वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
छोट्या गावांमधे, पशुसंवर्धन हा बर्याच कुटुंबांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मुलं जन्मापासूनच गायींच्या, वासरांच्या, डुकरांच्या, शेळ्यामेंढ्यांच्या आसपास वावरत असतात. दोन तीन वर्षांची मुलं, आई-वडिलांबरोबर घरच्या फार्मवर जाऊन छोट्या छोट्या साधनांनी लुडबुड करत काम करायचा प्रयत्न करतात. दुसरी तिसरीपासूनच ही मुलं “4 H” सारख्या कार्यक्रमांमधे सहभागी होतात. पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली ती लहान वासरं, डुकरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या हाताळायला शिकतात. ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एखादं वासरू किंवा डुकराचं पिल्लू वाढवणं, त्याला साफसूफ करून त्याची निगराणी ठेवणं, त्याचे केस विशिष्ट प्रकारे कापणं, त्यांना ठरावीक पद्धतीने उभं रहायला किंवा चालायला शिकवणं, हे सारं करायला शिकतात. उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळ्या काउंटीजच्या जत्रांचे वेध लागायला लागतात. अशा जत्रांमधे 4 H कार्यक्रमाअंतर्गत ही मुलं आपली जनावरं दाखवण्याच्या स्पर्धांमधे मोठ्या उत्साहाने भाग घेतात. या जत्रा आणि स्पर्धा या कुटुंबांसाठी मोठ्या महत्वाच्या असतात. सारं कुटुंब जणू झपाटल्यासारखं होऊन जातं. अशा स्पर्धांमधे बक्षीस मिळवणं म्हणजे मोठंच मानाचं असतं. त्यातून काउंटी किंवा विभागीय स्पर्धांतून पुढे जाऊन राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधे जायला मिळणं म्हणजे जणू स्वर्गालाच हात टेकणं.
एप्रिल, मे महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली की खेळांची मैदानं ओसंडून वाहायला लागतात. थंडीच्या सहा महिन्यांत घरा दारात बंदिस्त होऊन पडलेली मुलं, माणसं बाहेर मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशाचं उबदार सुख अनुभवायला आसुसलेली असतात. छोट्या गावांमधे करमणुकीला फारसा वाव नसल्यामुळे सायकली चालवणे हा एक लहान मुलांचा आवडीचा विरंगुळा असतो. तरूणांमधे त्याचंच रूपांतर मोटार सायकली चालवण्यात होतं. गावातल्या एकुलत्या एक मध्यवर्ती रस्त्यावर, मोठ्ठ्याने आवाज करत मोटार सायकली चालवत, हे तरूण समवयस्कांमधे रमून जाण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी त्याच त्या मध्यवर्ती रस्त्यावर मोटारींची परेड काढून शेवटी एखाद्या कट्ट्यावर बसून गप्पांचा अड्डा जमवला जातो. याच सुमारास (जून जुलैपासून) गावातल्या रस्त्याच्या कडेला आसपासचे शेतकरी आपल्या बागेतली फुलं किंवा शेतातले टोमॅटो, कणसं, किंवा इतर ताजा भाजीपाला घेऊन आपल्या पिक-अप ट्रक्स लावून विकायला बसतात.
मिडवेस्ट आणि त्याच्याही पश्चिमेकडच्या काही राज्यांतली काही छोटी गावं तर एवढ्या दूर दूर अंतरावर आहेत की कल्पना करणं अवघड व्हावं. कामानिमित्ताने नेब्रास्का, साऊथ डकोटा, नॉर्थ डकोटाच्या काही भागांमधे फिरलो तेंव्हा याची प्रचिती आली. या राज्यातल्या काही भागांमधे, जिथे रॅंचेस (प्रचंड मोठाली चराऊ कुरणे) आहेत तिथे मानवी वस्तीच्या खाणाखुणा धुसर होत जातात. अशा ठिकाणच्या काही रस्त्यांवर ३०-४० मैल अंतरांपर्यंत मधे वस्ती लागत नाही. या प्रदेशामधे फिरताना गाडीचा पेट्रोल टॅंक अर्धा जरी भरलेला असला तरी जेंव्हा गॅस स्टेशन दिसेल तेंव्हा पेट्रोल भरून टाकणे हेच शहाणपणाचं ठरतं. अशा ठिकाणी गाडीतलं पेट्रोल संपणं म्हणजे काय दिव्य असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अशा ठिकाणी रस्त्यावरच्या रोड साइन्स वगैरे काही नसतात. फक्त लाकडी फळकुटं खांबांवर ठोकून त्यावर अमुक रॅंच तमक्या दिशेला आहे एवढंच लिहिलेलं असतं. काही रॅंचेसवर मी गेलोय ते चक्क १५-२०,००० एकरांचे होते. अशा रॅंचवर गेलं की जिकडे बघावं तिकडे नुसतं अफाट माळरान. मधे झाडी, पाणवठे वगैरे सारं काही. रस्त्याचं नाव नाही. रॅंचेसवरच्या माहितगार माणसाबरोबर त्यांच्या गाडीनं गेलं तर ठीक नाहीतर २०,००० एकर जमिनीवर ३००० गायींचा ठावठिकाणा लागायलाच मुळी मुश्किल ! या अशा रॅंचेसवर गायींना पाणी पिण्यासाठी चक्क मोठ मोठाले तलाव केलेले असतात. या प्रचंड मोठ्या रॅंचेसवर या गायी रानोमाळ भटकत, चरत असतात आणि वन्य श्वापदांसारख्या, तहानेच्या वेळेला या पाणवठ्यांवर येत असतात. अशा मोठ्या रॅंचेसवर गायींच्या बरोबरीने इतर वन्य प्राणी देखील आश्रय घेऊन असतात. बर्याचदा हरणांचे कळप दृष्टीस पडतात तर काही पाणवठ्यांच्या आश्रयाने बदकं आणि गीजचे थवे गुजराण करताना आढळतात.
रॅंचवरच्या फार्महाऊसवर बहुदा पुरुष मंडळीच वास्तव्य करून असतात. त्यामुळे ह्या फार्महाउसेसमधे, त्यांच्या गॅरेजेसमधे, अस्सल पुरुषी अस्ताव्यस्तपणा ठायी ठायी विखुरलेला असतो. बीयरचे कॅन्स आणि बंदुका इतस्तत: पडलेल्या असतात. चिखलाचे बूट, मळलेले कपडे इतस्तत: भिरकाऊन दिल्या ठिकाणी पडलेले असतात.बर्याच रॅंचेसपासून शाळा खूप दूर असल्यामुळे अनेक रॅंचर्स जवळपासच्या बर्यापैकी मोठ्या गावात देखील एखादं घर बाळगून असतात. बहुदा बायका आणि मुलं अशा गावातल्या घरी रहातात. मुलं आठवडाभर शाळेत जाऊन शनिवार-रविवारी रॅंचवर ये जा करतात. अशा निर्जन ठिकाणी वैद्यकीय सोयी मिळणं देखील दुरापास्त. वेळ पडलीच तर आसपासच्या (६० ते १०० मैलांवरच्या) ठिकाणाहून एखादं हेलीकॉप्टर मागवावं लागतं. इथे तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णाला हेलीकॉप्टरमधून जवळच्या हॉस्पिटलमधे नेणं ही सामान्य बाब आहे.
आमच्या कंपनीचे पशुवैद्यकीय आणि इतर कर्मचारी गायींमधे भृण प्रत्यारोपण (embryo transfer) करण्याच्या निमित्ताने अशा दुर्गम भागातील रॅंचेसवर बरेचदा जातात. अनेकदा अशा ठिकाणी मोटारीने जाणं म्हणजे फारच जिकीरीचं काम असतं. अशा वेळी छोट्या विमानातून (पायलट आणि दोन किंवा तीन जण दाटीवाटीनं बसतील अशा) जाणं येणं फारच सोईस्कर ठरतं. इथे बहुतेक छोट्या गावांमधे अगदी छोटेसे विमानतळ असतात. अर्थात त्यावर केवळ पिकांवर औषधांची फवारणी करणारी विमानंच उतरू शकतात. अशा विमानांतून या शेता-माळरानांच्या अफाट हिरव्या समुद्रावरून एक ठिपका होऊन उडणं हा मोठा रोमांचक अनुभव असतो.
-- डॉ. संजीव चौबळ
February 14, 2016
लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे.
September 26, 2025
इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या.
December 6, 2022
कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी.
May 19, 2021
ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
April 1, 2022
श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का?
September 6, 2019
नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा…. चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत.
October 21, 2020
भारताला जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अगदी जोरात सुरू आहेत. येत्या पंधरा वर्षांत भारताची ओळख ‘सुपर पॉवर’ म्हणून स्थापित करण्यासाठी सगळ््या नेत्यांनी अगदी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेशी नुकत्याच करण्यात आलेल्या आण्विक कराराकडे त्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.
March 5, 2006
ऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती. स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ?
March 13, 2019
होलोग्राम आपण पाहिला असेल, पण त्याला होलोग्राम म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा काही विशिष्ट अक्षरे ही होलोग्रामने सादर केली की, त्यांची नक्कल करणे शक्य नसते. आता आपल्याकडे बनावट गुणपत्रिका किंवा इतरही बनावट कागदपत्रे तयार केली जातात.
October 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti