वाट कुणाची बघतो आम्हीं,
ठाऊक असते सर्वांना,
मृत्यू हा अटळ असूनी,
केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।
आगमनाचा काळ त्याचा,
कल्पनेनें ठरविला जातो,
अचूक जरी शक्य नसले,
विचार त्यावरी करीता येतो ।।२।।
जीवन म्हणती त्या काळाला,
जगणे आले मृत्यू येई तो,
जगण्यापुढे पर्याय नसतां,
सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।
तन मनाला सुख देऊनी,
जीवन काल वाढविती कांहीं,
सद्उपयोग तो केला जावा,
हीच इच्छा सदैव राही ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
- सुरेश भट
मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
- सुरेश भट
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
- सुरेश भट
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
- सुरेश भट
केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
- सुरेश भट
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
- सुरेश भट
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
- मंगेश पाडगावकर
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
- सुरेश भट
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
- सुरेश भट
प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी
कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा १
जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी २
मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे ३
कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक
त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची ४
सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी ५
फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता
महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये ६
सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक
त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ ७
कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी ८
कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा ९
परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका १०
सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी ११
जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती
शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून १२
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये १३
बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान
मानव जातीची ती शान, ह्या संसारी १४
मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे १५
विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी
नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे १६
वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची १७
तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा १८
वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती
आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून १९
तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार
नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी २०
मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद
जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी २१
ध्येय असे महान, मार्ग हे साधन
साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य २२
साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य २३
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून
स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे २४
अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी
आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान २५
न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून
आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे २६
विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद
लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत २७
सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे
हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती २८
जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे २९
म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य
जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे ३०
महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर
आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी ३१
मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या ३२
दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना
प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली ३३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
छेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.
लेखक : सिद्धू चिलवंत – आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,
मनी आस ती राहत असते, उचलून त्यास घ्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,
प्रयत्नात त्या साथ न मिळता, खालती कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,
विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.
कधी तरी अगदीच कधी तरी
'सौ' काही दिवस नसायची घरी...
सोनुली माझी मजेत रहायची
हौस मला तिची आई होण्याची...
पण...
झोपायची वेळ झाली की
कावरे बावरे व्हायची...
म्हणायची मग, मम्मी कुथे गेली
पप्पा, मम्मी कुथे गेली ?...
मी म्हणायचो,
येइल बघ आता ती कधीपण...
चल, खोटं खोटं झोपायचं का आपण...
मग ती घ्यायची
खोटं खोटं डोळे मिटून...
माझे डोळे मात्र जायचे
आसवांनी भिजुन...
आणि मग त्या रात्री
थोड्या वेळाने पुन्हा
तिने हळूच डोळे उघडले...
माझे ओलावले डोळे
नाही मला लपवता आले...
म्हणाली, पप्पा खरं खरं सांग ना
तुला पण मम्मीची आठवण येतेय ना ?...
आणि मग
कोवळ्या हाताने
मलाच ती थोपटू लागली...
पप्पा जो जो म्हणत
अलगद झोपी गेली.
- डॉ. सुभाष कटकदौंड, खोपोली.
………पाण्यासारखच निर्मळ त्याच तीच प्रेम असावं.
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“
पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा .
मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा
दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा .
तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे
तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे .
असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी
पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी .
ठावकी मज, ओढणीची गरज कां तुज पडतसे
जतन मागे निजहृदय अन् हृदय माझेंही असे .
कबुल आहे, घेतलें चुंबन तुझें, झाला गुन्हा
दे सजा, मी सिद्ध आहे चुंबना-आलिंगना .
स्वाद ओठांचा सखीच्या चाखतो गर्दीत मी
ती जिथें बाळास चुंबी, तेथेंच ठेवी ओठ मी .
घायाळ नजरेनें करुन पोटिस स्मिताचें लावसी
इजा-इलाजहि स्वत:च करणें, अजब पॉलिसी तुझी अशी .
स्वयपाकामधि ”दगडफूल” हें नांव ऐकुनी मजाच वाटे
सखि जरि कोमल, हृदय दगडासारखे, मज सजाच वाटे .
तीर निशाणावर लागावा म्हणुन शिकारी मिटतो डोळा
आतां कळलें, युवक आजचे, युवतीही कां ”मारत डोळा” .
बरें असतें जहालें जर तुझा रुमाल मी असतो
कधी तो स्पर्शतो ओठां, कधी हृदयाजवळ बसतो.
सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti