(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • यश येईल मागे मागे

    नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे
    येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे
    निराशूनी जावू नकोस रागें रागें
    हिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे
    विणाविस तू यशाची शाल धागे धागे|
    सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे
    सतत रहावे जीवनी जागे जागे
    तेव्हाच यश येत असते भागे भागे

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • खेळण्या नसे पर्याय

    दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस

    प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस

    खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा

    खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२,

    खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते

    तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३,

    विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा

    बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • महाशिवरात्री

    शिवापासून वेगळा झालेला जीव
    पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा
    काळ म्ह्णजे जीवन...
    पण जीव रमतो
    जगण्यातील मजा लुटण्यात
    आणि गुंतून पडतो असंख्य मोहात...
    शिवाला विसरलेल्या जीवाला
    पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच
    कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय
    महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत...

    कवी- निलेश बामणे

  • गोंधळ

    आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्‍हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून गोंधळयांची व्यवस्था करायला सांगितले. त्याने स्वत:च जाउुन सांगितलं असतं, पण गावात गोंधळी नव्हते आणि नवरदेवाने लग्न झाल्यावर हातातले हळकुंड सोडेपर्यंत तोंड वर करून गावाची शिव ओलांडायची नसते अशी प्रथा असल्याने आण्ण्याचा नाईलाज होता.
    बापूचा लोकसंग्रह दांडगा म्हणून लग्नाची सगळी व्यवस्था बापूने अंगावर घेतलेली. त्यात बापूचा काहीही फायदा नाही पण पुढे पुढे होउुन पुढारीपणा करायचा त्याचा शौक तो अशा प्रसंगातून भागवून घ्यायचा. शिवाय वयाने सगळ्यांनाच वडिलधारा असल्याने सहसा त्याचा शब्द कोण मोडत नव्हते. पाच मैलांवर शिंदेवाडी होती. तिथल्या गोंधळयांची जोडी सगळया पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बापूने सांगितल्यावर लगेच एक माणूस टांग टाकून सायकलीवरून शिंदेवाडीला गेला आणि त्याच रात्रीची गोंधळाची सुपारी देउुन आला.
    “बाबा, त्यांना लवकर यायला सांगितलं आहेस का?”
    “मग, दिवस बुडायच्या आत टच व्हायला सांगून आलोय.”
    “ते एक चांगल केलंस बघ. आणि त्यांना रस्ता कुठला सांगितलास?”
    “काय बापू तुम्ही पण विचारताय राव रस्ता कुठला सांगितलास म्हणून! त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला?”
    बापू त्याच्या उत्तरावर गप्प बसला. भूताची पांद ही वाडीजवळची ऐतिहासिक जागा होती. रात्री अपरात्री तिथून कोण आला की त्याला काहीतरी विचित्र अनुभव यायचे. लक्सूबापूला याच पांदीने वेड लावलं होतं. शेवटी त्याने तिथल्याच एका विहीरीत उडी टाकून जीव दिला होता. तेव्हापासून तर लोक दिवसाही तिथून जायला घाबरायचे. एकदम निर्मनुष्य रस्ता होता. रस्त्यावरून चारचाकी चालायचीच नाही. कशीबशी बैलगाडी जात असे एवढा ओबडधोबड. सायकल मात्र एका बाजूने चाकोरी धरून चालवता यायची. पण जी काही वर्दळ असेल ती दिवस बुडायच्या आतच असायची. बाकी इतरवेळी चिटपाखरूही नसायचं. म्हणून या बाबाने नीट सांगितलं नसेल तर गोंधळाची पंचाईत व्हायची ही बापूला काळजी लागलेली.
    दिवस बुडाला. सात वाजून गेले, आठ वाजले तरी गोंधळयांचा पत्ता नाही. गोंधळाला लागणारं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं. अण्ण्या घाईवर आलेला. लग्न होउुनही काही उपयोग नव्हता. गोंधळ झाल्याशिवाय बायकोजवळ जाता येणार नव्हते म्हणून तो वैतागला होता. लोक बायकोशी बोलूही देत नव्हते. गोंधळी आले नाहीत तर भटजीला बोलवून गोंधळ घाला म्हणून तो नाचायला लागला होता. एवढा टाईम होउुनही ते लेकाचे अजून का आले नाहीत म्हणून बापू चिंतेत होता. तसल्या काळ्याकुट्ट अंधारात कुणीही एकटा जायला तयार झाला नसता म्हणून बापूने दामा आणि गण्याला सायकली घेउुन शिंदेवाडीकडे पिटाळले.
    दोघेही सायकलवरून रस्त्याचा अंदाज घेत बॅटरीच्या उजेडात चालले होते. अर्धा रस्ता गेल्यावर त्यांच्या कानावर संबळाचा आवाज येउु लागला. दोघांचेही कान खडे झाले. त्यांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. काहीतरी आक्रित घडलं होतं यात वादच नव्हता. त्या रस्त्याने जसजसे ते जवळ जाउु लागले तसतसा त्यांच्या कानावर माणसाच्या गाण्याचा आवाजही यायला लागला. अजून पुढे गेल्यावर संबळ आणि गोंधळाची पदं ऐकू येउु लागली. पांदीतल्या भूताने दोघा गोंधळयांना धरलंय याची त्यांना खात्रीच झाली.

    गोंधळयांनी शिंदेवाडीतला एक गोंधळ आटोपला. बराच उशिर झाला होता. आडगेवाडीच्या सुपारीला दिवस बुडायच्या आत या म्हणून सांगितले होते. पण तिथेच मुक्काम करायचा आहे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून सायकलीवरून ते आडगेवाडीकडे निघाले. ते नेमके भूताच्या पांदीत आले आणि कुठून कुणास ठाउुक दोन भलेमोठे लांडगे समोर येउुन उभा राहिले.
    सायकली तशाच बाजूला टाकून लांडग्यांना पळवून लावण्यासाठी दोघांनी खूप आरडाओरडा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लांडगे मागे हटायला तयार नव्हते. अंधारात त्यांचे चकाकाणारे डोळे बघितल्यावर दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. लांडगे गुरगुरायला लागल्यावर विचार करायला वेळही नव्हता. दोघांनीही सरळ संबळ काढले, कमरेला करकचून बांधले, हात जोडले आणि “आई अंबाबाईच्या नावानं …” सुरू केलं. लांडग्यांनाही मजा वाटू लागली. उभे असणारे लांडगे संगीत गोंधळ ऐकत पायावर पाय टाकून आरामात खाली बसले. संबळ थांबला की गुरगुरायचे. गोंधळयांचे सगळे देव बोलवून झाले. संबळ बडवून हात दुखायला लागले पण लांडगे हटेनात.

    दामा आणि गण्या सावधपणे पांदीजवळच्या चढावर आले. खालच्या तालीतून आवाज येत होता. समोर दिसायला काहीच मार्ग नव्हता. आधीच रात्र, त्यात मोठमोठ्या झाडांनी अजून काळोख वाढला होता. सायकली वरच्या बाजूला उभा करून कानोसा घेत ते हळूहळू खाली उतरू लागले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांना समोरचा सीन दिसू लागला. दोन भलेथोरले लांडगे आरामात पायावर पाय टाकून दर्दी रसिकासारखे गोंधळ ऐकत बसले होते आणि या दोघांचा गोंधळ रंगात आला होता. थोडावेळ ह्या दोघांनीही त्या अनोख्या मैफलीची मजा घेतली. शेवटी गोंधळ्यांना तर घेउुन जायला पाहिजे म्हणून त्यांनी आरडाओरड करत बॅटरीचा उजेड लांडग्यांच्या डोळयांवर मारला आणि त्यांना पळवून लावले तरीही अंगात आल्यासारखे गोंधळी सुंबूळुंग गुंबूळुंग वाजवतच होते. पुढचे दोन लांडगे पळून गेल्याचा त्यांना पत्ताच नव्हता.
    “कोल्हापुरची लक्षुमी गोंधळाला यावं न् जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावं.” हे त्याचं चालूच होतं. शेवटी दामा आणि गण्याने जाउुन त्यांचे हात धरले तेव्हा ते भानावर आले.
    “ये खंडेरायाच्या लाडक्यांनो, बास करा आता. च्यायला, दिवस बुडायच्या आत या म्हटल्यावर हा टाईम आहे होय रे तुमचा? गुंडाळा आता हे सगळं आन् चला आमच्यामागं गपगुमानं.”
    कपाळावरचा घाम पुसून धरथरत्या अंगाने दोघा गोंधळ्यांनी आपला बाडबिस्तरा आवरला आणि निमुटपणे ते दामा आणि गण्याच्या मागे चालू लागले. शेवटी भेदरलेल्या गोंधळयांची वरात घेउुन ते आडगेवाडीत पोहोचले आणि दिवसातला तिसरा गोंधळ चालू झाला.

    ©विजय माने, ठाणे

    http://vijaymane.blog

    चित्र : खलील आफताब

  • रंग निळ्यासावळ्या घनांचा

    रंग निळ्यासावळ्या घनांचा, आज आभाळी पसरला,
    जसा विविधरंगी मुलामा,
    नभांगणाला कुणी दिधला, ---

    दिनकर उगवला जसा ,
    रंगांचे अगदी पेंव फुटतां,
    नभी जादू -ई खेळ चालला,
    जो पाहे तो चकित जाहला,--!!!

    सोनेरी, पांढरट, निळा,
    काळा जांभळा, पिवळा,
    रंग सज्ज भास्कर-स्वागतां,
    जणू विजयोत्सव साजरा,--

    मित्रराज डुलत येता,
    गडगडाट झाला ढगांचा,
    मेघमल्हार कोणी गायला ,
    कल्लोळ उठला पहा विजेचा,

    सुरुवात झाली चमचमाटा,
    धांदल सगळी मेघांची उडता,
    सूर्यराज विराजमान झाला,---
    धरती ल्यायली सोनशेला..!!!

    प्रकाशाचे रांजण उधळता,--
    प्रभाव सोनेरी किरणांचा,
    आकाशात जसा पडला,
    उन्हात न्हाली वसुंधरा,
    उजेडाचा सारा पसारा,-
    सीमा नाही तिच्या आनंदा,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

  • बाळाची निद्रा

    चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
    काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे

    कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
    मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी

    घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
    कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी

    नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
    परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें

    चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
    गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची

    असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
    शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • तनमन व्याकुळ

    मनाची भाषा मनास उमगते

  • पाऊस दाटलेला डोळी

    देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी
    भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी

    पावसाळी ऋतु जणू , मेघ मल्हाराची ताण
    माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं

    डोळे भरले नभाचे, धरणीच्या प्रीतिपोटी
    खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी

    नदी, नाले आळविती, पशु-पक्ष्यांची तहान
    वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण

    अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी
    असा ये रे ! तू बेताचा, होऊ दे रे ! आबादानी

    डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
    २३ जलै २०२२

  • येतात तुझे आठव

    येतात तुझे आठव,
    डोळ्यांत काळे ढग,
    उरांत फक्त पाझर,
    शिवाय नुसते रौरव ,--!!!

    येतात तुझे आठव ,
    होते सरींची बरसात,
    चित्तात उठे तूफान",
    मनात चालते तांडव,--!!!

    येतात तुझे आठव,
    प्रीतीचे हे संजीवन ,
    स्मृतींचे मोठे आवर्तन,
    त्यांचे लागती न थांग,---!!!

    येतात तुझे आठव,
    सरींची त्या उधळण,
    शब्दांचे पोकळ वाद,
    कल्पनांचे नुसतेच डाव,--!!!

    येतात तुझे आठव,
    अश्रू असूनही शुष्क,
    मन मात्र पाणथळ,
    कसानुसा होई जीव,--!!!

    येतात तुझे आठव,
    भोवती दुःखाची पाचर,
    सहवासाचे अमृतथेंब
    , कधी बनती विष:कण,--!!!

    येतात तुझे आठव,
    प्रेमाचे निव्वळ भास,
    आत्म्यात फक्त उलघाल,
    काट्यांची बनते शेज,--!!!

    येतात तुझे आठव,
    कधी येईल राघववेळ,
    कुशीत तुझ्या शिरून,
    संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--!!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

  • शबरीचे निर्मळ प्रेम

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी ।।धृ।।

    व्याकूळ होती राम भेटी
    रात्रंदिनी नाम ओठी
    नाचूनी गाऊनी भजन करी ।।१।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    बोरे जमवित चाखूनी वेचली
    अंबट तुरट दूर फेकली
    भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी ।।२।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    उष्टी बोरे प्रभू चाखती
    शोषूनी त्यातील रसभक्ती
    शबरी त्यांत जी जमा करी ।।३।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com