दगड टाकतां पाण्यावरी,
तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी,
बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी,
वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी,
दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई,
स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा,
सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो,
गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता,
वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 15, 2017
मराठी मना माझ्या नको अंत पाहू
पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥
मराठी मना काय तुझी ही अवस्था
कशी अस्मितेची तुला ही अनास्था
मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा
जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा
मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी
होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥
कुणी आणावा राजा शिवाजी राणा
मराठी मनाचा ताठ बुलंदी कणा
तुम्हा का न स्मराव्या मराठी मर्दकहाण्या
का न आठवावा तुम्हा लोकमान्यांचा बाणा
आठवणींना उजाळा, का न स्फुरावेत बाहू ॥ २ ॥
कधी जीव जातो उसासून माझा
कधी जिजाई पुन्हा प्रसवेल शिवबा
तगमग जीवनाची भिडे काळजाला
आक्रंदे मन मी, किती वाट पाहू ॥ ३ ॥
मराठीस माझ्या न साहवे कोंडमारा
आवर्तनांची मनास सले वेदना ही
फुटावे काळीज उठावा धुमारा
पिसाटे मन, मी कसा मूक राहू ॥ ४ ॥
दुर्दैव; माते तुझी वेदना ही
तुझ्या अंतरीची, पूतां का न रुतावी
व्यर्थ जन्म त्यांचा क्षुद्र दुर्दैवी ते
कुठे न कळे कशी आग ही चेतवू ॥ ५ ॥
तुझ्यास्तव का न ते उरी फुटावे
तुझ्यास्तव का न मने बंडाने पेटावी
का न प्रतिज्ञा त्यांची रक्ताने सजावी
नको रे नको, असा निर्जीव होऊ
नको मराठी मना अस्मिता गहाण राखू ॥ ६ ॥
महद्भाग्य माझे, मातृभाषा ही माझी
फडकवीन ध्वजा अटकेपार जयाची
मराठी मना, घे हा तुझा पुढारी
उभारा हे बाहू, नका मागे राहू ॥ ७ ॥
-- यतीन सामंत
October 23, 2022
उतरला ईश्वर धरेवरी
सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।।
वैकुंठींचा प्रभु नारायण
करतो जो विश्वाचें पालन,
कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।।
क्षीरसागरा मागे ठेवुन
शेषनाग-मंचकास त्यागुन
नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।।
क्षेत्र पंढरी जरि इवलेसें,
हरिस्पर्शें झगमगलें ऐसे –
जैसी स्वर्गामधें शोभते नगरी अलकापुरी ।।
कृतार्थता ही आम्हां मोठी
ब्रह्म अवतरे आम्हांसाठी
इथेंच थांबुन युगेंयुगें, उद्धरी जगा श्रीहरी ।।
- - -
- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
July 4, 2017
बागेतील तारका-
February 5, 2013
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 2, 2012
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 13, 2016
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
March 2, 2015
तुझ्या आठवणीत
शब्द विरघळतात
पाझरतात भावनां
हळवा होतो एकांत...
मी आभाळ पहातो
तरळतेस तूच नेत्रात
हाच भास विलक्षण
हळवा होतो एकांत...
ही सुरम्य प्रीत वेडी
तुझेच रुप पापणीत
मी मज भुलुनी जाता
हळवा होतो एकांत...
स्मरण तुझेच लाघवी
नित्य माझ्या अंतरात
तुजविण सुनेच सारे
हळवा होतो एकांत...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०८
१९/८/२०२२
September 21, 2022
पंचामध्ये मोठा पंच
गावगाडा सरपंच
सरकारचा दूत जसा
प्रश्नपत्रिकेचा संच!
घडो काहीबी गावात
बोला म्हणे सरपंच
लोकांचे धरी धनुष्य
आपला तुटतो प्रपंच!
बोलणे खातो तसाच
टवाळी विषय होतो
दिसली कडक टोपी
म्हणती माल हाणतो!
आरोपीच्या पिंजऱ्यात
रोजच खडा असतो
मतदानाच्या बुथवर
विरोधी राडा असतो!
आली जर का योजना
भोवती गराडा असे
निघली त्यांची बिले
आभाळी बघत बसे!
खरं बोलायला जावा
शहाणा झाला म्हणती
खोटं बोलायच तर
पंचायत मोठी होती!
तोंडदाबी बुक्की मार
घरावर तुळसीपत्र
शेंबडे पोर देते दम
मग मुळव्याधी सत्र!
नळ बघा, घाण बघा
मिटवा त्यांची भांडणं
नको नको म्हणताना
गळा आयोग लोंढणं!
हापशावरची चर्चा
तशी पांदीलाबी होते
सरपंच वरनं शाबूत
आत भुंगा पोखरते!
याचे दोन, त्याचे दोन
गुमान कामे करतो
भूषण एवढेच की
माणसांत देव पाहतो
पंचामध्ये....
-- विठ्ठल जाधव.
संपर्क - ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
November 27, 2021
तुमचे जीवन अवलंबूनी,
ग्रहराशीच्या दशेवरती
तेच होई जीवनी तुमच्या,
जसे ग्रहमंडळ फिरती...१,
मित्र मंडळी सगे सोयरे,
शत्रू असोत वा प्रेमाचे,
जीवनातल्या हालचालीवरी,
परिणाम ते होई सर्वांचे...२,
हेच सर्व ते ग्रह असूनी,
सतत स्थान ते बदलती
परिस्थिती बघूनी तुमची,
वागण्यात तो फरक करती...३
अपयशाला कारणीभूत तो,
असतो कुणीतरी नजीकचा
राहू-केतू शनि वा मंगळ,
ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,
यशाची चालता घौडदौड ती,
मदत लाभते काही जणांची
हे तर सारे इष्ट ग्रह ते,
फूलवी सुमने जीवनाची...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti