स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।
स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।
एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।
छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।
जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।
त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।
ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।
आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।
चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।
बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।
झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।
मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।
गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।
सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 12, 2020
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे....१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले.....२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते.....३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ....४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 15, 2019
भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...
एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।
मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।
तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।
कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।
भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 9, 2015
आघात होऊनी परिस्थितीचे,
सही सलामत सुटत असे,
संकटाची चाहूल लागूनी,
परिणाम शून्य ठरत असे ।।१।।
दु:खाची चटकती उन्हे,
संरक्षणाची छत्री येई,
कोणती तरी अदृष्य शक्ती,
त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।।
दूर सारूनी षडरिपूला,
मनावरती ताबा मिळवी,
प्रेमभाव अंगी करूनी,
तपशक्तीला सतत वाढवी ।।३।।
तपोबलाचे बनूनी कवच,
फिरत होते अवती भवती,
दु:खाचे वार झेलुनी,
रक्षण त्याचे सदैव करीती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 7, 2015
हिशोब तुजला घ्यावयाचा, मानव दरबारी थोडा,
दृष्य केले जे का येथे, मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।
अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण, ना कोणी येथे,
खरा हिशोब तोच कर्माचा, पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।
नीती अनीतीच्या चाकोरीतून, जाई कुणीतरी असा एकटा,
मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।
बाह्यांगाचे कर्म निराळे, शरिरमनाशी निगडीत ते,
अंतकर्मे आत्म्याची जाणे, बंधन त्यावरी कुणाचे नसते ।।४।।
असेल जे का सत्य तेवढे, चिटकूनी राही आत्म्यासंगे,
शरिर मनाच्या विळख्यामधूनी, सोडवूनी घेई आपली अंगे ।।५।।
क्षणात जाईल जळून सारे, देह मनाचे जे जे वेष्ठण,
सोडून मागे केवळ राही, सत्य आधारीत असे ते जीवन ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti