नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.
लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.
आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी एक शिक्षक ( त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू ) घरी येत होते. चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे छम छम, विद्या एयी घम घम.” ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).
माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच होते. त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.
माझी वेगळी खोली होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?” म्हणत गुरुजींनी माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार मिळालेला होता. ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.” गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 9, 2019
![]()
मी प्रथम समुद्र पाहिला तो..... अरबी समुद्र ! बी.एड्.च्या शिक्षणासाठी एक वर्ष कारवारला होतो. रोज सायंकाळी बीचवर जायचो. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या जिवाला तिथे कांहीसा गारवा मिळायचा. पुढे गोवा, मुंबईला जायचा अनेकवेळा योग आला नि अरबी समुद्राचे दर्शन वारंवार घडत गेले. परंतु महासागराचं महाकाय रूप पहायला मिळालं ते कॅनडामध्येच!
कॅनडाला जशी समुद्र किनारपट्टी लाभली आहे, तसेच सरोवरांचेही वरदान आहे. हॅलिफॅक्सला तर ‘सिटी ऑफ लेक्स' म्हणूनच ओळखले जाते. हॅलिफॅक्स बंदरावर अटलांटिक महासागराचं दर्शन घडलं नि एक अव्यक्त आनंद झाला. तसे महासागराचे महाकाय रूप इथे पहायला मिळाले नाही, कारण इथे महासागर जमिनीच्या अंतर्भागात शिरल्याने त्याला खाडीचे स्वरूप आले आहे. ही खाडी म्हणजे निसर्गरम्य परिसरात अवतरलेली जलपरीच जणू ! त्याच्या मध्यभागी असलेले छोटे बेट म्हणजे तारुण्यात सळसळणाऱ्या जलपरीच्या भाळावरचा टिळाच शोभावा ! त्यावरचा लाईटहाऊसचा सुंदर टॉवर तिच्या केशसंभारात माळलेला तुराच भासावा ! नाजुक, निळसर लाटांमुळे तिचं सळसळणारं लावण्य अधिक खुलून दिसत होतं.
उसळणाऱ्या लाटा, चित्रपटात पाहिलेला वा पुस्तकात वाचलेला सागराचा रुद्रावतार यावेळी पहायला मिळाला नाही. सागराच्या पृष्ठभागावर सगळेच कसे संथ आणि शांत होते. छोट्याछोट्या लाटा पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या. ते सुंदर दृश्य पाहून माझे मन आनंद सागरात डुबक्या घेत होते.
‘हारबर वाक' वरून मनसोक्तपणे फिरत निसर्ग निर्मित हे अद्भूत दृश्य आम्ही पहात होतो. समुद्र आज शांत होता; पण किनाऱ्यावर मात्र जनसागर उफाळला होता. नाना देशाचे, नाना वेशाचे, नाना भाषा बोलणारे,...... रंग़ीबेरंग़ी दृश्य मनाला मोहवित होते. त्यात नव्या ढंगात, नव्या रंगात, नव्या उमेदिने, नव्या संसारात पदार्पन केलेली नवी जोडपी अधिक ! विविध संस्कृत्यांच्या संगमात जणू सगळे एकरूप झालेले. बहूसंख्य इंग्रजी बोलणारे......मराठी किंवा हिंदी बोलणारे कुणी आढळतील या आशेने माझे कान वेध घेत होते नि डोळे धुंडाळीत होते. तशी एक-दोन कुटूंबे भेटली नि आपुलकीचा उबारा मिळाला. विदेशात स्वदेशी लोक अनोळखी असले तरी ते आपले वाटू लागतात. संस्कृतीच्या रेशीम धाग्याने त्यांची नाळ आपल्याशी जोडलेली असते. त्या गर्दीतही आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. ते कुटूंब होते नागपूरचे. मुलगा सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. त्याला भेटावे, नवं जग पहावं म्हणून ते आले होते. एवढ्या मोठ्या जनसमुदयात आपल्याशी मराठी बोलल्याचे ऐकून त्यांनाही आनंद झाला. पुढे तर त्यांचा मुलगाही माझ्या कन्येच्याच आयबीएम कंपनीत नोकरीला असल्याचे समजले.
हॅलिफॅक्स बंदर भुगोलात वाचलं होतं, आज प्रत्यक्ष पहात होतो. किनारपट्टीशेजारी धक्यावर एक-दोन थांबलेली जहाजे, दूरवर समुद्रात पर्यटकांना फेरफटका मारून आनणाऱ्या होड्या, बंदराच्या किनारपट्टीवर हातात हात घालून मौज लूटणारी तरूण जोडपी, कॉफिचे घुटके घेत विविधांगी दृश्ये पहाणारे पर्यटक...... सगळच कस वेगळ, नव-नव वाटत होतं. प्रदेश वेगळा, लोक वेगळे, त्यांची भाषा वेगळी. संस्कृती वेगळी.........! सारं कस स्वप्नातल्यासारख ! लहानपणी प्रथमच बाबांच्या बरोबर बेळगावात आलो होतो नि शहरातलं दृश्य पाहून भांबावल्यागत झाल होतं. अगदी तसंच वाटलं ! एका वेगळ्या अनुभवाच्या नि विचाराच्या तंद्रीत असतांनाच कन्येने हाक मारली. माझे त्याकडे लक्ष नसल्याचे पाहून ती पुन्हा म्हणाली,
‘पप्पा ऽ'
मी दचकून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली,
‘पाण्यावरून तरंगणारी ती ग्रीन बस पाहिलीत ?'
‘बस नि पाण्यात ?' मी प्रश्न केला.
‘हो, बस कम बोट !' तीने पाण्यावरून तरंगणाऱ्या बसकडे बोट करून दाखविले.
बसच होती ती, पाण्यावरून तरंगणारी ! मी कौतुकाने पाहू लागलो.
‘तीच बस आता जमिनीवर येईल नि रस्त्यावरून धाऊ लागेल.' ती म्हणाली.
सगळेच कसे नवलाईचे ! कांही वेळाने ती बस जमीनीवर आली नि प्रवाशी बसप्रमाणे रस्त्यावरून धाऊ लागली. हिरव्या रंगाच्या या अनोख्या बसने लोकांना समुद्रात होडी बनून जलविहार घडविला नि जमिनीवर बस बनून रस्त्यावरून फेरफटका मारून आनला. बहूरुप्याप्रमाणे पाण्यात नि जमीनीवर रूप बदलणाऱ्या या बसचं मला कौतूक वाटलं. अर्थात हा जादूटोना नव्हता तर विज्ञानाचा चमत्कार होता. या चमत्कारी बसमध्ये बसून एक वेगळा अनुभव घेण्याचा मोह आम्हालाही झाला; परंतु वेळे अभावी ही हौस पूर्ण करता आली नाही.
काठाला लागूनच पाण्यात झुलणाऱ्या फ्लोटींग ट्रॅककडे माझं लक्ष गेलं. कांही पोरं नि थोरंही त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गमतीने पळत होती. पाण्याच्या लहरीबरोबर झुलत्या पुलाप्रमाणे तो झुलत होता. त्यावरून फिरण्यात पर्यटकांना एक वेगळा अनुभव आणि आनंदही मिळत होता. फ्लोटींग ट्रॅक म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा लाकडी मार्ग ! लोखंडी साखळीने किनारपट्टीला त्याला बांधल्याने तो किनाऱ्यालगतच पाण्यावर तरंगत होता. त्याच्यावरून चालतांना झुलत्या पुलाप्रमाणे पर्यटकांना एक आगळा आनंद देत होता. आम्हीही त्यावर उतरलो नि त्याच्याबरोबर झुलण्याची मौज लुटली. एकिकडे दूरवर पसरलेला निळसर महासागर तर दुसरीकडे किनारपट्टीवर पसरलेला रंगीबेरंगी जनसागर ! फ्लोटींग ट्रॅक वरून हे अद्भूत चमत्कार आम्ही आळीपाळीने पहात होतो, त्यातून मन सुखावत होते.
हॅलिफॅक्सच्या मध्यवस्तीतही मी कधी एवढी गर्दी पाहिली नव्हती. अर्थात पुणा-मुंबईची गर्दी पाहिलेल्यांना इथली शांतता अस्वस्थ करील, पण एका मोठ्या दगदगीतून बाहेर पडल्याचा आनंदही देईल. शहरे मोठी पण लोकवस्ती विरळ असेच कांहीसे चित्र ! सगळेच कसे आखीव, रेखीव नि नियोजनबद्ध ! किनारपट्टीवर ही निरव शांतता नव्हती. लोटलेल्या जनसागरातून वाट काढत आम्ही पुढेपुढे जात होतो. एका कोपऱ्यावर तंतूवाद्याच्या तालावर इंग्रजी गीत गाणारा एक तरुण गायक दिसला. त्याचे सुरेल गायन रशीकांना डोलावित होते, त्याच्या शेजारी असलेल्या पात्रात लोक खुश होऊन पैसे टाकीत होते. आपल्याकडे गर्दीच्या ठिकाणी भिक्षा मागणारे लोक हमखास असतात. इथे असला प्रकार मला कुठेच दिसला नाही. अर्थात हा गायक भिक्षा मागत होता, असे मला मुळीच म्हणायचे नाही. तो आपल्या कलेचे प्रदर्शन करीत होता नि लोक खुशीने त्याच्या कलेचे मोल देत होते. एक प्रकारे त्याच्या कलेचा हा गौरवच होता.
आनखी कांहीसे पुढे गेल्यावर एका गोऱ्या युवकाची नाजूक बोटे हार्मोनियमवर लिलया नृत्य करीत होती. त्यातून उमटणाऱ्या स्वरानी साऱ्यांना बेधुंद केले होते. लोक अधूनमधून टाळ्या वाजवून त्याच्या कलेला दाद देत होते. या साऱ्या कलाविष्कारांचा आनंद घेऊन आम्ही पुढे गेलो, तोच मुला-मुलींचे कसरतीचे प्रयोग सुरू असलेले दिसले. लोक कुतूहलाने ते पहात होते. टाळ्या वाजवून त्यांच कौतूक करीत होते. आपल्याकडे यात्रातून असली दृश्ये पहायला मिळतात नि लोक त्याचा आनंद लुटतात; असाच कांहीसा प्रकार !
गोव्याच्या बीचवर विदेशी पर्यटकांना मी पाहिले होते, तसे कांही असभ्य, असंस्कृत प्रकार गोऱ्या युवक-युवतींचे इथेही असतील, हा माझा समज मात्र इथे खोटा ठरला. आम्हा भारतीयांप्रमाणे अंगभर वस्त्रे घातलेले लोक तसे कमीच; पण गोव्याच्या बीचवर विवस्त्र स्थितीत पाहिलेले विदेशी पर्यटक इथे पहायलाही मिळाले नाहीत.
कॅनडात अनेक स्थळांना भेटी दिल्या; परंतु हॅलिफॅक्स बंदराने मला एक वेगळीच मोहीनी घातली. त्यामुळे कधी विरंगुळा म्हणून, तर कधी स्वाभाविक ओढ म्हणून या बंदरावर आलो. प्रत्येक वेळी मला त्याचे वेगळेपण दिसले......कधी समुद्रात निसर्गाची विविध रूपं, तर कधी किनाऱ्यावर लोकांची कलाप्रदर्शनं !
बंदराविषयी अधिक जाणून घेण्याची मनात ओढ होतीच. बंदरावरचे माहिती फलक वाचून थोडीफार माहिती मिळालीही; परंतु तेवढ्यावरून मनाचे समाधान झाले नाही. अटलांटिक महासागराच्या नोव्हास्कोशियाच्या किनारपट्टीवरील हे एक नैसर्गिक बंदर. गेल्या अडीचशे वर्षापासून या बंदरातून समुद्र वाहतूक चालू आहे. उत्तर अमेरिका खंडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनच त्याची ओळख ! जगातील 150 देश या बंदराने जोडले आहेत. ‘इंटरनॅशनल सी फेअरर्स वेल्फेअर अँड असिस्टन्स नेटवर्क' या अंतरराष्ट्रीय संस्थेने ‘2015 पोर्ट ऑफ दी ईयर' पुरस्कार देऊन बंदराचा गौरव केला आहे. यावरूनच या बंदराचे महत्व आमच्या लक्षात आले.
बंदराच्या एका बाजूला ‘फार्मर्स मार्केट’ आहे. कॅनडातील शेती अद्याप पाहिली नव्हती; किमान इथले कृषी उत्पन्न तरी पहायला मिळेल या आशेने आत गेलो. दोन मजली भव्य इमारत. त्यात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, त्यावर प्रक्रीया करून तयार करण्यात आलेले पदार्थ, दूध, दुधापासूनच्या चीजवस्तूं, मासे, चिकन,......आदी. सारे स्टॉल्स व्यवस्थितपणे मांडले ! कांही तयार खाद्यपदार्थही विक्रीसाठी ठेवले होते. साधारनपणे आपल्याकडे असतो तसाच भाजीपाल्याचा प्रकार! कॅबेज, फ्लॉवर, नवलकोल, बिन्स, भेंडी, बटाटे, दोडकी, रताळी.....इत्यादी ! ढबु मिरची आपल्याकडे असते त्यापेक्षा बरीच मोठी नि विविध रंगी, कांदे नि टोमॅटो एवढाले मोठे, पहातच रहावे असे ! आपल्याकडची भाजी मंडई म्हणजे अस्वच्छता नि कुजलेल्या पाल्याचा दुर्गंध! इथे मात्र कमालीची स्वच्छता, शिवाय मार्केटची इमारतच वातानुकूलितत असल्याने भाजीपाला लवकर कुजण्याची शक्यता कमीच. इथे ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. आम्ही भाजीपाला खरेदी केला, कांही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नि विदेशातील एक वेगळा अनुभव घेऊन बाहेर पडलो.
***
कांही अंतरावरील बेडफोर्ड बेस हा सुद्धा हॅलिफॅक्स बंदराचाच एक भाग. दुसऱ्या दिवशी आम्ही फिरण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो. विशेषत: सायंकाळच्या वेळी इथे पर्यटकांची गर्दी म्हणता येणार नाही; पण बऱ्यापैकी वर्दळ असते. कांही स्थानिक लोकांनी हौस म्हणून लहान नौका विकत घेतल्या आहेत. विशेषत: सुटी दिवशी संध्याकाळच्या वेळी कुटूंबासमवेत ते इथे येतात नि विरंगुळा म्हणून नौका विहार करतात.
प्रतिवर्षी येथे 1 जुलैला ‘कॅनडा दिन' साजरा केला जातो. या दिवशी या बीचवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन असते. योगायोगाने हे कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली. त्यातून कॅनडाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. त्याहीपेक्षा रात्रीच्या फटाक्यांच्या आतशबाजीने मन वेधून घेतले. स्थानिक लोक रात्रीच्यावेळी आपल्या होड्या घेऊन खाडीच्या मध्यभागी जातात व फटाके, हुक्के......आदींची एकाचवेळी आतशबाजी करतात. रात्रीच्या अंधाराला भेदून टाकणाऱ्या या आतशबाजीमुळे समुद्रावर आकाशगंगा अवतरल्याचा भास होतो.
***
बंदरावरचं दृश्य मनाला आनंद देणारं, सुखविणारं आणि ज्ञानात भर टाकणारं होतं. अर्थात आपण जे पहातो, अनुभवतो त्यातून बरच कांही शिकून जातो; परंतु हॅलिफॅक्स बंदरांत वेगळ असं कांहीस आम्हाला मिळालं. त्यात होत ज्ञान आणि मनोरंजनही; परंतु टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची कथा ऐकून मन तेवढच भारावून गेलं. वाटलं, बुद्धी-कौशल्याच्या जोरावर माणसानं आकाशाला गवसणी घातली तरी त्याच्या कर्तुत्वालाही कुठेतरी मर्यादा ही आहेच. निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी बुद्धीकौशल्य अपुरे आहे, हेच खरे !
पहिल्या भेटीत बंदरावरील मेरिटाईम म्युझियम वेळेअभावी पहायला मिळाले नव्हते. दुसऱ्या वेळी खास यासाठीच आम्ही पुन्हा बंदरावर आलो. प्रवेशिका घेतल्या नि प्रथम खाडीत उभे असलेले जहाज पहावयास गेलो. जहाजाची बांधणी, इंज़ीन, अंतर्गत व्यवस्था पाहून मी थक्कच झालो. जहाज म्हणजे तरंग़ते घरच होते. स्वयंपाक खोली, डायनिंग हॉल, बेडरूम, स्वच्छतागृहे.....आदी व्यवस्था इथेही होती. जहाजाच्या आतील व्यवस्था व रचना पाहायची माझी ही पहिलीच वेळ. त्यामुळेच असेल कदाचित, या साऱ्या गोष्टींचे मला नवलच वाटले. त्यानंतर आम्ही मेरिटाईम म्युझियम पहायला गेलो.
म्युझियमच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला आकर्षक लाईट हाऊसचा मॉडेल मन वेधून घेणारा होता. विविध प्रकारची प्रवाशी व मालवाहू जहाजे, लढाऊ जहाजे, वाफेचे इंजिन, पानबुड्या, जुनी शिडाची जहाजे, होड्या, समुद्रप्रवासात वापरावयाचे साहित्य, महासागरात बुडालेल्या जहाजांचे सापडलेले अवशेष.....म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. सगळ्याच गोष्टी अभ्यासनीय आहेत. पण सर्वापेक्षाही मन हेलावलं ते याच ठिकाणी दाखविण्यात आलेला टायटॅनिक दुर्घटनेचा माहितीपट पाहून!
हॅलिफॅक्स बंदरापासून कांही अंतरावरच आक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या महासागरांनं हे मानवनिर्मित अजस्त्र जहाज गिळून टाकलं होतं. शेकडो निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. वृत्तपत्रातील हे वृत्त वाचले होते. या दुर्घटनेवर आधारीत चित्रपटही पाहिला होता. त्यावेळी मनाची जशी अवस्था झाली होती, तशीच अवस्था माहितीपट पाहिल्यानंतरही झाली. हॅलिफॅक्स बंदर दुर्घटनाग्रस्तांचे मुख्य शोध केंद्र बनले. इथूनच दुर्घटनाग्रस्त जहाजाच्या शोधासाठी दुसरी दोन जहाजं रवाना करण्यात आली. ओळख न पटलेल्या दुर्घटनेतील सुमारे 200 जणांचा दफनविधी याच शहरात तीन ठिकाणी करण्यात आला. ती स्मशानभूमीही पहाण्याचा योग आला. तिथला माहिती फलक वाचून मनाचा पुन्हा थरकाप झाला. ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा' हेच खरे !
-- मनोहर (बी. बी. देसाई)
October 31, 2020
राज कपूरच्या “हिना” मध्ये छान ओळी होत्या- “मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं !” त्याच धर्तीवर आजच्या पोस्टचे शीर्षक !
October 1, 2022
हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत प्राणी खाण्यासाठी सापाच्या दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून पडतो. नसता तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प दालनात एका उंदराला सोडले होते. सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके हालकेपुढे जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणे ह्या क्रिया तो करतो. असाच प्रयत्न हा सर्प करीत होता. त्याच वेळी उंदीर जीव वाचवण्यासाठी चपळाईने पळणे, सापाची पकड चुकवणे, त्याचा नजरेच्या टापूतून हालने, ह्या प्रयत्नात होता.
एक जीवन मरण्याचा संघर्ष चालू असलेला दिसत होता. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत: चे रक्षण करण्याची कला दिलेली असते. तो एक दिलासा असतो. जो जगण्यासाठी धडपडेल तोच जगेल. Survival of the fittest म्हणतात ते हेच. निसर्ग तुमच्या प्रयत्नांना सतत सकारात्मक साथ देतो. कित्येकदा वाघ सिंह यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणांनी आपली सुटका करून घातलेली आम्ही Discovery वा Animal Plannet ह्या दूरदर्शन चांनेलवर बघितले. पाण्यामध्ये प्रचंड मगरीने पकडलेला झेब्रा देखील आपल्या तडफदार धडपडीने ती मगरमिठी सोडू शकला हे पण बघितले. चंचलता, चपळाई, शिकारी प्राण्याचा लक्षवेध चुकवण्याची कला, प्रासंगिक आक्रमकता, धैर्य, चातुर्य हे सारे सुप्त रूपाने प्रत्येक प्राण्यात असतात. हे गुणधर्म संकट काळी जागृत होतात. नेहमीच्या अंग शक्ती पेक्षा कितीतरी पटीने त्याची शक्ती उत्येजीत होती. शरीराच्या प्रत्येक नस नसामधून त्याचा ओघ निर्माण होतो. हा परिणाम इच्छित ( Volentary action ) नसून आंतरिक चेतना अर्थात Instinct Relex Action असते. अपोआप उद्दुक्त होते. ही सारी निसर्गाची बचावात्मक योजना होय. कोंडून ठेवलेली भित्री वा पळपुटी मांजर तिच्यावर जीवघेणा हल्ला होत आहे हे समजताच तिच्यामध्ये विलक्षण शक्तीचा ओघ निर्माण होतो. ती झेप घेऊन त्या व्यक्तीचा गळा पकडून त्याचाच जीव घेण्यास सक्षम होते. ही स्व रक्षणाची किमया.
शिकारी साप आणि शिकार उंदीर ह्यांचे द्वंद्द चालले. चुरस अत्यंत रोमांचकारी व उत्च्सुक्ता वाढवणारी होती. एक बलाढ्य मारक आणि समोर अशक्त अश्या दोन प्राण्याची लढत. उंदरासाठी जीवन मरणाचा संघर्ष. तो सापाच्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीचा वेध घेत होता. सापाने दंश करण्यासाठी मारलेला टोला चपळाईने चुकवत होता त्याच वेळी सापाचे तोंड आपटून दुखवले जाई कांही वेळाने ते रक्त बमबाळ झाले. एक विस्मयकारक प्रकार घडला. उंदरावर सापांनी आपला जबडा उघडा करून एक दंश टोला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी उंदराने उलटवार केला. सापाचा उघडलेला खालचा जबडा झटकन आपल्या दातांनी गच्च पकडला. उंदराला छोटे छोटे दात असतात. त्याचा उपयोग पकडी मध्ये झाला.
उलट सापाला तसे चावण्याचे दात नसतात. तो फक्त भाक्षाला गिळतो. येथे खालचाच जबडा उंदराच्या पकडीमध्ये गेल्यामुळे साप एकदम निष्क्रिय झाला.सापाची ह्या अनपेक्षित पकडीतून सुटका करून घेण्याची धडपड चालली , पण जमले नाही. उंदराने त्याची पकड ढिली केली नाही. बराच वेळाने तो साप हतबल होऊन मान टाकू लागला. त्याचा हालचाली थंडावल्या उंदराने शत्रूची पकड दिली करीत लगेच चेहऱ्याचा दुसरा भाग पकडला. जागा बदलणे, पुन्हा दात रोवणे, कुड्तरणे हे चालू ठेवले. सापाचे तोंड छीलुन काढले. घायाळ केले. शेवटी सपालाच मृतुच्या स्वाधीन व्हावे लागले.
आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही video चित्रण ही केले होते. अशा घटना निसर्गाच्या चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास मिळणे हे आमचे नशीब नव्हे काय?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 14, 2015



-- निलेश बामणे
May 7, 2012
प्रसार माध्यमं आणि साहित्य’ याचा विचार करताना प्रसारमाध्यमं म्हणजे नेमके काय अर्थ समजावून घेतला पाहिजे. आपल्या विचारांचा, भावनांचा, लेखनाचा वा अन्य कलाप्रकारांमधून व्यक्त होणा-या कृतींना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहक अथवा साधक म्हणून कार्य करणारी यंत्रणा म्हणजे माध्यमं होत:
August 19, 2023
कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
December 18, 2022
” आजचा दिवस माझा ” ! चंद्रकांत कुळकर्णीने दिग्दर्शीय हाताचा परीस या कथेवर मनसोक्त फिरवला आहे. ही तर एका रात्रीची कथा ! पण सुरुवातीला “सिंहासन “जवळ जाणारा हा चित्रपट एकाएकी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चवीला राजकारण जरूर आहे पण ही एका मुख्यमंत्र्याच्या “आतील ” मानवाचे हृद्य दर्शन घडविणारे कथानक आहे.
September 26, 2021
जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.
November 26, 2022
संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.
मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.
डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.
१२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.
डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.
निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.
पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
August 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti