प्रेमात कशिश आहे, कोशिश आहे, आतिश (बाजी) आहे
नि कधी कधी साजिशही आहे
आणि हे सारं करायला दैवी आशिषचीही गरज आहे
प्रेमात आमिष आहे, ते सामिषही (बऱ्याचदा) असू शकतं.
प्रेमात ईश आहे, इश्श्य तर आहेच आहे.
त्यात he नि she लागते
प्रेम wishही आहे नि विषही ते असू शकतं
प्रेम विशेष आहे, पण त्यातून 'we'गेलं की शेष फारसं उरत नाही
प्रेम देवाचा प्रदेश आहे, त्याचा हृदयातून प्रवेश आहे
ते जिंकायला लागतो आवेश नि अभिनिवेषही
प्रेम आहे आस, प्रास (तहान), प्रयास-सायास, आभास सारं काही
प्रेम असतं आपल्याच आसपास
ते असल्यास आहे विश्वास, नसल्यास केवळ निःश्वास
प्रेमामध्ये नाद (दोन्ही अर्थाने) आहे, दाद आहे, एक उन्मादही आहे.
अखेर प्रेम हा विषय सादाचा आहे, वादाचा नाही
प्रेम आग आहे, एका अर्थाने नाग आहे
तो दागही आहे नि डागही (दागिना).
प्रेमात त्याग आहे, त्यात भागम्भाग आहे
पण इतकं सारं असूनही, प्रेम करणं भाग आहे.
प्रेमात (आपल्या माणसाला) डोळे भरुन पहावंसं वाटतं
त्याच्या/तिच्या वाटेकडे डोळे लावून बसावंसं वाटतं
न भेटल्यास डोळे भरुनही येतात. पण
इतकं सारं असूनही प्रेम आंधळं आहे म्हणतात
प्रेमाला नसतो बंध, बांधून मात्र आपल्याला ठेवतं
चव नसलेल्या प्रेमावाचून जीवन मात्र बेचव आहे.
प्रेमात आसक्ती आहे पण सक्ती नसावी
तो उपहार आहे, उपकार नसावा...
प्रेम आर्जवी व्हावं पण अवाजवी असू नये
प्रेम उन्नत असावं, उन्मत्त नको.
त्यात संवेदना जरुर असाव्यात, वेदना नकोत,
प्रेमात गुंतवणूक लागते पण गुंतागुंत नसावी
प्रेमात उमलून यावं-उन्मळून पडायची पाळी न येवो
प्रेम उदार असावं पण उधार नसावं
प्रेमाचं संक्रमण होऊ शकतं - आक्रमण करु नये
शेवटी प्रेम हा आसूसून जाण्याचा प्रकार आहे
-उसासून रहाण्याचा नाही
प्रेम देवासारखं आहे, शुद्ध, सर्वव्यापी पण अदृश्य,
अनादि, अनंत, असीम व अथांग.
आपल्या साऱ्यात अंश असला तरीही कुणातच नाही
प्रेम ज्ञानासारखं आहे - अपार, अथांग!
ते कणाकणाने जोडता येतं, एकमेकांत वाटल्याने वाढतं,
कितीही संपादन करा संपतच नाही
जितकं खोल जावं तितकी अधिक खोली वाढत जाते
जेवढं जास्त संपादावं तेवढा संतोष, समाधान, शांति, समृद्ध दृष्टी मिळते.
प्रेम असलं तर दाखवायला लागत नाही
कारण ते लपवावं म्हणून लपत नाही
नसलं तर मात्र दाखवूनही दिसत नाही
हे प्रेम आहे तरी काय?
ध्येय आहे की ध्यान
साध्य की साधन
आराध्य आहे की आहे आराधना
पूजनीय आहे प्रेम की आहे ही पूजा
प्रेम जसा साज आहे की आहे ती सजा
प्रेम माज निश्चित नाही वा नुसतीच मजा
प्रेम आहे सच्च्या भावनेची धारणा
अंत:करणाची एक प्रेरणा
एक अवगुंठित संवेदना नि त्याची निखळ आराधना
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९९९)
अगाध लीला अनामिकाची
अतर्क्य अगम्य ब्रह्मांड सारे
सुख दुःखांची उन , सावली
जीवनी प्रारब्धाचे भोग सारे....
शिशुशैशवी जीणे निरागस
प्रगल्भ मनी , हव्यास सारे
स्वार्थी मनीषा , सारेच माझे
मृगजळा पाठी धावती सारे....
भावभावनांचे शुष्क कंगोरे
इथे प्रीतभाव सुकलेले सारे
मनामनात मौन साशंकतेचे
संपले विश्वासाचे नाते सारे....
कधीकधी वाटते सुर जुळले
क्षणार्धात हरवूनी जाते सारे
जरी वाटले , निश्चिंती जगावे
तरी कर्म भोगावे लागते सारे....
संसाराची , कसरत विलक्षण
मोहपाशी मन गुंतन जाते सारे
काय मिळविले , काय हरविले
विचारात , जगणेच सरते सारे....
*********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २७७
२९/१०/२०२२
विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
भासे तीही एकटी,
चमकण्यात कमी जाणवते,--!!!
चेहरा तिचा उतरुनी,
निस्तेज ती दिसते,
का बुडाली कुणाच्या विरही,
कोडे मजला वाटते,--!!!
असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
चंद्र दिसे ना कुठे जवळी,
रजत किरणांचे लेऊन शेले,--!!!
समूहातून दूरच उभी,
अंतरी कोलाहल उठलेले,
लांबूनही ती दिसते "दुःखी*,
पाणी डोळां साठलेले,--!!!
वाट बघे सुधाकरांची,
जीव पहा कसा लावते,
तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,--!!!
मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,--!!
गायब माझा राजा कुठे,
विचार करते अंतर्यामी ,
स्थानाहून ना ढळणे,
धोरण तिचे मनोमनी,--!!!
इथे धरणीवरती मी,
राजसा, तुझी वाट पाहते,
कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,--!!
© हिमगौरी कर्वे
जमीन खोदतां पाणी लागते,
हीच किमया निसर्गाची,
कमी अधिक त्या खोलवरती,
साठवण असे जलाशयाची ।।१।।
प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,
समानता तो दाखवितो,
अज्ञानाचा थर सांचवूनी,
आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।
एक किरण तो पूरे जाहला,
अंधकार तो नष्ट करण्या,
ज्ञान किरण तो चमकूनी जातां,
फुलून येते ज्ञान वाहण्या.....||३||
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चष्मा लावूनी करीत होतां,
ज्ञानेश्वरीतील पारायण,
दृष्टीमधले दोष काढले,
चाळशीचा आधार घेवून ।।१।।
फुटूनी गेला एके दिवशीं,
चष्मा त्याच्या हातामधूनी,
पारायणे ती बंद पडली,
दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।।
चालत असता सरळपणे,
दैनंदिनीचे कार्यक्रम,
खीळ पाडूनी बंद पाडी,
क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।।
वस्तूचे मूल्य ठरते,
तिच्या उपयोगिते वरती,
तोलण्यास धन न लागे,
मूल्य मापन जेंव्हां होती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।
पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।
दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे ।।धृ।।
कांहीं काळासाठीं
नव्हता जगाचे पाठीं
कोठे तुम्हीं होता
न कळे आठवता
जाग येऊनी मिळाले भांडार आठवणींचे ।।१।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
विश्रांतीचा काळ हा
शांततेने गेला पहा
देह मनाची धावपळ
थांवली कांहीं काळ
पुनरपि लागते सर्वां चैतन्य जीवनाचे ।।२।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
गेल्या होत्या स्मृतिं
कांहीं काळांती
संपुन छोटे पर्व
परत लाभले सर्व
उपकार समजोनी याते आभार माना तिचे ।।३।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
सोडून देण्या दुःख
निद्रा मार्ग एक
नव्या जोमाने उठा
शोधा यशाच्या वाटा
हुरुप येण्या जीवनी आशिर्वाद मागा तिचे ।।४।।
प्रभात झाली उठा हो
मुखीं नाम घ्या जगदंबेचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खेळत होता बाळ अंगणीं इकडूनी तिकडे
मेघनृत्य ते बघत असतां दृष्टी लागे नभाकडे
उलटी सुलटी कशी पाऊले घनांची पडत होती
लय लागून हास्य चमकले त्याच्या मुखावरती
तोच अचानक गडगडाट झाला एक नभांत
दचकून गेले बाळ तत्क्षणी होऊन भयभीत
धावत जावून घरामध्यें आईला बिलगले
वाचविण्या त्या भीतीपासून पदराखालीं दडले
जरी थांबला गडगडाट भीती कायम होती
आवाजाचे नाद अद्यपि कानीं त्याच्या घुमती
भीतीने नजिक चिकटला आईच्या जवळीं
धडकन ऐकूं आली त्याला पुनरपि त्यावेळीं
गडगड धडधड आवाजाचा धसका घेवूनी मनीं
तोंड लपविले हळूंच जाऊन गादीमध्यें त्यानी
पिच्छा न सोडी आवाज अजूनी बसली ज्याची भिती
श्वास वाढूनी, स्वह्रदयाची धडकन होती ती
तगमग बघूनी बाळाची ती थोपटे मांडीवर आई
निद्रेच्या तो अधीन झाला ऐकून मधूर अंगाई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं....१
कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती
कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती....२
शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत
एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात....३
कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो
चुकून देखील तुझ्या राज्यीं, कधी येत नसतो....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti