(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • असाच पाऊस झिम्माड

    असाच पाऊस झिम्माड
    वाहते रस्ते गळकी झाडं
    पक्षी घरट्यात
    माणसं बिऱ्हाडात
    सगळं शांत निवांत ...
    अंतरात.. आसमंतात
    तू म्हणालास...
    एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची
    चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची
    हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं
    तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं
    पाऊस तुझ्या मनात
    पाऊस माझ्या डोळ्यात
    झरत होता झरझर
    उलगडत अंतर
    अचानक तू थांबलास
    ओल्या पापण्यांनी हसलास
    म्हणालास....
    संपला इथला सहवास
    पुढचा पाऊस नसेल खास
    बदलली चौकट कि बदलेल सगळं
    मनाच्या पाटीवर चित्र असेल वेगळं
    फुटतील ढग कोसळतील सरी
    सगळं असेल तसंच तरी
    सूर होतील बेसूर गातील राग अनवट
    पावसाच्या चित्रातले रंग दिसतील फिक्कट
    उखडलेली घरटी उजाडलेली घरं
    येईल नजरेत सगळं खरंखरं
    तू म्हणालास…तसंच झालाय रे !
    सुरु झालाय अनवट राग
    घेतोय कसला कसला माग
    मी अस्वस्थ त्रयस्थ वैराग
    सजीव चित्रातला निर्जीव भाग
    दिसतंय सगळं उदास भकास फिक्कट
    कारण....
    मोडून गेलास तू चित्राची चौकट...
    मोडून गेलास तू चित्राची चौकट!!!

    . ..... मी मानसी

  • तुझ्या अलगद स्पर्शाने

    तुझ्या अलगद स्पर्शाने
    मी आल्हाद मोहरुन जावी,
    दव भिजली पहाट सख्या
    तुझ्यात गुलाबी व्हावी..
    रोमांचित फुलेलं सर्वांग
    नजर फिरता तुझी,
    हात तू हातात माझा घेता
    ती बकुळ फुले लाजती..
    मिठीत तू हलकेच घेता
    उमलतील कमलदल पाकळ्या,
    ओठ ओठांना भिडतील
    विरह संपेल हा असा..
    एकरुप होते तुझ्यात मी
    मिठीत अलवार घे मजला,
    हसतोस मंद जरासा तू
    तुझ्यात मिटते ही अधर काया..
    -- स्वाती ठोंबरे.
  • देवा, ह्याही देशात पाऊस पाड

    ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.

  • निवडणूक

    १९८५ सालच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली ही कविता ! आजही तितकीच ताजी आणि संदर्भयुक्त आहे –

  • स्वच्छंदी जीवन

    चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे ।
    खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे ।।

    झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके ।
    दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके ।।

    संसार चक्र भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी ।
    नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी ।।

    पिल्लांना त्या पंख फूटता, उडूनी गेल्या घरटे सोडूनी ।
    अल्प काळाचे बंधन तोडीत, जगण्या पुनरपी स्वच्छंदानी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गोकुळीच्या आम्ही गोपिका

    गोकुळीच्या आम्ही गोपिका,निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,--!!

    करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,--!!

    ठुमक ठुमक चालीची
    नक्कल करीत थांबशी, ‌‌ उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!

    नको नको रे मारुस खडा,
    ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
    मिळून घालता ना डांका--!

    गोंडस तव रूपाला देखण्या,
    नुसते आम्ही बघत राहतां,
    अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
    दया कर आम्हांवर कान्हा,-!

    भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
    सोड, वाट मनमोहना ,
    कसे सांगावे नंद -यशोदा,--!

    हिमगौरी कर्वे.©

  • मित्रराज उगवताना

    मित्रराज उगवताना,सृष्टीवर घडे करामत,
    आभाळ उतरे जळात,
    त्याचे रूप दिसे पाण्यात,
    लोक
    आरस्पानी निळे सौंदर्य,
    नजरा खिळवून ठेवी,
    हलते डोलते आभाळ,
    पाण्यात प्रतिबिंबित होई,

    वृक्षांचे समूह किती,
    धरतीवर पेरलेले,
    निळाईत उठून दिसती, हिरवाईने नटलेले ,--!!!!

    तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई,
    प्रकाशाचे किरण घेऊनी,
    दिनकराचा प्रवेश होई,

    अंधारी बुडालेली सृष्टी,
    रंग तिचा बदलून जाई,
    कडेकडेने सोनेरी सोनेरी,
    पिवळसर उजेड पाऊल टाकी,

    प्रकाशाचा रांजण भरुनी,
    सूर्यराज दिमाखात येई,
    तांबड्या सोनसळी किरणांची,
    आता भाऊगर्दी होई,--

    डोंगर आपल्या डुलक्या सोडुनी,
    हात जोडुनी उभे राहती,
    सूर्यसम्राटाचे स्वागत करण्यां,
    भालदार चोपदार खडे राहती,--!!!

    पिवळसर प्रकाश आता धरणीवर ओसंडू लागे,
    तम जाई पळून सारे,-
    प्रिय तिचा तेजस्वी तळपे,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • माय मराठी : (लघुकाव्य-संच)

    (मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें)

    (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा

    माय मराठीला करूं मानाचा मुजरा

    चला, आज मराठीचे गोडवे गाऊं

    उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।।

    -

    (२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला

    भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला

    करील पुनरुत्थान, हरील हताशा

    कोण असा, पाहील मराठी भाषा ?

    -

    (३) संकर झाला, होऊं द्या की , मराठी मरणार नाहीं

    इंग्लिश-हिंदी-संगणकाच्या-भाषेला डरणार नाहीं

    सहस्त्रकें दो , आक्रमणांतुन तगली मराठ-भाषा जी,

    तिच्या भविष्याची कोणीही करूं नका काळजी ।।

    -

    (४) दोन हजार वर्षांत मराठी बदलली नाहीं कां ?

    मूळ रूपापासुन थोडीही ढळली नाहीं कां ?

    मग आतां शब्दांचा संकर हा कसला अनर्थ आहे ?

    मर्‍हाट-भाषा स्वत: काळजी घेण्यां समर्थ आहे ।।

    -

    (५) हिची अनवती करील, असा

    तुम्हांम्हांविण आहेच कोण ?

    तुमचीआमची उदासीनता

    हीच तिच्या र्‍हासाला कारण ।।

    बाहेरचे एल्गार परतवूं

    मराठीचा हात धरून

    कांहीं शुद्धता-आग्रह धरून

    कांहीं संकर मान्य करून ।।

    करूं नका जयकार हिचा

    एकच दिवस , अरे

    मराठभाषा अमुची माता

    हिला ज़पूं सारे ।।

    - - -

    सुभाष स. नाईक मुंबई

    M – 9869002126 . eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com ; www.snehalatanaik.com

  • जग

    मी म्हणालो जगाला
    मला फक्त तुझ्यासाठी
    आणि स्वतःसाठी जगायचयं...

    जग म्हणालं मला
    माझ्यासाठी जगं पण
    टाळं स्वतःसाठी जगायचं...

    मी बदललो
    जगाच्या कल्याणासाठी
    पण आता जगचं मला बदलतयं...

    जगात बदल घडवणं
    आता अशक्य आहे
    कारण जग आता पाषाण झालयं...

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
    दिनांक – 9 मार्च 2016

  • चल, चांदण्यांची सैर करू

    चल, चांदण्यांची सैर करू,
    अंबरी, ढगां-ढगांत विहरू,
    कडेकडेने मेघांच्या,जाऊ,
    हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!!

    मिचकावून डोळे आपुले,
    चांदण्यांची वरातच पाहू,
    सुंदर चमचमत्या प्रकाशात,
    त्यांची आभा नीट न्याहाळू,--!!

    काळ्याशार गालिच्यावर नभांत,
    वावरते प्रकाश--झोत पाहू,
    इकडून तिकडे हलत्या प्रवासी,
    चंद्राचीही धांदल बघू,---!!

    कोण त्यांच्यात अधिक सुंदर,
    मनी मानसी स्पर्धाच लावू,
    चंद्राचा मुखडा लोभसवाणा,
    पाहून आपण अचंबित होऊ,--!!

    धरेवर ती मजा नाही,
    ना कुठली दिसे चांदणी,
    नकली नको त्या, असली पाहू,
    देखणी, नाजूक त्यांची बांधणी,--!!

    पृथेवर का कधी चंद्र दिसे,
    तोही इतुका जवळून आढळे,-?
    थंडगार त्या वातावरणी,
    झोपण्यात केवढी मजा असे,-?

    अंतराळाचे सुख निराळे,
    दु:खाची मुळी बात नसे,
    ताण-तणांवा नसेल जागा,
    ताणून द्या हो,शरीर सगळे,--!!

    ओढाताण नाही कुठली,
    जिवां मिळेल विश्रांती,
    मानापमानाची कल्पनाही,
    तिथे करायाची नाही,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©