उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
-- ..... मी मानसी
मी तुझी शाई बनू इच्छिते
मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते
जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून
चालत असते,
माझ्या तमाम दुःखाच्या,
पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या
नीलकंठ लेखणीला
सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर,
मी या शाईने लिहू शकेल
या प्रकाशमान विश्वाचे सफेद अक्षर
मला सांभाळून घे लेखणी
मी तुझी शाई बनू इच्छिते.
मी कागदाच्या देहावर गोंदण होऊ इच्छिते
मी जगाशी व्यक्त होऊ इच्छिते की
कागदाच्या संगमरवरी देहावर
लिहीन मी एक प्रार्थना
जी ताजमहल पेक्षा अधिक सुंदर असेल,
मला घडवण्याची ताकद दे ब्रह्मा !
मी तो हातोडा होऊ इच्छिते
माझा मान अपमान
माझा संघर्ष
माझी ओळख
या सर्वांना ओलांडून गुंजत राहू इच्छिते
मी शब्द नाद होऊ इच्छिते
मूळ हिंदी कविता - " मैं तेरी रोशनाई होना चाहती हूँ "
- अलका सिन्हा
मराठी अनुवाद - विजय नगरकर
स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि
तितकंच अथांग असं आकाश
एकमेकांना भेटतात
क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर
आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते
त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले..
त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त
त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला
काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं...
---आनंद
ती आणि तो स्टेशनवर दिसले
कॉलेजमधले असतील...
काहीतरी बिनसले होते....
ती त्याच्या गळ्याला हात
लावून शपथ घेत सांगत होती
आणि ती पण तसेच करतहोती...
दोघेही साधे ...लोक बघत होते
त्यांना कळत होते तरीपण
ते दुर्लक्ष करत होते..
शपथा....सागणे..आर्जव करणे..
हे असेच चालते प्रेमात..
शेवटी त्याची गाडी आली..
तो थोडे ' किस ' सारखे करून गेला..
ती तशीच परत...
पुढे चालू लागली...
तोच तिचा मोबाईल सुरु झाला
परत तेच सुरु....
प्रेमात असेच असते...
त्यांना थांबणे माहीत नसते.....
-- सतीश चाफेकर.
हे टिपूर चांदणे,सख्या तुला बोलावे,
आकाशातील घनमाला,
घराची तुला वाट दाखवे, --||१||
डोईवरचा चंद्रमा,
माझिया प्रियाला स्मरण देई,
एक चंद्र घरी वाट पाहे,
सारखा सूचित करत राही,--||2||
शांत नीरव वातावरणी,
बघ सजणा बोल घुमती,
विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे,
कानात कसे गुपित सांगती,||3||
भवतीचा काळोखही,
येण्याची तुझ्या वाट पाहे,
मिलन कल्पून मनाशी,
दोन जिवांची संगत देई, --||4||
सुगंधित रातराणी
मिलाफाचे गान गाई,
दरवळ आपुला पसरत,
शेज सुगंधित करत राही,--||5||
दाराचा उंबरा पहा,
वाट किती पाहतो,
तोच आधी प्रतीक्षेत,
तुझ्या सखीचे काम करतो,--||6||
सभोवार झाडे उभी,
डौलदार ती स्वागतां,
माना झुकवून वाट पाहती,
धनी कधी यायचे आता,--||7||
तुळशीजवळ पणती,
जीव धरून पाहे,
कितीही उशीर झाला तरी,
सखी सोबत करत राहे,--||8||
नादखुळा वाराही झेपावे,
बघ ना रे तुझ्यासाठी,
तू आल्याची खबर सांगे,
पुढे येऊन तुझ्या आधी,-!!||9||
हिमगौरी कर्वे.©
शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।
आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।
यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।
शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।
खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।
उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।
देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।
खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।।
ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।।
विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
काळजाच्या भेटी,
आलीस सई गाठी,
खूण पटता आत्म्यांची,
किती आनंदी दिठी,--!!! ||१||
काळजाच्या भेटी
आलीस सखे राती
पूर गप्पांचा येता ,
वाढत जाय भरती,--!!! ||२||
काळजाच्या भेटी ,
आलीस मैत्रिणी,
जिवांचे दुवे सांधीत,
घट्ट हृदयाची नाती,--!!! ||३||
काळजाच्या भेटी,
आलीस सये पाठी,
सुखदुःखांच्या हिंदोळी,
दोघी बसू एकाच झुली,--!!! ||४||
काळजाच्या भेटी ,
आलीस तू सहेली,
सह राहुनी राहुनी,
केलीस दुःखे हलकी,--!!! ||५||
काळजाच्या भेटी,
आलीस माझ्यासाठी,
तुझ्यातील तू अन् ,
माझ्यातली मी,
द्वैतातील अद्वैतासाठी,--!!! ||६||
हिमगौरी कर्वे.©
प्रेमाचे पूर्णत्व
कोणाकडेच नसते
प्रेम जन्मालाच अपूर्ण येते...
अर्धे प्रेम त्याच्याकडे
अर्धे प्रेम तिच्याकडे
फक्त त्या दोघांचेच
प्रेम एकत्र येता
प्रेम पूर्ण होते...
प्रेमाच्या पूर्णत्वालाही
आयुष्याची मर्यादा असते
अपूर्ण प्रेम शेवटी
अपूर्णच असते...
©निलेश बामणे
भाळीचे भाग्य असावे
मृदुलस्पर्शी स्वर्गसुखाचे
अमृत प्रीतवात्सल्याचे
सौभाग्य सहृदी मित्रत्वाचे....
आयुष्याच्या वाटेवरती
दुःखातही सुखावणारे
आधाराचे हात देवूनी
कुणी असावे सावरणारे....
रमविणाऱ्या रम्यनिसर्गी
ऋतुरंगात भुलूनी जाता
मोहरल्या मिठित विरूनी
दिव्यस्पर्शात मिटुनी जावे....
जन्म, मृत्यु सत्यशाश्वती
हॄदयांतरी जपता भावप्रीती
सांजाळल्या क्षितिजावरती
जीवा लाभावी आत्मशांती....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५६
१२/१०/२०२
Copyright © 2025 | Marathisrushti