दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 8, 2015
पावसाने हलकं झालेलं आभाळ
आज पक्षांनी पार भरून गेलं
चिव चिव निनादली रानभर
मन रानभर वार्यासंग हुदडलं
-- शरद शहारे
February 20, 2020
समोर ये तूं केंव्हा तरी,
बघण्याची मज ओढ लागली,
फुलूनी गेली बाग कशी ही,
बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।
कल्पकता ही अंगी असूनी,
दूरद्दष्टीचा लाभ वसे,
अंधारातील दुःखी जनांची,
चाहूल तुज झाली असे ।।२।।
शीतल करुनी दुःख तयांचे,
जगण्याचा तो मार्ग दाखविला,
सोडूनी सारे वाटेवरी,
आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।
आस्तित्वाची चाहूल येते,
आज इथे केंव्हातरी,
तव आशीर्वादे जगतो सारे,
हीच पावती त्याची खरी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 24, 2017
February 1, 2022
।। विषय जरी दारु असला तरी !
।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल !
।। पिऊन थोडी चढणार असेल
।। तरच पिण्याला अर्थ आहे
।। एवढी ढोसून चढणार नसेल
।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
।। मी तसा श्रध्दावान
।। श्रावण नेहमी पाळतो
।। श्रावणात फक्त दारू पितो
।। नॉनव्हेज मात्र टाळतो
।। ज्याची जागा त्याला द्यावी
।। भलती चूक करू नये
।। पिताना फक्त पीत रहावं
।। चकण्यानं पोट भरू नये
।। वेळच्या वेळी आपण ओळखावी
।। आपली आपली आणिबाणी
।। लाज सगळी सोडुन देऊन
।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
।। पिऊन तर्र झाल्यानंतर
।। काय खातोय ते कळत नाही
।। खाल्ल्यानंतर बिलामधली
।। टोटल कधी जुळत नाही
।। अशीही वेळ असते जेंव्हा
।। कोणीच आपला नसतो
।। म्हणून आपण प्यायला जातो
।। तर नेमका ड्राय डे असतो
।। असं उगीच लोकांना वाटतं
।। की दुःख दारूत बुडून जातं
।। दुःख असतं हलकं हलकं
।। अल्कोहोलसोबत उडून जातं!
।। एकदा प्यायला बसल्यानंतर
।। तुझं-माझं करू नये
।। तुझी काय, माझी काय
।। नशा कधी सरू नये
।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,
।। जाण्यासाठी भांडू नकोस
।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,
।। पण दारू अशी सांडू नकोस
।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
।। बर्फ नको, सोडा नको
।। उंच आभाळी उडण्यासाठी
।।पंख हवे... घोडा नको !
।। फॉरीन लिकर कितीही प्यावी
।। काही केल्या चढत नाही
।। देशी आपली थोडीशीच प्यावी
।। दोन दोन दिवस उतरत नाही
।। पिणं असतं आगळा उत्सव
।। त्याचा उरूस होऊ नये
।। प्यायला नंतर आपला कधी
।। वकार युनूस होऊ नये
।। घरी बसून दारू प्यायचे
।। खूप सारे फायदे असतात
।। हॉटेलमधे, बिल भरायचे
।। काटेकोर कायदे असतात
।। आम्ही कधीच दारूमधे
।। दुःख आमचं बुडवत नाही
।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो
।। भेसळ आम्हाला आवडत नाही
।। हवा तसा मी चालतो आहे
।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ?
।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी
।। पचवून दाखव, नंतर बोल!
।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
।। काही ' न ' पिणारे मित्र
।। पार्टीनंतर आपल्याला
।। आपल्या घरी नेणारे मित्र
।। पिणाऱ्यांनी समाजाचा
।। कुठलाच कायदा पाळू नये
।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
।। प्यायचा मोह टाळू नये
।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो
।। पानी लागेल ते चरत असतो
।। जेंव्हा माझं बिल कोणी
।। दुसराच माणूस भरत असतो
।। काय होतंय, कुठे होतंय
।। काही केल्या कळत नाही
।। एकदातरी वेळ अशी
।। पिणाऱ्यांना टळत नाही
।। प्रत्येकानंच आपला आपला
।। जसा घ्यायचा असतो श्वास
।। तसा प्रत्येकानं आपला
।। सांभाळायचा असतो ग्लास....
।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण
May 16, 2019
जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,--?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,-- कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,--!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,--!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,--!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,--!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,--!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 2, 2019
आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?
तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,
सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,
कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,
विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी
मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,
मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा
समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,
मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,
आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालवितो.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 27, 2019
फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे,
कष्ट सोसले शरिर मनानें, चीज त्याचे झाले दिसे ।।१।।
बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने,
यश ना पडले पदरी. पाठ फिरविली नशीबाने ।।२।।
निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती,
शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।।
लिहिता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता,
छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता ।।४।।
त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती,
सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती ।।५।।
काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी,
मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी ।।६।।
मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी,
काव्यातील आनंदात , डुबता सारे विसरूनी ।।७।।
विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फूर्ती देवता,
अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता ।।८।।
अनुभव होता तनामनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते,
उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते ।।९।।
लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी,
परिस्थितीशी झगडा देऊनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी ।।१०।।
गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे,
सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळ ।।११।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 19, 2016
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 21, 2020
November 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti