माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
असो.
मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.
नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.
माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.
मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.
माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !
दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
नरो वा वानरो वा !
मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.
माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
2.10.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2
जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.
आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.
प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.
प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !
आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?
असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.
नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.05.2017
महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली.
चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे.
चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. "त्याला" फसवून काहीही करू नये. चेक पोस्ट वरून नोंद न करता एकही वाहन जाऊ नये. तसंच काहीसं आपल्या अन्नाचं असतं. ही जीभ आणि लाळ म्हणजे जणु काही सीसीटीव्हीच असतात. आत काय येणार आहे. हे त्याला आधीच समजलेले असते.
यासाठी त्याचे डोळे, कान, बोटे, नाक हे अन्य गुप्तहेर पण काम करत असतातच.
किमान 100 वर्ष जर राज्य करायचे असेल तर, केवळ एकाच यंत्रणेवर पूर्णपणे विसंबून, अवलंबून न राहाता, अन्य पूरक यंत्रणेच्या सर्व शक्तींचा पुरेपुर वापर करून घ्यावा. ही चाणक्यनीती ज्या राजाला कळते, त्याला नमो नमो करावेसे वाटते. (उगाच नाही, निवृत्त आयकर अधिकाऱ्यांना परत बोलावून घेतलेय !!! )
कोणत्या चवीला पचवायला, किती प्रमाणात, कोणते द्राव, पोटात पाहिजे, हे आधीच कळल्याने येणाऱ्या अन्नाच्या स्वागताला ही सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते.
घास इकडून तिकडून फिरवत बत्तीस वेळा चावावा असे म्हटले जाते.
......" तुमचे प्रत्येकाचे इथे वेगवेगळे काम आहे, तुमची प्रत्येकाची आम्हाला गरज आहे, वुई ऑल लव्ह यु, आम्हाला सोडून जाऊ नका." असे या बत्तीस दातांना, सूचक सांगितले तर जात नसावे.?
वाढलेल्या ताटातील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून, आचूषकाच्या ( स्ट्राॅ च्या) सहाय्याने ओढुन थेट घश्याखाली ओतले असते तर कॅलरी वाईज चौरस जेवण पूर्ण झालेच असते ना ! स्ट्राॅ ने कॅलरीज मिळतील, पण तृप्ती मिळणार नाही.
आणि अश्या ( बफेलोचं आंबोण ) पद्धतीने जेवण्याची, कल्पना सुद्धा करवत नाही. इथेच वेगवेगळ्या चवीने जेवण्याचे महत्व लक्षात येते.
त्याने दिलेल्या या सर्व यंत्रणेचा योग्य तो सन्मान आपण राखला पाहिजे. ज्याचे काम त्याच्याकडून करवून घेतले पाहिजे.
इसी मे तो मजा है !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.11.2016
शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.
हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!
चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!
१)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.
२)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.
३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.
५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही.
अ) गाईंचे दुध:
१)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे.
२)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो.
३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे थोडे प्यावे.
४)वारंवार संडास मधून आव पडून त्रस्त झालेल्या व्यक्तीला १ कप गाईचे दुध+१ कप पाणी+१/२ चमचा सुंठ घालून हे मिश्रण फक्त दुध शिल्लक राही पर्यंत उकळावे व त्यास थोडे थोडे पाजावे.
५)संडासला घट्ट होत असल्यास १ वाटी दुध+ १ मोठा चमचा तूप किंवा लोणी चपाती किंवा भाकरी सोबत खावे.
गाईचे दुध प्यायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.
आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
शिल्लक काय रहाते ?
जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
मागे साधे मीठच उरते !
जे खरंतर औषधी आहे.
आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?
आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
नंतर ???
पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.
आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.
चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.
आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
Copyright © 2025 | Marathisrushti