(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • साद

    ठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे

  • जीवनाचा खरा आनंद

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।

    बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
    निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
    बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
    येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
    परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा ।।४।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
    समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा ।।५।।

    तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • बचाव

    सरडा चढला झाडावरती,

    सर् सर् सर्, करीत ।

    लक्ष्य त्यांचे फूलपाखरू,

    फुलाभोवती होते खेळत ।।१।।

    भक्ष्यकाची चाहूल मिळतां,

    भर् भर् भर् गेले उडूनी ।

    शोषीत असता गंध फुलांतील,

    चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।

    व्याघ्र मावशी मनी ,

    म्याँव म्याँव करीत आली ।

    उंदीर मामा दिसता तिजला,

    झेप घेण्या टपून बसली ।।३।।

    शंका येता त्याला किंचित,

    झर् झर् झर् तो बिळांत गेला ।

    केवळ चित्त सावध असतां,

    प्राण आपले वाचऊ शकला ।।४।।

    निसर्ग देतो कला आगळी,

    बचाव करण्या शत्रू पासूनी ।

    सावध असतां जीव जीवाणू,

    मारू न शकते त्याला कुणी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • थोडे तुझे – माझे

    रोज रोज तेचं तेचं
    लाडू नकोत गोडाला
    कधीतरी चवीसाठी
    ठेचा हवाच ठसक्याला
    तसेच आहे आयुष्यात
    लावून घेऊ नये मनाला
    थोडे तुझे थोडे माझे
    घेऊन लागू प्रवासाला
    थोडे दिवस शांत शांत
    घरात राहिलं अबोला
    चांगलेच असते वादापेक्षा
    काहीच आपण न बोला
    वेळ जातो तसे वाटते
    उगीच बोललो जीवाला
    जाऊदेत सोडून देऊ
    सारे काही वेळेला
    आपण सारे विसरतोही
    विषय सोडे मागला
    आप्त मित्र आठवण करी
    घे आता बदला चांगला
    तरी एक कानमंत्र
    ठेऊ एक गाठीला
    बाहेर कुणा सांगू नाही
    नाहीतर घेतील चर्चेला
    हसून खेळून घेऊ सारे
    सोडून देऊ विषयाला
    जुळतात बंध हळूहळू
    लागेल गोडी संसाराला!!
    -- वर्षा कदम.
  • मराठी गझल – तुझ्या-विना

    तुझ्या विना सखे अता रिते रिते जगायचे
    तुझ्याच आठवात मी कसे किती झुरायचे

    मला नकोच वाटते जिणे असे उदास पण
    तुझा सुगंध भासतो म्हणून श्वास घ्यायचे

    दुखावल्या मनावरी हळूच फुंकरीन मी
    सुखावतील वेदना असे मला लिहायचे

    नभात माळल्यास तू असंख्य तारका जरी
    तयांस दाखवायला मलाच रात्र व्हायचे

    तुलाच शोधतात ही अधीर तीव्र स्पंदने
    तुला लिहीत गात मी मलाच सापडायचे

    रडायला जमेल का कधीतरी यथेच्छ की
    नकाब जन्मभर असे हसून वापरायचे

    मुक्या सुन्या उरातही नवा फुटेल हुंदका
    विनायका असे तुला नवीन गीत गायचे

    विनायक पाटील...✍

  • आईचे ऋण

    मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
    धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी

    प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी
    निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी

    दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
    घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने

    निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
    पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो

    अनंत ऋणे करुनी ठेवसी तुच माझ्या शिरावरी
    अशक्य आहे तेच फेडणे ह्याच जन्मी तरी

    मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
    पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • एखाद्या मध्यरात्रीपासून….

    एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
    आणि चलनात यावी सच्चाई...

    एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला
    आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
    आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे....

    एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
    आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने...

    एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
    आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
    आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
    आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची...

    एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बनावा
    अगदीच माणसासारखा...

    जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
    पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ....

    आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
    पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची...

    हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून....

    Forwarded Post

  • ध्यान

    ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर,
    सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।।

    स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे,
    मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे ।।२।।

    लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी,
    कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी ।।३।।

    साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत,
    शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।।

    काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान,
    करण्यास तुम्ही जावे, जाईल सारे बिघडून ।।५।।

    ध्यानात झोपे शरीर, शांत करूनी मन,
    आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन ।।६।।

    वेळ थोडा जाता, ध्यान सहज लागते,
    अंतरीचा प्रकाश दिसता, मन आनंदात डुबते ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तृप्ती आणि समाधान

    तृप्ती व समाधानात धुसर रेषा
    समाधानात तृप्ती का
    तृप्तीत समाधान !
    तृप्ती व समाधान
    जीवनाच्या गाडीची दोन चाके
    एक चालते
    दुसरे डुगडुगते !
    समाधानाच्या वाटेवर अतृप्तीचे काटे
    तृप्तीच्या युक्तीने एकही न रुते !
    तोच खरा मार्ग
    समाधानाने तृप होतो
    तृप्तता मिळूनही
    समाधान होत नाही
    त्याचा मार्ग चुकतो !
    समाधानाच्या पाठी धावताना
    तृप्ती दिसेनाशी होते
    समाधानातून तृप्ती मिळविता येते
    तृप्तीचे समाधान वेगळे असते !
    अतृप्तता समाधानाचा अभाव आहे

    तो तर
    समाधान आणि तृप्तीचा लपंडाव आहे !
    कायमच अश्या गोष्टींचा गोंधळ होतो
    समाधन समोर असूनही तृप्तता मिळत नाही
    तृप्तता मिळूनही समाधान होत नाही !
    खरे काय खोटे काय
    सर्व मनाचे खेळ आहेत !

  • मन अथांग सागर

    मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा,
    मन आवर्तनी भोवरा,
    सखोल पाणथळाचा, --||1||

    मन बिंदूंचे अवकाश,
    विस्तीर्ण मन पसरट,
    भावनांचे उठती कल्लोळ,
    अतुल आणि अलोट,--||2||

    मन पाण्याचा डोंगर,
    एकावर एक पार,
    शुभ्रतम* भासे चढ,
    *निळसर पण उतार,--||3||

    मन किरणी प्रभाव,
    झेलत साऱ्या दिनभर,
    सोनेरी कलत, झुकत,
    आभाळ उदंड त्यावर,--||4||

    मन समुद्री वादळ,
    वारे अखंड वाहत,
    जीवाची नौका चालण्या,
    शीड आत्म्याचे उभारत,--||5||

    मन माशांचे घर ,
    कधी गोंडस कधी घातक,
    उत्साही ते खळाळत,
    कल्पना-साम्राज्य पूरक,--||6||

    मन लाटेवरचे उधाण,
    संजीवनी अपार स्त्रोत,
    जीवघेण्या केव्हा तुफानात, नयनातून सागरी बरसात,--||7||

    मन तुला न कळत,
    मन मला न आकळत,
    मन मनुजा न गवसत,
    उलघाल सगळी अंतरात,--||8||

    © हिमगौरी कर्वे