहुयात.हि चवीला तुरट,कडू,गोड असून उष्ण व गुरू व रूक्ष असते.हि कफ,पित्त व वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मंजीष्ठा कडू व तुरट तसेच रूक्ष असल्याने जखमा भरून काढते व त्यातील स्त्राव देखील कमी करते.

    २)हि कडू,तुरट,गोड चवीची व रूक्ष असल्याने रक्ताचे प्रसादन व पोषण करते व त्यात विकृत पद्धतीने वाढलेल्या तीन्ही दोषांचे शमन व शोधन करून त्वचेचा वर्ण सुधारते.

    ३)कडू,तुरट चवीने मंजीष्ठा मांस व रक्तातील क्लेद,पित्त व विषाचे शोधन व शमन करते व त्वचारोग नष्ट करते.

    ४)उष्ण गुणाने मंजीष्ठा गर्भाशय उत्तेजक व शोधक कार्य करते म्हणून मासिक पाळीच्या तक्रारीत ती उपयुक्त आहे.

    ५)अतिसारामध्ये मंजीष्ठा चुर्ण व लोध्र चुर्ण एकत्र मधासोबत देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 7

    नंतरचा उपाय अर्घ्य.सुगंधीत पाण्याने हात धुवायला अर्घ्य वापरले जाते. पाण्यात चंदन, अक्षता, दुर्वा, इ. वस्तू घालून हे पाणी देवाला हात धुण्यासाठी दिले जाते.

    काही खाण्यापिण्यापूर्वी हात पाय धुवायचे असतात, एवढे समजले तरी पुरेसे आहे. नंतरचा उपचार आचमन. ज्याविषयी आधी लिहून झालेले आहे.

    स्नान आणि अभिषेक केल्याशिवाय पूर्ण शुद्धी होतच नाही. गंगा आदि सप्त नद्यांचे पवित्र पाणी आंघोळीकरीता आहे, अशी कल्पना करून आपणही स्नान करावे. स्नानाने शरीराची शुद्धी तर होतेच पण मनाची शुद्धी देखील होते. स्नान करीत असताना लक्ष स्नानाकडेच असावे, तरच स्नानाने मानसिक शुद्धी होईल.

    पंचामृत स्नान, भस्म स्नान, इ. प्रकारावरील सविस्तर आरोग्यटीपा यापूर्वी आपण वाचलेल्याच असतील.

    स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणायला सांगितलेली आहेत. मंत्राचे विशिष्ट स्वरामधे उच्चारण केले असता, त्यातून निर्माण होणारी स्पंदने, लहरी यांनी वातावरण सात्विक बनते. घंटा, शंख इ. मुळे निर्माण केल्या नादामुळे काही जंतु मरतात, असेदेखील वाचल्याचे स्मरते. मंत्र स्वतः म्हटले तर उत्तमच, पण केवळ ऐकले तरी आरोग्याची प्राप्ती होते, असाही एक संदर्भ मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीचा मिळतो. गायत्री मंत्राच्या योग्य उच्चाराने, कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींची वाढ थांबते, असेही लक्षात येत आहे. मात्र मंत्राचे उच्चारण निर्दोष हवे, स्पष्ट हवे, जीभेला पहिल्यापासूनच तशी सवय हवी तरच ते उच्चार जमतात, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, म्हणूनच समाजातील काहीजणांनाच ते काम नेमून दिलेले होते. जर उच्चारात जरा चुक झाली तरी निर्माण होणाऱ्या लहरींची स्पंदने बदलतात, आणि अर्थ चुकतो. चिता आणि चिंता, खून आणि खूण, जहाज, चमचा, श आणि ष यातील उच्चारात फरक पडून चालत नाही.

    काही वेळा शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती असत नाही, पण ज्याला तो अर्थ समजला पाहिजे, त्याला जर योग्य उच्चारात एखादे वाक्य ऐकवले तर, या वाक्यातून जे समजायला हवे होते ते त्याला सहज कळते.

    जसे, "आज सांच्याक तुका चाराक सावतांथुय च्यॅयक बोल्लयला आसा" हे मालवणी वाक्य, मालवणी न कळणाऱ्या माणसाला काहीच अर्थबोध घडवणार नाही. पण ज्याला अर्थ कळणार नाही त्याने, जर हे वाक्य नीट उच्चारासह पाठ केले, आणि ज्याला मालवणी भाषा समजते, त्याच्यासमोर जाऊन उच्चारले तर ? ....
    ........त्या मालवणी माणसाला कळेल की, " मला सायंकाळी चार वाजता सावंत यांच्याकडे चहा प्यायला बोलावले आहे."

    कळले का मंत्रामधील उच्चाराचे महत्त्व ?
    जे जे देवासाठी, ते ते देहासाठी.
    जरा जरी फरक झाला तरी नुकसान हे ठरलेले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.06.2017

  • किचन क्लिनीक – खजुर

    आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.

    अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.

    ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.

    चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:

    १)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.

    २)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.

    ३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.

    ४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.

    ५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.

    ६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.

    ७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.

    ८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.

    खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४