भारतीय संस्कृती जगातील इतर संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आणि आधुनिक जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवणारी आहे. भारतीय संस्कृतीतील अनेक परंपरांचे आजही अनुकरण केले जात आहे.
आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी
कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी
कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी
उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी
काय करील ती अबला डाग पडता शिलावरी
दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी
भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची
शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हस्तिनापुराच्या सुवर्णभिंतींमध्ये
एक स्त्री सावलीसारखी जगत होती,
न आवाज, न आक्रोश,
फक्त श्वासांच्या दरम्यान दडलेलं वादळ.
अर्थात ती म्हणजे गांधारी...
तिने डोळे मिटले नव्हते,
तिने दृष्टीला बांधून ठेवलं होतं.
अंधार हा तिचा शत्रू नव्हता,
तो तिचा निवडलेला आश्रय होता.
पतीच्या वेदनेशी एकरूप होताना
तिने स्वतःचं आकाश गमावलं.
त्यागाच्या नावाखाली
स्वतःच्या प्रश्नांना गाडून टाकलं.
राजकारण दरबारात उघडं नाचत होतं,
महत्त्वाकांक्षेच्या ज्वाळा वाढत होत्या,
पण तिच्या शांततेचा पडदा
सगळ्यावर अलगद पसरत होता.
मुलांच्या पावलांमध्ये तिने भविष्य ऐकलं,
पण त्या पावलांतला अहंकार
तिच्या मायेने झाकला गेला.
आईचं हृदय न्यायापुढे हरलं,
आणि इतिहासाने आपला निर्णय घेतला.
द्रौपदीच्या वेदनेचा प्रतिध्वनी
सभागृहाच्या स्तंभांवर आदळत होता,
तिच्या मौनात मात्र
एक खोल भीती घर करून बसली होती,
“जर मी बोलले, तर सर्व काही तुटेल.”
आणि ती न बोलल्यामुळे
सर्व काही तुटलं.
कुरुक्षेत्रावर जेव्हा रणशिंग वाजलं,
तेव्हा तिच्या अंतरात्म्यात
पश्चात्तापाचा शंखनाद झाला.
शंभर स्वप्नांचे देह पडले,
आणि तिच्या मायेचा महासागर
एका क्षणात वाळून गेला.
राख हातात घेऊन ती उभी होती,
आई, राणी, स्त्री…
तिन्ही ओळखी धूसर झालेल्या.
तिने कृष्णाकडे पाहिलं,
अनंताच्या डोळ्यांत प्रश्न ठेवला.
तो शाप नव्हता,
तो वेदनेचा भार होता.
“मी अंधार निवडला,
पण अंधाराने मला का निवडलं?”
तिच्या पट्टीत करुणा होती,
पण करुणेला कणा नव्हता.
तिच्या प्रेमात ऊब होती,
पण सत्याला सामोरं जाण्याचं तेज नव्हतं.
गांधारीची शोकांतिका
नियतीने लिहिलेली नव्हती,
ती विलंबलेल्या निर्णयांची सावली होती.
डोळे बांधणं सोपं होतं,
पण अंतर्मनाला बांधणं अशक्य.
सत्य दार ठोठावत राहिलं,
आणि तिने शांततेचं कुलूप लावून ठेवलं.
शेवटी जेव्हा कुलूप तुटलं,
तेव्हा उरली होती फक्त राख
आणि राखेत उमटलेली शिकवण.
प्रेम जर न्यायाला साथ देत नसेल,
तर ते मायेचं कवच नसून
विनाशाचं निमंत्रण ठरतं.
गांधारी अंध नव्हती...
ती प्रकाशाला घाबरली होती.
आणि जेव्हा तिने पट्टी उघडली,
तेव्हा पाहण्यास काहीच उरलं नव्हतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता
धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज
मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी
त्या दु:खीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी
सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।
भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।
प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।
भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।
गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे ।
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।
सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।
साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।
पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
यथासांग विधीने मनी तोषला ।८।
संपत असता यात्रा घटना एक घडली ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।
धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।
आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।
यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।
केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।
डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदेव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात सामवतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडित ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मीलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभु मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जीवंतपणीच तुम्हीं प्रभुमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti