एक होती शाळा
शाळेत होता फळा
फळ्यासमोर मुले बसत
असेच रोज वर्ग भरत
शाळेचे एक होते मैदान
चाले तिथे रोज घमासान
खेळांचे मग डाव भरत
दिवसा मागून दिवस सरत
बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी
आता कसली शाळा
आणि कसले मैदान
कोरोना च्या धाका पाई
मुले झालीत हैराण
हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.
-- भैय्यानंद वसंत बागुल.
January 21, 2022
कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन
जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन...१,
झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले
सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले...२,
कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी
जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी...३,
गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला
सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
April 23, 2019
शून्य होऊन जगता यावं,
कुणाची वाट पाहत नाही,
कुणाच्या आठवणींनी
रात जागवावी असंही नाही.
कोणी भेटलं तर ठीक,
नसलं तरी चालेल,
मनाला एवढंच कळलं पाहिजे
आपण पुरेसे आहोत,
हे कुणी सांगायला नको.
हसू येईल तेव्हा हसावं,
डोळे भरले तर
त्यांना थांबवू नये,
दुःख आलं
म्हणून स्वतःवर रागही नको.
कुणी सोबत राहिलं
तर आभार मानावेत,
कुणी निघून गेलं
तर दोष कुणालाच नको,
सगळं होतंच,
म्हणून होतं
इतकंच समजून घ्यावं.
शून्य म्हणजे एकटेपणा नाही,
ते म्हणजे मनाचं
हलणं थांबणं,
जिथे काही हवं नसतं,
आणि तरीही
श्वास शांत चालू असतो.
शून्य म्हणजे पोकळी नाही,
तो एक अथांग आकाश आहे,
जिथे ‘मी’ हळूहळू विरघळतो,
अहंकाराचा आवाज मंदावतो,
आणि इच्छांची राख
शांतपणे खाली बसते.
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे काही मिळवायचं नसतं,
काही सिद्ध करायचं नसतं,
आणि तरीही
असण्याची जाणीव
पूर्णत्वाने धगधगत राहते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 30, 2026
मी तुला स्वप्नात पाहू लागले
दूर रानी मोर नाचू लागले
दिवस हे नाहीत जरिही पावसाचे
का अवेळी मेघ बरसू लागले?
चाललो एकत्र इतुकी पावले
मी नव्याने तुज बघाया लागले
फिरुन का मी षोडषी झाले आता?
हृदय माझे धडधडाया लागले
काय हे माझे तुझे नाते असे?
हृदयास मी माझ्या पुसाया लागले
तू नको देऊ उजाळा आठवांना
काठ डोळ्यांचे भिजाया लागले
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 5, 2023
असा कसा, जसा तसा,
जीवनाचा हा प्रवास,
किती कष्ट दुःखे, यातना,
कधी आनंदाचा मधुमास,--
कधी कटू कधी गोड,
कधी तिखट, कधी आंबट,
चवी जितक्या येती वाट्या,
तितुके पडती विविध सायास,--
कधी गंमत, कधी मजा,
कधी जोरा, कधी सजा,
कधी रंक होतो राजा,--
कधी राजाचाच बने दास,--!!!
केव्हा वाटे जीवनगाणे,
सुरेल स्वर्गीय ते तराणे,
कधी अंतर्दुःख पुराणे,
कधीही सोसावे घोर शल्यांस,--!!
पाऊस आठवणींचा जसा,
हृदयात अविरत पडतां,
गहिंवर मनातले संचारता
ओसंडे संयमाची कांस,--!!!
कधी प्राक्तनाचा लचका,
कधी दुष्कर्मांचा फटका,
केव्हा सामोरी अपघाता,
कधी अचानकच हर्षोल्हास,--!!!
वेळ पुढे-पुढे धावता,
आयुष्याला गती मिळतां,
सरता काळाचा महिमा,
भूतकाळी रमणे खास,--!!!
वेदनांची रेलचेल होता,
शारीरिक व्यंगे उफाळता,
यातनांचा करता सामना,
हतबलता करे सारखे उदास,--!
कधी श्रद्धा, तर अंधश्रद्धा,
तोंड देणे, कधी विश्वासघांता,
कधी नात्यांचा होतसे चुरा,
असे शत्रुत्वही घेते घास,--!!!
प्रश्न कधी अस्तित्वाचा,
केव्हा अस्मिता, अहंकाराचा,
कधी दीनदुर्बळ जिकिरीचा,
अपुरे ठरती सारे प्रयास,--!!!
हिमगौरी कर्वे ©
August 20, 2019
जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने,
पडेल प्रवाहीं तिच्या कुणी, लागते त्याला वाहणे....१,
काही काळ वाहतो देह, डूबून जाणे लक्ष्य तयाचे
कसा वाहतो केंव्हां डुबतो, वेग ठरवी हे प्रवाहाचे....२,
बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती
वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होवून काठी राहती,....३,
देह क्षणाचा जरी, त्याची कर्मे चिरंतर राहती
कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना आठवण देती...४,
त्या कर्माच्या राही आठवणी, मार्गदर्शक जी बनती इतरा
डुबणाऱ्या त्या देहाकडूनी, सावध राहूनी कर्म करा....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 18, 2019
November 3, 2021
March 26, 2022
आज हे आकाश मजला, थोटके का भासते
झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?
उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते
चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?
अथांग सागर खोल जरी ती, डूबकी घ्यावी वाटते
जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?
काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते
केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 30, 2019
सत्य, अहिंसा, साधी राहणी,
महात्मा गांधींची विचारसरणी
तत्वांची सगळ्या किती हेटाळणी,
कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
May 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti