(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तरीही माझं जीवन सुखाच होतं

    व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्‍याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.


    माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत

    पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं..
    तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||

    आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
    पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
    तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||

    घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
    दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||

    आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
    दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥

    पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
    शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥

    शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
    पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥

    शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
    अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता - कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥

    नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
    शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ ||

    वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
    कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||

    पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
    उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||

    शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत,
    कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||

    गावची जत्रा हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
    बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||

    गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे,
    पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||

    हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
    बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या - डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||

    प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
    होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||

    दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
    रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||

    जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
    रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||

    खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
    पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||

    मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
    विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||

    घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
    पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||

    पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
    गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
    तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||

    आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
    टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
    कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

    आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,
    क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
    बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ ||

    आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
    एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
    आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

    आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
    इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..

    म्हणून

    पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे,
    पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

    -- मराठीसृष्टी टिम

  • होळी…….

    सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ..........
    सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ..........
    थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी..........
    जीवनातील उत्साह म्हणजे होळी ...........
    पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी........
    मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ........
    देवावरील विश्वास म्हणजे होळी..........
    मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी.......
    तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी .........
    अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी ...........

    -- निलेश बामणे

  • या भवंसागरातुनी

    या भवंसागरातुनी,तारीशी ना रे कान्हा,
    भोवती निळ्या आभाळी,
    तूच भासशी राणा,--!!!

    संसारसागरात भटकती,
    अनेक हतबल जीव ना,--?
    हात त्यांना नकळत देशी,
    करत आपला जादूटोणा,--!!!

    सागरी या सुखकमळे फुलली,
    मोहक वाटती, गुलाबी रंगा,
    दर्शन त्यांचे अधुनी -मधुनी,
    फक्त पाठ राख श्रीरंगा,--!!!

    भासतसे सुख फुले उमलली, क्षणभंगुर या जीवना,
    उमलून फुलती ,कोमेजती,
    शेवट ठेवती मात्र तरंगा,--!!!

    अदृश्य ही नाव चालली,
    काय करावे या हेलकाव्यां,
    तना- मनाचा कान करुनी,
    ऐकते फक्त तुझ्या पाव्यां,--!!!

    वरून पाहते प्रतिमा माझी,
    जशी पुढे--पुढे चालता,
    जीवन नौका अखंड प्रवासी, निधान तूंच, - तूंच, त्राता,--!!!

    एकात्म होऊन मुरारीशी,
    अर्पण करते त्याला आत्मा,
    केवळ तूच या हृदयी,---
    तूंच असशी परमात्मा--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • जुळे

    जीवनाच्या रगाड्यातून-

  • ऋतुगंध

    तुझं अवेळी कोसळणं भावतं मला
    भावनांचे उद्रेक झेलतानांही शांत असतोस
    माझा पाऊस नसतोच असा..
    उन्मुक्त ,अव्यक्तच रहाणारा
    बेभान होणं जमत नाही तुला..
    अनावरतेचा मखमली साज ही पेलत नाही तुला
    नागचाफ्यांतला गंध श्वासांत भरून रहातो..
    शुभ्रमौतिकांचे सडे सांडत येणारी
    प्रत्येक ओळ मी
    गिरवत रहाते माझ्या तळहातावर..
    प्रतिबिंबातला अनोळखी होत जाणारा
    शहारा सरसरत रहातो शरीरभर...
    अंगभर लपेटून घेते
    इवल्या सोनचाफ्याचा बहर
    केशर माखल्या ऋजुतेची ग्वाही..
    क्षणभरच ओझरती ठेवत
    तू तुझा पाऊस मिटून घेतोस
    सैंरध्रींचा मखमली साज
    ओघळत रहातो अनावर...

    © लीना राजीव.

  • खरे श्रेष्ठत्व

    कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।

    कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।

    निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।

    मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।

    विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।

    प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरविले ।।

    दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।

    विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।

    मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।

    स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।

    आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।

    युक्ती चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।

    घारीच्या द्दष्टीतील तीक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।

    कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी स्वासांनी जे हरवले ।।

    नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।

    उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।

    आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।

    दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।

    सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।

    हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।

    जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।

    मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • बदलती पिढी

    पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे

    क्षणा क्षणाला बदलून जाते, मन चकित करणारे....१,

    सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात

    पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंतीचा थाट....२,

    चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी

    फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असुनी....३,

    हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य

    नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश....४,

    ओबड धोबड बटबटती ते, रंग पसरवी सारे,

    कुणा न कळे आधुनिक कला, ही फसती ज्याला बिचारे....५,

    नाद मधूर हा प्रवाह वाहे, हृदयस्पर्शी जो असे

    जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे....६,

    अर्थ काय आणि भाव कोणता, उलघडण्याचे कष्ट पडे

    नव काव्याची चाल कशी ही, वाटते सर्वांना कोडे....७,

    जे जे होते सुंदर मौलिक, दृष्टी आड चालले

    सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले...८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जबरदस्त मराठी मोटिवेशनल कविता

    https://youtu.be/VZ1bm7L9OdE

  • डस्टबिन

    नका हो नका लादू माझ्यावर रोजरोजच हे शिळेपण....
    जरा पहा डोळे उघडून.... मीही एक माणूस आहे....डस्टबिन नाही !!
    उरलं अन्न, शिळ्या भाज्या घालतेच रोज याच्या पोटात
    नको वाटे वाया जाया, पण हे का रोज माझ्याच वाट्यात
    दिवसभराचा शीण, त्रागा आणि चिडचिड तुमची
    साचलेली गरळ नि मळमळ... चक्क येता नि सरळ ओतून देता या गृहीत धरलेल्या डस्टबिनपोटी
    गप गुमान भरून घेतो, कोंबून कोंबून घुसमटून जातो
    तरीही कधीच भरून सांडत नाही
    पण दररोजचं हे शिळेपण आता सहन होत नाही
    अंतरातला ताजा सुवास कधीच का जाणवत नाही?
    माणसातलं माणूसपण कधीच दरवळत नाही?
    पण आता आहे सारे थांबवायचे
    उकिरड्यावरच्या गलिच्छ पेटीगत यापुढं नाही वाहायचे
    मलाही जाणिवा आहेत किमान माणसागत जगण्याच्या
    मलाही हक्क आहे नको आहे ते नाकारण्याचा
    कारण... जरा पहा डोळे उघडून.... मीही एक माणूस आहे....डस्टबिन नाही !!
    -- वर्षा कदम.
  • वेडा चंद्रास्त

    केशरी क्षितिजी
    त्या चंद्राची कोर
    सोबत चांदणी
    फिरते सभोवार
    दाटलेल्या सांजवेळी
    परतून येई सारी पाखरं
    नसे उजेड संपूर्ण
    नाही काळोख फार
    सोबती निघे तो चंद्र
    जिथवर जाई नजर
    जणू सखा सोबती
    प्रेमळ मृदू अलवार
    निर्मळ नितळ मनी
    उगी उठे हुरहूर
    कातळास का कधी
    सांग फुटेल पाझर
    रेंगाळू नकोस तेथे
    तू वेळी सावर
    आता मनास वेड्या
    तू वेळी आवर
    बहकेल हे बहाण्याने
    तू नको जाऊ पार
    उगी काळजाशी भिडते
    ही लोभस चंद्राची कोर!!
    -- वर्षा कदम.