(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • न मागितलेल्या वेदना

    काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात
    भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात

    काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात
    आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात

    एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात
    नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात

    हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो
    स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो

    वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून
    'सुखी माणसाचा सदरा' विरविरतो लक्तरं होऊन

    हर एक सकाळी जिवंत असणं असावं का हे वरदान
    का लिखिताच्या अभिशापाने असावं फर्मावलेलं दंडविधान

    जळजळता अनाहूत, कलंक भाळी लेवून
    जीवनाला सामोरं जाणं मान वर करुन
    भार शिक्षेच्या कवचकुंडलांचा अंगावर धारुन
    खूप आतून यावा लागतो निर्धार हुंकार होऊन!

    सोनं होणं नशीबी नसलं तरीही
    आगीतून जाणं क्रमप्राप्त होतं
    आपल्या सजेचा खलिता गळ्यात टांगून
    पाय ओढत रहाणं आपल्याला भाग असतं

    वावटळीने विखुरलेल्या मनाची जुळव चिवटपणाने करतो
    आश्वासित आत्म्याला तो, माझ्या अस्तित्वाचा पुनः शोध असतो

    खंतेच्या खळग्यांवर आठवणींचे दगड ठेवून
    कालच्या काळोखाकडे मी जेव्हा पाठ फिरवतो
    उद्याच्या उष:कालाच्या किरणांवर चालत रहाणं
    हा एकच मार्ग तेव्हा मला खुला असतो

    -यतीन सामंत

  • तू गुंतला असा की

    तू गुंतला असा की
    जगण्यास वेळ नाही
    अन् सांगतो जगाला
    मरण्यास वेळ नाही

    गाणार गीत केव्हा
    तू सांग जीवनाचे
    जेव्हा तुलाच वेडया
    हसण्यास वेळ नाही

    आयुष्य तू तुझे तर
    जगतो खुशाल आहे
    आता जगाकडे ही
    बघण्यास वेळ नाही

    मिटणार ना कधी जे
    ते नाव दे यशाला
    म्हण एकदा तरी की
    हरण्यास वेळ नाही

    आयुष्य युद्ध आहे
    जिंकून एकदा घे
    सांगू नको पुन्हा की
    लढण्यास वेळ नाही.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • आता आस उरली नाही

    दिसे किनारा, निवता वारा
    तेवती संध्यादीप काही
    आता, आस उरली नाही ॥

    पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
    नव्या धुक्यात अशा विराव्या
    ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
    आता आस उरली नाही ॥ १ ॥

    न जगताच जे जगले
    जीवन, त्यातच मन उबले
    थरथर मनीची शरीरी उतरुन राही
    आता आस उरली नाही ॥ ३ ॥

    भयाणतेच्या सीमेवरी
    वास्तवता वास्तव्य करी
    जीवन झाले चोथा, रस उरला नाही
    आता आस उरली नाही.

    -- यतीन सामंत

  • बाई मी शेतातं निंदते….

    बाई मी शेतात, शेतातं निंदते,
    काळ्या मातीतं, जिवनं सांधीते...
    हाती खुरपं, खुरप्यानं खुरपीते,
    काळ्या मायंवर,नक्षी मी काढीते....!

    बाई मी पिकाशी,पिकाशी बोलीते...
    मव्हा संसार, संसार सांगते...
    मन हालकं, फुलकं करीते...
    सुख द:खाचा हिशोब मांडीते...!

    बाई खुरपं गं, खुरपं संवंगडी...
    त्याच्या साथीनं, किटाळ काढीते...
    तणं शावकार, देनं मी मोडीते...
    काळ्या मायचं रून मी फेडीते....!

    बाई जगाचा जगाचा जलम....
    जलम जलमे काळीच्या पोटात...
    नाना परीचे,जिवं लहान थोरं...
    काळ्या मायचा पसारा आचाट...!

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

  • होळीत जाळा दुष्ट भाव

    एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//

    ऐष आरामांत राहून देह झाला मलीन

    शरीर सुखासाठी करती नाना खटपटी

    आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१//

    मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी

    राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार

    टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२//

    विसरुनी चाललो मानवता प्रत्येक बघतो स्वार्थता

    विश्वासाचे आपले नाते विसरुन गेले सारे ते

    निस्वार्थी बुद्धीने आतां जाणा इतर मनाचे ठाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //३//

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • खुळ्ळूक खुळ्ळूक गाडी

    गाडीवानदादा बैलं तुझी लय भारी, खुळ्ळूक खुळ्ळूक गाडीत , केव्हाच निघते तुझी स्वारी,
    सर्जा राजाची जोडी,
    भरदार कशी उंचीपुरी,
    घुंगूरमाळा डुलवीत डुलवीत दोघांची जोडी चाले न्यारी,
    सर्जा राजा वाऱ्यागत पळती,
    सुसाट सो सो अगदी धावती,
    जसे विमान जाई गगनांतरी,
    चाबूक" ना मुळी वापरशी,
    कांसरा"" हलके जरा ओढशी
    असे करून दिशा दाखविशी,
    कसब, ममता केवढी थोरली,--?
    गाडीवान दादा झोकात बसशी झुकून पुढे, त्यांना थोपटशी, --
    रोज मळ्यात निघे तुमची वारी--!!!
    पोरांगत त्यांना वाढवशी,
    जिवांपाड जाऊन जपशी,
    वैरण पाणी वेळेत देशी,
    मुक्या जनावरांचे, प्रेम तुझ्यावरी,-!
    दुष्काळ पडता स्वतः उपाशी,
    सर्जा राजाची निगराणी खाशी नवल हे की संगे तुझी अस्तुरी,--!!! लेकरांगत कसे वाढवशी,
    जवळ घेऊनी कवटाळशी,
    होता त्यांना जरा काही,
    तुझी मायाममता मोठी,--!!!
    सर्जा राजा भाग्यवंत किती,
    असे आईबाप त्यांना मिळती, अनोखीच ही हृदयाची नाती, बघितली नाहीत आजमिती,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • रेषा

    तुझ्यासाठी दाही दिशा
    जाशी तू कुठेही
    माझ्यासाठी फक्त तूच आशा
    तू ने सवे कसेही
    आहेचं कुठे मज आकांक्षा
    स्वप्नात रमते तुझ्याही
    विणते नव्याने कोषा
    तू दे आकार कसेही
    प्रांतप्रांतातील मुक्त देशा
    आवडे शोधण्या मलाही
    या मजपुढे काही रेषा
    आखून जा जरी पुढेही
    ही अव्यक्त मौन भाषा
    न ऐकू ये कुणाही
    तरी ओतते तप्त शिशा
    नित्य लाही लाही
    काळेभोर मुक्त केशा
    सोडून पाहिलेही
    बांधून त्यास दशदिशा
    तप्त वाट चालतेही
    या समांतर चाली रेषा
    न छेदे कुठे कधीही
    न लोभ न थारा द्वेषा
    जगणे स्वीकारते असेही!!
    -- वर्षा कदम.
  • सुखाची मोहमाया

    तप्त लोखंडात, लपली ती आग

    दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,

    सुंदर फूलात, सुंगध तो छान

    अवती भवती काटे, ते कठीण...२,

    विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,

    झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,

    सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया

    न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सुरात गुंफले शब्द प्रेमाचे

    सुरात गुंफले शब्द प्रेमाचे
    ऋणानुबंध असतात जन्मोजन्मीचे,
    भाव सुंदर सुखद असतो मनी
    भेट आपुली साहित्यिक वरुनी..
    नसेल नाते आपुले काही
    प्रेम भाव असेल मन मंदिरी,
    प्रेमळ काव्य करते स्वाती
    रसिकहो आनंद असावा कायम हृदयी..

    -- स्वाती ठोंबरे.

  • निवांत

    आताशा वाटतं
    बसावं इथंच निवांत
    क्षणांचे शिंपले वेचत
    आणि पहावं दूर मागे
    त्या वाटांकडे
    जिथून आले होते ते
    सुखदुःखांचे वारे..

    आयुष्याचं गणित मांडून
    सोडून द्यावेत जुने हिशोब
    आणि बसावं इथंच निवांत
    स्वप्नांचा कशिदा विणत...

    -- आनंद पाटणकर