शून्य होऊन जगता यावं,
कुणाची वाट पाहत नाही,
कुणाच्या आठवणींनी
रात जागवावी असंही नाही.
कोणी भेटलं तर ठीक,
नसलं तरी चालेल,
मनाला एवढंच कळलं पाहिजे
आपण पुरेसे आहोत,
हे कुणी सांगायला नको.
हसू येईल तेव्हा हसावं,
डोळे भरले तर
त्यांना थांबवू नये,
दुःख आलं
म्हणून स्वतःवर रागही नको.
कुणी सोबत राहिलं
तर आभार मानावेत,
कुणी निघून गेलं
तर दोष कुणालाच नको,
सगळं होतंच,
म्हणून होतं
इतकंच समजून घ्यावं.
शून्य म्हणजे एकटेपणा नाही,
ते म्हणजे मनाचं
हलणं थांबणं,
जिथे काही हवं नसतं,
आणि तरीही
श्वास शांत चालू असतो.
शून्य म्हणजे पोकळी नाही,
तो एक अथांग आकाश आहे,
जिथे ‘मी’ हळूहळू विरघळतो,
अहंकाराचा आवाज मंदावतो,
आणि इच्छांची राख
शांतपणे खाली बसते.
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे नाती, अपेक्षा, शब्द
सगळं विरून जातं,
आणि उरतो फक्त
निर्विकार साक्षीभाव,
एक खोल, निःशब्द अस्तित्व…
जिथे काही मिळवायचं नसतं,
काही सिद्ध करायचं नसतं,
आणि तरीही
असण्याची जाणीव
पूर्णत्वाने धगधगत राहते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे