तुझ्या आठवणीत
शब्द विरघळतात
पाझरतात भावनां
हळवा होतो एकांत...
मी आभाळ पहातो
तरळतेस तूच नेत्रात
हाच भास विलक्षण
हळवा होतो एकांत...
ही सुरम्य प्रीत वेडी
तुझेच रुप पापणीत
मी मज भुलुनी जाता
हळवा होतो एकांत...
स्मरण तुझेच लाघवी
नित्य माझ्या अंतरात
तुजविण सुनेच सारे
हळवा होतो एकांत...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०८
१९/८/२०२२
भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे ।
तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।
शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन ।
उघडले जाते मग विचारांचे दालन ।।
किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही ।
विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।
रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी ।
कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।
वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी ।
उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।
प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा
स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रूप असे देखणेकाळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, --??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,--!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
फाटलेलं कापड सुई-दोऱ्याने सहज शिवता येतं,
पण फाटलेलं नातं मात्र इतकं सहज जुळत नाही.
सुई प्रत्येक टाका घेताना स्वतः टोचणी सहन करते,
आणि दोरा मुकपणे प्रत्येक फट अलगद भरून काढत राहतो.
नात्यांनाही अशीच एक सुई हवी असते
चुकांची टोचणी स्वीकारणारी,
आणि असा एक दोरा
विश्वासाचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा.
रागाच्या एका क्षणात नाती तुटतात,
पण ती पुन्हा जोडण्यासाठी
संयमाचे असंख्य टाके घालावे लागतात.
शिवलेलं कापड पुन्हा वापरता येतं,
पण शिवणांच्या खुणा कायम राहतात.
नात्यांचंही तसंच असतं...
माफ करता येतं,
पण मनावर उमटलेले ओरखडे सहज पुसले जात नाहीत.
म्हणून शब्द जपून बोला,
अहंकाराला थोडं दूर ठेवा.
कारण सुई-दोरा बाजारात सहज मिळतो,
पण मनापासून जपलेली नाती
पुन्हा पुन्हा मिळत नाहीत.
सुईची टोचणी क्षणभराची असते,
पण तुटलेल्या विश्वासाची वेदना आयुष्यभराची असते.
म्हणून...
नाती शिवताना सुईची टोचणी लागली तरी चालेल,
फक्त विश्वासाचा दोरा कधी तुटू देऊ नका.
कारण दोरा तुटला की,
नाती पुन्हा जुळली तरी
मनाच्या घडीत एक शिवण कायमची राहते...
*नाती जपणं म्हणजे जिंकणं नव्हे,
तर प्रत्येक वेळी थोडंसं स्वतःला विसरून
एकमेकांना पुन्हा पुन्हा स्वीकारणं होय.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
हातातील काडी घासतां पेटीवरी
अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी
लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो
अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो
चितांत असतो प्रभू सदैव शांत
ओळखण्या त्यासी लागताती संत
संत हाच गुरु मार्गदर्शक असे
चित्तातील प्रभूला जागवित असे
उजळण्या मन घर्षण लागे संताचे
पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उठा उठा हो सकळजन
स्वागत करु या रविउदयाचे
फूलून जाते जीवन ज्याने
त्या सूर्य आगमनाचे //धृ//
उषाराणीची चाहूल येता
चंद्रतारका ढळल्या आतां
चराचराना जागे करण्या
चाळवी निद्रा हलके हाता
वंदन करु या लिन होऊनी
चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//
स्वागत करुया रविउदयाचे
रंगबेरंगी सुमने फुलली
वाऱ्यासंगे डोलू लागली
दरवळूनी तो सुगंध सारा
वातावरणी धुंदी आणली
मकरंदापरि चंचल होऊनी
स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//
स्वागत करुया रविउदयाचे
पक्षी येती किलबील करिती
उठा उठा ते सांगुन जाती
कुजबुज करिती राघू मैना
ताना मारित कोकीळ गाती
कुक्कुटाची ती बांग तुतारी
आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//
स्वागत करुया रविउदयाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून...
तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून...
-- आनंद
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
कोण देई हा आकार ?
तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
कोण हे घडवित असे ?
प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
कोण देई ह्यांत लक्ष ?
त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
ही किमया असे कुणांत ?
तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
फिरवी कोण चक्र सहज ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@mail.com
अभिमान अम्हा देशाचा
विश्वास असे ज्ञानाचा,
तो क्षणही दूरवर नाही
नव उदय महासत्तेचा
आव्हान संकटे आली
ना मानली कधिही हार,
त्वेषात पेटुनी लढलो
उघडले कीर्तीचे दार
संघर्ष जरीही केला
पण हात पसरले नाही,
अडखळलो पडलो उठलो
परि इमान विकले नाही
बुद्धीच्या जोरावरती
श्रम जिद्द आणि शांतीने,
उत्तुंग भरारी घेता
यश आले आनंदाने
त्यागाची लावुनी ज्योत
आत्मनिर्भर भारत बनवू,
करोनि स्वदेशी जागर
हा महान भारत घडवू
ही हिंद संस्कृती मोठी
संदेश विश्वशांतीचा,
अन् फडकत अविरत ठेवू
तिरंगा स्वाभिमानाचा
- विजय जोशी
Copyright © 2025 | Marathisrushti