आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?
निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं
केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य
मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी
हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।
आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी
तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।
दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले
दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।
मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा
ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।
राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना
हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
जीवन होते कृष्णाचे आगळे विविधतेनें भरलेले सगळे
गूढ, घनदाट जंगलापरी सारे पैलू साकार करी
जंगलामध्यें झाडे वाढती छोटी छोटी झुडुपे उगवती
पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी जल सांचूनी बनली तळी
गोड, आंबट, तुरट फळे सुंगधी तशीच उग्र फुले
राघू, मैना, ससे, हरणे तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे
जंगल दिसते भरलेले पूर्ण बरे वाईट यांचे चूर्ण
कृष्णाचे जीवन तसेंच नटलेले चोर ते संतापर्यत गेलेले
चोरी केली, खोड्या केल्या नटखट बनूनी घागरी फोडल्या
प्रेमिकांचे जाळे भोंवती नाच नाचला तालावरती
मुरली वाजवूनी गुंगवी मधूर गीताने डोलवी
राजकारणी म्हणून जगला युक्तीने नमवी शत्रूला
युद्ध भूमिच्या प्रसंगी अर्जूनास तो गीता सांगी
सोळा कलांचे रूप मिळाले पूर्ण अवतारी जीवन जगले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट चालत होता ।
कुणीतरी आहे मार्गदर्शक, यापरी अजाण होता ।।
बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी ।
आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी ।।
संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें ।
विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे ।।
ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुराऊनी ।
जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई दूर पळूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मैत्र बनून आलीस जीवनी
न्हवते कधी ध्यानी-मनी
गुंफून स्नेहाचे धागे रेशमी
व्यापलीस तू , माझी अवनी !
कधी राग, कधी लोभ
कधी चिडू, कधी गोडू
कैरीची लज्जत, हापुसी गोडवा
दिलास मैत्रीला,आयाम नवा !
शांत सुखी जीवन सागरी
आली कैक तुफानी वादळे
भिरभिरती नौका सांभाळत
उभी तू, जणू दैवी सुकाणू !
नाही कसला गर्व, तुला
निरागस स्नेहाचा, तू झरा
सर्वांच्या मदतीला तुझा हात
जणू समाजसेवा हेच तुझे व्रत !
घर, मैत्री, नाती, सेवा
सर्वांचा तू अतूट दुवा
प्रणाम माझा, तुझ्या चरणी
नकळत माझ्या डोळ्यात पाणी !
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
माझे म्हणूनी जे मी धरले,
दूर होई ते मजपासूनी,
दूर ही जावूनी खंत न वाटे,
घडत असते कसे मनी ।।१।।
बहुत वेळ तो घालविला,
फुल बाग ती करण्यामध्ये,
विविध फुलांची रोपे लावूनी,
मनास रमविले आनंदे ।।२।।
कौतुकाने बांधी घरकूल,
तेच समजूनी ध्येय सारे,
कष्ट करूनी मिळवी धन,
खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।
संसार करूनी वंश वाढवी,
संगोपन ते करूनी त्यांचे,
थकूनी जाई देह आता तो,
चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।
ओढ आतां उरली न काही,
ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी,
समाधानी तो होऊ शकलो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…यांचं नाव घेऊन राजकारण करून सामान्य माणसाला स्वातंत्र्यानंतर पासून दूर ठेवलेल्या अनु याची खदखद व्यक्त करणारी मुक्त छंद कविता
https://youtu.be/VZ1bm7L9OdE
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करीते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनुभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पुनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti