इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये
त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये
फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली
वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये
किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले
एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये?
शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी
गोष्ट अर्धी राहून जाईल इतकं अबोल होऊ नये
एकच आहोत आपण मनानं हेही मान्य आहे मला
स्वप्नवर्खी स्पर्शानाही इतकं कमी लेखू नये
माझी कविता माझ्याचपाशी पाकळी पाकळी मिटत गेली
क्षण निसटून जातील इतकं लज्जे, आड येऊ नये !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
नाग हा
जमिनीखाली रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात,
त्याची पूजा करतात
नागपंचमीला.
हा नाग
जमिनीवर रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फूत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात.
त्याची पूजा करतात
काल-आज-उद्या,
कायमच.
किमानपक्षीं,
निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी.
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रस्त्याने चालताना एकाकी,
स्पष्टच दिसत होत
आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण ...
त्यांच्या पायातील गुलाबी बुट
पाहिल्यावर का कोणास जाणे
हद कर दि आपने...म्ह्णावंस वाटल...
गुलाबी रंगाचा पोशाख
परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना
त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल...
कहींनी तर गुलाबी रंगाला
पर्याय म्ह्णून अगदी सहज
लाल रंगालाही जवळ केल...
गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या
काहींच्या गुलाबी गप्पा
तेंव्हा ओसंडून वाहत होत
त्यांच्या चेहर्यावरून गुलाबी हस्य...
माझ्या मनात विचार आला
ते सारं पाहून आता
आपण काय करावं
पण दुसर्याच क्षणी
माझ्या लक्षात आले
आपण तर काळा रंगाचा पोशाख
परिधान केलाय नेहमी सारखाच
निषेधाचा आज...
मनात किती आल तरी
गुलाबी पॅन्ट परिधान करणे
मला शकय नव्हते
आणि गुलाबी शर्ट मी
कालच वापरून झालो होतो
नेहमी सारखाच...
आता व्हॅलेन्टाईन डे
कसा साजरा करावा
म्ह्णून मी माझ्या
कित्येक वर्षापूर्वीच्या
गुलाबी वहया काढून वाचू लागलो
नेहमी सारखाच
त्यातील पानावर
गुलाबी नाही तर
लाळ अश्रू गाळ्त...
कवी – निलेश बामणे
आई ...!
तुझे आयुष्य म्हणजे...
आमच्या सुखी जीवनासाठी,
अनवानी पायाने...
निखाऱ्यातून ‘चालने’ होते.
दुष्काळाच्या आगीतून,
ताऊन-सुलाखून निघालेले,
चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते.
अंध्याऱ्या रात्रीतील...
शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते.
आम्हा सर्वांच्या सुखासाठी,
स्वतःच, दुःखाचे विष पिऊन,
विचारमंथनातून मिळवलेले,
कंठातील अनमोल ‘रत्न’ होते.
हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून,
मनाच्या काळजावर कोरलेले,
विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते.
आपल्या सुखी कुटुंबासाठी,
काबाड-कष्ट, उपास-तापास करून,
कणा-कणांनी घडवलेले ‘घर’ होते.
आपुलकी-जिव्हाळा-प्रेम, वात्सल्य-ममतेनी,
माणसाळलेले माणुसकीचे ‘घरदार’ होते.
बोचऱ्या थंडीतील उबीचे ‘चादर’ होते,
कोरडया विहीरीतील पाण्याचे ‘पाझर’ होते.
- ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे
☎️ मो.न. 8830800335 ====================================
Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ===================≈================
हे असेच मी बनावे..
नी असेच मी घडावे..
शब्दांनी ही रे माझ्या,
माणसासाठीच लढावे.
विष प्यावे अन शंकर व्हावे,
शब्द माझे पैगंबर व्हावे..
फकिरा लिहावी इथे साठे नी
शब्दांनीच आंबेडकर व्हावे..
आगरकर सुधारक हे दिवाने यावे,
खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे..
जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे,
कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे..
पाजावे नाथाने गाढवास काशीचे पाणी,
माणसाला माणुसकीचे दर्शन व्हावे ..
गावे तुकाने जे का रंजले गांजले
ज्ञानदेवांनी जगासाठी पसायदान घ्यावे ..
देश भक्तीची मदिरा घ्यावी,
आणि नशेत असे झिंग व्हावे.
पेटावे असे मग रक्ताने माझ्या,
क्रांतिकारक भगतसिंग व्हावे.
मातीसाठी कधीही अव्वल,
शर्थ माझ्या जिवाची व्हावी..
बघावे मी परस्त्रीस जेंव्हा
नजर माझी शिवाजी व्हावी ,,
अहिंसक गांधी यावा इथे ,
विचारांनी माझ्या शुद्ध व्हावे
षड्रिपूंशी व्हावी सुटका,
मन हे माझे बुद्ध व्हावे..
सोडून सारे द्वेष मनीचे,
सारेच प्रेमात अधीर व्हावे,..
कालिदास व्हावे शब्द काही,
काही शब्दांनी कबीर व्हावे..
एक उत्सव माझ्या कवितेचा,
मला असा भरवायचा आहे.
मलाच माझ्यामध्ये एक,
माणूस असा घडवायचा आहे...
-- लतीफ शेख सारोळकर
लातूर
8975071158
https://www.facebook.com/shaikh.latif.988
( “आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन )
दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला
मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला
सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला
उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला
गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं
चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी
कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा
आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ती समोरून आली की
अजूनही तो स्वतःला
सावरून घेतो ,
आश्चर्य वाटते ,
ती प्रत्येकवेळी
वेगळी असते ,
तो तोच असतो,
त्याचे आणि तिचे
नाते अजून अतूट आहे
खरे तर त्याच्यामध्ये
ती असतेच असते ,
नीट स्वतःकडे मनाचे
डोळे उघडून नीट बघा
इतके कळले नाही
अरे ती म्हणजे
तीच
तिला चेहरा नाही
तरी वळून वळून बघता ना
ती तीच ती
सुंदर आसक्ती........
-- सतीश चाफेकर.
सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला
आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।।
श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी
श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती
जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना.....१
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व
सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी
आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला...२
सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला
निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी
आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती
जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला...३
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार
ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी
रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला....४
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti