काल जे असते
तसे आज नसते
प्रेमात पण तसेच असते
असे का त्याला उत्तरच
नसते फक्त फरक लक्षात
घ्यायचा असते निमुटपणे
तरच सारे काही सुरळीत होते.....
प्रेम प्रेम रहाते
नाहीतर
काही खरे नसते......
जसे भांड्याला भांडे लागते
तसे प्रेमाला प्रेम ' लागते '....
-- सतीश चाफेकर.
जीव भुलोकीचा पाहुणा
अनिश्चिती,या स्पंदनांचा
संपता, पाहुणचार दैवी
घेतो जगी निरोप सर्वांचा।।
गतजन्मांचीच सारी नाती
याच जन्मी, ऋणमुक्तीची
चित्रगुप्ताच्याच चोपडीत
चोख हिशेब सारा सर्वांचा।।
सलोख्याने ऋणमुक्त व्हावे
निजानंदी! निजसुख घ्यावे
निरपेक्षी सुखदा ही आगळी
मना ध्यास असावा मुक्तीचा।।
जीवनी, सुखरूपताच शांती
निर्मोही! प्रीतीस्पर्श सदानंदी
वरदान! कृपावंती तेच ईश्वरी
श्रद्धाभाव रुजवावा भक्तीचा।।
-- वि. ग. सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ४१.
९ - २ - २०२२.
पहाट झाली,
चिव चिवते चिमणी
उमज येईना,
उठविले तिजला कोणी.....१,
आई आहे कां ?
जी उठवी शाळेसाठी,
गुदगुदल्या करूनी
कुरवाळिते हळूंच पाठी....२,
घड्याळ उठवी
घण घण करूनी नाद
घरट्यामधुनी,
नाही ऐकला असा निनाद.'..३,
' उषाराणी येते,
साऱ्यांची आई बनूनी
प्रेमानें मोडी झोंप,
नाजूक करकमलांनी.....४,
घड्याळ आमचे,
दवबिंदू पडतां पानावरूनी
चाळविती निद्रा,
टपटप आवाज करूनी' .....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लिहिले आजवर खूप, काही राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
रोज सकाळी घाईत चेहरा पाहून जाई
थकून येतो बाळ जेव्हा झोपून जाई
असाच झालो मोठा डोळे सांगून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
कष्ठ उपसले आईची त्या कदर होती
लाड पुरवले बापाने ती उधार होती
हात फिरवला जेव्हा डोई कळून आले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
असा घडवला हात हाता घेऊन त्याने
राखले ना काही टाकले देऊन त्याने
आठव येता डोळा पाणी साचून आले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
बघतो जेव्हा गर्दीत बाबा कुठेच नसतो
कधी अचानक डोळा पाणी होऊन दिसतो
पाठीवरची थाप घेण्याचे राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
मी कमी तो कवितेत माझ्या बोलत आहे
सपाट जागी नसला वळणा चालत आहे
कवितेस माझ्या उंच भरारी देऊन गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
एकटक तो बघतो काही बोलत नाही
चुकले तरीही आधीसारखे सांगत नाही
छापू आपण पुस्तक तसेच राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
लिहिले आजवर खूप काही राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
-काव्यप्रसाद
प्रसाद गोठणकर
(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -)
स्वातंत्र्य मिळाले
तेव्हा ते म्हणाले
गरिबी हटाव!
त्यानंतर
कित्येक पंतप्रधानांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मुख्यमंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
आमदाराने खासदारांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर त्यांच्या कित्येक
बगल बच्यांनी
आपली गरिबी हटवली
स्वातंत्र्य मिळून
पन्नास वर्षे झाली
गरिबी कुठे हटली?
यांची बिचारी गरिबी
पिढ्यान् पिढ्या
कधी हटणारच नाही
गरिबीचे यांनी
केले कुत्रे
लाचार लूत भरलेले
यांच्या गरीबीचे
कुत्रे मात्र
लठ्ठ लाचेचा पाव खाते!
गरीबीचा मंत्र
जपायचा
डोळे झाकून
दुनिया झुकते
झुकणारी जनता
गरीबच असते
दिसते तसे नसते
म्हणून जग फसते
गरिबी हटली
तर श्रीमंती
राज करील कसे?
-- विनायक अत्रे.
प्रेम हे करत नसतात , ते होत असते
प्रेम हे मागत नसतात, ते मिळत असते
प्रेम हे दिसत नसते, ते जाणून घ्यावे लागते
प्रेम हे बंधन नसते, ते मुक्त करते
प्रेम परिसासारखे असते जे लोखंडाचे सोने करते
प्रेम अमृतासारखे असते जे मेलेल्याला जिवंत करते
प्रेम हे तिचे किंवा त्याचे नसते, ते दोघांचे असते
-- विवेक विजय रणदिवे
किती रे खोड्या करशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।
झोपू दे रे तिजला आता, ती तर गेली खूप दमूनी
दही दुधानी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडता
फस्त करशी काही मोदक, ताटामधले तूच खाऊनी....२,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपीच्या तू फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शब्दभावनांची जुगलबंदी
Copyright © 2025 | Marathisrushti