पुण्यामधलंच स्थळ हवं ।
मुंबईला सेकंड ऑप्शन ।
लिकर पी कर विकएन्ड ।
लाईफसाठी हीच कॅप्शन ।।
शनवारवाडा , वैशाली हे ।
आऊटडेटेड झाले पॉईंट्स ।
गोल ऍचिव्ह करण्यासाठी ।
शोधते मी नव्या हाईट्स ।।
मल्टिप्लेक्स , मॉल मध्ये ।
टाईमपास भारी होतो ।
सिंहगड पर्वतीवर ।
आता कोण जातो येतो ?
फेबु ट्विटर मेसेंजरवर ।
अपडेट्सचा धूर अन् जाळ ।
मेमरी होते फुल तरीही ।
नेटवरचा येतोच गाळ ।।
जेवण घरचं बेचव सालं ।
हवा यार पिझ्झा बर्गर ।
पब क्लब डान्सफ्लोअर ।
सच तो है ये हुक्का पार्लर ।।
बाईकवरची नशाच न्यारी ।
गच्च धरावं बॉयफ्रेंडला ।
तोंडावरती स्कार्फ बांधून ।
थेट घुसावं लॉंग ड्राइव्हला ।।
चॅटिंग डेटिंग करण्यासाठी ।
फार्म हाऊस पॅकेजवाली ।
ब्रेकअप , पॅचअप इव्हेंट्ससाठी ।
तिथेच होते पार्टी ओली ।।
ऑनलाइन मिटिंगमधल्या ।
पोझिशन्स अँड कमिटमेंट्स ।
एमबीए चं येडं पकवतं ।
रिझल्ट्स, मॉरल , एटिकेट्स ।।
स्थळाला दे होकार बये ।
आई रडते रोज घरी ।
' वय वाढतं ' बोअर करते ।
पॅनिक होते घरीदारी ।।
नकोच मुलं , नकोच नाती ।
डस्टबीन्स तर नकोच घरी ।
ऑकेजनली ड्रग्ज साठी ।
लिव्ह इन चा ऑप्शन भारी ।।
चौकट नको , स्पेस हवी ।
त्यासाठीच तर धावाधाव ।
माझं पॅकेज , माझं शहर ।
मीच ठरविन , माझी हाव ।।
* * * *
पस्तिसाव्या वाढदिवशी ।
कुणी नाही विश केलं ।
अजून तिला कळलं नाही ।
क्षितीज किती दूर गेलं ।।
अजून तिला वाटत राहतं ।
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
आरसा हसतो हळूच गाली ।
तिला नसतं भान नवं ।।
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
मी नदी...
तुमच्या आईसारखीच...
फरक एवढाच,
तिने तुम्हाला जन्म दिला,
आणि मी तुम्हाला जगवलं...
हिमशिखरांच्या कुशीत जन्म घेऊन,
डोंगरदऱ्यांतून धावत आले.
तुमच्या सुखासाठी माझे आयुष्य,
हसत-हसत मी वाहत राहिले.
माझ्या कुशीत खेळलात तुम्ही,
माझ्याच पाण्यात वाढलात तुम्ही.
माझ्या काठी स्वप्नं पेरून,
सोन्याची शेती फुलवलात तुम्ही.
तहान तुमची मीच भागवली,
भूक तुमची मीच हरवली.
तुमच्या प्रत्येक आनंदासाठी,
माझी प्रत्येक लाट झिजत गेली.
पण...
आज माझ्याच लेकरांनी,
माझ्या कुशीत विष कालवलं.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली,
माझं ममत्वच गाडून टाकलं.
आज माझ्या लाटा वाहत नाहीत,
त्या तर निःशब्द रडत आहेत.
प्रत्येक लाटेच्या हुंदक्यात,
हजारो वेदना दडल्या आहेत.
माझे मासे तडफडून मेले,
पक्ष्यांनी माझी साथ सोडली.
हिरवीगार किनाऱ्यांची शाल,
आज विराण वाळूत हरवली.
मी कधीच काही मागितलं नाही,
फक्त तुमच्यावर प्रेम केलं.
तुमच्या सुखासाठी आयुष्यभर,
स्वतःचं अस्तित्व अर्पण केलं.
आज मात्र एकच प्रश्न विचारते...
**आईचं दूध विषारी झालं तर,
लेकरं कशी जगतील?
नदीचं पाणीच मेलं तर,
माणसं तरी कशी वाचतील?**
अजूनही माझ्या डोळ्यांत आशा आहे,
अजूनही तुमच्यावर विश्वास आहे.
माझे अश्रू पुसा...
माझ्या जखमा भरा...
माझ्या प्रवाहाला पुन्हा
निर्मळ श्वास द्या...
कारण...
*मी फक्त नदी नाही...
मी तुमचा श्वास आहे...
मी तुमचं भविष्य आहे...
मी जिवंत राहिले तरच,
तुमचं उद्याही जिवंत राहील...*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मानवता जागवली जाते
नसानसात जिथे
संस्कृती फोफावली जाते
आदर्श घडतात तिथे (१)
-- सौ.माणिक शुरजोशी
शिव कुणाचे चिंतन करितो ?
प्रश्न पडला मनी,
तोच तर आहे प्रभू जगाचा
काय तयाचे ध्यानी...१,
जेव्हां आम्ही चिंतन करितो,
ध्यान लावी प्रभूकडे,
प्रयत्न करूनी जगास विसरे,
लक्ष केंद्रितो त्याजकडे....२,
उलट दिशेने शिवाचे चिंतन,
चालते जगतासाठीं
ध्यानामध्यें स्वतःसी विसरे,
लक्ष्य त्याचे इतरासाठीं ....३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे...
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि ...
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ....
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
'नाहीच बोलणार मी आता'
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो.....
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८
आई भाकर
थापते चार
खायला सारे
बेजार फार
-- माणिक (रुबी)
एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar”gmail.com
सह्यगिरीच्या डोंगररांगा
हिरवाईने नटून बहरल्या |
रंगबिरंगी रानफुले गोजिरी
भाळावरती त्यांनी माळीली |
संततधारा शिरी बरसात होत्या
मेघातुनी अलवारश्या रेषा |
झाकोळून गर्द रंग हा गहिरा
घननीळ नभातच मिसळून गेला |
वेध लागले सहस्त्ररश्मीला
कधी पाहतो शृंगार धरेचा |
हळूच बाजूला करुनी ढगांना
थोपविल्या त्या झरझर धारा |
अलगद पसरली रवी किरणेही
सोन पाऊली धरणीवर उतरली |
उघडून निळी आभाळाची छत्री
प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |
व्योमाच्या या लख्ख उजेडात
सातारा माझा उजळुन निघाला |
सृष्टीच्या ऐकून या काव्या
भैरोबा पेढ्याचा हसला ||
?मी सदाफुली
©✍️संध्या प्रकाश बापट

तव बकुळफुलांच्या सुगंधात
अजुनही मी विरघळतो आहे..
कां? या प्रश्नाला उत्तर नाही
भाग्यच भाळीचे भोगतो आहे..
तव लडिवाळ स्मरण गंधाळ
चराचरातुनी दरवळतो आहे..
काय, काय, कसे विसरावे
याच संभ्रमी मी जगतो आहे..
घुसमट विरही असह्य जीवा
मनआभाळही गहिवरले आहे..
तव बकुळफुलांच्या सुगंधात
अजुनही मी विरघळतो आहे..
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८१
२/११/२०२२
जागा वाटपातील वाढती अस्वस्थता
Copyright © 2025 | Marathisrushti