मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं
वाटेवरच्या वळणावर
थोड्यावेळ थांबावं
अपरिचित काही मनांना
प्रेमानं जोडावं
मनाच्या काठावर
कधी शांत बसावं
चिंता विवंचनांना
अलगद पाण्यात सोडावं
येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना
आपल्या पोटात घ्यावं
जिवलगांच्या दूःखांना
कसं प्रेमाने सहावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
मनाच्या नदीने
कसं संयमाने वहावं
संतापाच्या परिणामांना
शांत प्रेमानं भरावं
मदत हवी त्यांच्याकडे
जरूर कधी वळावं
पण आपल्या ध्येयापासून
कधी नाही ढळावं
मनाच्या नदीने कसं
जास्त नाही रेंगाळावं
चंचल अशा मनाला
त्या विध्यात्यास अर्पावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं.
- डॉ.सुभाष कटकदौंड
गड्यांनो, -- या लवकरी,उघडा हा दरवाजा,
लेकरु वाट पाहे खाली,
तान्हुला बाळ माझा,
संध्याकाळ होऊन गेली ,
उशीर किती झाला आता,
बाळ माझे झोळीत खाली,
फुटू लागला मलाही पान्हा,
भुकेलेला बाळ माझा,
रडत असेल तो केव्हाचा
,घरांत दुसरे कोणी नाही,
धनीही मोहिमेवर माझा,
कुणी नसते अशावेळी,
लेकराला लागतां भुका,
मायच भूक जाणे त्याची,
जीव तडफडे कसा तिचा,--!!!
राजांस वंदन करुनी,
निरोप द्याल का माझा,
असतां ताकीद तुमची,
मोडते नियम तुमचा,--!!!
पदर आपुला पसरुनी ,
भाकिते तुमची करुणा,
समजून घ्या हो काकुळती,
खरा त्यातला आर्तपणा,
करते पुन्हापुन्हा विनवणी,
आईपण माझे जाणा,
नका दाखवू नियमांचा बडगा,
तुमचीही आई आठवा,
सोडा मला तुम्ही झडकरी,
दाखवा माझ्यावरती दया,
व्हा भाऊ माझे तुम्ही,
जाणा माझी ममता, माया,
कठोर काळजाचे तुम्ही,
का मला असे रडवतां,-?
रडते माझ्यातील आई,
समजावू कसे आता तुम्हां,--!!!
का घालता अशा भिंती,
का छळता मज गरीबा,
आई आहे चिमुकल्याची,
करत नाही जिवाची पर्वा,
विनंती तुम्हा शेवटची,
थोडा दरवाजा उघडा,
बुरूज इथे दिसल्यावरती,
थांबेन कशी मी जरा,--??
बुरुजच आता माता-पिता,
टाकते उडी लेकरासाठी,
आता विनवणी भगवंता,
तोच राहील माझ्यापाठी,--!!!
हिमगौरी कर्वे.
©
आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें
तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।।
नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे
तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।।
सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग
प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।।
वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी
सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।।
एकाची शक्ती बनते दुसऱ्यास पुरक
निसर्गचक्र शोधते संतुलन त्यांत एक ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तो एकमेव ढग काळा, जग सारे तहानलेले
ही एक भाकरी अवघी, जग सारे भुकेजलेले
मी ऐल तिरावर आहे, अन् पैलतिरावरती तू
अन् मधे एवढा सागर वर वादळ उधाणलेले
अंगात त्राण या नाही, कंठात प्राण आलेले
ऐकाया कैसे जावे कोणाला पुकारलेले
हृदयाचे माझ्या पुस्तक मी सहसा उघडत नाही
प्रत्येक पान जखमांचे रक्ताने चितारलेले
दिनरात चालतो आहे पण गाव लागले नाही
हे पाय पांगळे माझे ना अजुनी विसावलेले
मज तहान ज्या क्षितिजाची, ते अजुनी आले नाही
वाटेत व्योमही आले जे स्मरते झुगारलेले
एकेक शब्द या हृदयी मी तुझा गोंदला आहे
होकार फार थोडेसे पण जास्ती नकारलेले
मी फक्त वेंधळा होतो,ते लोक शहाणे होते
मागास एकटा मी अन् बाकीचे पुढारलेले
जमणार कसे माझे त्या लोकांशी किंचित देखिल
जे मला भेटले होते ते सारे फुशारलेले
तो शिशिर आजही स्मरतो संगती तुझ्या मी होतो
स्मरतात आज देखिल ते दिन मजला दवारलेले
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी
पंखामधली भरारी कशी
नाजूक नाजूक पंखाना
आधार होता मायेचा
चिमुकल्या त्या हालचालींना
पायबंध तो भीतीचा
क्षणात आले बळ कोठून
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे
आकाशासी कवटाळले
कधीतरी उडणे, आज उडाली
बघण्या साऱ्या जगताला
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोंचीला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- स्वाती ठोंबरे.
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
मिळेल कांहीतरी
गडबड मनां होऊन जातां
निराशाच पदरीं ।।१।।
शांत चित्त आपुले
तूं ठेव प्रत्येक समयी
मिळेल यश पदरी तुझ्या
खात्री याची घेई ।।२।।
आत्मविकास तूं सोडूं नको
आपल्या कामाचा
मोबदला मिळेल तुजला
योग्य प्रयत्नाचा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
कोण देई हा आकार ? १
तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
कोण हे घडवित असे ? २
प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
कोण देई ह्यांत लक्ष ? ३
त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
ही किमया असे कुणांत ? ४
तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
फिरवी कोण चक्र सहज ? ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
Copyright © 2025 | Marathisrushti