भाळीचे भाग्य असावे
मृदुलस्पर्शी स्वर्गसुखाचे
अमृत प्रीतवात्सल्याचे
सौभाग्य सहृदी मित्रत्वाचे....
आयुष्याच्या वाटेवरती
दुःखातही सुखावणारे
आधाराचे हात देवूनी
कुणी असावे सावरणारे....
रमविणाऱ्या रम्यनिसर्गी
ऋतुरंगात भुलूनी जाता
मोहरल्या मिठित विरूनी
दिव्यस्पर्शात मिटुनी जावे....
जन्म, मृत्यु सत्यशाश्वती
हॄदयांतरी जपता भावप्रीती
सांजाळल्या क्षितिजावरती
जीवा लाभावी आत्मशांती....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५६
१२/१०/२०२
तुझं-माझं आयुष्य
आहे एक पिंपळपान
वार्धक्याच्या उंबरठ्यावर
शरीर झाले जाळीदार....
भुतकाळात शिरलो की आपण दोघे क्षणार्धात
याच पिंपळ वृक्षाखाली
बसलो होतो तासनतास....
तारुण्यातली रग होती
जगण्यातली धुंदी मोठी
सुखी संसाराच्या सारीपाटावर पडली दानं खोटी होती.
पानगळीच्या ऋतूत पानगळ झाली
जवळ तेवढी फांद्यांची
जाळी तेवढी शिल्लक राहिली
वहीतलं पिंपळपान
तुझं नी माझं
गीत गात हलकेच
पण जाळीतून निसटून जातो
म्हणूनच म्हणतो सखे
तुझं माझं आयुष्य
एक पिंपळ पान ....
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी
कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत
आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत
सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत
वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत
शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात
उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत
धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे
जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे
धुडकावून वर्तमानाचे सारे सावध पोलादी पहारे
त्या लहानमोठ्या आठवणींनी उठवावे अंगभर शहारे
अनुभवावा तो जुनाट श्वास मिटल्या पापण्यांमधूनी
उष्ण निश्वासासंगतीने पाघळावी स्निग्धता डोळ्यांकडांनी
जगता न येतो भूतकाळ, क्षण होतात हे निसरडे
आकंठ डोहात डुंबूनही, रहातो आपण कोरडे कोरडे
चुटपुटतो जीव धापा टाकत उसासतो वेड्यागत
उगा मन रहातं हिंदकळत दगड टाकल्या पाण्यागत
तो ओढाळ-ओढाळ वास अजूनही येतो
दाटून येतात कढ, श्वास घुसमटून जातो
मन होतं वेडंपिसं सांडलेले क्षण वेचता वेचता
लगबगतो जीव पाठी फिरता-फिरता
तेवढ्यातही फुटतात कोंब, मनाच्या गाभ्याला
क्षणिक का असो, उमलतेही पालवी मनाला
आठवणींच्या काळोख्या कप्प्याकप्प्याला आहे काचेचे दार
अंधुकसे दिसतात चेहरे सारे पण होता नाही येत पार
जाणवतात बंद दाराआडचे निश्वास नि दूरवर खोल हुंकार
घुमतात परिचित आभास नि परावर्तित होणारी गाज
दूर पहाता दिसतात लुकलुकताना माणुसकीचे दिवे
काळोखाचा होतो निचरा, प्रकटतात आठवणींचे थवे
धुसर चेहेऱ्याच्या बऱ्याच आठवणी करतात एकदम गलका
आतुरतेने, आकांताने देतात दारावर वारंवार धडका
दिसते रांगणारी गोंडसता ते दुडदुडणारी दांगटगर्दी
मस्तीखोर बेशिस्तीपासून ते शिस्तपूर्ण कवायती
दाराआडून डोकावतो मग गोबरा एक चेहेरा
सवय लागेस्तोवर शाळेचा कंटाळा करणारा
आईचा सोडताना पदर, डोळे भरुन येणारा
उगा कौतुकाला आसुसलेला हळवा निरागसपणा
झरझरतो काळ जलद चलचित्रागत डोळ्यांसमोर
जाणवतो हात तुमचा आयुष्यचित्राच्या रेखेरेखेवर
धाकाच्या धपाट्यापासून ते जिवाच्या जिव्हाळ्यापर्यंत
पाठी लागलेल्या शिस्तीपासून पाठ राखणाऱ्या आश्वस्त मिठीपर्यंत
जगण्याच्या सुरवातीपासून ते जग जिंकायच्या इर्षेपर्यंत
काळजातल्या ओलाव्यापासून नजरेतल्या निखाऱ्यापर्यंत
लोखंडाच्या परीसस्पर्शाच्या ध्येयप्रक्रियेच्या पूर्ततेपर्यंत
जागतात आठवणी, बापुडा जीव आसुसतो क्षणाक्षणाला
आपुलकीच्या ओढाळपणाला, मायेच्या वर्षावाला
आभाळाच्या छायेला नि सांभाळणाऱ्या सावलीला
चांदोमामाच्या सोबतीने, तिन्हीसांजेच्या दीपज्योतीला
आयुष्याच्या प्रगतीला होती जिद्द तुमच्या ध्येयाची
वळून पहावं जेव्हा, पाठराखण तुमच्या सावलीची
स्वप्नांना घेऊन उशाशी, आम्ही घरटी आभाळात केली
भावनेची गुंतवणूक तुमची, क्षितीजे आमची विस्तारित गेली
साठाव्या आठवणी, या आठवाव्या साठवणी
कराव्या हळूवार गोळा, नयनांच्या रांजणी
बनवावी दोन ओतीव, गाळीव त्यांची टिपं
असावी जी दाट, नात्याहूनही नीट
यावी त्यांना गूढ, सागराची अथांगता
ध्रुवाहूनही अढळ मिळावी चिरंतनता
रहावी तेवत ती शिल्पं कृतकृत्य
बनून दीपस्तंभ दोन्ही डोळ्यांत
- यतीन सामंत
जीवनभर घासुन घेतल्यावर
आता म्हणता चंदन आहे |
दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला
माझं वंदन आहे || १ ||
आता नाही मला कधी
चंदन व्हायचं |
सहाणच होईन बरी
मला नाही झिजायचं || २ ||
एक एक पान काढलंत
फांदी सहित ओरबाडून |
व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा
चित्र काढता रेखाटून || ३ ||
आता कुठला राग नाही
लोभ नाही उरला |
स्थानक येण्याआधीच माझा
प्रवास होता सरला || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
आम्हीच लावली येथे भांडणे दोन जमातीत
फोडावीत एकमेकांची डोकी हेच स्वप्न डोळ्यात ।
आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात
धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात
भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला
बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास ।
अशिक्षीत तुम्ही रहावे हाच ऊद्देश असे अमुचा
केले बहू प्रयत्न की अमुचा ऊद्देश सफल व्हावा
राहिलात तुम्ही अशिक्षीत ऊद्देश सफल झाला
धर्मांध तुम्हा बनवण्याचा डाव यशस्वी झाला ।
रक्ताळलेत हात तुमचे करुन हत्या निष्पाप अनेक
चटावली जिव्हाही अमुची चाखुनी रक्त नमुने अनेक
मातीत जाल तुम्ही ना काही सुतक आम्हाला
निवडणुकीत मते मिळवण्याचा फंडा यशस्वी झाला ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१ आक्टोंबर २०१८
एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं
भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।।
भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा
जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।।
धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं
इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।।
" नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें
आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें " ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कृष्ण कमळ-
..
भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे
निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे
कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी
कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी
बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती
विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती
मग पागोळ्यांच्या गोळ्या टपर्यांवर तडतड करती
वर चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती
उंबर्याजवळ दिसणारी वाळवीच तरणीताठी
अन कुरबुरण्यात उलटली ह्या बिजागरींची साठी
वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला
पण मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
-- ॐकार जोशी
Copyright © 2025 | Marathisrushti