(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3

    संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.

    कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
    "अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।"

    या संकल्पामधे "आयु आणि आरोग्य" असे दोन शब्द दिसताहेत.
    आरोग्य कोणाचे ?
    समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.

    केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !

    माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
    देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?

    मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी "देणारा" देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !

    आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !

    अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.

    त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.

    औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.05.2017

  • नैवेद्य भाग ४

    गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.

    भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत "यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो" आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.

    भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.

    कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
    हे त्याच्यातील साम्य.

    महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
    आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.

    यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.

    तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.

    प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.

    देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
    आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    10.09.2016

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग एक

    आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
    हो.
    कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
    "मला असे वाटते" या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
    हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
    नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?

    एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!

    पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.

    नियम एक.
    पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.

    प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी........

    एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी......... हे फक्त आयुर्वेद सांगतो.

    एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.

    हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.

    जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय "सुट" होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.

    इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.

    सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.04.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग १५

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3

    जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.

    शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.

    या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.

    आता करा यादी.
    फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
    दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
    पालेभाज्यांच्या जुड्या,
    दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
    पाकीटातील मांसाचे तुकडे,
    आईस्क्रीमचे गोळे,
    दह्याचे पातेले,
    शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
    डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
    ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
    सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....

    फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
    शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !

    असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.

    शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !

    आजची काळाची गरज,
    हे असंच चालायचं,
    काळानुसार बदलायला नको काय ?
    आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?

    एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
    या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • किचन क्लिनीक – शेंगदाणा

    शेंगदाण्यांचा वापर आपण पुष्कळ वेळेस करतो टाईमपास म्हणून खारे किंवा भाजून खातो,पोहे,खिचडीतघालतो,चटणी,आमटी,
    लाडू,चिक्की,तेल अशा विविध प्रकारे आपण हे वापरतो.

    शेंगदाणे किंवा भुईमूग हे प्रामुख्याने घाटावर घेतले जाणारे पिक.हे जमीनीखाली शेंगामध्ये तयार होतात.

    शेंगदाणे चवीला गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध वात कफ नाशक व पित्तकर असतात.हे दातांना बळकटी देतात.जखम भरायला मदत करतात.त्वचाविकारात उपयुक्त असून बलकारक,पोषक आहेत.

    आता आपण शेंगदाण्याच्या विविध व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहू:

    १)शेंगदाणा लाडू/चिक्की:
    गोड,उष्ण,पचायलाजड,स्निग्ध,वातनाशक,
    कफपित्तकर,बलकारक,अशक्तपणा कमी करणारी,श्रमहर आहे.

    २)शेंगदाणा चटणी:
    तिखट,गोड,उष्ण,वातनाशक,कफपित्तकर,
    पचायला जड,तोंडास रुची उत्पन्न करणारी,भुक वाढविणारी,शुक्रधातू नाशक आहे.

    ३)खारे शेंगदाणे:
    गोड,खारट,उष्ण,वातनाशक,कफ पित्तकर,अम्लपित्त वाढविणारी,पचायला जड,स्निग्ध,रक्तविकार वाढविते.

    ४)शेंगदाण्याची आमटी:
    चवीला गोड,तिखट,उष्ण,वातकफनाशक,
    पित्तकर,शुक्रनाशक,भुक वाढविणारी,रुचिकर,पचायला जड,बाळंतीण बाईचे अंगावरचे दुध वाढविते,पौष्टिक आहे.

    ५)शेंगदाणा तेल:
    गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातनाशक,
    कफपित्तकर,जखम भरायला मदत करते,त्वचेचा वर्ण सुधारते,संडास व लघ्वी सुटायला मदत करणारी.

    ६)शेंगदाणा पेंड:
    गोड,रूक्ष,वातनाशक,पित्तकफकर,उष्ण,दुध वाढविते,जखम भरणारी,पचायला हल्की.

    शेंगदाणे अतिप्रमाणात खाल्ल्याने अम्लपित्त होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनिक – लसुण

    मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो.

    आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो, आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.

    चला तर मग ही लसूण आपले बारीक सारीक आजार बरे करून आपल्याली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.

    १)नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!

    २)ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो साधा सोपा उपाय लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.

    ३)लसुण ही डोळयांचे आरोग्य देखील उत्तम राखते बरे का. त्या करीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.

    ४)सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या बघा गॅस कुठल्या कुठे पळुन जाईल.

    ५)सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणा-या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा ह्या उपायाने निश्चित फायदा होईल.

    ६)ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.

    तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर

    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

    केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.

    म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
    भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !

    थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.

    हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.

    त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.

    आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.

    तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
    त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
    यालाच म्हणतात,
    चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
    भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
    माझे काही चुकलंय का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.02.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस

    केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 16

    दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात,

    परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते.
    दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील क्लेदाचे पाचनही व्यवस्थित होत नाही. अशा अवस्थेत त्या आशयामधे आलेला अन्नरस किंवा पोषकांश देखील दूषित होतो.

    जसे नासलेल्या दुधामधे कितीही चांगले शुद्ध सात्विक दूध घातले तर सर्वच दूध नासते.

    किती सुंदर उदाहरण ग्रंथकारानी दिले आहे.

    दही विरजलेले पातेले आहे, त्यातील सर्व दही चमच्याने खरडून जरी काढून घेतले, पण पातेल्यात, पाणी घालून जर धुतले नाही, जर त्या दह्याचा थोडासा अंश पातेल्यात शिल्लक राहिला तर ? आणि पुनः त्याच पातेल्यात दूध ओतले तर ?

    परत सर्व दुधाचे रूपांतर दह्यामधे होईल. तसंच ग्रंथकार सांगत आहेत.

    रात्रौच्या वेळी होणारी स्रोतो संकोच ही प्रक्रिया आणि त्याचा पचनावर होणारा परिणाम पचन बिघडवणारा असतो, असे शास्त्रकारांना सांगायचे आहे. म्हणून रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ नंतर जेवू नये.

    आप्त मंडळी जे सांगतात, ते ऐकलं तर खूप गैरसमज दूर होत असतात. मी म्हणेन तेच खरं हा मोठ्ठा दोष आहे. आपल्या परंपरा काय सांगताहेत, आपण कुठे रहातोय, आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, याचा विचार आरोग्याच्या रक्षणासाठी व्हायलाच हवा. आप्त म्हणजे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली मंडळी.

    त्यांनी अनुभवलेलं, ग्रंथामधे लिहून ठेवलेलं, आम्हाला नको झालंय, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी आजची पिढी, अवांतर वाचन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, कोणी सांगितले तर विश्वास ठेवत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला पुरावा हवा असतो. बुद्धीवादी व्हावं, विज्ञानवादी व्हावं, जरूर व्हावं, पण या करीता आपले पूर्वज जे सांगत होते, त्या मागील कारणांचा आपल्या सकारात्मक बुद्धीने जरा विचार करावा.

    आपल्या आजोबांना, वडीलांना विचारावे, त्यांच्या लहानपणी, जेवणाच्या वेळा कोणत्या होत्या, जेवणातले पदार्थ कोणते होते, काही पदार्थ विशिष्ट दिवशीच केले जात होते, मांसाहार विशिष्ट दिवशीच घेतला जात होता, असे का ? हे शोधून काढले पाहिजे.

    या प्रश्नांची उत्तरे मिळवली की, आज रोग का वाढताहेत, याचेही उत्तर सहज मिळू लागेल.

    या सर्व उदाहरणावरून लक्षात येतंय की रोग वाढायचं मुख्य कारण आमचं उशीरा होत असलेलं जेवण हे आहे. बदलायचं ठरवलं तर आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो.
    औषधं कायमची बंदही होऊ शकतात
    पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि विश्वास.
    आप्तांवर, ग्रंथावर आणि स्वतःवर !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक

    जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?

    सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "

    आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?

    आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.

    या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.

    या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.

    जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !

    जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !

    दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    17.06.2017