आघात होऊनी परिस्थितीचे,
सही सलामत सुटत असे,
संकटाची चाहूल लागूनी,
परिणाम शून्य ठरत असे ।।१।।
दु:खाची चटकती उन्हे,
संरक्षणाची छत्री येई,
कोणती तरी अदृष्य शक्ती,
त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।।
दूर सारूनी षडरिपूला,
मनावरती ताबा मिळवी,
प्रेमभाव अंगी करूनी,
तपशक्तीला सतत वाढवी ।।३।।
तपोबलाचे बनूनी कवच,
फिरत होते अवती भवती,
दु:खाचे वार झेलुनी,
रक्षण त्याचे सदैव करीती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जीवा जगण्याचीच एक आंस
असे जगावे, तसे जगावे,
मला वाटते मुक्त जगावे,
कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या,
अगदी त्यांना कोळून प्यावे,--!!!
जीव टाकत स्वच्छंदाने,
मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे,
जीवनाचे मर्म लुटावे,--!!!
कधी कस्तुरी व्हावे वाटे,
सुगंध फैलावण्या सारे,
वाऱ्याने त्याचेच गान गावे,
घेऊन जग तृप्त व्हावे,--!!!
कधी वाटते डोंगरदरीत,
हरणउड्या मारत हिंडावे,
स्वैर आपुले आभाळचआपण, आपल्या हाते खाली आणावे,--!!!
कधी वाटे गरुड व्हावे,
ऐटदार पंख फैलावत,
साऱ्या पृथेवर राज्य करावे,
कधी वाटे कोकरू व्हावे,
इकडून तिकडे उड्या मारत, पटकन कुणाच्या कुशीत शिरावे,--!
कधी वाटे मधमाशी व्हावे, फुलांफुलातील मध चाखत, साठवण करत करत रहावे,
कधी वाटते राजहंस व्हावे पाणियात डुंबत डुंबत,
दिमाखाने झकास जगावे,--!!!
नकोत सगळे प्रश्न हे,
नकोशी ज्यांची उत्तरे,
माणूसपण सोडून देऊन,
थोडे जगून पहा बरे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला ।
दूरवर बघत राहीन, ती लेकीला ।।१।।
लेक चालली निरोप घेवूनी, सासरी ।
भरल्या नयनी माय उभी, शांत दारी ।।२।।
जड पावले पडता दिसती, लेकीची ।
ओढ लागली त्याच पावलांना, मायेची ।।३।।
उंचावूनी हात हालवीत, चाले लेक ।
जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक ।।४।।
वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली ।
अश्रूपूसून पदराने, माय घरात आली ।।५।।
दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून ।
स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड……
कोणते दुःख तुला छळते
अकारण कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवीत असतां आनंदी भाव
आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तुजसाठीं धावूनी
कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझ्याच समजूनी
जीवन मार्गी होता बदल
नको होऊस वेडे चंचल
सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवीत जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालती होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।
प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।
सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।
शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।
अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे 'पुरूष' ।
'पुरू' म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे 'ईश ।।
अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी ।
विधात्याची वास्तूकला, अप्रतीम अजोड ठरे खरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
देह - बाळपणीचा सुखावणारा
मातापित्यांना
घरच्यांना दारच्यांनाही
मऊ, रेशिमस्पर्शी
पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा..
देह - यौवनातला ...सुखवणारा
इतरांना....स्वत:लाही
रेशिमस्पर्शी सुख देणारा
भोगणारा
भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा
गर्वोन्नत - टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा...
देह - मावळतीचा काहीच न सोसणारा
दुःखच नव्हे तर सुखही...
जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा..
मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना
देहावाचून अर्थ नाही
तरीही तुझ्या-माझ्यात असावं
देहापलिकडचं काही
हातात घेतलेले हात नि आलिंगन
ही असावी फक्त लिपी
पण भाषा असावी आत्म्याची..
तरच...
रिझू विझू डोळ्यांनी
एकमेकांकडे पाहताना
कडवट औषधांच्या गंधात
नि जीव वाचवणाऱ्या शस्त्रांच्या सोबतीत
जाणीव होईल
संगमरवरी सौंदर्याच्या आड
दडलेल्या रक्त-मांस-अस्थिच्याच फक्त अस्तित्वाची
तेव्हाही आपण गाऊ वसंतातली प्रीतीगीतं
त्याच उत्कटतेनं
जशी गाईली होती.
देहाला वसंताची पहिली पालवी फुटताना…..
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते -
'टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
कशासाठी उभे आहात ?
अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच.....
तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
तुम्ही डॉलर मिळवा
लोक बघा किती आनंदात
बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..''
हे फटकारे त्यांनी टिळकांचे नाव घेवून सर्वांवरच ओढले आहेत. या कवितेतले टिळक आपल्या अंगावर धावून येतात आणि आपली झाडाझडती घेतात.
Copyright © 2025 | Marathisrushti