अग्ग बाई!!
सास्सु बाई
सदा त्यांना
अस्से घाई
ओsss!अरेच्चा!
पहा पहा
आधुनिक
पोषाख हा
अय्यो गडे!
इश्श गडे!
माझ्झी सासू
पहा गडे!
त्यांना तुम्ही
हसू नका
नाव मुळी
ठेवू नका
अय्यो रामा!
म्हणू नका
अभ्यासू त्या
ज्ञान ऐका
ज्ञानपिठ
पुरस्कार
त्यांना मिळे
मान थोर
छंद त्यांचा
ओssss!बघा ना
पुस्तकांचा
हा खजिना
नम्र अति
त्या आहेत
हो!मी सुन
भाग्यवंत
(कल्पनेत कल्पिलेल्या सास्सूबाई)
-- सौ. माणिक शुरजोशी
मराठी माणसाची
रित लय भारी
त्याच्या वागण्याची
रितच कांही न्यारी
........कुणी म्हणतसे
.......त्याला खेकडा
.........तर कुणी म्हणे
........हा अपुला बापडा
करीतसे गोष्टी
फार मोठ्या मोठ्या
धाव असे कुंपनापर्यंत
फार छोट्या छोट्या
..........व्यवहार करताना
..........भावनेला तो मध्येमध्ये आणि
..........फायद्याच्या गोष्टींवर
..........सोडून देई पाणी
भावना जेव्हा आड येई
तेव्हा पैसा त्याचा जाई
पैशाला पैसा खेचतो
याची जाण त्याला नाही
...........गरीबीतच राहण्यास
...........मानितसे धन्यता
..........मोठ मोठ्या गप्पा मारून
...........स्वत:ची फसवणुक करीतसे अन्यथा
म्हणूनच मराठी माणूस
दिसत नसे व्यवसायात
इमाने इतबारे सेवा करून
मान मिळविण्याचा प्रयत्न करीतो
धनिकांच्या दप्तरात
............राहणार नाही काय मागासलेला
............मग तो आर्थिक व्यवहारात?
............कसा बरे तो दिसू लागेल
............व्यापार उदिमात?
दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हिशोब तुजला घ्यावयाचा, मानव दरबारी थोडा,
दृष्य केले जे का येथे, मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।
अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण, ना कोणी येथे,
खरा हिशोब तोच कर्माचा, पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।
नीती अनीतीच्या चाकोरीतून, जाई कुणीतरी असा एकटा,
मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।
बाह्यांगाचे कर्म निराळे, शरिरमनाशी निगडीत ते,
अंतकर्मे आत्म्याची जाणे, बंधन त्यावरी कुणाचे नसते ।।४।।
असेल जे का सत्य तेवढे, चिटकूनी राही आत्म्यासंगे,
शरिर मनाच्या विळख्यामधूनी, सोडवूनी घेई आपली अंगे ।।५।।
क्षणात जाईल जळून सारे, देह मनाचे जे जे वेष्ठण,
सोडून मागे केवळ राही, सत्य आधारीत असे ते जीवन ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
https://youtu.be/0rAv7mcDBwU
मित्रांनो, "हार-जीत बनुनी बघ " ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
"माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा.
"माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
subscribe me : https://www.youtube.com/channel/UCWg4s4JepryoGlUdgiAFttQ
थोडेसेच जेवण का असेना
मेष आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।
वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।
कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
मिथुनाचे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।
'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
कर्केचे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।
राजस जेवणाच्या सिंहेचा
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।
'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
कन्येची जेवायची नीती.. ।।६।।
भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
तूळ खाते पाचक गोळ्या.. ।।७।।
काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण वृश्चिकेला रुचत नाही.. ।।८।।
कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
धनू काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।
ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो मकर
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।
निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
कुंभेची चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।
कधी-कुठेही जमते
मीनेची खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।
आहे ना गंमत !
स्वतःची रास तपासून बघा
WhatsApp वरुन आलेली कविता
महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
-- WhatsApp वरुन आलेली कविता
-- सुशांत
एक होती शाळा
शाळेत होता फळा
फळ्यासमोर मुले बसत
असेच रोज वर्ग भरत
शाळेचे एक होते मैदान
चाले तिथे रोज घमासान
खेळांचे मग डाव भरत
दिवसा मागून दिवस सरत
बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी
रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी
आता कसली शाळा
आणि कसले मैदान
कोरोना च्या धाका पाई
मुले झालीत हैराण
हात धु , मास्क घाल, हेच रोज ऐकू येतं
अन मोबाईल हाती घेऊन, युद्ध त्यांचे सुरू होतं.
-- भैय्यानंद वसंत बागुल.
माझ्या भोवताली,
माणसांचे रान,
चहूबाजूंना असूनही,
वाटा सुनसान,--!!!
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
नातीगोती किती,
प्रश्न एकच पडे,
विचारती किती,--
टोचे सले असे एकटेपण,--!!
माझ्या भोवताली,
मित्रपरिवार किती,
असंख्य हात निव्वळ,
फक्त वर ते उठती,
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
पिके खूप मतांची,
उपयोगाला येती,
त्यातील का कधी,--!!
टोचे सले असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली, दे
कितीक सहयोगी,
असते का त्यांना,
आंच हितचिंतनाची,--?
टोचे सले असे एकटेपण,--!!!
माझ्या भोवताली,
माझे असे किती,
प्रेम माया कुठली,
आणावी आपुलकी,--
टोचे, सले, असे एकटेपण--!!
माझ्या भोवताली,
इहलोकातील गर्दी,
प्रांजळ निर्मळ,
भावना कोणाची खरी,--
टोचे सले असे एकटेपण,---!!!!
© हिमगौरी कर्वे.
-- स्वाती ठोंबरे.
Copyright © 2025 | Marathisrushti