अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग आठ
औषध घेतलं पण गुणंच आला नाही. असं बऱ्याच वेळा होतं. असं का होत असेल. काही तरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, हे शोधून काढलं की दोष निघून जातो. कोणत्याही समस्या या याच पद्धतीने सोडवायच्या असतात. ही आयुर्वेदीय दृष्टी प्राप्त व्हायला हवी.
जसं आपली एखादी टुव्हीलर सुरूच होत नाहीये, बंद पडली आहे. तिची काय काय कारणं असू शकतात, याचा विचार करतो तेव्हा पहिलं कारण इंधन संपलेलं असणं,इंधनाचा दर्जा योग्य नसणं, इंधनामधे कचरा असणं, टाकीमधे असलेलं इंधन कार्बोरेटरला न मिळणं, कार्बोरेटरमधे कचरा अडकणं, कारबोरेटरमधे एअर येणे, दुसरं, बॅटरी संपलेली असणं, अन्य पार्टस मधे काहीतरी गडबड निर्माण होणं, सायलेन्सर साफ नसणं, अशी अनेक कारणांचा विचार एकाच वेळी करावा लागतो.
घरातलं उदाहरण घेऊ, पुरणपोळी योग्य लुसलुशीत न होण्याची कारण काय असतील, याचा नीट विचार केला तर अनेक कारणांचा शोध घ्यावा लागतो. जसं चणाडाळ योग्य प्रतीची नसणं, ती नीट न शिजणं, नीट वाटली न जाणं, शिजल्यावर कटाचे पाणी नीट निथळून न घेणं, नीट न ढवळता आल्याने पातेल्याच्या बुडाला शिजलेली डाळ करपणं, दुसरं गुळ चांगला नसणं, तो योग्य प्रमाणात न घेणं, त्याचा पाक योग्य न होणं, डाळीमधे एकत्र करताना योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळी एकत्र न करणं, नीट न ढवळणं, तिसरं पीठंच चांगले नसणं, योग्य तेवढं तिंबलं न जाणं, त्या पीठात सढळ हस्ते तेल न घालणं, तिंबून झाल्यावर योग्य तेवढा वेळ जाऊ न देणं, तवा योग्य नसणं, विस्तव नीट नसणे, पोळपाट नीट नसणं, नीट लाटताच न येणं, तव्यावर पसरवणं, ती फिरवणं, परतणं,खमंग भाजल्यावर वाफ जाईपर्यंत पसरून ठेवणं, अतिरिक्त पीठ हळुवार काढून घेणं,तिची नीट घडी करून ठेवणं......इ.इ.
पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही, याची ही एवढी कारणं असू शकतात. ही अगदी वरवरची कारणे झाली, सूक्ष्म कारणांचा विचार केलेलाच नाही. इ.इ. अनेक कारणे जेव्हा लक्षात घेतली जातील, आणि ती जेव्हा दूर केली जातील, तेव्हा पुरणपोळी अगदी म न प सं त झालीच पायजे.
बरोबर ना !
अगदी हीच, अशीच कारणे, औषधं लागू न पडण्याची आहेत,
वैद्याचे निदान चुकणे, वैद्याकडून औषधाची निवड चुकणे, अनुपान सांगायला विसरणे, चुकणे, इ.
औषधे देणाऱ्या मदतनीसाकडून, औषध द्यायची वेळ चुकणे, चुकीचे औषध देणे, चुकीच्या वेळी देणे, औषध देताना विश्वासाने न देणे, वैद्याने सांगितलेले अनुपान न निवडता, स्वतःच्या मनाने त्याअनुपानात बदल करवून देणे, इ.इ.
रुग्णाने, दिलेले औषध पूर्ण मात्रेत न घेणे, अर्धे औषध वाटीत तसेच ठेवून पटकन वाटी धुवून टाकणे, गोळी घेतल्याचे नाटक करून, ती तोंडातच लपवून, चुळ भरण्याच्या बहाण्याने ती गोळी थुंकुन टाकणे, कंटाळत औषध घेणे, विश्वासाने न घेणे, "एवढी औषधे संपवली, आता ह्या एवढ्याश्या गोळीने काय होणारे" असा नकारात्मक विचार औषध घेताना मनात निर्माण होणे, इ.इ.इ.
औषधाचा दर्जा योग्य नसणे, खूप जुने (एक्स्पायर्ड) दळ गेलेले औषध वापरणे, जसे सांगितलेले आहे तस्सेच औषध न मिळणे, काही औषधांचा संग्रह हा विशिष्ट ग्रहणाच्या वेळी, विशिष्ट नक्षत्र असताना, विशिष्ट दिशेचे, विशिष्ट मंत्र म्हणून, त्या वनस्पतीला प्रार्थना करून, विशिष्ट विधी करून, तोडून संग्रहीत करायची असतात. वाळवताना सावलीत वाळवणे, कडक उन्हात वाळवणे, वाळवून झाल्यावर ती योग्य त्या ठिकाणी संग्रहीत न करणे, काही औषधे भाताच्या राशीत, काही जमिनीमधे पुरून, काही औषधे मधात बुडवून, काही औषधे लाकडी कपाटात, काही काचेच्या बरणीत ठेवायची असतात. तर काही औषधे तयार करताना सूर्य हवा, तर काही औषधे तयार करताना चंद्राचा प्रकाश त्यावर पडायला हवा, काही औषधे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हटले असता, औषधांची कार्यशक्ती वाढते, इ.इ.इ.इ.
अबबबबब एवऽढीऽ कारणे असू शकतात, याला ग्रंथकार चिकित्सेचे चतुष्पाद असा शब्द योजतात. वैद्य, परिचारक, रूग्ण आणि औषध.
पाचवे कारण दैव अनुकुल असणे वा नसणे, हा दैववाद देखील आयुर्वेद मानतो.
हे परम्युटेशन काॅम्बीनेशन, ज्याचे जुळले त्याला औषधांचा गुण आलाच म्हणून समजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
26.04.2017
जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार
काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?
बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.
भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?
औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !
येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
असो.
एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
आणि...
....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
.....
....
...
..
.
आपण जगलो पाहिजे.
विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !
हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
इलाज नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.04.2017
गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का?
गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची म्हणजेच ह्या क्षूपाची फळे होय.चवीला थोडी तिखट गोड आणी थंड अशी ही वेलची आपल्या शरीरातले वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवते.
हिचा उपयोग फक्त गोडधोड पदार्थातच होतो असे नाही तर घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो बरं का!आश्चर्य वाटले का?
चला तर मग पहायचे ना ह्या इवल्याशा वेलदोड्याचे औषधी गुण:
१)संडास मधून आव पडत असल्यास वेलचीपूड लोण्यात मिसळून द्यावी.
२)चक्कर येणे,मळमळणे,डोके दुःखी ह्यात १/२ चमचा वेलची पूड+१/२ चमचा जीरे चूर्ण+ ४ चमचे लिंबाचा रस+१ चमचा साखर हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
३)उचकी लागत असल्यास १ चमचा वेलचीची राख+ २ चमचे मध हे चाटण वारंवार चाटावे.
४)वेलचीच्या साली+रिठे पाण्यात उकळावे आणी हे मिश्रण आंघोळी पुर्वी अथवा दिवसातून २-३ वेळेस अंबाला लावावे ह्याने अंगाची खाज कमी होते.
५)खोकला येत असल्यास १/२ चमचा वेलची पूड मधासोबत मिसळून दिवसातून तीन वेळेस घ्यावे.
वेलची खाण्याचा अतिरेक केल्यास आतड्यांना अतिरिक्त चालना मिसळून पोटदूखी आणी संडासला पातळ होणे ह्या तक्रारी सूरु होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते.
मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली जाऊ शकते.
आणखी एक उदाहरण समजून घेऊया.
नीट शब्द शब्द वाचलेत तर समजेल.
जर मी माझ्या हातांचे काम वाढवले तर शरीरातील रक्त किंवा उर्ज़ा हातामधे आणली जाईल. पायांनी धावलो तर, हीच उर्जा पायात वळवली जाईल. डोक्याचे काम केले तर हीच उर्जा इतर अवयवांमधून काढून मेंदूकडे नेली जाईल, ( म्हणून जिथे उर्जा जाईल, तेव्हा इतर अवयवांमधील शक्ती तुलनेने कमी होईल, मेंदुचे काम वाढवले, अभ्यास केला, तर हातापायामधील शक्ती मेंदुकडे वापरली जाईल. हातापायामधील शक्ती तात्पुरती कमी केली जाईल. )
म्हणून पाठांतरासारखा अभ्यास पहाटेच्या वेळी करावा. मेंदुला रात्रभर रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने मेंदु तरतरीत असतो. नीट लक्षात रहाते. पण दिवसभर विचार करून मेंदु दमलेला असतो, आणि रात्री झोप येते तेव्हा जागरण करून अभ्यास केला तर काऽऽही उपयोग होत नाही. झोप येणे, म्हणजे आतून येणारा सिग्नल आहे. "आता मी दरवाजा बंद करत आहे. बाहेरचे व्यवहार बंद. आम्हाला आतील दिवसभराची सर्व पेंडींग कामे करायची आहेत." असं तो म्हणतो.
बॅन्क कशी दुपारी तीननंतर आतून बंद करून घेतली जाते. पण आतमधे बॅन्क बंद नसते. आतमधे काम सुरू असते. तसंच शरीराचं असतं. आतली कामे करायची असल्याने दरवाजा आतून बंद ! (म्हणजे झोप. )
आता पचनाचे काम आतील भागात सुरू झालेले आहे, तेव्हा हीच उर्जा पचनासाठी वापरली जाईल. म्हणजे "पेरीफेरल सर्क्युलेशन" कमी होईल. आणि "सेंट्रल सर्क्युलेशन" वाढवले जाईल. इथे सुद्धा हातापाय आणि डोक्यातील शक्ती पचन नीट होण्यासाठी आतमधे वळवली जाते. जेव्हा उर्जा आतमधे आहे, तेव्हा बाहेरची कामे कमीच करावीत.
आता एक गोष्ट लक्षात येतेय का पहा.
आज्जी सांगायची, "अरे आत्ता जेवला आहेस ना, धावतोस कसला, पोटात दुखेल. असं जेवणानंतर लगेच धावू नये "
....... म्हणून जेवणानंतर लगेच धावू नये, लगेच मोठे काम करू नये, लगेच अभ्यास करू नये. कारण असं मोठे शक्तीचे काम बाहेर सुरू झाले तर आतील पचन बिघडते.......
जेव्हा पचनानंतर उर्जा तयार होणार असते, तेव्हा बाकीची सर्व कामे थांबवली तर शरीराला आतमधे लक्ष दिले जाईल. आतले काम पूर्ण झाले नाहीतर दुसऱ्या दिवशी पुनः काम सुरू करताच येणार नाही. म्हणून इतर सर्व कामे थांबवायची ऑर्डर काढली जाते, म्हणजेच आपणाला झोप निर्माण केली जाते. बाकी सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विश्रांतीला गेली की मनाला मनसोक्तपणे आपली आतली कामे करता येतात. पोरं, नवरा शाळेत, कामाला गेली की कसं छाऽन कामं आवरता येतात. कोणाचाही अडथळा नाही.
तसं जर लवकरात लवकर पचनाचे काम पूर्ण करण्यासाठी, आपण जर लवकर जेवलो, आणि लवकर झोपलो तर पुढे तो मनसोक्त काम करवून घ्यायला मोकळा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.03.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !
किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना.
हिचा देखील बराच पसरलेला वेल असतो.वेल लावल्यापासून सव्वा महिन्यात फळे येतात.आपण खातो ते दोडके हे त्या वेलीचे फळ.हि दोडकी देखील कडू व गोड अशा दोन प्रकारची असतात.ह्यातील कडू औषधी करिता वापरतात तर गोड खायला वापरतात.
दोडके हे चवीला गोड व थंड आणी तिन्ही दोष कमी करणारे असते.आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात.
१)मुलांना अंगात ताकद भरण्याकरिता आठवड्यातून तीन वेळेस हि भाजी जेवणात द्यावी.
२)ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात उकडलेले दोडके सैंधव व जिरे पूड घालून खावे.
३)ज्या व्यक्तिंना कृमी होण्याची सवय असते त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी एक दिवस आड खावी.
४)तोंडाला रूची नसल्यास दोडक्याच्या काढलेल्या शिरा +चिमूटभर मीठ+१/२ इंच आले हे मिश्रण चावून येणारी लाळ थुंकावा व नंतर चोखोही थुंकावा.
५)शरीरातील धातूक्षीण होऊन चिडचिडे पणा व मानसिक त्रास वाढल्यास जो थकवा येतो तो कमी करण्यासाठी दोडक्याचे सूप बडीशेप ,जिरे व धणेपूड घालून त्यावर साजूक तूपाची फोडणी देऊन प्यावे.
दोडके खाण्याचा अतिरेक केल्यास संडासमधून आव पडू शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
Copyright © 2025 | Marathisrushti