पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा
मान उंच करुन
चंद्रीचा कोंबडा आरवला
खाजणाकडील काला वारा
अंगाला झोंबू लागला
त्याची पर्वा न करता
आसमंताला जाग आली
काळोखाचे कांबळे दूर सारीत
अवनी जागी झाली
कराडी कुटुंबाची वस्ती
विझल्या रॉकेलच्या बुदल्या
मातीच्या चुलीत अंगार फुलला
आणि झावळीच्या झोपडींतून
धुराचे ढग उसळले.
न बाळगलेली कराड्यांची
कलकलणारी कुत्री
रात्रभर जागल्याने
गटारात घोरत होती
रवी किरणांनी झाडांचा
आश्रय घेत घेत
जमिनीवर पाय टेकले
घोटभरच्या आणि भाकरी खाऊन
चंद्री बुगानी बाजाराकडे धाव घेतली
श्री. सुभाष गजानन दिघे
मुरुड
शांत, शीतल गर्द किनारा
संथ लहरी प्रवाही सरिता
खळाळते प्रतिबिंब नभाचे
मनी उचंबळते प्रीतसरिता
आठवांची, झालर झुलते
थकली जरी ही गात्रे आता
अंतरी, स्मृतींची गंगायमुना
अखंड वाहते पावन सरिता
निर्मोही भावनांची भावगंगा
जागविते, हॄदयी भावगीता
भावप्रीतीचे, सरोवर सुंदर
मिलना, आतुरलेली सरिता
तृप्ततेचा साक्षात्कार लाघवी
सागरसरिता, संगमी सांगता
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५०
११ - ६ - २०२२
आनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष
दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष
समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष
का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष
का फक्त एक कल्पना आहे मोक्ष
मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष
एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय ?
मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो ?
मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,---कसे कुणी म्हणेल !
पण कसे कळेल कि मला मोक्ष मिळाला ?
खरेच कल्पनेच्या बाहेर असतो मोक्ष !
-- संतोष पाटील
चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी
क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दिन दिन दिवाळी...
गायी म्हशी ओवाळी...
वसु बारसला ।।१।।
दिन दिन दिवाळी...
आरोग्य सांभाळी...
धन त्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी...
दुःखाला पिटाळी...
नरक चतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी...
लक्ष्मीला सांभाळी...
अश्विन अमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी...
नववर्षाची नवाळी...
बळी प्रतिपदेला ।।५।।
दिन दिन दिवाळी...
भावाला ओवाळी...
यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।
धावपळीचे जीवन सारे,
मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,
दिसून येतो त्यातील अंत ।।१।।
चैतन्यमयी जीवन असूनी,
चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,
मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।
थांबत नसते कधीही जीवन,
अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चीर निद्रा,
विश्रांती ही भास मनीचा ।।३।।
थकून जाई शरिर जेंव्हां,
प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,
घेई आसरा पुन्हा दुजाचा ।।४।।
आत्मा देखील थकून जाता,
परमात्म्याशी विलीन इच्छितो
चैतन्यातूनी विश्रांतीचा
‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं....१
कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती
कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती....२
शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत
एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात....३
कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो
चुकून देखील तुझ्या राज्यीं, कधी येत नसतो....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।
महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।१।।
जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।
आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।२।।
दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।
परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।।३।।
डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।
कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।।४।।
कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।
परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।।५।।
आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।
परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।।६।।
ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।
पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।।७।।
विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।
मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।।८।।
अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।
अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।।९।।
गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।
चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।।१०।।
विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।
परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।।११।।
ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।
हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।।१२।।
तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।
नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।।१३।।
अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।
चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी ।।१४।।
प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या ।
करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या ।।१५।।
दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे ।
आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे ।।१६।।
विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला ।
अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला ।।१७।।
फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले ।
कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।
विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा ।
वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा ।।१९।।
सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई ।
कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई ।।२०।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जेव्हा सगळेच हात सोडून जातात,
तेव्हा न बोलता सोबत उभा राहणारा हवा.
डोळ्यांतल्या न सांगितलेल्या अश्रूंना,
शब्दांविना समजून घेणारा हवा.
मनातल्या प्रत्येक जखमेवर,
मायेचा हलकासा स्पर्श करणारा हवा.
सुखाचे सोबती खूप भेटतात,
पण दुःखात सावली बनून राहणारा हवा.
जगाने पाठ फिरवली तरी,
"मी आहे" एवढंच सांगाणारा हवा.
जीवनाच्या कुरुक्षेत्रात जेव्हा
स्वतःशीच लढाई सुरू असते,
तेव्हा गीतेचा एक श्लोक बनून
मनात धैर्य जागवणारा हवा.
कधी मित्र बनून हसवणारा,
कधी गुरु बनून घडवणारा,
कधी आईच्या मायेचा स्पर्श,
तर कधी वडिलांच्या आधारासारखा वाटणारा हवा.
प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं,
हे अलगद समजवणारा हवा
स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदात,
खरं सुख शोधायला शिकवणारा हवा.
म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात,
एक कृष्ण नक्की भेटायला हवा...
जो नशिबात असो वा नसो,
पण हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
विश्वास बनून कायम राहायला हवा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti