आत्ताचा क्षण सुंदर करा...
कारण येथे
अनंता शिवाय
अनंत काहीच नाही.
जे निघून गेले,
ते काळाच्या ओंजळीत विलीन होत गेले.
जे येणार आहे,
ते अजून नियतीच्या श्वासातही जन्मलेले नाही.
मग उरले काय?
हा एक श्वास...
जो आत येतो,
आणि सांगून जातो
"तू जिवंत आहेस,
कारण तुझ्यात तो अनंत अजूनही धडधडतो."
जग जिंकण्याच्या धावण्यात
माणूस स्वतःलाच हरवून बसतो.
आकाश मोजण्याच्या हट्टात
स्वतःच्या अंतःकरणाचा अथांग सागर
त्याच्या नजरेतून निसटून जातो.
क्षण कधीच साधा नसतो.
तो ईश्वराने लिहिलेली
एक मौन प्रार्थना असते.
ज्याला ऐकण्यासाठी
कान नव्हे,
तर शांत झालेले मन लागते.
फुल उमलताना आवाज करत नाही,
सूर्योदयाला घोषणांची गरज नसते,
नदी वाहताना
तिच्या प्रवाहाचा गर्व नसतो.
अनंतही असाच असतो
निःशब्द...
पण सर्वत्र.
स्वतःला इतके रिकामे करा,
की प्रत्येक श्वासात
त्याची चाहूल लागेल.
इतके नम्र व्हा,
की प्रत्येक भेटणाऱ्या जीवात
त्याचाच चेहरा दिसेल.
कारण प्रेम म्हणजे
दोन हृदयांचा नव्हे,
तर एका अनंताचा
स्वतःलाच दिलेला स्पर्श.
मृत्यूही शेवट नसतो.
तो फक्त
एका श्वासातून दुसऱ्या शाश्वत शांततेत
उतरलेला प्रकाश असतो.
म्हणून...
या क्षणावर प्रेम करा.
यालाच कवटाळा.
यालाच नमस्कार करा.
कारण येथे
ना भूतकाळ आहे,
ना भविष्यकाळ...
येथे फक्त
अनंत आहे.
आणि त्या अनंतात
'मी' विलीन होतो,
'तू' विलीन होतोस,
उरते फक्त एक अखंड सत्य...
*आत्ताचा क्षण सुंदर करा...*
*कारण येथे अनंता शिवाय*
*अनंत काहीच नाही.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म
भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन
नाचत गांत राहिली, केले तुझ पावन
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी
भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
करेन कोटी, करेन कोटी
करेन कोट्या कोटी कोटी
सांभाळीन त्या छातीच्या कोटी
केवळ अस्सल एक ना खोटी
सरस्वती थैमाने ओठी
कोटीला मग कसली खोटी
- यतीन सामंत
सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,
उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,
जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,
जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,
निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,
सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे
जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे
असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे
प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे
आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं
निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी
दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला
आयुष्यातील कांहीं भाग, अर्पा तुम्हीं समाजाला
तीन दिशात्मक जीवन जगा, यश तुमचे हातीं
जीवनातील आनंद घेतां, समाधान ते लाभती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गरिब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला
बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।
छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।
काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एक होती अनु
फुलासारखी जणू
डोळे फिरवी गर्र गर्र
पाऊल टाकी भरभर
तिला लागली भूक
गडू दिला एक
बघितला रिकामा गडू
तिला आले रडूं
आईने दुध भरले
कांठोकांठ ओतले
तिला हवय जास्त
दूध आहे मस्त
रडरड रडली
आदळ आपट केली
सांडूनी गेला गडू
पाठींत बसला मात्र धम्मक लाडू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१
तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे
तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६
केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली
काय हवे तिजला, या अवचित वेळी....७
जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती
हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य
चिव चिवणारी पिल्ले, होती तयाची लक्ष्य....११
चाहूल माझी लागता, सावध परि झाला
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नशीब नाही
म्हणून ओरडू नको
नशीब आहे
म्हणून मान उंचावू नको
पैसा नाही
म्हणून रडू नको
पैसा आहे
म्हणून जास्त खर्च करू नको
घरदार नाही
म्हणून भिक्षा मागू नको
घरदार आहे
म्हणून भटकू नको
दुःख आले आहे
म्हणून खचू नको
सुख आले आहे
म्हणून जास्त उडू नको
हे माणसा.....!
काही गोष्टी मिळतात
काही गोष्टी मिळत नाहीत
पण तू त्या गोष्टींची जास्त हाव ठेवू नको
- कौस्तुभ प्रभु
कुणी तरी असावं...
हाकं मारताच परत येणारं
डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं .......
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं.....
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं......
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं.....
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं...
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं......
- दिप....
Copyright © 2025 | Marathisrushti