नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कॉफी चा स्वर्ग ......
तसे पहिले तर व्हिएतनाम भरपूर मोठे राष्ट्र आहे त्यामुळे छोट्या सुट्टी मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिएतनाम बघणे नक्कीच शक्य नाही, तर मागे आपण व्हिएतनाम ची मुंबई पहिली तर आज बघुयात दिलवाले का शहर दिल्ली म्हणजेच व्हिएतनामचे राजधानी हनोई ची, जर तुम्ही पर्यटक असाल तर हनोई तुमच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर असायला हवे.
आपल्या परंपरेची ओळख जपणारे आणि त्यात आधुनिकतेचा मेळ घालणारे हे शहर, १८७३ मध्ये फ्रान्स नंतर १९४० च्या दशकात जपानचे अधिपत्य आणि मग पुन्हा फ्रान्स असे करत करत १९४५ मध्ये स्वतंत्र उत्तर व्हिएतनाम ची राजधानी आणि त्यानंतर १९७६ मध्ये जेव्हा कंमुनिस्ट पार्टी ने सैगोन वर आपली सत्ता स्थापन केली तेंव्हा हनोई संपूर्ण व्हिएतनाम ची राजधानी बनले. इथे म्हणून तुम्हाला फ्रेंच कॉलनी त्याच बरोबर चिनी , जपानी ह्यांचा प्रभाव मिळतो. ह्या प्रभावामुळे एक पर्यटक म्हणून तुम्हाला इथे भरपूर सन्मान मिळतो.
हनोई हि फक्त देशाची राजधानी नसून ती पर्यटक राजधानी सुद्धा आहे, इथे तुम्हाला अनेक प्रकारचे खानपान पासून तर फिरण्याची ठिकाणे सगळे अनुभावाला मिळते. पण जर तुम्ही इथे आलात नाही कॉफी पिली नाही तर नक्कीच तुमची ट्रिप अपूर्ण ... इथे तुम्हला अनेक प्रकारच्या कॉफी चा अनुभव घेता येईल जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल तर इथे कोल्ड कॉफी मिळेल आणि थंडी मध्ये गरम , पण एक मिळणार भन्नाट प्रकार म्हणजे एग कॉफी .... काय झाले.. अचानक शॉक खरंच इथे अंडे घातलेली कॉफी मिळते , पण ह्याचा अर्थ तिची चव बिघडते असे नाही पण एक वेगळी जिभेवर रेंगाळणारी चव अनुभवायला मिळते, तुम्हाला जर बंधने नसतील तर हा प्रकार एक मस्ट ट्राय ... नॉर्मल कॉफी जर घरी नेणार असाल तर ब्लु माउंटन आणि रेडी मेड कॉफी मध्ये ३ इन १ नक्की घ्यावी.
हनोई तसे हो ची मिन्ह पेक्षा लहान असून तुम्हाला साधारण एकदिवसात पूर्ण हनोई बघता येऊ शकते त्यासाठी तुम्ही हनोई सिटी टूर ची बस घेऊ शकता , लंडन मध्ये असण्याऱ्या डबल डेकर पण वरचा भाग मोकळी असणारी बस इथे दिवसभर चालू असते, तिचे भाडे साधारण ७०० रुपयांपासून सुरु होते.
तुम्ही हनोई मध्ये राहणार असाल तर आणि तिथला रंगीत पर्यटनाचा अनुभव घेणार असाल तर होअन किएम (ओल्ड क्वाटर्स ) मध्येच हॉटेल घ्या आपल्या बजेट नुसार तुम्हाला इथे भरपूर पर्याय मिळतील, जवळपास ५० छोट्या छोट्या गल्ल्याने नटलेला हा परिसर एक वेगळा अनुभव देतो खास करून तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी इथे असलेल्या लावला नक्कीच भेट द्या, सिटी टूर च्या बसेस तुम्हाला इथून मिळतील. इथे प्रत्येक स्ट्रीट वर तुम्हाला एक प्रकारच्या वस्तू अशाने विभागलेले दिसून येईल. इथे चालत फिरले तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी बघता येतील पण फिरताना आपले हॉटेल कुठे आहे हे मात्र नक्कीच लक्ष्यात ठेवावे. शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंत लागण्याऱ्या नाईट मार्केट मध्ये नक्कीच जावे, तुम्हाला इथे इथल्या अनेक भेटवस्तु अतिशय स्वस्तात मिळू शकतात आणि इथे सुद्धा तुम्ही मोलभाव करू शकता.
होअन किएम च्या जवळच साधारण ३ किमी अंतरावर टाय हो (वेस्ट लेक) नावाची जागा आहे तिथला सूर्यास्त तर एकदम अवार्णिनीय , संध्याकाळी निळया आकाशात गुलाबी जांभळा रंगाची छटा जणूकाही एखाद्या कॅन्वाह्स वर एखादा चित्रकाराने काढलेले चित्र वाटते. संध्याकाळी मस्त वेस्ट लेक च्या काठी एखाद्या कॉफी शॉप मध्ये बसून सूर्यास्तचा अनुभव हा नक्कीच घेण्यासारखा आहे.
हनोई मध्ये वन फुक नावाचे एक छोटे खेडे आहे , आधी ते खेडे होते पण आता ते शहराच्या भर वस्तीमध्ये असून जर तुम्हाला सिल्क घ्याचे असेल तर हनोई मध्ये इतरत्र ना घेता इथूनच घ्यावे, हनोई मध्ये तसे फिरण्यासाठी पपेट थिएटर , हो ची मिन्ह मेलोसुईम, डाँग शून मार्केट, ह्याच बराबर जर तुम्हाला एखादा चांगला औभाव हवा असेल तर इथे टाइम्स सिटी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या मत्स्यालयाला नक्कीच भेट द्या इथे असणारे शो बघ्यासारखे असतात, लहानमुलांसाठी तर नक्कीच.
हॅनाइ आणि हो ची मिन्ह च्या खाण्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही पण इथे थंडी, पाऊस , उन्हाळा हे सगळे ऋतू असल्यामुळे आपल्या थंड पासून गरम पदार्थांची चव अनुभवायला मिळते, आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर हनोई मध्ये अन चाय म्हणून अनेक शाकाहारी हॉटेल मिळतील, आणि नक्कीच तुम्हाला व्हिएतनामीस शाकाहारी आवडेल.
हनोई ला भेट द्यायची असेल तर सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि फेंब्रुवरी ते एप्रिल हा काळ उत्तम. डिसेंबर जानेवारीत इथे थन्डी असते त्यामुळे जर तेंव्हा येत असाल तर गरम कपडे सिबत ठेवावेत. हनोई पासून जवळच हालॉंग बे , सपा, निन्ह बिन्ह , बा वि उद्यान हे असे अनेक ठिकाणे असून त्याबद्दल आपण पाहुयात पुढच्यावेळात ......
-- यशोदीप भिरूड
जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो.
सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे.
एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे. ही पिके येऊ लागताच, आम्ही आमच्या व्यायामाची घोडदौड त्या दिशेने घेऊन जात असु. व सकाळच्या प्रहरी, शांत वातावरणात, कुणीही बघत नाही याचा कानोसा घेत,चक्क तेथे तारे खालून शिरुन शेतात जात असू. ते पिक आमच्या पोटाच्या क्षमते प्रमाणेच खात असू. आनंद घेत असू. ज्यांमध्ये इतर भावना, जसे भय, निर्लजापणा, दुसऱ्याचे पिक हडपणे, हे सारे बाल सुलभ दुर्गुण भरलेले होते. आज जेव्हा त्या आठवणी येतात, थोडीशी गम्मत वाटते, थोडीशी खंत वाटते. परंतु वयाचे पांघरुण त्या घटनावर चांगलेच आच्छादले जाऊन, दिलासा देत दुर्लक्ष करण्यास सांगते.
शाळेचे पटांगण हे अतिशय सुलभ, योग्य, असे साधन त्या काळांत आम्हास मिळाले होते. जेथे आम्ही मित्र मंडळी खेळत असू. एक घसरगुंडी होती. सुरपारंबा, आम्ही खेळत असू. घरांत दिलेली रींग, बॉल, बँट, रँकेट, शटल फुल, फुटबॉल हे सर्व सामान्य खेळ होते. क्रिकेट त्या काळी तेथे नव्हते. विटी दांडू हे खेळ होते. मारुतीनेच मला सायकल चालवण्याची कला व बँलेंस शिकवले.
आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. नंतर जस जसे आम्ही पुढील वरच्या वर्गांत जाऊ लागलो, शाळेलाही वरचावर्ग स्थापन करण्याची शासकीय मान्यता मिळत गेली. आज तर ती संस्था फार मोठी झालेली कळते. चंपावती शाळेच्या व्यवस्थापनेत नवीन शिक्षकांची भरती होतच होती. शाळेच्या संस्थापनेच्या संबंधीत कांही शिक्षक मंडळी होती. माझ्या माहितीप्रमाणे व आज मला आठवते, ते होते, श्री. ना. के. महाशय गुरुजी. ते ही आम्हास शिकवायचे. तसेच घारपुरे गुरुजी, पांडे गुरुजी. तेथेच नवीन गुरुजी त्यावेळी आले ते मुकुंद घनशाम कुलकर्णी. ते सोलापुरचे होते. एका शब्दांत जर टिपणी करयची, तर खऱ्या अर्थाने माझ्या संपुर्ण शैक्षणिक क्षेत्रामधील अतिशय उत्तम, आदर्शवादी, शिक्षक म्हणून मी त्याना प्रथम प्राधान्य देईन. जीवनाची इमारत जर पायावर आधारीत असते, तर माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया जबरदस्त पक्का व मजबुत बनविताना श्री. मुकुंद घनशाम कुलकर्णी गुरुजींचा प्रमुख सहभाग त्यांत होता. त्यानी पुस्तकी ज्ञान, अभ्यास क्षेत्र, व्यायाम, ह्या प्रांतामध्ये शिक्षकी मार्गदर्शन केले. तसेच ते सतत जीवन म्हणजे काय, जीवनाला कसे सामोरे जावे, जीवनातील यश मिळवणे हेच कोणतेही शिक्षण घेण्याचे सार असते. ध्येय असावे लागते हे सांगत. अनेक सामान्य विषयांची चर्चा करीत. आमच्या विकसीत होऊ पाहणाऱ्या बुद्धीला सतत चालना व चैतन्य देत असत. अनेक छोटी छोटी उदाहरणे, सांगुन थोरा मोठ्यांच्या यश्स्वी जीवनाच्या कथा वर्णन करीत. अभ्यास, ज्ञान, आणि जीवन या तिन्ही गोष्टी यशस्वी करण्यावर त्यांचा भर होता. अनेक वेळा सांज समयी ते फिरावयास जायचे, त्याच वेळी मारुती व मी ती वेळ हेरुन त्यांच्या बरोबर जात होतो. त्यांच्या सहज वा सामान्य बोलण्यातच आम्हाला कित्तेक विषयांच्या गम्मती कळत असते. एक प्रेमळ गुरु शिष्य नाते होते. शाळेमध्ये त्यानी अनेक नव्या नव्या योजना राबवल्या. मारुती व मी, आम्हा दोघाना ते विशेष महत्व द्यायचे. आम्ही पण सारे मन लाऊन ती कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. दोन योजनांचा मी प्राथमिकतेने उल्लेख करु इच्छीतो.
शाळा तशी खुपच लहान होती. परंतु त्यानी तीचे नांव बीडच्या परिसरांत व जिल्ह्यांत दुरपर्यंत नेऊन ठेवले. त्याच शाळेत त्यानी ज्ञान विकास ह्या नावाचे हस्त लिखीत मासिक सुरु केले होते. मासिक फक्त विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यानीच चालविलेले हेते. सारी सकल्पना कुलकर्णी गुरुजींचीच. सर्व विद्यार्थ्याना लेखनाची गोडी निर्माण करणे हा प्रमुख हेतू. मला म्हणजे भगवान ह्या विद्यार्थ्याला “ संपादक ज्ञान विकास “ म्हणून निवडले गेले.
आज ज्येष्ठ वयाच्या वळणावर, त्या घटनेबद्दल खूप आनंद व समाधान वाटते. त्या क्षणी मला फक्त आनंद वाटला होता. कारण समाधानाचा संबंध योग्यतेशी, क्षमतेशी असतो. आणि त्याचे तसे विश्लेशन, त्यावेळी कसे असणार. अर्थात “न धरी शस्त्र करी मी “ ह्या भगवंताचा वचनाप्रमाणे कुलकर्णी गुरुजी सतत पाठीशी होते. सर्व विद्यार्थ्याचे लेख कविता जमाकरणे, वाचून संपादन करणे, चांगला वा वाईट म्हणून त्यावर टिपणी करणे, हे काम मजवर सोपविले होते. शेवटी कुलकर्णी गुरुजी त्यावर मत देऊन लेख निकाली काढीत. सर्व लेख श्री कुलकर्णी गुरुजीनी स्वतःहाच्या हातानेच लिहीले होते. त्याकाळी छपाई करणे हे मार्ग फार दुर्मिळ होते.
ज्ञान विकास हस्त लिखीत मासिक संपादक भगवान नागापूरकर वर्ग ८ वा. आज त्याची खुप गम्मत वाटते. येथेच माझी एक फजीती झाल्याची आठवण येते. माझा मित्र मारुती याने एक लेख लिहून मासिकासाठी दिला. त्यानी नांव दिले होते “ मुऱ्हाळी “
मला त्याचाच अर्थ माहीत नव्हता. त्याचा बोध मला झाला नाही. ते सारे क्षुल्लक समजुन मी तो ‘अस्विकृत” अशी टिपणी करुन बाजूस टाकला. सर्व लेखांचा गठ्ठा मी कुलकर्णी गुरुजीकडे दिला. दोन दिवसानंतर तोच गठ्ठा मला परत देण्यांत आला. माझे लक्ष वेधले गेले ते मारुतीच्या मुऱ्हाळी ह्या लेखावर. गुरुजीनी लाल शाईने पहील्या पानावर लिहीले होते
“ उत्तम लेख प्रथम क्रमांक “ मी खजील झालो. कुलकर्णी गुरुजीनी मला बोलाऊन सांगितले. “ मुऱ्हाळी ही भावनिक व्यक्तीरेखा आहे. हा प्रेमळ भाऊ असतो. तो आपल्या लग्न झालेल्या बहीणीकडे जातो. तीला दिवाळीसाठी तीच्या माहेरी म्हणजे आई वडीलांकडे घेऊन येण्याचा प्रचत्न करतो. हा अतिशय भावनापुर्ण व प्रेमळ प्रसंग असतो. मारुतीने त्यावरच बहीण भाऊ प्रेमाचा नैसर्गिक धागा धरुन, सुंदर प्रकाश झोत टाकला. तु पण असेच लिहीत जा. “
मारुतीचे हेही वेगळे स्वरुप माझ्या ध्यानी आले. त्यावेळी मला माझ्या विषयी खंत व लज्जा वाटू लागला. मारुतीने दिलेल्या शिर्षकाचे मुऱ्हाळी या शब्दाचे अवलोकनच झाले नव्हते.
गुरुजीनी दुसरी अशीच योजना फार यशस्वी केली. त्याच शाळेंत प्रदर्शन भरऊन. मारुतीला ह्या योजनेमध्ये प्रमुख केले गेले होते. त्याच्या बरोबर आम्ही आठजण इतर मित्र मंडळी होतो. गुरुजींचे मार्गदर्शन होते. मारुती सारी योजना कामे आमच्याकडून करऊन घेत असत. चित्रकला, हस्तकौशल्य, वैज्ञानीक प्रयोग, अनेक चित्र विचीत्र गोळा केलेले पदार्थ, रांगोळ्या, दैनंदीन जीवनामधील प्रात्यक्षीके, ईत्यादी अनेक अनेक दालनानी त्या प्रदर्शनांत खपच भव्यता, दिव्यता आणली होती. मारुती व मी दोघेही, त्या प्रदर्शन निर्मीती मध्येखुपच प्रयत्नशील व यशस्वी ठरलो. अर्थात कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.
पुढचा भाग पुढील अंकात---
डॉ. भगवान नागापूरकर
मैत्री फक्त माणसा-माणसांमध्येच असते असे नाही तर मनुष्य आणि प्राणी यांचीही मैत्री असू शकते. ही मैत्री इतकी जीवापाड होऊ शकते प्रसंगी तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या मैत्रीसाठी काय करतील याचा नेम नसतो. एका अरबाला घोडेस्वारीचे अतिशय वेड होते. मात्र तो खूपच गरीब ०८००० घोडा विकत घेण्याची त्याच इच्छा तशीच राहिली होती. शेवटी १-१ जमा करून त्याला अखेर मनासारखा घोडा मिळाला. त्याच्यावर तो अगदी मित्रासारखे प्रेम करू लागला. त्याचा रोज खरारा करी, चांगले चुंगले खायला देई आणि मग रपेट मारून येई. घोड्यालाही तो अरब म्हणजे मालक थोडा जरी दूर राहिला तरी करमत नसे. काही दिवसांनी त्या अरबाची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची झाली. घोड्याला पहिल्यासारखे आपण चांगले खायला देऊ शकत नाही याची खंत त्याला टोचत होती. तशातच तो अरब घोड्यावर बसून एकदा बाजारात गेला असता तेथील एका सौदागराला त्याचा घोडा आवडला. त्यामुळे त्याने घोड्याची किंमत विचारली. अरबाने प्रारंभी घोडा विकणार नाही असे सांगितले. त्यावेळी त्या सौदागराने तू मागशील ती किंमत देईन असे त्याला सांगितले. अरबाला वाटले नाही तरी आपण या घोड्यास चांगला दाणापाणी घालत नाही. त्या बिचार्या घोड्याला या सौदागराकडे चांगले खायला तरी मिळेल. घोड्यावरील मैत्रीपोटीच त्याने त्याला विकण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सौदा झाला. घोड्याची किंमत म्हणून त्याने मागितलेल्या मोहरा सौदागराने अरबाला दिल्या. निरोप घेण्यासाठी म्हणून अरब मोहरांची थैली घेऊन आपल्या घोड्याजवळ आला. पाहतो तो घोड्याच्या डोळ्यांतून असू ओघळत होते. ते असू पाहून अरबाला खूप वाईट वाटले. त्याचक्षणी तो त्या सौदागराकडे परत गेला व मोहरांची थैली त्याला परत करून त्याने सौदा रद्द केला. माझा जीव गेला तरी चालेल पण हा घोडा मी विकणार नाही, असा निर्धार करून तो घोड्याजवळ परत आला. त्याला पाहताच घोडाही आनंदाने फुरफुरला. दृढ मैत्रीमुळे ते पुन्हा एकत्र आले होते. त्या आनंदातच अरबाने घोड्यावर मांड ठोकली व तो निघून गेला.
दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.
वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.
३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.
थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.
मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.
१ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.
१ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.
- सुनील रेगे
धान्याला सूप… धान्य निवडणे. फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात…
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .
जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.
सांग सांग भोलानाथ,
शाळा सुरू होईल काय?
कोरोनाचं संकट टळून
शाळा उघडेल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातून बाहेर जायला मिळेल का रे एकदा
भोलानाथ भोलानाथ
आई, ए आई ऽ ऽ , बाबा ऽऽऽ कुठे आहात सगळे?
मला जाम कंटाळा आलाय? बाबा कधी जायचं शाळेत, निदान समोरच्या बागेत तरी जाऊदे ना? चार दिवस झाले मी कुठेही गेले नाहीये.
ए आई काय करीत होतीस, भांडी घासत होतीस? अगं त्या मावशी का नाही येत आहेत आपल्याकडे? हे सगळं काय चाललंय?
अग हो कोरोना कोरोना कोरोना हेच ऐकतेय नुसतं. म्हटलं ना आपण ‘गो कारोना’ तरी हा कोरोना जात का नाहीये? मला तर जाम कंटाळा आलाय. हो ग धुतले ग हात किती वेळा धुऊ. हो अगदी चोळून धुतले गं त्या जाहिरातीतल्या बंटीसारखा विचार देखील आला मनात,
‘‘ए बंटी तुझा साबण स्लो आहे का?’’ किती ते हात धुवायचे?
ए आई कसा होतो ग हा कोरोना काय म्हणतेस? त्या गणितात शिकवतात तसं?
हा म्हणजे ए बरोबर बी, बी बरोबर सी, म्हणजेज ए बरोबर सी. म्हणजे , ए ने बी ला हात लावला आणि जर ए ला रोग असेल तर तोच रोग बी लाही होईल बी ने सीला हात लावला तर तोच रोग सीलाही होईल बापरे म्हणजे आख्खं एक्स वाय झेड पर्यंत.... अरे देवा...
बाबा, तुम्ही बाहेर जाताना मास्क लावून का जाताय? आणि बाकी सगळ्या जगाला सुट्टी आहे, किंवा काय ते वर्क फ्रॉम होम आहे, पण तुम्हाला, डॉक्टर काकांना सुट्टी का नाही? काय म्हणता बँक ही अत्यावश्यक सेवा आहे? लोकांना पैशाची कमी पडायला नको म्हणून बँक चालू ठेवलीय का? अरे देवा, पण मग आता तुम्हीही काळजी घ्या.
ए आई, पण परवापर्यंत तरी संपेल का गं हे? परवा माझा वाढदिवस आहे, अगदी खूप लांबच्या नाही, पण पलीकडच्या बिल्डींगमध्ये राहणार्या माझ्या मैत्रिणींना, मावशीला, आत्याला माझ्या बहीणभावडांना तरी बोलवायचं का ग आपण?
काय म्हणतेस कुणालाही बोलवायचं नाही, आई, तूच असं करतेयस? नेहमी तर मला म्हणत असतेस, की घरी कोणी आलं की बोलावं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. त्यांना पाणी विचारावं आणि आता ग आता?
अरे देवा, म्हणजे आपला वाढदिवस करायचा नाही असंही सांगितलंय का शासनाने? अच्छा अच्छा म्हणजे आपल्यामुळे दुसर्याला किंवा दुसर्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून शक्यतो बाहेर जायचं नाही, काय म्हणतेस शक्यतो नाही जायचंच नाही.
शी बाबा.
शाळेत जायचं नाही, परीक्षा रद्द झाली, क्लास नाही मग करायचं तरी काय? आयडिया आई, नाहीतरी मावशी नाहीत, मी तुला थोडी मदत करते. मी तुला मटार सोलून देऊ का? आणि दुपारी केर पण काढेन.
काय गं आज्जी कशाला हाका मारतेयस? काय म्हणतेस? आजपासून तू मला रामरक्षा शिकवणारेस, रामरक्षा म्हटल्याने आपल्यावरचं म्हणजे जगावरचं संकट नाहीसं होईल. बरं बरं मी नक्की शिकेन ग रामरक्षा.
आज्जे, आज्जू ये ग तू इकडे आपण दोघी मिळून पत्ते खेळुयात. हो अगं इतकं लगेच कुचकं नको बोलू. मला सारखा तो फोन बघून कंटाळा आलाय, डोळे पण दुखतायत. दादीटला बघ नुसता फोनमध्ये डोकं खुपसून बसलाय. काय म्हणतेस तो आईला मदत करतोय. वा वा काय करतोय मदत? काय आज तो कुकर लावायला शिकला? पण आई मला गॅसजवळ जाऊ देत नाही, म्हणते तू लहान आहेस? मग मी काय करू? मी आपली भाजी निवडेन, केर काढेन.
आजी, तू या लोकरीचा स्वैटर विणतेयस मला पण शिकवशील का गं? मी पण तुला आमच्या शाळेतला डान्स शिकवेन. अगं काही नाही मोडत तुझा पाय नाचून? अगदी सोपा आहे. जमेल तुला. आणि आपण सगळे मिळून अंताक्षरी पण खेळू.
पण माझा वाढदिवस घरातच जाणार, मला केक मिळणार नाही, बाहेर जाऊन काही खायला मिळणार नाही.
काय म्हणतेस आई, तू यूट्युबवर बघून माझ्यासाठी घरीच केक करणारेस वाव ऽ ऽ किती मज्जा. आपण सगळे मिळून घरात धमाल करू म्हणतेस. बरं बाई, पण माझा हा वाढदिवस वायाच जाणार ना?
काय म्हणतेस? ‘शिर सलामत तो पगडी पचास म्हणजे काय?’’ अच्छा अच्छा म्हणजे या वाढदिवशी जर आपण सरकारचं ऐकलं, नियम पाळले तर आपलंच नाही तर देशाचंही भलं होईल बरं, आणि आजचा एक वाढदिवस घरात केला तर पुढे अनेक वाढदिवस मी साजरे करू शकेन.
हो हेही खरंच आणि आई अगं हे सारं संपलं की, आपण जाऊच की बाहेर पण तोपर्यंत मात्र मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही, मला तुझं म्हणणं अगदी पटलंय. बघ तोपर्यंत मी रोज नवीन नवीन काही तरी शिकत राहीन. व्यायामसुद्धा करीन बरं आम्हाला शाळेत शिकवतात आणि तुम्हाला पण शिकवीन.
योग करू, शतपावली करू, घरात राहूनच मज्जा करू
या कोरोनावर मात करू, जगावरील संकटाला दूर करू.
मी घरातच राहीन...... घरातच राहीन. गो कोरोना गो कोरोना
भोलानाथ कोरानावर औषध निघेल काय? भोलानाथ भालानाथ.
-- सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti