(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • योग्य वेळी

    दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी

    काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी....१

    शून्यामधले कितीकजण ते, शून्यची सारे अवतीभवती

    परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२

    आज हवे ते त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती

    सहानुभूतीचा शब्द एक तो, निर्माण करील सहनशक्ति....३

    क्षीण होता तव दृष्टी, दिसेल कां तयाची धडपड

    श्रवणदोष तो येण्यापूर्वी, ऐकून घे तू दु:खी ओरड...४

    चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू

    संगे जावून जाण तयांचा, जगण्यामधला खडतर हेतू...५

    जेव्हां असशील विंवचनात तू, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती

    कोण जगतो कसा काय ते, जाणून घेण्या सवड कुणा ती...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • गोड स्वप्नं 

    अजुनही एकांतात
    कधी तिला आठवते
    कोवळ्या त्या मनाचे
    सुंदर गोड स्वप्न ते...

    त्याला पाहुन
    तिचं मन झुरलं होतं
    कळलं नव्हतं तिला
    पण ह्रुदय हरवलं होतं

    बसल्या बसल्या बोटानं
    वहीत रेषा ओढत होती
    स्वतःच्या नावापुढे
    त्याच नाव जोडत होती

    झुरलेल मन तिचं
    शब्द शोधत होतं
    भावनां व्यक्त करण्यास
    बळ शोधत होतं

    ओठांवरच्या शब्दांना
    कंठ नाहीच फूटला
    हळुहळू मोगऱ्याचा
    तो बहरही ओसरला

    अल्पायुषी भावना ती
    अशी झुरता मेली
    रेंगाळलेल्या पावलांनी
    बोहल्यावर ती चढली

    दूर राहिलेल्या वाटेसाठी
    मन नाही अडखळलं
    वास्तवाच्या हिरवळीवर
    अगदी आनंदान रमलं...

    अजूनही एकांतात
    कधी तिला आठवते
    पडलेले गोड स्वप्न ते
    हसुन झटकून टाकते.

    - डॉ.सुभाष कटकदौंड

  • नाती मृगजळी

    वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा
    या भावनांचे आज अर्थ बदललेले

    उरि न उरली माया ममता ममत्व
    ओढ, आस्था आपलेपण विरलेले

    निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे
    नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले

    इथे कुणीच कुणाचे कधीच नसती
    सत्य विदारक जगी पचनी पडलेले

    स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी
    स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले

    कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी
    नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९३

    १६/११/२०२२

  • चुकीचे मूल्यमापन

    चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे

    रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,

    कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली

    टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,

    जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले

    श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,

    यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी

    कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जीवन मरणाची शर्यत

    शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
    विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी

    शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
    झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी

    काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
    रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला

    रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
    नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती

    खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
    जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना

    शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
    भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत

    मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
    जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी

    परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
    बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते

    निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
    जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गर्दीत माणसांच्या

    गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
    स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
    त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
    अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
    शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
    त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
    त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
    का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • मानवतेचा वसा

    झाले गेले सारे विसरूनी जावे
    व्हायचे ते ते सारे होतची असते

    क्षणाचा कां कधी असे भरोसा
    जगणे पूर्वप्राक्तनी कर्मची असते

    जन्म! देणे घेणे भोग प्रारब्धाचे
    पूर्वसंचित भाळीचे जगणे असते

    युगायुगांतुनी लाभे जन्म मानवी
    त्यावर केवळ सत्ता ईश्वरी असते

    कठपुतलीपरी हे जीवन मानवी
    दोरी अनामिकाच्या हाती असते

    किल्मीषे मनातील दूर सारिता
    अंतरी मन:शांती सुखवित असते

    मानवास अपूर्व वसा मानवतेचा
    विवेकी जीवनाची सांगता असते

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९२

    १५/११/२०२२

  • न मागितलेल्या वेदना

    काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात
    भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात

    काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात
    आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात

    एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात
    नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात

    हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो
    स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो

    वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून
    'सुखी माणसाचा सदरा' विरविरतो लक्तरं होऊन

    हर एक सकाळी जिवंत असणं असावं का हे वरदान
    का लिखिताच्या अभिशापाने असावं फर्मावलेलं दंडविधान

    जळजळता अनाहूत, कलंक भाळी लेवून
    जीवनाला सामोरं जाणं मान वर करुन
    भार शिक्षेच्या कवचकुंडलांचा अंगावर धारुन
    खूप आतून यावा लागतो निर्धार हुंकार होऊन!

    सोनं होणं नशीबी नसलं तरीही
    आगीतून जाणं क्रमप्राप्त होतं
    आपल्या सजेचा खलिता गळ्यात टांगून
    पाय ओढत रहाणं आपल्याला भाग असतं

    वावटळीने विखुरलेल्या मनाची जुळव चिवटपणाने करतो
    आश्वासित आत्म्याला तो, माझ्या अस्तित्वाचा पुनः शोध असतो

    खंतेच्या खळग्यांवर आठवणींचे दगड ठेवून
    कालच्या काळोखाकडे मी जेव्हा पाठ फिरवतो
    उद्याच्या उष:कालाच्या किरणांवर चालत रहाणं
    हा एकच मार्ग तेव्हा मला खुला असतो

    -यतीन सामंत

  • आईच्या प्रेमाचा निरोप

    आई तुझे प्रेम,

    अनंत त्याचे दाम ।

    तुलनेसी ब्रम्हांडी,

    जड तुझीच पारडी ।।१।।

    पुंडलीक तुझ्यासाठी,

    विसरला जगत् जेठी,

    कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ,

    शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।

    बलीदानाची तू मूर्ती,

    'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी कीर्ती,

    कष्ट करुनी वाढविले छोटे,

    विसरती तुला होऊन मोठे ।।३।।

    सोडीनी एकटे तुजसी,

    पंख फुटता उडे आकाशी,

    निरोप देऊन प्रेमाचा,

    कळस गाठला महानतेचा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कोकणातील समुद्रकिनारा

    कोकणातली खूप मंदिरे...
    सागरकाठावरी!
    भक्ती गाठते मुक्तीकिनारा,
    बसून लाटांवरी!

    कृतज्ञतेचे मीठ सांडते,
    रात्रंदिन येथे,
    जाळ्यामध्ये येती धावत,
    माशांचेच जथे!

    आकाशाचा रंग पांघरून
    स्वच्छ निळे पाणी
    ओठावरती लाटांच्या तर,
    फेसांची गाणी!

    होड्या झुलती दबा धरुनिया,
    पकडाया मासे,
    शकुनी मामा होऊनी कोळी,
    जाळ्यांचे फासे!

    समुद्र भेटे जिथे नभाला
    क्षितीजरेषा निळी!
    सांजसूर्य भेटाया येता,
    क्षितीज त्याला गिळी!

    दगडांचा आडोसा पाहून,
    कुजबुज करते प्रेम,
    चोरून बघणारांची दृष्टी,
    अचूक साधी नेम!

    विश्रांती ना चुकून घेती,
    लाटा दमल्या तरी,
    ओंकाराला स्मरते येथे,
    वाऱ्यातून वैखरी!

    अहंपणाचा अंश उरेना,
    ऐकून सागरगाज!
    आत्मपरीक्षण करता येते,
    माजालाही लाज!

    - प्रमोद जोशी

    102 निर्मल अपार्टमेंट्स, श्रीकृष्णनगर,मु.पो. जामसंडे,
    ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग-416612. 9423513604