गोड शब्द बोबडे,
लकब मनास आवडे ।
शब्दांची भासली जाण,
नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।।
भावनांचा उगम दिसला,
मनी व्यक्त होई हालचालीतूनी ।
रागलोभ अहंकारादी गुण,
दिसून येती जन्मापासून ।।
देश-वेष वा जात कुठली,
सर्व गुणांची बिजे दिसली ।
हळूहळू बदले बाह्यांग जरी,
उपजत गुण राही अंतरी ।।
प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत ।
उफाळून येती सुप्त भावना,
मानवी त्या जन्मखुणा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 2, 2015
शंभर वर्षे जगा तुम्हीं, काका आमच्यासाठीं,
बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं ।।१।।
भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे,
तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे ।।२।।
उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले,
कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ।।३।।
आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे,
दुर्दैवाने आमुच्या, नाही ते बघण्या फळाकडे ।।४।।
मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां,
रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करां ते आतां ।।५।।
चालू ठेवा मार्गदर्शने, तुम्हीं आपल्या घराण्याची,
जोपासण्या शिकवा तुम्ही, जीवनाविषयीं तत्वें त्यांची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 18, 2016
संसारातील ऐहिक सुखे,
धडपडीने मिळवीत असे
प्रयत्नातील आनंद खरा,
भोगण्यांत तो दिसत नसे
उबग येई ह्याच सुखाची,
जीवन खर्चीले ज्या करितां
त्या सुखांत समाधान नव्हते,
जाणवले तेच मिळतां
प्रभू मिलनाचा आनंद तो,
चिरंतर ते समाधान देयी
ईश्वरी मार्ग खडतर असूनी,
क्लिष्टता येते मनाचे ठायीं
तसेच चाला उबग सोसूनी,
कठीण अशा त्या मार्गावरती
यश येईल कष्टाचे परि,
संपूर्ण समर्पण जेव्हां होती
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
खूप भूक लागलेली आहे.
पाऊस सुद्धा खूप पडत आहे.
तिचं घर सुद्धा दूर आहे.
नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं !
घरातून कांदे भजी चा वास यावा .
त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा.
आत मधून आपली "ती" गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी .....
आपण door bell वाजवत रहावी .......
नंतर, कड़ी वाजवत रहावी ........
नंतर, दार वाजवत रहावं .......
तरी ही "तीने" दार उघडू नये ........
पोटात आग !
अंगावर पाऊस !
"तिच्या" वागण्याने ह्रुदयlला वेदना ....!!!
अगदी अस्सचं होतं बघा ......
जेंव्हा "ती" Online असूनही Reply देत नाही तेंव्हा ...!!!!
-- विनोद डावरे, परभणी.
9765 998 999
September 3, 2019
सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।
बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।
लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।
उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।
कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।
फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।
दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।
केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।
प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।
समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 12, 2017
सारे जीवन जाते आपले अन्न शोधण्याकडे
काय उरते आमच्या हाती विचार करा थोडे....१
जीवनाची मर्यादा ठरली आयुष्य रेखेमुळे
आज वा उद्या संपवू यात्रा हेच आम्हांस कळे....२
धडपड करी आम्ही सारी देह सुखा करिता
विचार ही मनांत नसतो इतरांच्या करिता....३
वेळ काढावा जीवनातुनी इतरांसाठी थोडा
सार्थकी लावा आयुष्य तुम्ही जीवन शिकवी धडा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 7, 2019
आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना -
(भाग - 1)
अरे राजा ये ना
नको ग आई
नोकरी मला लागू दे
डॅालर जरा कमवू दे
कर्ज माझे फिटू दे
मग मी येईन
अरे राजा ये ना
नको ग आई
गर्दी किती तिथे
राहू मी कुठे?
घर मला घेऊ दे
मग मी येईन
अरे राजा ये ना
नको ग आई
रस्ते तिथे छोटे
त्यात खड्डे मोठे मोठे
शिस्त नाही कुठे
हॅार्नच्या आवाजाने कानच फाटे
नाही गुणांची कदर
नाही बुध्दीचाआदर
भ्रष्टाचाराचा कहर
कसा जमायचा वावर ?
स्वच्छतेचा अभाव
सत्ता संपत्तीचा प्रभाव
आरक्षणाचा दबाव
कसा लागेल माझा निभाव?
तुला सांगतो एक खरे
वाटते इथेच आता बरे
आई बाबा तुम्हीच
इथे येता का सारे?
आई तू ये ना
नको रे राजा
आई तू ये ना
नको रे राजा
तू म्हणतोस ते खरे
इथे नाही आता बरे
पण कारण याला
आम्हीच तर सारे
कुणी राहिले गप्प
आळी मिळी चुप्प
देश सोडून कुणी
निघून गेले हुप्प
नाही पुढाऱ्यांना टोकले
ना भ्रष्टाचाराला रोकले
ना न्यायासाठी झटले
नाही एकतेला जपले
नाही शिस्तीचे पालन
ना संस्कृतीचे जतन
नाही निसर्गाचे संवर्धन
शिक्षणाचे निमूट, पाहिले पतन.
ना सत्याचा आग्रह
ना कर्तव्याचा निग्रह
ना मूल्यांचा संग्रह
केला धर्माचा दुराग्रह
आता मात्र वाटते
सुधारायचे हे चित्र
देशाला बदलायचे
येऊन साऱ्यांनी एकत्र
मिळून आम्ही सारे
आणू बदलाचे वारे.
मग तरी तुम्ही सारे
परतून याल का रे?
(भाग - 2)
आई मी येऊ का?
का रे राजा?
डॉलरचा रेट कमी झाला
जा आपल्या घरी ट्रम्प म्हणाला
राजा इथली धूळ सोसेल का ?
इथली बेशिस्त पचेल का?
आम्हाला हिणवण्यात
दिवस जातोय तुझा
परत साऱ्यांना
आपलं म्हणशील का?
आई इथे आता
नाही कुणी कुणाचे
सगळंच वातावरण
झालंय खूपच संशयाचे
माहीत नाही माझी
नोकरी कधी जाईल
भीती आता वाटते
धोब्याचा कुत्रा होईल
एखादी छान नोकरी
तिथे मिळेल ना गं मला
इथल्यासारखं नाही मिळालं
तरी चालेल आता मला
ये बाळा ये
तुला सामावून नक्की घेणार
परका झाला होतास
पोरका नाही करणार।
June 7, 2017
मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन ।
कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥
जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा।
येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥
यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते।
कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥
करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन ।
दैन्याचेच प्रदर्शन। असे अजबच ॥ ४ ॥
जन्मभर चाकरी । खावी इमाने भाकरी ।
सत्याची कास धरी । सर्वथा अशक्य ॥ ५ ॥
असत्याचा बडेजाव। भोंदू-दांभिकाला भाव ।
ती मोठेपणाची हाव । सर्वमान्य ठरे ॥ ६ ॥
थाट खोट्याचा काय । महागाई महामाय ।
देवाघरी न्याय मिळणे मुष्किल ॥ ७ ॥
आमचे राहणीमान ग्रंथातले लिखाण ।
पुकारिती आर्तजन । आता धावा ना हो ॥ ८ ॥
- यतीन सामंत
September 15, 2022
कालपर्यंत
पावसाच्या एका सरीसाठी
डोळे आभाळाकडे लागले होते.
आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
मनात भीतीचं वादळ उठलं आहे.
आयुष्य इतकंच शिकवतं
अभाव दुःख देतो,
पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.
जिथे "पुरेसं" थांबतं,
तिथेच समाधान फुलतं.
जिथे हव्यास वाढतो,
तिथे आनंद हरवत जातो.
भाकरी पुरेशी असेल,
तर ती अमृताहून गोड लागते.
छप्पर पुरेसं असेल,
तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.
श्रीमंती म्हणजे
अफाट संपत्ती नव्हे.
"आहे ते पुरेसं आहे,"
असं मनापासून म्हणता येणं
हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.
कारण...
अति पाऊस पूर आणतो,
अति ऊन दुष्काळ घडवतो.
निसर्ग असो वा आयुष्य
"पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.
ज्याला पुरेसं कळलं,
त्याला समाधान लाभलं.
आणि ज्याला समाधान लाभलं,
त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 14, 2026
ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ......... १
कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ....... २
पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?....... ३
......मी मानसी
August 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti