वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नैराश्य :बालमनातील स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept)
वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व नैराश्य या घटनांना सामोरे जावे लागत आहे.
ताणतणाव म्हणजे,
" ज्या एका मानसिक अवस्थेतेमुळे शरीर स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते ती म्हणजे ताण (Stress). ""ज्यांच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका संभवतो,अशा घटनांद्वारे उद्धवणारी प्रक्रिया म्हणजेच ताण (by Lazhrous /fhokman,psychologist).
वाईट घटनांमुळे निर्माण होणारा ताण खऱ्या अर्थाने त्रासदायक असतो तर चांगल्या घटनांमुळे होणारा ताण हा आनंददायक किंवा सुखद असतो.
स्व-संकल्पना म्हणजे ,
"स्वतःचे स्वतःविषयीची कल्पना,भावना,अभिवृत्ती,आवडी निवडी ,सवयी,क्षमता,राहणी,प्रेरणा इत्यादींचे मूल्यांकन म्हणजे स्वसंकल्पना होय." ताण निर्माण करणाऱ्या घटना :
जीवनात ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर मानवी जीवन अस्वस्थ होण्यास सुरुवात होते . जसे ,जीवनसाथी ,नोकरी दैनंदिन वादविवाद ,संशयवृत्ती ,भांडणे ,वैचारिक मतभेद ,नोकरीमधील वरिष्ठांची अपमानित वागणूक, प्रेमप्रकरणं ,फसगत अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक घटकांवर प्रतिकूल परिणाम होऊन मानवी आरोग्य बिघडते . अपमान ,एकाकीपणा ,अभ्यासाचे दडपण ,भीती व अपयश, नातेसंबंधातील दुरावा ,जीवनातील अनेक लहान सहान समस्यांनी त्रस्त होणे,इतरांकडून न मिळणारा आधार,प्रेम ,यामुळे सतत तणावात राहणे त्यामुळे आंतरिक प्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो . व्यक्तीच्या आयुष्यात एका उंचीपर्यंत कार्यक्षमतेच्या प्राप्तीसाठी ताण येणे आवश्यक असते ,परंतु ताणाच्या कार्यक्षमतेची पातळी सतत वाढली तर त्याचे रूपांतर नैराश्याकडे जाऊ शकते . बालपणातील मानसिक,शारीरिक किंवा लैंगिक आघात . नकारात्मक विचार येणे,त्याबद्ल स्वप्नं पडणे,भीती वाटणे,लक्ष केंद्रित करता न येणे,स्मरणशक्ती कमी होणे,नकारात्मक विषयावरील टीव्ही सिरीयल पाहणे . समाजात मिळून मिसळून वागायची भीती वाटणे . कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नेहमी ताण येतो.
समस्या १ : दीपाली मॅडम सरकारी शाळेत नोकरीला. वर्गात छान शिकवायच्या,प्रेमळ होत्या . त्यांच्या लग्नानंतर पतिपत्नीतील वैचारिक वादावरून पटेनासे झाले, नित्याची भांडणे,मारझोड,संशयवृत्ती यामुळे पतीचा त्रास वाढत गेला. सतत ताणतणावात असल्याने चिंता,नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात दोन अपत्य झाली .घरच्या सदस्यांनी समजाविले परंतु मार्ग निघाला नाही.एकाकीपणा ,सामाजिक नीति-नियम ,प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे इतरांना समस्या न सांगण्याचे धाडस अशा अनेक नकारात्मक कारणांमुळे नैराश्यात आयुष्य जगणे सुरु झाले .
मॅडम होळीला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या . ताणतणावाचा परिणाम त्यांच्या शरीरावर व मनावर झालेला होता. आईला म्हणाल्या, माझ्या मुलांचा सांभाळ करशील का? या सवांदावरून आई वडिलांनी काळजी घ्यायला हवी होती. त्यांना आईवडिलांची साथ लाभले नाही व आई वडिलांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सारं काही असहय होऊन आपल्या मुलासह आत्महत्या केली .
समस्या २ : सरिता मुलाला घेऊन आईवडिलांकडे वास्तव्याने राहायला आली. ती नोकरी करते. पाहायला सुंदर, प्रेमळ ,इतरांना मदत करणारी ,काय झालं असेल तिच्या आयुष्यात ?लग्नानंतर लहानसहान कारणावरून भांडण, वादविवाद,मतभेद ,नेहमीचा ताणतणाव चिंता यामुळे एकत्र आयुष्य जगणे असह्य झाले .समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश .
दरम्यानच्या काळात पतीने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला परंतु सरिताने नकार दिला .पती मुलाला शाळेतून परस्पर घेऊन गेला . पतीला काहीही न बोलता आपल्या ताणतणावाचे व वात्सल्याचे समायोजन केले पालकांनी सकारात्मक मानसिक धाडस दिलं . जगण्याची नवी उमेद दिली . तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या प्रेमळ सहवासाने पती व मुलाविना सरिता आनंदाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय .
व्यक्तीच्या बालमनांतील स्वसंकल्पना :
स्पर्धेच्या काळात मनुष्य स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता स्वतः अंध काळोखात जात आहे. ही लहानपणातील स्वसंकल्पना होय .अनुवंश व बाह्य घटकांमुळे व्यक्तीची जडणघडण होते. उदा .स्वतःचे विचार व्यक्त न करू देणे ,स्वतःला कमी लेखणे, काळा वर्ण ,शारीरिक व्यंग इ .कारणांमुळे व्यक्तिमत्व न्यूनतेची स्व-संकल्पना बालमनात बनते . उद्धट बोलू नकोस ,वाद घालू नकोस,मुलीच्या जातीने जास्त बोलायचे नाही , अशा नकारात्मक गोष्टीचे मुले अनुकरण करतात यातून स्वसंकल्पनेची बीजे रुजविल्या जातात .कुटुंब व शाळेत मुलांमधील स्वतःचे महत्व कमी असल्याची स्वसंकल्पना दृढ होत जाते .बालकाच्या स्वसंकल्पनेवरच जीवनाचे यश अपयश अवलंबून असतेबालमनात कुटुंब व शाळामधून ऐकविलेल्या काल्पनिक परिकथा /गोष्टी उदा. सिंड्रेला, भुताच्या गोष्टी इत्यादींमधून स्वसंकल्पना बनत जातात समस्येचे मूळ त्याच्या बालमनांतील स्वसंकल्पनेत दडलेले असते .
बालमनातील भीतीयुक्त स्वसंकल्पनेमुळे समस्येचे समायोजन दीपाली मॅडमला करता आले नाही. पालकांनी समस्या व्यक्त करण्याचे धाडस निर्माण केले असते तर टोकाचा निर्णय घेतला नसता . आयुष्यातील चिंता ,ताणतणाव, नैराश्य या बाबत पालक ,जीवलग मित्र ,यांना सांगून समस्येचे निराकरण झाले असते.स्वतः कमावती असल्याने पतीपासून विभक्त किंवा वेगळे राहून आनंदी जीवन जगता आले असते .पालक, मित्र, नातेवाईकांनी भावनिक आधार दयायला हवा होता .आत्महत्या करण्यापेक्षा थोडे अपमान सहन करण्याची सकारात्मक हिंमत करायला हवी होती . सरिताने आयुष्यातील ताणतणावाचे आईवडिलांच्या भावनिक आधाराने,प्रेम व सहकार्याने समस्येचे व्यवस्थापन केले, आज आपले आयुष्य आनंदाने जगत आहे .
तणाव, चिंता ,नैराश्य यातून सुटका होण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग नियमित करावा .नैराश्य दूर करण्यासाठी परिस्थिशी जुळवून घेणे व समस्येचे भावनिक समायोजन करण्यास शिकणे .जीवनशैली साधी व गरजा कमी ठेवणे . बालमनावर कुटुंब व शाळांमधून सकारात्मक स्वसंकल्पनेची बीजे रुजविणे .स्वतःची बलस्थाने आणि उणिवा ओळखून त्याचा स्वीकार करणे .नकारात्मक विचार, गैरसमजुती, व्यसनाधीनता यापासून दूर राहणे, रागावर नियंत्रण ठेवावे .विनोदबुद्धी, छंद जोपासणे ,मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणे, साजेसा जीवनसाथी शोधणे. आपले काम प्रामाणिकपणे करणे व आनंदी राहणे. स्वआदरभाव राखून स्वतःचा व इतरांचा मानसन्मान करणे .अपमान सहन करायला शिकले पाहिजे .सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करावे. जसे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, बाबा आमटे इ. स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, मी माझे मानसिक आरोग्य उत्तम ठेऊन आनंदाने आयुष्य जगू शकतो,असे स्वतःला सुचवित राहावे . सकारात्मक विचार देणाऱ्या चित्रपट, टीव्ही मालिका पाहाव्या .
ताणतणाव ,चिंता व नैराश्य यावर मात करून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावा व सकारात्मक विचारधारेचा अंगीकार करावा.
-- प्रा. हितेशकुमार पटले
ExamVishwa
April 23, 2017
आरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात.
April 8, 2023
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी यांनी लिहिलेला हा लेख
माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म झाला. व्हर्नाक्युलर (म्हणजे सातवीची) परीक्षा पास झाल्यावर वडिलांची अशी इच्छा होती की, जळगावच्या जवळ असलेल्या ममुराबाद येथील शेतकी फार्मवर नोकरीसाठी जावे. त्यांचा तसा आग्रह होता. तसे नोकरीबाबतचे पत्र देखील मला मिळाले होते. परंतु माझी इच्छा पुढे शिक्षण चालू ठेवण्याची होती. म्हणून मी नोकरी न स्विकारता एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात वाहातुकीची साधने उपलब्ध नव्हती.
त्यामुळे डोक्यावर पेटी घेऊन मी माझ्या गावापासून ८ कि.मी. अंतरावरील भुसावळला पोहोचलो. तिथून जळगावला. एस.एस.सी. च्या परीक्षेसाठी रेल्वेने गेलो. शिक्षणासाठी संघर्षमय जीवनाचा शेवट इथेच संपत नाही. कॉलेजची शिक्षण घेण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि वडील गावाचे मुलकी पाटील असल्यामुळे व त्यांचा संपर्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी येत असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की, आपल्या मुलाने महसूल विभागात नोकरी धरावी. म्हणजे त्याला पुढे परिक्षा देऊन मामलेदार होता येईल व प्रांत ऑफिसरची जागा त्याला मिळू शकेल. कारण मामलेदार व प्रांत ऑफिसर म्हणजेच केवळ 'साहेब' अशी त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती. आणि तेच खरे अधिकारी समजले जात होते. कारण ग्रामीण भागातील लोकांचा केवळ या अधिकाऱ्यांशीच संबंध येतो त्यामुळे त्यांना ते देवासमान मानतात. त्यांचे बोलणे म्हणजे जणू देववाणीच समजतात. त्यामुळे वडील कॉलेज शिक्षणाला परवानगी देईनात कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी श्री. डमरी (नंतर वित्त विभागात सचिव होते.) नाशिकला कलेक्टर होते. त्यांचा व वडिलांचा संबंध येत असे. वडिलांनी त्यांना सल्ला विचारला. त्यांनी मला नाशिकला एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, असा वडिलांकडे आग्रह धरला. एवढेच नव्हे तर माझे नाशिकमधील ते गार्डियन म्हणून राहणार असे वडिलांना सांगितले. मला पुणे किंवा नाशिकला कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही.
माझे काका नडियाद (गुजरात) येथे इंजिनियर होते. त्यांनी मला कॉलेज शिक्षणासाठी नडियादला येण्याचा आग्रह धरला. वडिलांचा विरोध सहन करून मी गुजराथ विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. लगेच माझा विवाह झाला. त्यानंतर नोकरी करून एल.एल.बी. ची पदवी मिळवली. अकाऊंटस् मध्ये क्लार्कची नोकरी करीतच माझं वकिली शिक्षण पूर्ण झाले. मी वकिली सुरू केली. वकिलीतून बऱ्यापैकी पैसे मिळू लागलेत. परंतु जळगावसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहात असल्यामुळे आजारपणासाठी अथवा अन्य कारणासाठी जळगावला येणाऱ्या असंख्य नातेवाईकांमुळे माझे घर रेल्वेचे वेटिंग रूम झाले व माझ्या पत्नीला दवाखान्यात नातेवाईकांना डबे पोहोचविणे, आल्यागेलेल्यांसाठी चहा करीत बसणे हाच मुख्य व्यवसाय झाला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. हे मला आवडले नाही. म्हणून मी सरकारी नोकरी स्विकारली व अकोल्यात असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पुणे व मुंबईत काम केले. त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट ड्राफ्टसमन कम अवर सचिव व डेप्युटी ड्राफ्टसमन कम डेप्युटी सेक्रेटरी या मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी जाहिरात आली. मी सुरुवातीला अवर सचिव म्हणून रुजू झालो. परंतु लगेच ४ महिन्यात उपसचिव पदासाठी झालेल्या निवडीमुळे उपसचिव झालो. पुढे ४ वर्षांत मला सहसचिवाचे पदी बढती मिळाली. पुन्हा पुढील ४ वर्षांनंतर माझी सचिवपदी पदोन्नती झाली. पुढील दोन वर्षात मी प्रधान सचिव झालो तर त्यापुढील २ वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर शासनाने प्रधान सचिव, पार्लमेंटरी अफेअर्स या विभगात माझी प्रधान सचिव म्हणून पुर्ननियुक्ती केली. शासनाने तिथून माझा सेवा कालावधी संपायच्या आतच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र राज्य लॉ कमिशनचे चेअरमन म्हणून ३१ मे २००५ पासून नियुक्त केले. मी तिथून निवृत्त झालो. विधि आयोगाचे प्रामुख्याने काम म्हणजे आयोगाने राज्याचे विद्यमान कायदे व संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत मोडणारे कायदे तपासणे, त्याखाली केलेले नियम व अधिनियम हे संविधानातील तरतुदींशी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी न्यायदान पद्धतीत सुधारणा सुचविणे, संपुष्टात आलेले कायदे तपासून आवश्यक असल्यास ते निरसित करणेविषयी सुचविणे, समान विषयासंबंधीचे कायद्यांच्या एकत्रीकरणाबाबत शिफारस करणे, एखाद्या विषयावर नवीन विधिविधान करण्यासाठी शिफारस करणे, वगैरे बाबींचा त्यात समावेश होतो.
जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं मिळत जातात व ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. शाळेत असताना मी अतिशय व्रात्य होतो परंतु त्यावेळी श्री.एल.एन. सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि त्या विषयाबद्दल माझ्यात निर्माण केलेली आवड माझ्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरली. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले नसते तर माझे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न हे पहाटे पडलेले स्वप्न न होता मध्यरात्री पडलेले स्वप्न ठरले असते. त्यांनी मला जीवन कसे जगावे, त्यात प्रामाणिकपण असावा व सतत इतरांना मदत करीत राहावे ही शिकवण दिली व तसे वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला. तर वकिली करीत असताना मला वकील म्हणून घडविण्यात श्री. डी. डी. चौधरी या प्रथितयश वकिलांचा मोठा हात आहे. त्यामुळे मला वकिली करताना खूपच मदत झाली. तर मंत्रालयात विधी व न्याय विभागात रुजू झाल्यावर यशस्वी प्रारूपकार कसे होता येईल याचे धडे व मार्गदर्शन माझे वरिष्ठ अधिकारी श्री. धुरंधर व श्री. धोत्रे यांचे लाभले. त्याचा मला आयुष्यभर उपयोग होत राहिला. एवढंच नव्हे तर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर विविध नियुक्त्या झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रेरकच ठरल्यात. माझ्या आयुष्यात मला लोकांचे सतत प्रेमच मिळत राहिले. म्हणूनच मी वयाची ८८ वर्षे आनंदाने पार करून अजूनही उत्साहाने कार्यरत आहे. शासकीय सेवेत असताना विशेषत्वाने बॅ. अंतुले, श्री. शंकरराव चव्हाण, श्री. शरद पवार, श्री. सुधाकरराव नाईक, श्री. विलासराव देशमुख व श्री. सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले व माझा कामातील उत्साह वाढवत ठेवला. तसेच विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक यांचेही भरपूर सहकार्य लाभले.
माझ्या यशस्वी जीवनाचा पाया हा माझ्या पत्नीने रचलेला आहे. तिची मला मिळालेली आयुष्यभराची साथ ही केवळ भावनिकच नसून कणखर व्यक्तिमत्त्वाची लाभली व त्यामुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. संस्काराच्या मंदिराला रूप देऊन घर उभं करणारी ही गृहकर्तव्यदक्ष गृहिणी म्हणजे माझी खरी मार्गदर्शिकाच आहे. आपल्यावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आक्रसून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे जाऊन भूतकाळात जास्त न रमता भविष्याकडे नजर ठेवून वर्तमानाला जास्त महत्त्व देणारी ही समयसूचक गृहिणी म्हणजे लेवा परिवारातील एक आदर्श महिला आहे. तिने मुलांवर बालवयात केलेले सुसंस्कार आणि घडविलेला बौद्धिक विकास यामुळेच मी यशस्वी झालो. ती म्हणजे माझ्या यशोदायी जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या मुलांचा, सूनांचा सहवास हा आनंददायी आहे. कदाचित माझ्या ठणठणीत प्रकृतीचे तेच रहस्य असू शकते.
या यशस्वी जीवनात शासकीय सेवेत असताना कटु अनुभव देखील आलेत. मला पुर्ननियुक्ती मिळाल्यावर काहींना ते आवडले नाही. मला मात्र वेदना झाल्यात. पण मी मनात काही ठेवीत नसतो. मी विसरलो. कारण आयुष्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही आहे. त्या कटु आठवणी विसरूनच मार्गक्रमणा चालू ठेवली.
डेप्युटी ड्राफ्टसमन असताना मला शासनाने (केंद्र व राज्य शासनाच्या शिफारशीनंतर) लंडनला 'Course for Govt. Legal Officers from Overseas, London' साठी पाठविण्यात आले. हा अनुभव भावी जीवनात खूप उपयुक्त ठरला. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलक्युअलस् यांच्यामार्फत The great son of the soil हा पुरस्कार मला नवी दिल्लीला A Prominent social worker म्हणून दिला होता.
आपल्या जीवनाच्या प्रवासात आईवडील, शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा जसा हातभार लागत असतो तसाच मी ज्या लेवा पाटीदार समाजात जन्माला आलो त्या समाजातील धुरीणांचा मी आभारी आहे. आमचा समाज बहुसंख्येने खानदेशात राहात असला तरी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. अशा समाजाला एकत्र आणून सामाजिक जाण निर्माण करून समजा सेवा करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने लेवा पाटीदार महासंघ स्थापन केला. त्या महासंघाचा मी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. माझ्या या समाजकार्याची जाण ठेवून ठिकठिकाणच्या शाखांनी माझा बहुमान केला व मला 'समाजभूषण' म्हणून गौरविले.
मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी १ डिसेंबर १९५९ पासून दरवर्षी १ डिसेंबरला कायम न चुकता शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शन, पूजा व आरतीसाठी जात असतो.
काळ बदलतो तशा वृत्ती बदलतात आयुष्यात जी मानसिकता जपली तशी आताच्या पिढीत दिसत नाही. शासकीय सेवेत सेवाभावी वृत्ती हरपत चालली आहे. हे बघून मात्र खूप वाईट वाटते.
-दे. ना. चौधरी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 30, 2022
गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. असेल सहज ३८ एक वर्षांपूर्वीची …म्हणजे साधारण १९८१-८२ची. त्यावेळी कॉलेजचा एक ट्रेकिंग ग्रुप होता ..कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. त्यातले सहा जण निघालो वासोटयाच्या ट्रेकला. साताऱ्याहून बामणोलीला बसने जाऊन पुढे ‘कोयना’ होडीने ओलांडली. तिन्हीसांजा झाल्याने डोंगराच्या पायथ्याला जंगलात मुक्काम केला
August 1, 2019
गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं?
January 1, 2018
मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं.
December 13, 2023
मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार झटका दिला आहे. मराठा आरक्षणावर स्थगितीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. त्यामुळं मराठा आरक्षण देणारच अशी घोषणा करणारं राज्य सरकार अडचणीत सापडलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण संबंधी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळली व मुंबई हायकोर्ट च्या अंतिम निर्णयाची सरकारने वाट पाहावी अशी समज सरकारला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अलर्ट सिटिज़न्स फोरम ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षणा संबंधी याचिकेवर सुनावणी करण्या अगोदर अलर्ट सिटिज़न्स फोरम ला या विषयात आपले मत नोंदवण्याची संधी द्यावी असे निवेदन श्री दयानंद नेने यांनी 8 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते.
मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ?
मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अंतरिम आहे. त्यामुळं आधी उच्च न्यायालय याच्यावर काय निर्णय देतं हे स्पष्ट होऊ दिले पाहिजे. त्यानंतर राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
त्यामुळं राज्य सरकारची याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं कुठलाही निर्णय न देताच फेटाळली आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं वेगळा कुठला निर्णय न देता उच्च न्यायालयाची स्थगिती कायम ठेवली आहे.
हायकोर्टानं काय म्हटलं होतं?
हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देताना काही मुद्दे नोंदवले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकार 50 टक्के एकुण आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टानं नोंदवलं आहे.
अनेक अहवालांच्या निष्कर्षानुसार मराठा समाज मागासलेला नाही असं स्पष्टपणे दिसतं. त्यामुळं नारायण राणे समितीचा अहवालात अनेक त्रुटी आढळत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे.
आतातरी सरकारने जागे हावे व केवळ राजकीय हेतूनी प्रेरित असलेला हा निर्णय बदलावा असे आवाहन श्री दयानंद नेने यांनी केले आहे.
-- दयानंद नेने.
December 18, 2014
December 18, 2014
१८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला.
June 10, 2022
कोणाचे सूर कोणाशी जुळतील हे सांगता येत नाही. लेखकाशी सूर जुळले की संवेदनशील वाचक पत्रातून खुला होतो. पत्रातून आनंद आणि वेदना झिरपते. संवाद संपलेल्या काळातही असंख्य वाचक आजही लेखकाला पत्र लिहितात. प्रत्यक्ष पत्रातून आपलं जीवन लेखकासमोर उघडे करतात, त्याच्याकडून मार्गदर्शन मागवतात.
June 26, 2025
परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप... एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन गृहस्थाला आम्हीच सांगितले, बाबारे ....! बकऱ्यासाठी सापळा रचताना कधी काळी वाघ सिंह आले तर जमिनीत पुरलेल्या लांडग्याचे कसे होईल. ते निरुत्तर झालेच,पण उलट त्यांनी हसून दाद दिली.
तात्पर्य सांगायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत केवळ एका माणसामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागल्यामुळे लाखो रुपयाची धूळधाण झाली. हा अनर्थ कसा झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण ...? याचं आत्मपरीक्षण संबधितांनी करणे गरजेचे आहे. खरं तर ते या लाखो रुपयाचा चुराडा वाचवू शकत होते, परंतु आपली मनसबदारी कोणी सोडायला कबूल नव्हते. निवडणूक आहे कोणी तरी निवडणुकीला उभे राहणार , त्यात काही गैर नाही. कारण त्यांचा तो हक्क आहे. आता कोणी उभे राहायचे, यावर ढोबळमनाने विचार केला तर उमेदवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा, चारचौघात उठणारा बसणारा, त्या संस्थेशी आस्था असणारा, त्यांच्या कार्यात योगदान करणारा असावा, हे साधे सरळ गणित आहे. परंतु अती सामान्य वकूबाची माणसं नेतृत्व हातात घेण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे वाटत असले तरी सभासद आहे. त्यांना डिवचण्याचा किंवा यापुढे कधीही निवडणूक लढवू नका, असा सल्ला देत नाही. आपला तसा हेतू नाही. बरेच लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात पण माघार घेतात कारण संबधित संचालक समूह रूपाने त्या त्या माणसाला काही तरी गाजराचं आमिष दाखवितात. त्यामुळे त्यांना आकाशाला गवसणी घातल्यासारखी वाटते, राजकारणात, सहकार क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात. सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या विचारात पडत नाही. समोर येईल त्याचा तो बुद्धीपेक्षा भावनेने आदर करतो.
ही विशाल जुन्नर नावारूपाला आलेली संस्था आहे समस्त सभासदांना त्याचा सार्थ अभिमान आहे. जुन्नर तालुक्यात पुणे, मराठा सारख्या अनेक संस्था होऊन गेल्या. भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे बुडाल्या. आजही ज्यांचे पैसे गेले ते टाहो फोडत आहेत. विशाल जुन्नरच्या सभासदांना असे वाटत होते की, लोकांना संस्थेविषयी आस्था आहे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे आता पर्यंत चांगले चालले आहे ना ....! चालू द्या म्हणून डोळेझाक करीत होते. परंतु विशाल जुन्नर संचालकांविषयी प्रचंड नाराजी आहे. हे झालेल्या मतदानावरून सिद्ध होते. जेव्हा इतके मतदान कमी प्रमाणात होते., तेव्हा संस्थेवरची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांच्या विषयी मनात असलेली ओल आटत चालली आहे. असा अर्थ होतो की, काही दिवसांपूर्वी आम्हाला घरोघर निनावी पत्र पाठविली गेली. हे अनेक वेळा झाले पत्रे येतात चर्चा होतात. सभासदांना ठाऊक नसलेल्या घटनांचा पाढा पत्रात वाचलेला असतो. पण ही पत्रे पाठविणारे आपल्या संचालकांशी संबधित आहेत. छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त करताना कोणी संस्थेला बदनाम करीत असतील तर आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली जात नाही...? यामुळे सत्शील,सद्प्रवृत्त माणसाला नालायक म्हणून संबोधत असतील तर कायदेशीर कार्यवाही केली जावी. जर संस्था करायला धजावत असेल तर सभासदांनी याला आळा घालावयास हवा. यामुळे संस्थेची विश्वासार्हता धुळीस मिळत आहे. हे समस्ताना सांगणे आवश्यक आहे. विशाल जुन्नर विषयी किंवा त्यांच्या गौरवास्पद कामगिरीविषयी मी काही वर्षापूर्वी आपला वार्ताहर या दैनिकात लेख लिहिला होता. (संचालकांना विसर पडला असेल ) जे चांगले काम त्याचा आवर्जून उल्लेख करावा , असे मला वाटते. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार एका खोलीत बसले होते. संरक्षणात्मक व्यूह रचना सुरु असावी. मला पाहिले अन त्यांचे डोळे भिरभिरले. चटकन दार बंद झाले. पारदर्शकता नको. आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी संरक्षणात्मक आणि प्रतिकाराची शक्ती गमावली की, माणसं अशी वागतात. निवडणुकीला कोणीही उभे राहावे, ज्यांच्या त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. आमची मित्रमंडळी त्या समूहात असल्यामुळे निवडणुकीचा विचारही मनात शिवत नाही.
या संस्थेत संस्थापक सदस्य सुभाष शिंदे यांचे योगदान फार मोलाचे आहे. ते हयात नाहीत. संस्था विस्तार होत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना काय वाटायचे, या विषयावर काळाचौकीतील महानगरच्या कार्यालयात सभा होती. वक्त्यांनी अनेक सूचना केल्या. आम्ही त्यांना एक सूचना केली. तितक्या रक्कमेचे बोनस रुपी शेअर वाटावेत जेणे करून भविष्यात जो पर्यंत लाभांश मिळत राहील तो पर्यंत सभासदांना रौप्यमहोत्सवी वर्षाची आठवण येत राहील. त्यावर अनेकांनी सभेत विरोध केला पण नंतर देताना मात्र बोनस दिला. आपले सारे सत्य, बाकीचे सारे मिथ्या...! ही भावना जडलेली आहे. आताही या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते की, विशाल जुन्नर समूहातील सभासद ज्याची कामगिरी अत्युत्तम आहे. योगदान मोलाचे आहे. अशा सर्वसामान्य सभासदाला *कै.सुभाष शिंदे* यांच्या नावे *विशाल जुन्नर गुणवंत सभासद* हा पुरस्कार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला जावा. जेणे करून या संस्थापक सदस्याला खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. प्रस्ताव आहे. विचार करणे वा न करणे हे संस्थेनी ठरवायचे आहे. लिहिण्यासारखे बरेच काही आहे हल्ली स्पष्ट बोलल्याने अथवा लिहिल्याने बरेच जन नाराज होतात. निवडून आलेल्या सर्व संचालकांचे घोडपदेव डी पी वाडी समूह हार्दिक अभिनंदन करीत आहे.
March 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti