नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..
April 7, 2020
आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या.
March 8, 2022
ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी रुजवणारे ‘नवल रंगभूमी’ संस्थेचे संस्थापक, पत्रकार नरेंद्र बल्लाळ हे बालरंगभूमी या संघटनेचे अध्यक्ष असताना ९० साली त्यांनी पुढाकार घेऊन ठाण्यात एकदिवसीय बालरंगभूमी संमेलन आयोजित केले होते. बालरंगभूमी ही संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न होती. त्यामुळे साहजिक या संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मुख्य सहभाग होता. या संमेलनाला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष राजाराम शिंदे आणि त्यावर्षीच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष शाहीर साबळे उपस्थित होते. या बालनाट्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कलाकार माधव वझे होते, तर उद्घाटक होते महाराष्ठ्र राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अरुण गुजराथी. ठाणे शहराचे तत्कालिन महापौर मोहन गुप्ते हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. सहयोग मंदिर येथे भरलेल्या या संमेलनात परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित केले होते.
उद्घाटनाचे भाषण करताना अरुण गुजराथी यांनी ‘बालनाट्य आणि बालरंगभूमीचे महत्त्व मी जाणतो, नवीन अभ्यासक्रमात बालनाट्याला स्थान मिळवून देण्यासाठी मी स्वत तुमच्या सोबत प्रयत्न करेन. तसेच किमान महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये बालनाट्याला सवलत मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू या,’ असे उद्गार काढले होते. ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका बहारदारपणे करून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारे आणि पुणे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले माधव वझे या पहिल्या बालनाट्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. या संमेलनाच्या मंचावरून बोलताना माधव वझे म्हणाले, ‘बालनाट्य म्हणजे काही घटकाभरची करमणूक नाही, तर मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी, त्यांच्या जीवनाची कक्षा रुंदावणारी ती एक चळवळ आहे. याचे भान पालकांनी ठेवायला हवे. आजच्या पालकांना आपला मुलगा टीव्हीच्या पडद्यावर चमकावा एवढीच अपेक्षा असते. पण केवळ टीव्हीवर दिसल्याने मुलाची प्रगती होत नाही, तर टीव्हीच्या तंत्रातील काय-काय गोष्टी तो आत्मसात करतो, आपल्या नाटकातल्या भूमिकेशी तो किती एकरूप होतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. कुठेतरी चमकण्यासाठी बालनाट्याचा वापर हे चुकीचं समीकरण आहे.’
या बालनाट्य संमेलनात ‘पाठ्यपुस्तकात बालरंगभूमीचे स्थान’ या विषयावरील परिसंवादात मूक-बधीर मुलांसाठी काम करणाऱ्या कांचन सोनटक्के म्हणाल्या, ‘बालरंगभूमी या विषयाचे ज्ञान शिक्षकांना होण्यासाठी त्यांची शिबिरे घेतली पाहिजेत, तसेच या विषयासाठी काही तासिका राखीव ठेवल्या पाहिजेत. रंगभूमीचा विचार करताना नृत्य, नाट्य, कला या सगळ्यांचा विचार व्यापक करायला हवा. मुलांना शिकविण्याची भूमिका न घेता, शिक्षकांनी त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व दिले पाहिजे. एखाद्या संहितेवर अवलंबून न राहता पाठ्यपुस्तकातील धड्याचेच नाट्यरूपांतर करावे. यामुळे धड्याचे आकलन चांगल्या प्रकारे होईल.’
राजीव तांबे म्हणाले की, ‘मुलांच्या सूचनांचा शिक्षकाने आदराने विचार करावा. केवळ तो विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना नाटकाविषयी लिहितं, बोलतं, पाहतं करणं हे आवश्यक आहे. मुलांमधील कलागुण ओळखून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तर मुले अधिक तन्मयतेने काम करतात. प्रत्येक मुलगा नट असेलच असं नाही, पण आजचा बालक हा उद्याचा सुजाण प्रेक्षक आहे याची जाण पालकांना असावी.’
परिसंवादाचा समारोप करताना नाडकर्णी म्हणाले, ‘नाट्य ही जिवंत गोष्ट आहे, याचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. धड्याचे नाट्यरूपांतर केल्यानं मुले एकाच गोष्टीचा विचार अनेक प्रकारे करू शकतात. नाट्याविष्कार करताना जर त्यांच्यावर शिक्षकांचे दडपण नसेल तर ती अधिक जबाबदारीने वागतात.’
‘बालनाट्य निर्मिती’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष होते ‘नवशक्ती’चे संपादक, नाटककार आत्माराम सावंत आणि या परिसंवादात सहभागी झाले होते बालनाट्य निर्माते राजू तुलालवार, जयवंत देसाई आणि विजयकुमार जगताप. यावेळी बालनाट्य निर्माते म्हणून आपली बाजू मांडताना तुलालवार म्हणाले, ‘मला बालनाट्य निर्माता व्हावं लागलं ही माझी शोकांतिका आहे. मी लिहिलेली बालनाट्ये दर्जेदार असूनही रंगमंचावर आणणारा निर्माता मिळेना म्हणून मी नाट्यनिर्माता झालो. बालनाट्य निर्मात्यांपुढे अनेक अडचणी कायम उभ्या असतात. शाळा बालनाट्यांनी आश्रय देत नाहीत, तालमींसाठी जागा मिळत नाहीत, नेपथ्य आणि रंगभूषा खर्चिक असते, शिवाय थिएटरचे भाडे परवडत नाही. त्यामुळे आम्ही कलाकारांना मानधन देऊ शकत नाही. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी थिएटरच्या तारखा मिळवणे जिकिरीचे आहे. गडकरी रंगायतन वगळता इतर थिएटरवाले बालनाट्याला व्यावसायिक नाटकांच्या तागडीतच तोलतात. शिवाय पालक बालनाट्याकडे आपल्या मुलाला टीव्हीची संधी देणारं प्रवेशद्वार म्हणून पाहतात.’
या चर्चेचा समारोप करताना आत्माराम सावंत म्हणाले, ‘आत्तापर्यंत जी बालनाट्ये यशस्वी झाली ती त्यातील नाट्य वस्तूमुळेच. प्रसिद्ध नट, प्रसिद्ध लेखक यापेक्षाही मुलांना आकर्षित करते ती रंजक कथावास्तू. मुलांना फसवणे सोपं नसतं, तसेच नेपथ्यात वास्तवतेपेक्षा सूचकता हवी. सूचकतेमुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते.’
या संमेलनात पुढील ठराव मंजूर झाले : दूरदर्शनवरील ‘नाट्यधारा’ या कार्यक्रमात बालनाट्यांचा समावेश असावा, प्रत्येक जिह्यात बालरंगभूमीसाठी एक थिएटर असावे, तसेच किमान तालमींसाठी तरी जागा उपलब्ध व्हावी, बालनाट्यांना नाट्यगृहे सवलतीच्या दरात मिळावीत, वृत्तपत्रांच्या जाहिरातींच्या दरातही बालनाट्यांना सवलत मिळावी.
या संमेलनाचा समारोप करताना बालरंगभूमी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बल्लाळ म्हणाले, ‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे संमेलन झाले असून, त्यानिमित्ताने बालरंगभूमीकडे पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले जाईल आणि बालरंगभूमीला नवी दिशा मिळेल अशी आशा मात्र या संमेलनाने निर्माण केली आहे.’
बालरंगभूमीच्या चळवळीत ठाण्याचा सहभाग नेहमीच आघाडीचा राहिला आहे. गेली तीन दशके सातत्याने महाराष्ट्रातला एकमेव बालनाट्य महोत्सव ठाणे महापालिकेकडून साजरा केला जातो. त्याच ठाणे शहरात महाराष्ट्रातले पहिले बालनाट्य संमेलन भरले हेते, याचे विस्मरण होऊ नये म्हणून ही आठवण!
September 19, 2022
पहिल्यांदाच एकटं राहायची वेळ होती तिची. ती भुता-खेतांवर विश्वास ठेवणारी होती.मला फारच हसायला आलं हे ऐकून.आणि झालं अस की, इथे wooden flooring असल्यामुळे आणि थंड वातावरणामुळे ते कर् कर् अस वाजत असायचं.
January 26, 2022
सरांना पुण्यात कोथरुड येथे येऊन चार वर्षे झालेली आहेत. सरांच्या रोजच्या पोस्ट वाचणारे वाचक असंख्य आहेत, मात्र ती वाचून व्यक्त होणारे, बोटांवर मोजण्याइतकेच.. ही खंत कुलकर्णी सरांनी अनेकदा फेसबुकवर व्यक्त केली.. आता मी लेखन बंद करणार असेही जाहीर केले.. अशावेळी अनेकांनी पोस्ट लिहिणं बंद करु नका, अशी विनवणी केली.. सरांनी पोस्ट लिहिणं चालू ठेवलं…
May 26, 2022
रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला रमेश दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! सिगारेट आणि केरळ मध्ये पॉप्युलर असलेली कळ्ळ ( माडी) चा शौकीन असलेला रमेश रंगात आला की रजनीकांत चे डायलॉग ऐकवायचा. त्यातल्या त्यात “शिवाजी” मधला रजनी त्याचा आवडता.
खरेतर त्याने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.टेक. केले होते. ‘अण्णा युनिव्हर्सिटी’ ही तामिळनाडू मधील एक नामवंत युनिव्हर्सिटी आहे. बी.टेक. मध्ये सेकंड क्लास असल्यामुळे त्याने एम.टेक. करायचे ठरवले. एम.टेक. ला एडमिशन साठी ६० टक्के गुण असणे आवश्यक होते परंतु शासनाकडून मिळणाऱ्या सवलती मुळे त्याला त्यात सूट मिळाली होती. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मुळे त्याला सारी फी पण माफ होती. मूळचा हुशार असणाऱ्या रमेश मध्ये बेफिकीरपणा होता. एम.टेक. करताना पण तो तेवढासा सिरीयस नव्हता. कधी कधी तो, बारावीला त्याला मॅथ्स मध्ये शंभर पैकी शंभर गुण पडले होते आणि बी.टेक. करत असताना तो बॅच मेट्स ना कसे मॅथ्स शिकवायचा याचे किस्से ऐकवायचा! तामिळनाडू मधून तो केरळ मध्ये शिकण्यासाठी आला होता खरा पण मल्याळी लोकांबद्दल त्याचे काही चांगले मत नव्हते! इथले शिक्षक मुद्दामहून आपल्या असाईनमेंट्सना कमी मार्क्स देतात ही तक्रार तो बऱ्याचदा ऐकवायचा!
“यु विल नॉट फेस एनी प्रॉब्लेम दिनेशभाई, यु आर अ सन इन लॉ ऑफ केरला… दिज पीपल विल गिव्ह यू गुड मार्क्स!” एकदा तो मला म्हणाला होता!!
एम. टेक. चा कोर्स बऱ्यापैकी प्रॅक्टिकल वर आधारित होता. प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा पण व्हायची. महाराष्ट्रात एम.टेक. च्या कोर्स मध्ये अशी प्रॅक्टिकल ची परीक्षा होताना कधी मी पाहिले नाही! तेथील प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची पद्धत इतर कॉलेजेस पेक्षा वेगळी होती. आम्हाला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन तीन चार तासांसाठी लॅब मध्ये सोडून दिले जायचे. इंटरनेट बंद केलेले असायचे आणि अधून मधून सर फक्त फेरी मारायचे. डिग्री प्रोग्रॅम ला घेतली जाते तशी कुठलाही एक्सपरिमेण्ट करून दाखवायची ती परीक्षा नव्हती!
त्या दिवशी “डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग” या विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा होती या विषयाची धास्ती सगळ्यांनीच घेतलेली असायची. याच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार फिल्टर डिझाईन करून त्याचा कोड (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम) लिहून तो कोड डीएसपी प्रोसेसर वर इम्प्लिमेंट करावा लागायचा आणि नंतर त्याला इनपुट सिग्नल देऊन मिळालेले आउटपुट हे दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार आहे की नाही ते दाखवावे लागायचे. नऊ जणांच्या बॅचमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असायचे त्यामुळे कोणी कोणाची कॉपी करेल हे शक्य नसायचं आणि दिलेल्या वेळेत आपले काम पूर्ण करणे हे ही महत्वाचे होते त्यामुळे कुणी कुणाला मदत करायच्या फंदात पडायचे नाही!
रमेश एक्झाम साठी गेल्यानंतर त्याला जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालं तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं की त्याच्याकडून हा प्रोग्रॅम लिहिणे काही होणार नाही! त्याच्या बॅचच्या नऊ स्टुडंट्सची परीक्षा सकाळच्या सत्रात होती आणि दुपारच्या सत्रामध्ये बाकीचे नऊ स्टुडंट्स येणार होते. त्यामध्ये त्याचा रूम पार्टनर पण होता. लॅब मध्ये कुणी सुपरवाझर नाही आहे हे बघून रमेशने त्याच्या पार्टनरला मोबाईल वरून प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवले आणि प्रोग्रॅम लिहून पाठवायला सांगितले! इकडे रूमवर त्याचा पार्टनर दुपारी परीक्षा असल्यामुळे अभ्यासात गर्क होता रमेशला प्रोग्रॅम लिहून पाठविण्यात त्याचा वेळ वाया जाणार होता. त्यामुळे त्याने त्याला मेसेज पाठवून दिला की त्याला काही हा प्रोग्राम लिहायला जमत नाही त्यामुळे तो पाठवत नाहीएय.
त्याचा मेसेज वाचून रमेश ची उरली सुरली आशा संपली! रमेशने पार्टनरला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या, पण तो काहीच करू शकत नव्हता! त्याच्याकडे आता करण्यासारखं काहीच उरले नव्हते. त्या दिवशी भारताची कुठलीतरी वन डे मॅच सुरू सुरू होती. प्रोग्रॅम लिहिणे जमत नाहीएय निदान क्रिकेटचा आनंद तरी घ्यावा म्हणून रमेश क्रिकेटचा स्कोअर बघायला लागला. तो स्कोअर बघण्यात गर्क असतानाच नेमके सर लॅब मध्ये आले. मोबाईल मध्ये डोळे घालून बसलेल्या रमेश कडे बघून त्यांनी त्याचा मोबाईल मागून घेतला.
“सार, आय एम नॉट कॉपिंग सार” रमेश त्याच्या टिपिकल तामिळ चा प्रभाव असलेल्या इंग्लिश मध्ये म्हणाला.
“आय नो, यु आर नॉट कॉपिंग बट लेट मी सी युर मोबाईल” पर्यवेक्षक म्हणाले.
“आय वोज जस्ट चेकिंग स्कोर सार” रमेश म्हणाला.
“ओके, बट गिव्ह युवर मोबाईल”
“येस सार, यु कॅन सी सार” असे म्हणून रमेश ने सरांकडे मोबाईल दिला.
मधल्या काळात इकडे हॉस्टेलवर त्याच्या पार्टनरला काय वाटले कुणास ठाऊक, आपली तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी रमेशने पाठवलेला प्रॉब्लेम सोडवला आणि आता सोडवला आहेच तर रमेश ला मेसेज पाठवूया म्हणून त्याने तो प्रोग्रॅम रमेशला पाठवूनही दिला!
सरांनी रमेश चा मोबाईल घ्यायला आणि त्याच्या रूमपार्टनर चा मेसेज यायला एकच गाठ पडली. त्यावेळी व्हाट्सएप नव्हते. SMS वरच बोलणे व्हायचे. मोठा मेसेज असेल तर तो तुकड्या तुकड्यात येई. प्रोग्रॅम मोठा असल्यामुळे सरांच्या हातातल्या मोबाईल वरचे मेसेज थांबत नव्हते!
सरांनी शांतपणे मोबाईल रमेश च्या समोर धरून विचारले
“रमेश, व्हाट इस धिस? कुड यु एक्सप्लेन?”
ते सारे मेसेज पाहून रमेश चा चेहरा बघण्यालायक झाला होता!
त्या परीक्षेत त्याचा ‘निकाल’ लागला हे सांगायला नको. तो अर्थातच नापास झाला. कालिकत युनिव्हर्सिटी च्या नियमाप्रमाणे कोणत्याही विषयात एकदा नापास झाले की पुढच्या प्रयत्नात कितीही मार्क्स मिळाले तरी “पास क्लास” मिळतो. त्यामुळे त्याला एम.टेक. ला पण पास क्लास वर समाधान मानावे लागले.
त्या दिवशी संध्याकाळी, ‘आधी नाही म्हणून नंतर प्रोग्रॅम का पाठवला’ या कारणावरून त्याची आणि पार्टनर ची चांगलीच जुंपली. रमेश च्या मते सारी चूक त्याच्या रूम पार्टनर ची होती! त्याच्या मते पार्टनरने अगोदर ‘नाही जमणार’ असा मेसेज पाठविल्यामुळेच तो बिनधास्त मोबाईल वर स्कोर बघत होता. त्याच्या मते अगोदरच जर पार्टनर ने त्याला ‘पाठवतो’ असे सांगितले असते तर तो सतर्क राहिला असता! अर्थात त्याच्या या लॉजिक ला पार्टनर कडे उत्तर नव्हते!
- श्रीस्वासम
May 27, 2020
हा एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग. गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने गांवमामा झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ …..
September 5, 2013
कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडलाकालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या.
October 17, 2013
राजेश खन्नाच्या ‘रोटी’ने सर्वत्र रौप्यमहोत्सव साजरे केले. त्याच दरम्यान त्याला एक सहा फुटी लंबू भेटला व ‘परवरिश’ चित्रपटाची निर्मिती झाली या लंबूशी त्याची ‘केमिस्ट्री’ जुळली व पुढील त्याचे सलग आठ चित्रपट, सुपरहिट झाले. तो निर्माता-दिग्दर्शक म्हणजेच, ‘लाॅस्ट ॲण्ड फाऊंड’ स्टोरीचा हुकमी किमयागार मनमोहन देसाई!!
March 1, 2022
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते.
August 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti