आहे मी ऋतू लयाचा
शहारता शिशिर सांगतो
हिरव्या ओल्या श्वासांना
मातीशी जोडून पांगतो...
सुस्तावल्या रात्रीस
अस्ताव्यस्त पांघरतो
आभासी धुक्याचे अस्तर
दिवसावर अंथरतो...
स्त्रोत चैतन्याचे सारे
कवेत घेत..आकसतो
भुंड्या झाडदिठ्यांना
बोचऱ्या गारव्यात डसतो
उत्पत्ती ला आहे इथे
शाप लयाचा तो कोसतो
रुक्ष देहीच्या गर्भात
बीज वसंताचे पोसतो...!!!
-सौ विदुला जोगळेकर
इंटरनेट च्या प्रवाहात रोज मी
काही ना काही सोडत असतो
फेसबुक व्हॅट्सअप वर वाहते ते
माणसं आपसूक जोडत असतो
कविता लिहिणे एक छान माध्यम
लिहून प्रवाहात सोडून द्यायच्या
पोहोचतात आपोआप सगळीकडे
प्रतिक्रिया तेव्हढ्या आपण घ्यायच्या
पोहोचतो हृदयात वाचणार्याच्या
संवेदना लगेच जाणवतात त्याच्या
असतो काहींमध्ये केमिकल लोचा
बघायच्या नाहीत प्रतिक्रिया त्याच्या
माणसं चांगली जोडत रहायची
नको असलेली सोडून द्यायची
आपली आवड आपण जपायची
इंटरनेटच्या प्रवाहात सोडून द्यायची
-श्रीपाद देशपांडे
मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले
आनंद तर झालाच पण काळजीने घेरले
सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार
माझा मुलगा अन संसारही तिचा होणार
आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा
भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा
आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड
मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड
भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले
पण मनाचे भांडे खडखडच राहिले
कारण आजवर मीच होते गृहिणी सर्वश्रेष्ठ
माझेच पदार्थ वाटायचे सर्वांना चविष्ट
आता माझी घरावरची सत्ता जाणार
माझा काळजाचा तुकडाही तिचा होणार
कोणाला सांगणार मी बापडी ही व्यथा
माझ्यातली आई लपवत होती सारी अस्वस्थता
एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू
करू लागले तयारी मनाची होण्यासाठी सासू
शेवटी मनाला समजावले,
अरे सून तर येणार अन कुटुंबात बदलही होणार
पण आता कामांची विभागणी होणार
सारे तर नेहमीप्रमाणे पसारा करणार
पण आता आवरायला तिची मदत असणार
आजवर खूप केले संसार उभारण्यासाठी
आता थोडे जगू या फक्त स्वतःसाठी
आपली संसाराची खुर्ची जपून ठेवायचीच
पण आपल्या शेजारी तिची खुर्ची मांडायची
अशी झाली युती भावी सुनेशी मनाची
अन करू लागले तयारी मनापासून लग्नाची
आता तिच्या रूपाने आला आहे घरी आनंद
आता ठेवायचे आहे तिला कायम टवटवीत प्रसन्न
सौ. मंजुषा श्याम देशपांडे,
पुणे.
ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार
मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार
चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती
स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान
कुठे हरवले परंतु माझे जिगरदोस्त दोन पुढे पुढे ते तसेच गेले रात्रीचे उचलुनी वाण
स्मृती गंधाच्या याच शलाका जाळीत जाती जीवा आज तडफडे जीव तयास्तव तृणवत मम ठेवा
-- जयंत वैद्य
घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या,
रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।
चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं,
क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।
प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली,
श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।
चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची,
हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।
वेडा समजोनी त्यासी दगड कुणी होते मारीत,
हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।
धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत,
परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।
समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे,
हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।
ही झाली छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे,
सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कधी कधी जुन्या रेडिओसारखं
आपलं मनही एकाच व्यक्तीला शोधत राहतं...
गर्दीतल्या हजारो आवाजांतून
एकच सुर कानाशी येत राहतो,
आणि आठवणींच्या लहरींवर
तोच चेहरा तरंगत राहतो.
कधी शब्द सापडत नाहीत,
कधी भावना हरवून जातात,
पण मनाच्या त्या जुन्या फ्रिक्वेन्सीवर
त्याच्याच आठवणी वाजत राहतात.
वेळ पुढे सरकत असतो,
ऋतू बदलत राहतात,
पण काही नाती अशी असतात
जी मनाच्या कोपऱ्यात शांतपणे जगत राहतात.
जुन्या रेडिओचा खडखडाट जसा
एक दिवस अचानक सुरेल होतो,
तसंच कधीतरी एखादं स्मित
संपूर्ण आयुष्य उजळून टाकतं.
आणि मग कळतं...
शोध संपलेला नसतो कधीच,
कारण काही माणसं
दूर गेल्यावरही मनातच राहत असतात.
अशी काही नाती अंतराने तुटत नाहीत, ती फक्त आठवणीत अधिक खोल रुजत जातात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे
अगदी निर्विकार जणु ओळखच नाही
न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे
जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही
मग्न असती सारेच आपुल्या विचारात
इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही
स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो
अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही
मी भला, माझे भले नको कुणी दूसरे
आता नाते सहृदयी कुठेच उरले नाही
भावनां शुष्क कोरडया, रुक्ष नाती सारी
आता ओलावा अंतरीचा दिसतच नाही
संवादाविण कां ? जीव हा सुखात जगतो
सांगावे कसे कुणास हेच कळतच नाही
***********
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१६
१/१२/२०२२
यावर्षी बळीराजाला,
सोयाबिननं तारलं !
पण जगाच्या पोशिंद्याले,
मजुरीनं मारलं !!१
...
हजार रुपय एकरानं,
मागील वर्षी सोंगलं !
दोन हजार एकरानं,
मजुर यंदा बोंबलं !!२
...
मळणीवाला म्हणतो मला,
दोनशे रुपये पोतं !
मी म्हटलं त्याचा काय,
आता जीव घेतं !!३
...
आलं आभाळ, झाकण्यासाठी,
ताडपत्री नेतो !
दोन हजारानं इथे त्याचा,
खिसा कापला जातो !!४
...
एवढ सार करुन सोयाबीन,
बाजारात नेतो !
ओलं आहे म्हणून भाव,
सोळाशाचा येतो !! ५
...
घरी आल्यावर सारा हिशेब,
चुकता करुन देतो !
हाती नाही राह्यलं काही,
म्हणून रोगर घेवून घेतो !!६
...
यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
वाली कोणी व्हा रे !
नका देवू दुजे काही,
हिंमत तरी द्या रे !! ७
...
असाचं जर बळीराजा,
जहेर पिऊन मेला !
आपलाही पुढे समजा,
खेळ खलास झाला !!८
...
सरकारच्या दरबारी,
आवाज उठला पाहिजे !
त्याच्यासाठी प्रतिनिधी,
आमचा झटला पाहिजे !!९
...
जय किसान जय जवान,
आठवा आता नारा !
दोघांसाठी खरचं आता,
काहितरी करा !!१०
...
फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
प्रेषक - विनय साटम
चित्र दिसते दर्पणी ,
जसे असेल तसे,
धूळ साचता त्यावरी,
अस्पष्ट ते होतसे ।।१।।
दर्पणा परि निर्मळ मन,
बागडते सदैव आनंदी,
दूषितपणा येई त्याला,
भावविचारांनी कधी कधी ।।२।।
निर्मळ ठेवा मन आपले,
झटकून द्या लोभ अहंकार,
मनाच्या त्या पवित्रपणाने,
जीवन होत असे साकार ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti