दिवस रात्र मम नयनी वसते
स्वप्नात येऊनी मला छळीते
सांग रमणी हे सांग मला ग
तुझे नी माझे हे कसले नाते ।
जरी न दिसशी मला कधी तू
सैरभैर मन हे होऊनि जाते
तुला पाहिल्यावर मन हे माझे
सांग का ग आनंदीत होते ।
असशी जरी दूरवर तू तेथे
मम हृदयी तुझेच रुप येथे
आहे खरोखरी किती मधूर
तुझे नी माझे हे प्रेमळ नाते ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
२१ आक्टोंबर २०१८
सारा असतो फक्त दिखावा
मृगजळा सारखी सारी नाती
कुणीच नसते, कधी कुणाचे
इथे स्वार्थापोटी जुळती नाती
दिल्याघेतल्याचे हे जग सारे
त्याविण कां? कुणी सांगाती
भाव लोचनी भोळे, भाबडे
भरोसी, जीव जातो गुंतुनी
गळाभेटी, दिखावा पोकळ
पण हे सारेच कळते सर्वांती
विकलांग होती श्वास जेंव्हा
जीव कासवीस होतो एकांती
--वि.ग.सातपुते( भावकवी )
9766544908
रचना क्र.२६८
२२/१०/२०२२
फेसबुकवरुन आलेली एका अज्ञात कवीची सुंदर रचना…
आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले
येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले ।
कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला
पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला ।
तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला
ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला ।
तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला
अती आनंदे त्यास पाहता मम जीव सुखावला ।
ऊन पावसाचा खेळ हे लक्षण श्रावण मासाचे
त्यास जोडून येती दिवस किती गोड आनंदाचे ।
माहेरवाशीण कुणी वाट पाहते या श्रावणमासाची
मंगळागौर अन् नागपंचमी ही पर्वणी माहेरपणाची ।
असाच श्रावण सदा बहरु दे माझीया हो अंगणी
पियासंगे मग गाईन सखे मी मंजुळ गोड गाणी ।
सुरेश काळे
सातारा
मो. 9860307752
दि. २ सप्टेंबर २०१८
तुमचे नाम संकीर्तन ।
हेचि माझे संध्या-स्नान ।।
तुमच्या पायाचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ।।
तुमच्या पायाचा साक्षेप ।
हा चि माझा काळ क्षेम ।।
तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
एका जनार्दनी सार ।
ब्रह्म रुप हा संसार ।।
बघतां बघतां
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
इवलं होतो मुक्त पाखरूं
वारा पिऊन बागडणारं
क्षणात रुसणारं-फुगणारं
क्षणामधें खुदकन् हंसणारं.
होतं हंसू निर्व्याज मोकळं
होतं सकाळचं ऊन कोवळं.
हळूंच सारं पसार झालं
किलबिलतांना कळलंच नाहीं.
अचानक येऊन यौवनानं
‘टक्-टक्’ करून केलं जागं
आणि उंबरठा ओलांडून
मस्तीत राहिलं पुढे उभं.
मी स्वार होतांक्षणीं
भरधाव सुटला वारू
सारं जग जिंकायची
तुफान दौड झाली सुरूं.
मनामधें जिद्द होती
मनगटात होता जोर
यशशिखर काबीज करायचं
उद्दिष्टही होतं समोर.
एकामागुन एक भराभर
हवं तें सारं मिळवत राहिलो
वरती-वरती पुढे-पुढे
स्वत:च स्वत:ला पळवत राहिलो.
पळत राहिलो, चढत राहिलो
थांबलो नाहीं फारसा
दरम्यान चौकट बदलत गेली,
बदलत गेला आरसा.
पण आरशावरचं मखमली आवरण
कधी मुळी मी काढलंच नाहीं.
खरं म्हणजे, सुचलंच नाहीं.
खरं तर,
मला बर्याच गोष्टी करायच्या होत्या
अनेक स्वप्नं होती
खूपशा इच्छा होत्या.
करायचं होतं शिवबांसारखं
कार्य महान, भव्य
करायचं होतं स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे
देशासाठी कांहीं दिव्य;
पुसायचे होते मला
पीडितांचे आंसू
पहायचं होतं दीनांच्या डोळ्यात
फुललेलं हंसू.
द्यायची होती
नृत्य-संगीताला
दिल खोलूऽन दाद
घ्यायचा होता कथा-कवितांचा
मनमोकळा आस्वाद.
ज्ञानोबा-तुकोबांसारखं
भक्तिरसात पोहायचं होतं
पंढरीच्या वारीत
नाचत-गाऽत जायचं होतं.
बरंऽच कांहीं करायचं होतं.
विणून ठेवलं होतं कधीचं
मी नाजुकसं जाळं,
पण कवटाळुन अर्धा क्षणही
घेतां नाहीं आलं;
बंद कप्पे धुंडाळायला
मला अजिबात जमलंऽच नाहीं.
ऊन कधी कलतं झालं
तें मला समजलंच नाहीं,
उमगलंच नाहीं.
- सुभाष स. नाईक
M : 9869002126.
सांगा, सांगा कुठला देवधर्म आता
सांगा कुठले सत्य - असत्य आता..।।
कुणी सांगावे, ते ऐकावे
देवकृपे ते घडते सारे
डोळी दिसले तेच पाहिले
सांगा काय ज्ञात - अज्ञात आता....।
रामकृष्णही जन्मले जगती
देवत्वाची ती साक्ष जगती
निधर्माचेच ते रक्षणकर्ते
सांगा कुणी पाहिला देव तो त्राता....।
कुठली प्रीती, कुठली भक्ती
सुखसागरी मस्त धुंदित जगावे
श्वासात गंधतो स्वार्थभोग आता
सांगा निष्पाप स्पर्श हवा कुणा आता...।
सांत्वन मनीचे रोज करावे
कधीतरी भेटल तो नियंता
दमले नेत्र अन जीव हा सारा
सांगा कुठली मोक्षमुक्ती आता....।
--वि.ग.सातपुते.( भावकवी)
9766544908
रचना क्र.२०२
१६/८/२०२२
सांज क्षितीजी थबकता
रंगले आभाळ भावनांचे
शिंपण, अंतरी अमृताचे
मनी भास ते अमरत्वाचे...
उजळलेली तिन्हीसांजा
आविष्कार, कृतार्थतेचे
जरी ही गात्रे पांगुळलेली
शांत मनात भाव मुक्तीचे...
जीव ! स्मृतीत गुंतलेला
नाद अंतरी टाळमृदुंगाचे
मन, सारे विठ्ठल विठ्ठल
संकीर्तनी सत्य शाश्वताचे...
यावीण दूजे सुख कोणते
अहोभाग्य जन्मोजन्मिचे
तोच सावळा एक कृपाळू
अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे...
–वि.ग.सातपुते (भावकवी )
9766544908
रचना क्र. २०५
१७/८/२०२२
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचे, चकविणे मनाला ...१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक ते असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा मग करी...३,
अंतरातील सुख, नितांत ते असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बरं झालं काही लोकांनी
वेळेवर आपले रंग दाखवले,
नाहीतर त्यांच्या खोट्या प्रेमालाच
आम्ही आयुष्यभर आपलेपण समजत राहिलो असतो.
ज्यांच्यासाठी स्वतःच्या आनंदालाही
हसत हसत बाजूला ठेवलं,
त्यांनीच गरज संपताच
नात्याचं पान अलगद मिटून टाकलं.
मनापासून जपलेली माणसं
क्षणात परकी झाली,
आणि विश्वासाच्या काचेवर पडलेल्या तड्यांनी
मन कायमचं बदलून गेलं.
आज ना कुणाकडून अपेक्षा आहेत,
ना कोणाबद्दल तक्रार...
कारण वेळेने एक अमूल्य धडा दिला,
**"आपले तेच असतात,
जे कठीण काळातही
आपला हात कधीच सोडत नाहीत."**
बाकीचे तर फक्त
ऋतूनुसार रंग बदलणाऱ्या पानांसारखे असतात.
वेळ आली की चेहरा बदलणारे,
आणि गरज संपली की नातं विसरणारे...
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti