वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शस्त्रास्त्र आयातीत भारत आघाडीवर असून दुसर्या स्थानी चीन आणि तिसर्या स्थानी पाकिस्तान आहे, असे म्हटले आहे. अहवालातील ही आकडेवारी बरोबर आहे. यापूर्वी चीनचा क्रमांक शस्त्रास्त्र आयातीत पहिला होता. परंतु चीनने आपल्या शस्त्रास्त्रासंबंधीच्या धोरणात बदल केला.
April 9, 2014
हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.
ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.
२)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.
३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.
४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.
५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.
अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 24, 2016

एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची....
एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. मंदिराचे बांधकाम हे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही व्हावी. या बद्दल सर्वांचच एकमत झालं आणि कामाला सुरुवात झाली.
मंदिराचं बांधकाम एकीकडे सोपवण्यात आलं. तर दुसरीकडे एका शिल्पकाराकडे श्री गणेशांच्या मूर्तीचे काम देण्यात आले. या शिल्पकाराचं नाव होतं विदुर. विदुर हा शिल्प घडविण्यात अतिशय पारंगत होता. पाषाणातून एक जागृत आणि बोलक्या डोळ्यांची जिवंत प्रतिमा उभी करणं हे विदुरचं एक वेगळच वैशिष्ट्य.... पण हे वैशिष्ट्य साध्य करी ते केवळ ध्यानामुळेच... विदुर हा ध्यानस्थ गुरूंचा शिष्य होता. ध्यानगुरूंकडून विदुरने कित्येक वर्षे ध्यान-ज्ञान आत्मसात केले होते. म्हणून तो प्रत्येक शुभकार्यासाठी सहजरीत्या ध्यान लावी आणि त्यातून यश मिळवत असे. म्हणूनच प्रत्येक मूर्ती विदुर ध्यान लावून घडवत असे. त्याच्या या ध्यानामुळेच पाषाणाला ही जागृत अवस्था मिळे.
या मंदिरात असलेली पूर्वीची श्रीगणेशांची मूर्ती देखील विदूरच्या पूर्वजांकडूनच कोरण्यात आली होती. म्हणूनच जशीच्या तशी हुबेहूब मूर्ती घडवणं हे विदुरलाच शक्य आहे. असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास होता. पण विदुरला शिल्प कोरण्यासाठी इतर शिल्पकारांपेक्षा काहीसा अधिक कालावधी लागेल, याची सुद्धा गावकऱ्यांना जाणीव होती. आणि हे मान्यही होते. कारण मंदिर नव्याने उभं करण्यासाठीही तितकाच कालावधी लागणार होता.
इथे नव्याने मूर्ती कोरण्यासाठी मोठ्या दगडाची आवश्यकता होती. म्हणून विदुरने काही दिवसातच मूर्ती घडविण्यासाठी लागणारा एक मोठा दगड शोधून काढला आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा ठराविक पटीने लहान असा दुसरा दगड शोधून काढला. मोठा दगड हा साक्षात श्री गणेशाची मूर्ती घडविण्यासाठी होता तर लहान दगड हा मूषकाची मूर्ती घडविण्यासाठी होता.
थोडाही वेळ न घालवता विदुर ने आपले काम हाती घेतले. मूषकाची मूर्ती बऱ्यापैकी लवकर होईल, या विचाराने विदुरने सर्वात प्रथम लहान दगड निवडला आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे लहान दगड समोर ठेवला. आणि त्यावर ध्यान लावले. ध्यान लावल्यानंतर विदुरने दगडाशी बोलून त्याला कोरण्यासाठी त्याची अनुमती मागितली. लहान दगडाने होकार दिला. विदूरने आपले काम सुरू केले. विदूर प्रत्येक मूर्ती घडवताना आपली नेहमीची एकच लहानशी चिनी आणि हातोडी वापरत असे. आपल्या हलक्या हाताने दगडाला कोरत असे. जेणेकरून त्या दगडांमध्ये प्राण आहेत.
विदुरने सुरुवात करायला घेतली तोच त्या लहान दगडाला लगेच वेदना व्हायला लागल्या. विदुर थोडं थांबला आणि पुन्हा त्याने थोड्यावेळाने सुरुवात केली. पुन्हा त्या दगडाला वेदना व्हायला लागल्या. शेवटी विदुरला त्या दगडाने स्पष्ट सांगून टाकले की, "अरे बाबा, मला सोड, मला नको कोरूस. कोण या अवजारांचा घाव सोसेल, मला ते काही जमणार नाही, जिथून तू मला आणलंस. पुन्हा मला तिथेच नेऊन ठेव. मला या असहाय्य वेदना नकोत, मला जाऊदे परत त्याच जंगलात....!
विदुरने हे सर्व शांतपणे ऐकले. आणि त्याने या लहान दगडाला एका बाजूला ठेवले. तो तसाच उठला आणि काहीही उत्तर न देता मोठ्या दगडाजवळ गेला. आपल्या रोजच्या सवयी प्रमाणे काही वेळ ध्यान लावले. शुभ संकेत ऐकले आणि आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली. मोठा दगड खूप आनंदी होता. वेदना या सारख्याच होत्या. मोठा दगड हा आकाराने मोठा असल्यामुळे त्याला अधिक वेदना सहन कराव्या लागणार होत्या. पण यासाठी त्याची तयारी होती. या वेदनांचा त्याला स्वीकार होता. जमिनीतून मोत्यासारखे दाणे तेव्हाच उगवतात, जेव्हा ती जमीन नांगराचे घाव सहन करते. प्रत्येक ऋतूंचे परिणाम सहन करते. याची त्या दगडाला परिपूर्ण जाणीव होती म्हणून या दगडाला विदुरचे घाव सहन होत होते.
कित्येक महिने या दगडावर कोरीव काम सुरू होते. पण त्या दगडाने आपली सहनशक्ती वेळेनुसार वाढवली होती. सहन करण्याची क्षमता वाढवली होती. बघता बघता इकडे मंदिर उभे राहिले. दीड वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही. मंदिराचं बांधकाम फार सुंदर झालं होतं. आता गावातल्या सर्वांना यात स्थापित होणाऱ्या मूर्तीचं विशेष कुतूहल होतं. गावातल्या काही मुख्य लोकांनी काही जणांना विदूरच्या घरी मूर्ती घडविण्याचे शिल्पकाम कितपत पूर्ण झाले हे पाहण्यासाठी पाठवले. त्याचप्रमाणे चार-पाच जण तिथे मूर्ती कितपत पूर्ण झाली आहे हे पाहण्यासाठी आले. विदुरने त्यांचे आदरातिथ्य केले. आणि मूर्तीला दाखवून म्हणाला, "अजून चार-पाच दिवस मला द्या, काम पूर्ण होतच आले आहे." त्याच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक होकार देऊन तिथून निघून गेले.
विदुरने मूषकाची मूर्ती कोरली नव्हती, म्हणून श्रीगणेशांच्या मूर्तीच्या चरणी त्याने मूषकाचे रूप घडविले आणि चार-पाच दिवसातच मूर्तीला परिपूर्ण केले. पाच दिवसांनी विदुरच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक विदुरच्या घरी आले. आणि सोबत गाडी देखील घेऊन आले. कारण श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत वाजत-गाजत न्यायची होती. विदुरने मूर्ती गावकऱ्यांना सोपवली. गावकऱ्यांनी मूर्तीला पाहिले. सर्वांना मनोमन फार आनंद झाला. अगदी हुबेहूब पूर्वीच्या मूर्तीचेच स्वरूप घडविलेले होते. त्या सर्वांनी श्री गणेशांच्या मूर्तीला नमस्कार केला. आणि आदराने उचलून ती मूर्ती गाडीमध्ये ठेवली. मूर्तीच्या मागेच मूषक कोरण्यासाठी आणलेला लहान दगडही त्यांना दिसला. त्यांच्यातल्याच एकाने तोही उचलला. आणि मंदिरात याचा काहीतरी उपयोग करू, या विचाराने तोही गाडीमध्ये ठेवला.
श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत आली. गावकऱ्यांनी मिळून मूर्तीला गाभाऱ्यामध्ये स्थापित केले. मंदिराच्या पूजाऱ्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पूजा-अर्चना केली. आरती केली. सर्वांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. तोच त्यातल्या त्यात एकाच्या लक्षात आले की, आपण गाडीमधून आणलेला एक लहान दगड जर येथे ठेवला तर नक्कीच नारळ फोडण्यासाठी त्याचाही उपयोग होईल..... त्याने लगेचच जाऊन तो दगड मंदिरात आणला आणि बाजूला ठेवून दिला. आता प्रत्येक जण त्यावर नारळ फोडू लागला. या दगडाला आधीच वेदना सहन होत नव्हत्या आणि त्यात अजून या वेदना.... तो फार रडू लागला.
हळूहळू भक्तांची गर्दी कमी झाली आणि मध्यान होताच पुजाऱ्यांनी गाभार्याचे दार लावून घेतले. तोच लहान दगडाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. तो खूप मोठ्याने रडू लागला. आणि श्री गणेशांच्या मूर्तीकडे पाहून तो म्हणाला. जर त्यावेळी मी ही त्या शिल्पकाराचे घाव सोसले असते, तर आज माझीही जागा वेगळी असली असती आणि मी इथे पडून राहिलो नसतो. माझी आरती झाली असती, ओवाळणी झाली असती, पूजा-अर्चना झाली असती, नैवेद्य दाखवला गेला असता, मलाही फुलांनी सजवले गेले असते, पण हे सर्व मी गमावले कारण तेव्हा मी सहन केले नाही. त्यामुळे आता या मोठ्या दुःखाला मला सामोरे जावे लागतेय.
कधीकधी खूप कमी वेळ दुःख सहन करून, अनंत काळापर्यंतचा आनंद मिळवता येतो....
-- स्वाती पवार
May 13, 2021
भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय. अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत. अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही. त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.
नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते. एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.
अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे. जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.
अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.
उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.
उटणे बनविण्याची कृती.
साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 9, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
May 12, 2017
“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात.
July 14, 2022
हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला.
February 6, 2022
मेंदूतील ‘आरक्युएट फॅसिक्यूलस’ ही मेंदूतील नसांची जुडी, भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे विविध भाग एकमेकांना जोडते. आर्क्युएट फॅसिक्यूलस हा भाग किती विकसित झाला आहे, यावरून त्या प्राण्याची बोलण्याची क्षमता कळू शकते.
November 11, 2021
सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते.
February 26, 2023
८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .
March 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti