वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
झाडे लावा झाडे जगवा असे जनसामान्य म्हणतो. पण एक झाड जीवन देते, वाढविते, पुष्ट करते, पर्यावरणाचे रक्षण करते. तर भ्रष्टाचार रूपी झाड मनाच्या मातीत रुजते आणि मानवाला सैरभैर करून सोडते. या झाडाची फुले व फळे विषारी असतात. वडाच्या झाडाला आलेली फुले व फळे औषधी असतात. याच्या पारंब्या जमिनीत खोल जाऊन झाडाला आधार देतात. तर भ्रष्टाचार रूपी झाडाच्या पारंब्या खोल जाऊन झाडाला पोकळ करतात.
December 15, 2011
द के. डी. सिंग बाजू स्टेडियम हे भारतातील लखनौ शहरात आहे. हे मैदान हॉकीचे मैदान म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू के. डी. सिंग यांचे नाव या मैदानाला देण्यात आलेले आहे.
July 17, 2023
शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.
आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.
या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.
मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.
एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.
तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.
एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !
इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.
परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.
मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.
तसेच या चवींचे आहे.
कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.11.2016
November 1, 2016
मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे.
April 4, 2017

पेंढारे’ या गावाला ‘कर’ जोडून हे आडनांव तयार झालं असावं असा प्रथम दर्शनी समज होतो. ‘पेण्ढरकर’ या आडनावावरून राजकवी यशवंत यांचे पूर्वज ‘पेण्ढर’ या मूळ गावाचे रहिवासी असावेत असाही रास्त समज होतो.
June 10, 2016
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
-- निखिल मुदगलकर
March 26, 2010
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!
November 24, 2019
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
October 26, 2017
आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता ही चोळामोळा करून फेकून द्यायची गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीतही बातमीचे पावित्र्य जपणाऱ्या ज्या काही मोजक्या प्रसारण संस्था जगात आहेत, त्यात अजूनही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन म्हणजे बीबीसी चे नाव घेतले जाते.
October 18, 2021
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
September 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti