ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा,
उपसतो जरी सतत, होत नसे निचरा....१,
गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे,
पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे....२,
पेला पेला जमवूनी, कलश भरून आला,
नाहून जाता त्यात, देह भान विसरला....३,
सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे,
आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो
भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग करूनी घेतो
पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे
भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे
व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति दाखविती
धर्माचे नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती
पुरोहित असा असावा, धर्माची करि उकलन
भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग देयी दाखवून
प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे
चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
हवे तेच बोलता मी
जमाया लागले लोक
सत्य सांगू लागताचि
उठू लागे एक एक।
...मी मानसी
*म्हण येरे पावसाला *
जेष्ठा मागून आलास तुझे स्वागत आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥धृ॥
पिण्यासाठी नाही पाणी बघ रिता माझा घडा
नाही पाणी इथे तिथे पाणी नाही फुलझाडा ॥१॥
आस आता तुझ्या पाशी बरसून जा आषाढा
कढ दाटले आशेचे ओल्या झाल्या नेत्रकडा ॥२॥
यक्ष कालिदासाचा तो मेघ दूत त्याचा बडा
सांग त्याला ही रे जरा यक्षप्रश्न माझा बडा॥३॥
परोपरी विनवणी तुला म्हणूनी आषाढा
म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥४॥
मधु दारसेवाड....
तमाम पब्लिक धावतं
उगवत्या सूर्याला नमन करायला.
शेठच्या मुलानं बोलावतांच,
सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला. -
तोंड घट्ट मिटून
किती गूढ गुपितं
आंत दडवून ठेवतं
ऑफिसचं भलंमोठं सेफ. -
प्रवास बोरीवली ते फोर्ट
डोंबिवली ते कोर्ट.
लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं
ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं.
- सुभाष स. नाईक
अंतर वाढलं,
कोणी पावलं मागे घेतली म्हणून नाही,
तर कोणी थांबलंच नाही म्हणून.
शब्द होते,
पण ते पोचायच्या आधीच
त्यांचा अर्थ हरवून बसला.
म्हणून संवाद मेलेला नाही,
पण तो ओळखीचा राहिला नाही.
अनोळखी सहज जवळचे झाले,
कारण त्यांच्याशी अपेक्षा नव्हत्या.
आणि ओळखीचे दुरावले,
कारण अपेक्षाच खूप होत्या.
एकेकाळी नाव पुरेसं होतं,
आता स्पष्टीकरणही अपुरं वाटतं.
आपण भेटतो, बोलतो, हसतो…
पण कुठेतरी
एकमेकांना ओळखणंच विसरलो आहोत.
हे अंतर
नात्याच्या शेवटी नाही,
ते नात्यातच
हळूच रुजत गेलंय.
आणि म्हणूनच कदाचित
आज आपण एकमेकांसमोर उभे असलो,
तरी मनात कुठेतरी जाणवतं
आपण आता
एकमेकांसाठी
अनोळखी झालो आहोत.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं
भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।।
भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा
जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।।
धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं
इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।।
" नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें
आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें " ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जगता, जगता जगती
अनामिका शोधीत राहिलो..
हितगुज अव्यक्त मनाशी
नित्य मीच करित राहिलो...
वळणा वळणावरुनी
अज्ञाना उलगडीत राहिलो...
नेत्री केवळ ध्यास तुझा
येरझारा घालीत राहिलो...
कधीतरी भेटशील एकदा
भक्तीभावनां जपत राहीलो...
वेडी आशा वेडी आसक्ती
नकळे तुझ्यात मग्न राहिलो
रचना क्र. ९०
२९/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
विसरलास का श्रीरंगा, गोकुळीच्या गोपिकांना,
सोडून गोकुळां जाता,
तुम्ही द्वारकाधीश होता,--!!!
आठवतो बाळकृष्णा,
तुझा हुडपणा आम्हा,
बाळपणीचा काळ सुखाचा,
येतो प्रत्यय जेव्हा तेव्हा,--!!!
जो तो गेला भूतकाळा,
काय घडते वर्तमाना,
कुणाचा कोणास नाही पत्ता,
विराण ही शांतता,
खायला उठे गोकुळा,--!!!
मौज, मस्ती करत दंगा,
स्मरतो साऱ्या बालगोपाळा, दही-दूध-लोणी,पळवत होतां,--
कोण रागे भरणार तुम्हां,--!!?
कोण होई तक्रार -करतां,-? होतास गोंडस नंदकिशोरा,
अगणित तुझ्या खोड्या,--?
नाटके अन् तुझी अदा,
गाई वासरे सगळी खिल्लारे,
त्रस्त होते नंद-यशोदा,--!!!
धुमाकूळ चाले तुम्हा गोपाळांचा,
साक्षीलाही आहे यमुना,--
तिच्याच तीरी साऱ्या लीला,
साथही देई तुम्हां उधांणता,--!!!
अक्रूराने तुज दूर नेता,
गोकुळात भयाण शांतता,
जो तो येथे बघ हिरमुसतां,
कधी बाळकृष्णा, तुम्ही परततां,--?
© हिमगौरी कर्वे.
Copyright © 2025 | Marathisrushti