वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता.
October 9, 2023
मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला.
August 19, 2023
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.
August 27, 2019
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय.
June 5, 2022
जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते.
July 8, 2022
पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात.
April 4, 2023
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग पाच
सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही.
रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी जेवलो तर अन्न पचायला फक्त आठ तास लागतात. आणि पुनः सायंकाळी चरचरीत भूक लागते. तर रात्रीचे जेवलेले पचायला तब्बल सोळा तास लागतात. रात्री आठ वाजता जेवलो तर पुनः चरचरीत भूक लागते दुपारी बारा वाजता ! म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागतो.
रात्री कामही बेताचेच असते. सर्व वेळ झोपेतच असतो, त्यामुळे शरीराच्या हालचाली पण कमीच. श्रम कमी आणि अन्न जास्ती वेळ एकाच ठिकाणी पडून राहते. त्याचा परिणाम म्हणून पोटात चिकटपणा तयार होतो. चरबी वाढते, पोट सुटते, रक्तातील साखर किंवा आम म्हणजे आजच्या भाषेतील चरबीचे अनेक प्रकार म्हणजे ट्रायग्लीसराईड, कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे, वाढतात.
दिवसा ही चरबी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही, कारण ही चरबी किंवा चिकटपणा कमी करणारा सूर्य फक्त दिवसाचाच असतो. त्यामुळे दिवसा घेतलेल्या अन्नावर अग्निची प्रक्रिया पटकन होते, शारीरिक हालचाली नीट होत असतात. पोट हलत असते, चिकटपणा कमी निर्माण होतो. शरीर प्रमाणबद्ध रहाते. स्वास्थ्य मिळते.
निसर्गाने दिलेले नियम पाळले तर औषधांची गरजच उरणार नाही. नाहीतर कृत्रिम औषधांचा अक्षरशः बाजार झालाय. एकदा डाॅक्टरांकडे जावे लागले तर एक औषध कायम स्वरूपात सुरू होते. त्यातही आपली मूळ तक्रार राहते बाजूलाच, नवीनच रोग, ज्याचा आपल्याला त्रास काहीच नाही, तो शोधून काढला जातोय. आणि आपण तो अगदी सहज मान्य पण करतोय. त्यासाठी पुनः कृत्रिम औषधे आहेतच. एक नसलेला त्रास कमी होण्यासाठी दुसरे त्रासदायक औषध घेणे हा पर्याय.
असो ! काय करणार ?
आरोग्याच्या मूळ व्याख्याच बदलून गेल्यात.
ते पूर्वीचे फॅमिली डाॅक्टर बदलले, ती आपुलकीही संपून गेली.
ऋतुही बदलले, हवामानही बदलले,
पाच दिवसाची कसोटी आता एका ओव्हरपर्यंत कमी होत आली.
रात्रही बदलली आणि आता दिवसही बदलले.
रोग बदलले, आरोग्यही बदलले !
कामाचे दिवस आणि विश्रांतीची रात्रही बदलली !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.05.2017
May 20, 2017
अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली.
September 12, 2018
हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो.
October 12, 2023
• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल.
• सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं ठेवला. त्या वेढ्यातून सुटका करून घेण्यांसाठी शिवरायांनी एक धाडशी बेत आखला, आणि तो म्हणजे, जौहरला गाफील करून विशाळगडावर पलायन करायचें. शिवाजी राजांतर्फे जौहरशी तहाशी बोलणी केली गेली, आणि अमुक अमुक दिवशीं शिवराय जौहरच्या भेटीला जाणार असें ठरलें. जौहर व त्याची विजापुरी छावणी आनंदून गेली, वेढा कांहींसा ढिला पडला. ठरलेल्या त्या दिवसाच्या आदल्या रात्रींच शिवरायांनी मोजक्या लोकांसह जौहरच्या वेढ्यातून पलायन केलें, परंतु जौहरच्या माणसांना त्याचा पत्ता लागलाच. जौहरनें आपला जावई सिद्दी मसूद याला शिवबांच्या मागावर धाडलें. त्याला चकमा देण्यासाठी ‘शिवा काशीद’ याचा उपयोग करून शिवरायांनी अमूल्य वेळ प्राप्त करून घेतला.
( शिवा काशीद याच्यावरील माझा वेगळा, संशोधनात्मक, लेख, या वेबसाईटवर पहावा ).
जाणुनबुजून शिवरायांनी विशाळगडला जाण्यासाठी जंगलातला आडरस्ता धरला होता. हेतू हा की, आपला पाठलाग करणें जौहरच्या माणसांना कठीण जाईल, व तें सैन्य पाठीवर आलेंच, तर त्या जंगलच्या मुलुखात त्यांच्याशी चकमक करून पुढें पळणें आपल्याला सोपें जाईल. आषाढाचा पावसाळी महिना, सर्वत्र रपरप चिखल, जंगलच्या वाटा, रात्रीचा मिट्ट काळोख. शिवराय पालखीत होते, पण बरोबरचे मावळे पायीं होते, कारण जौहरच्या वेढ्यातून पायींच पळतां येणें शक्य होतें, घोड्यावरून नव्हे. वाटाडे भले वाट दाखवायला असतील, पण तो धावत-धावत-प्रवास तर सोबतीच्या ६०० मावळ्यांना पायींच करायचा होता. त्या दौडीत, पायीं दौडत असतांना, शिबरायांच्या संरक्षणाची जबाबदारी बांदलांवर होती. बाजी प्रभू देशपांडा हा पठ्ठ्या गडी बांदलांचा सरदार होता.
देशपांडे असा उल्लेख न होतां, त्या काळीं ‘देशपांडा’ असा उल्लेख होत असे. अशी इतर उदाहरणेंही पहातां येतील. जसें की, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा (नरसाळे) . खुद्द शिवाजी राजांचा उल्लेख ‘शिवाजी भोसला’ असा विजापुरी सरदार करत असल्यास, त्यात कांहीं नवल नव्हे. अशा तर्हेचा उल्लेख अगदी हल्लीहल्लीपर्यंत केला गेलेला मी स्वत: पाहिलेला आहे. खुद्द माझे सासरे ‘गडबोला आला होता’ अशा प्रकारचे उल्लेख करीत. ही २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि अशा एकेरी उल्लेखात (जसें, गोडबोले याच्या ऐवजी गडबोला) कुणाला कमी लेखायचें असा कांहींही प्रकार नसे, तर ती बोलायची पद्धतच होती.
शिवरायांसह मावळे जंगलवाटेनें पायीं दौडत होते, तर सिद्धी मसूद व त्याचे ३०००-५००० सैनिक हमरस्यानें घोड्यावरून दौडत होते.
पावसात चिखल तुडवत, पूर्ण रात्रभर पन्हाळगड ते विशाळगड-पायथ्यापर्यंत धावल्यानंतर, पहाट होण्याच्या सुमाराला, शत्रू जवळ आला असें पाहून, शिवराय ३०० मावळ्यांसह पुढे विशाळगडाकडे धावले; अन् बाजी प्रभू , घोडखिंडीत, फक्त ३०० मावळ्यांसह, सिद्दी जौहरच्या ३०००-५००० सैनिकांना तोंड द्यायला, अडवून धरायला थांबले. खिंडीत कां, तर तिथें शत्रूच्या अगदी थोड्याच माणसांना पुढें सरकतां येणार होते, आणि तेंही पायी, घोड्यांवरून नव्हे. त्यामुळे बाजींना , आपल्या दसपटीहून जास्त शत्रूसैन्याला, लहान लहान तुकड्यांशी लढत, थोपवून धरणें, कांहींसें सोपें होतें. अर्थात्, काम तसें सोपें नव्हतेंच. पन्हाळगडाहून, रात्रीं अंधार झाल्यावर, वेढ्यातील जौहरचे सैनिक झोपल्यानंतर, म्हणजे मध्यरात्रीच्या आगेमागे, ११-१२ च्या सुमारास, हे मावळे पळाले असतील. म्हणजे घोडखिंड येईतो, त्यांचें, ५-६ तास पळणें झालेलें होते. एवढें जंगलवाटेनें अंधारात व चिखलात पळणें, परत शत्रूच्या भीतीचें टेन्शन, या शारीरिक व मानसिक ताणानें, तोंवरच ही माणूसें थकून गेलेली असतील. आणि, खरी परीक्षा तर पुढेंच होती. किती तास असें लढायचें ?
त्यापुढील शिवरायांचेंही काम सोपें नव्हतेंच. केवळ ३०० मावळ्यांसह त्यांना विशाळगड नुसता चढायचा नव्हता, तर तेथील शत्रूशी लढत लढत त्यांना पुढे ज़ायचें होतें ; कारण विशाळगडालाही वेढा पडलेला होता , जौहरनें फास अगदी व्यवस्थित आवळलेला होता.
लढत लढत विशाळगडाभोवतीच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी मुसंडी मारली व ते गडावर धावले. गडावर पोचेपर्यंत मध्यान्ह झालेली होती. पहाटेपासून ते मध्यान्हीपर्यंत, म्हणजे किमान सातएक तास तरी, बाजींनी व त्यांच्या मावळ्यांनी शत्रूसैन्याला थोपवून धरले. कमाल आहे ! आधीचें ५-६ तास जंगलातून धावणें, आणि त्यानंतर, दसपट शत्रूला सातएक तास सक्सेसफुली थोपवून धरणें, हें ‘खायचें काम नव्हे’. त्यासाठी बाजींचेंच नव्हे, तर त्यांच्याबरोबरच्या सगळ्याच मावळ्यांच्या शारीरिक क्षमतेचें अन् प्रबळ इच्छाशक्तीचें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे ! राजे गडावर पोचून तोफांचे आवाज झाले, ते ऐकूं आल्यानंतरच बाजींनी प्राण सोडला, असें म्हटलें जातें. तें कितपत खरें आहे, कल्पना नाहीं. मात्र, इच्छाशक्तीनें आपला प्राण कांहीं काळ रोखून धरला, अशी साध्यासाध्या माणसांचीही उदाहरणें दिसून येतात, त्यामुळे, बाजींनी तसें केलें असल्यास नवल नव्हे. पण, बाजी स्वत: कधी पडले, व किती काळ त्यांनी प्राण रोखून धरला, याहीपेक्षा अधिक महत्वाची आहे त्यांची व त्याच्या अनामिक सहकार्यांची कामगिरी ! आपल्याला मृत्यू येणारच हें आधीपासूनच ठाऊक असूनही ते लढले; आणि आपल्याला मिळालेली कामगिरी त्यांनी फत्ते केली. अशा प्रसिद्ध-अप्रसिद्ध लोकांनी रचलेल्या पायावरच आज आपण सारे अभिमानानें उभे आहोत !
• या अनुषंगानें, मला बाजी प्रभूंवर कविवर्य कुसुमाग्रज यांची, ‘संपेल कधी रण प्रभो तरी । मी कुठवर साहूं घाव शिरीं ।’ ही अत्युत्कृष्ट व सुप्रसिद्ध कविता आठवते. लता मंगेशकरांनी ती गाइलीही आहे अशा उत्कटतेनें, की ती ऐकून आपण विव्हल होऊन जातो. तोफांचे आवाज येईतों बाजी लढले, व आवाज आल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला, या आख्यायिकेवरच ही कविता आधारलेली आहे.
मात्र, कुसुमाग्रजांबद्दल पूर्ण आदर बाळगूनही, त्यांनी या कवितेत रंगवलेला बाजी प्रभूंचा मनोव्यापार मला पटायला कठीण जातो. ‘लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो’ असें ठामपणें म्हणून त्यांनी शिवरायांना पुढे गडावर जाण्यासाठी प्रवृत्त केले, व नंतरच्या लढाईत ते स्वत: अतिशय घायाळ होऊनही, अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहिले. असे बाजी प्रभू , एक तर , ‘संपेल कधी रण ?’ असा आकुल विचार करतील कां ; आणि दुसरें म्हणजे, हातघाईच्या लढाईच्या धुमश्चक्रीत, त्यांना, तलवार-ढालीव्यतिरिक्त, ‘संपेल कधी रण’ हाच काय पण कुठलाही अन्य विचार करायला निमिषाचीही फुर्सत तरी मिळूं शकली असेल काय ? हां, ‘तोफांचे आवाज येईतों लढत रहा, शत्रूला रोखून धरा, जीव गेला तरी बेहत्तर’ असा संदेश त्यांनी जोशानें लढाईपूर्वी आपल्या साथीदारांना ज़रूर दिला असेल.
पावनखिंडीतल्या लढाईचें विस्तृत वर्णन आपल्यापुढे नाहीं, पण एक अन्य लडाईचें तर निश्चितच आहे. ती म्हणजे जानेवारी १७६१ ची, ( म्हणजे पावनखिंडीच्या १०० वर्षें नंतर झालेली ) , मराठे व अब्दाली यांच्यात झालेली पनिपतची तिसरी लढाई. तिचें वर्णन मराठी बखरीमध्ये आहेच, पण तें किती विश्वसनीय आहे, त्याबद्दल शंका आहे. मात्र, फारसी साधनांमध्येही त्या घटनांचें वर्णन आहे. काशीराज या, लखनौच्या शुजाच्या पदरीं असलेल्या मराठी माणसानें फारसीत लिहिलेलें पुस्तक कदाचित् जास्त विश्वसनीय आहे. तें असो-नसो. पण त्या लढाईत सदाशिवराव भाऊ व पेशव्यांची हुजरात हे लोक गिलच्यांशी लढता असतांना काय झालें, तें विचारणीय आहे. कापाकापी सुरूं होती. एका वीर पुरुषाला चार-पांच गिलच्यांनी घेरले होतें तो दात आवळून त्यांच्याशी लढत होता, ते अर्थातच त्याला ओळखत नव्हते, पण त्याचे उंची कपडे पाहून, हा कुणीतरी मोठा सरदार असावा, असें त्यांना वाटलें. याला जिवंत पकडलें तर आपल्याला बक्षिशी मिळेल, असें त्यांना नक्कीच वाटलें असणार. ‘तुम कौन हो’ असें ते लढतांनाच विचारत राहिले, पण त्यानें उत्तर दिलें नाहीं, तो लढतच राहिला. अखेरीस लढता लढताच त्याचा अंत झाला. फार नंतर समजलें की तो सदाशिवराव भाऊ होता.
वीर पुरुष तलवार-ढाल, तलवार-ढाल असे करत करत लढतच असतात, त्यांना शत्रूला उत्तर द्यायला किंवा तोफांच्या आवाजाची वाट पहात, ‘संपेल कधी रण’ असा व्याकुळ विचार करायला फुर्सतही नसते, आणि तशी त्यांची मनोधारणाही नसते.
• अर्थात्, या चर्चेमुळे, कुसुमाग्रजांच्या कवितेचें, एक साहित्यकृती म्हणून मूल्य अजिबात कमी होत नाहीं.
तसेंच, त्या कवितेत वर्णलेले विचार खरोखर बाजी प्रभूंच्या मनात आले असोत वा नसोत, त्यामुळें त्यांच्या कार्याचें महत्व तिळमात्र कमी होत नाहीं. त्यांच्यापासून स्फूर्ती घेणें, एवढें तर आपल्याला नक्कीच शक्य आहे, आणि तें आपण केलेंच पाहिजे .
- - -
१३.०७.२०१६
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 15, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti