(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

    ‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
    मी बसलोही
    क्षीण तुझा कर करीं घेउनी
    सुखावलोही .
    नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
    काय व्हायचें होतें
    ‘उद्या’च येथुन कायमचें तुज
    दूर ज़ायचें होतें.

    - - -
    ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
    हिच्या आठवणीत )

    -- सुभाष स. नाईक

  • बघता तुला प्रिया रे ,

    बघता तुला प्रिया रे ,--
    जिवा बेचैनी येते,
    कासाविशी होता हृदयी,
    आत मोरपीस हलते,--!!!

    विलक्षण ओढ तुझी,
    काळजाला किती छळते,
    मूर्त माझ्या अंतरीची,
    अढळ अढळ होतं जाते,--!!!

    स्पर्श होता तुझा सख्या,
    माझी न मी असते,
    बाहूंत तुझ्या विसावण्या,
    किती काळ मी तरसते,--!!!

    तुझ्यातच सारे विश्व माझे,
    जगही तोकडे भासे,
    तुझ्याचसाठी राजसा,
    मन्मनीचा चकोर तरसे,--!!!

    उषा आणि संध्या,
    आपले रंग उधळती,
    प्रेम रंगाचाच वर्षाव,
    भास्करावरती करिती,--!!!

    रात्र येते चंदेरी ती ,
    जेव्हा जवळ तू असशी,
    जिवापाड जाऊन तूही,
    प्रीत" माझ्यावर करशी,--!!!

    धुंद रात्रीची मदमस्त किमया,
    प्रेमात नखशिखांत नहाते,
    आभाळीची चटोर चांदणी,
    प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!

    हिमगौरी कर्वे©

  • शांततेचा शोध

    मनाची शांति । मिळेना कुणा
    कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।।

    जीवन ध्येय । शांततेसाठीं
    प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।।

    शांतीचे घर । अंतःकरण
    नसे बाहेर । कधीं चूकून ।।

    शत्रू शांतीचा । अशांति असे
    ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।।

    विरोधी दोघे । दूर राहती ।
    वाईट बघे । एकमेकाती ।।

    अशांत वाटे । मन तुम्हांला ।
    बोचती काटे । घेता तिजला ।।

    बाह्य असूनि । त्वरित दिसे ।
    चंचल मन । तिजला फसे ।।

    अशांती मनीं । येता तुमचे ।
    घ्या समजूनी । फळ बाह्याचे ।।

    बाहेरी मिळे । असे अशांति ।
    शोधा सगळे । आंतिल शांती ।।

    यत्न सुखाचे । अशांती आणी ।
    व्यर्थ तुमचे । श्रम होऊनी ।।

    प्रयत्न होतां । अशांति येई ।
    सोडून देता । शांतीच राही ।।

    शांति ईश्वर । रूप आगळे ।
    आनंद फार । कुणा न कळे ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • रीतसर कांदे पोहे आणि चहा

    रीतसर कांदे पोहे आणि चहा
    जेष्ठ लोकांच्या सोबत भेट ठरते पहा
    चारचौघात दोघे बघतात एकमेकांना हळूच
    मोठ्यांच्या समोर नजर भेट होते ती लाजून
    दोघांना काहीतरी तिथेच क्षणात वाटतं
    इथेच आपलं जुळाव हे मग जाणवत
    थोडस दोघांत बोलून भेट ती संपते
    होकार होतात दोघांत लग्नगाठ मग ठरते
    आकर्षण स्पर्श ओढ दोघांनाही असते
    लग्नानंतरचे नवीन दिवस मखमली बहरते
    ती अहो म्हणते कारण ठरवून लग्न हे असते
    त्यालाही तिचे गोड अहो म्हणणे मोहित करते
    मखमली स्पर्शाचे दिवस आल्हाद सुरु होतात
    एकमेकांना वेळ देतांना सवयीच्या खुणा अलगद कळतात
    भांडण राग रुसवा वाद दोघांतही होतो
    परी जेष्ठांच्या समजुतीने संसार फुलतो
    हळूहळू ओळख होते एकमेकांना सारी
    तीच मजा असते नातं हळुवार उलगडण्याची
    दोघांच्या आवडी नव्याने दोघांना कळतात
    रंगीबेरंगी फुलपाखरु मन दोघांची एक होतात
    अलवार स्पर्श मोहक मिठी भावुक मन
    सगळे हक्काने सहज दोघांत उलगडते
    मिटल्या डोळ्यांत दोघांच्याची नाजूक
    प्रेम अलगद ओथंबून तरळते
    दोघेही सवयीने एकमेकांचे होतात
    प्रेम नंतर करतात आणि संसार हलकेच सजवतात
    असो लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज पवित्र नातं
    हे लग्नगाठीतच बनतं
    ठरवून केलेल्या लग्नात प्रेमही नक्कीच मोहरत
    -- स्वाती ठोंबरे.
  • पांढरपेशी

    एक पांढरी पाल
    वर वर चढायची .....
    मनात माझ्या खोल ...
    खोल जखम करायची

    जखम रक्ताळलेली
    चिघळत रहायची ...
    पालीच्या चुक्चुकण्याने
    खपलीहि निघायची

    त्या पालीचे सगे सोयरे
    करीत मौज जमायचे
    स्वार्थाच्या तलवारीने
    पंख माझे छाटायचे .....

    अपंग मी, गलितगात्र,
    वेदनेने विव्हळायचो
    पालीच्या छद्मीहास्याने
    गुदमरून मरायचो,

    आता........

    हुंकार मी भरला आहे
    नागफणी बनणार आहे
    न्याय हक्क मिळवून माझे,
    आकाशी गवसणी घालणार आहे

    (हि कविता रविवार सकाळ १९८२ मध्ये प्रसिद्ध झाली होती)

    © अरविंद टोळ्ये
    ९८२२०४७०८०

  • कुंभार आगळा

    खेळ त्याचेच सारे
    तो कुंभार आगळा
    घडवितो, तोडितो
    सर्वा लावीतो लळा

    तो जीवाचा आत्मा
    श्वासास जगविणारा
    ब्रह्मांडी त्याची सत्ता
    तोच एक तारणारा

    जगणे केवळ भोगणे
    प्रारब्धा मिठित घ्यावे
    जन्ममरण प्रवास एक
    चालता त्याला स्मरावे

    पुनरपी जननं, मरणं
    निर्णायक तोची ईश्वर
    उगाच, कशाला चिंता
    जगती सारे आहे नश्वर

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२२४

    ३/९/२०२२

  • आठवावे मृत्यूसी

    निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना,

    गती देई जीवन चक्रांना, ईश्वरी शक्ती II १II

    उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती

    याच तत्वे निसर्ग चालती, अविरत II २II

    ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून

    घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने II ३II

    वस्तूचे निरनिराळे आकार, चेतना देवूनी करी साकार

    यास जीवन संबोधणार, आपण सारे II ४ II

    मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती

    वापरून तीच ती माती, आकार देई पुन्हा पुन्हा II ५II

    दिसेल भांडी फुटलेली, अथवा नवी बनलेली

    हीच हात चलाखी, सगळी त्याच्या खेळण्याची II ६II

    मृत्यू टळला न कुणा, हे अंतर्मनी जाणा

    यशस्वी करा जीवना, मर्म ओळखूनी त्याचे II ७II

    राहीला नाही राम, उरला नाही शाम

    मागे राही फक्त कर्म, तुमच्या जीवनातील II ८II

    जाणता मृत्यूची अटळता, घालवी ती मनाची चंचलता

    आणील आयुष्या निश्चिंतता, समजोनी जीवन क्षणभंगूर II९ II

    ठेवा मनामध्ये बिंबवून, अनिश्चित आहे जीवन

    मर्यादा धडपडीना देवून, आयुष्य मार्ग आक्रमाल II १०II

    नागडा उघडा येई येथे, तसाच जाई परत तेथे

    कांहीं न तयाला नेता येते, सोडताना हे जग II ११II

    आत्म्यासंगे जाई कर्म, जगती राही देह धर्म

    निसर्ग चक्राचे हे मर्म, ओळखावे सर्वांनी II१२II

    धडपड तुमची धनापाठी, कुणी झगडे सत्तेसाठी

    आकर्षण सारे मायेपोटी, बाह्य गोष्टीचे II१३II

    संसार हा नाशवंत, सर्वासी आहे अंत

    म्हणूनी जाणावा भगवंत, अविनाशी शक्तीस II१४II

    निद्रेस जाण्यापूर्वी, मृत्यूची आठवण करावी

    मात्र त्याची भिती नसावी, मनामध्ये II१५II

    मृत्यूची करिता आठवण, चुकांना पडेल बंधन

    बंधनात होईल महान, कार्य तुमचे कडूनी II१६II

    जाणोनी छोटा काळ, न दवडी तो फुकट वेळ

    शोधण्यास तो जाईल, जीवनाचे प्रयोजन II१७II

    माहीत असते सर्वांना, मृत्यू टळला न कुणा

    परी आठवण त्याची निर्भय मना, रोज येत राहावी II १८II

    भीऊ नका मृत्यूला, अपघात समजा त्याला

    जीवनचक्र पूर्ण होण्याला, मदत होई त्याची II१९II

    जैसा आनंद जन्माचा, तैसा मानावा मृत्यूचा

    यात सहभाग प्रभूचा, समजावे ही विनंती II२०II

    शुभ भवतू

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • पाऊलवाटा

    वाट, चढणीची गडकोटी
    सदैव मी तुडवित राहिलो
    उरली आता चारच पाऊले
    आता माथ्यावरी पोहचलो
    आव्हानी पत्थर पाऊलवाटा
    दुर्दम्य! विश्वासाने चाललो
    सभोवारी हिरवीगार सुखदा
    गतस्मृतीं कुरवाळीत राहिलो
    छेड़ितो शीतल पवन धुंदला
    झुळझुळ ती झेलित राहिलो
    नेत्री आठवांचे निर्झर सुंदर
    जिथे नाहलो, तुडूंब डूंबलो
    सारिपाट साऱ्या जीवनाचा
    मी आज उलगडित राहीलो
    काय मिळवले काय हरवले
    मी मना समजावित राहिलो
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १३२.
    ८ - ५ - २०२२.
  • चंद्राचे कायम स्वरूप

    ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला /

    मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला //

    चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे /

    झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे //

    नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन /

    शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन //

    बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे /

    थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे //

    तेच आहे मधुर चांदणे चंद्रातील शितलतेचे /

    आजही वाटतो आल्हाद बघता रूप पौर्णिमेचे //

    चंद्र आहे कवीची स्फूर्ती बालकाचे तोच गीत /

    प्रेमिका देण्या आनंद मग्न तो सदोदित //

    चंद्र आहे मुकुट मणी निसर्गाच्या सौंदर्याचा /

    ऐकून त्याचे बाह्य रूप आनंद कमी न होई त्याचा //

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • काजवा

    प्रकाश देण्याच सामर्थ्य प्राप्त असलं,
    तरीही काजवाच तू!
    तेंव्हा,
    उगाच पेटत्या मशालीवर झेप घेऊन,
    तिला विझविण्याचा,
    केविलवाणा प्रयत्न करू नकोस,
    लक्षात ठेव!
    ती धगधगती मशाल आहे,
    तेव्हा,
    आहुती तुझीच जाणार आहे.
    मशाल ती मशालच,
    पेटेल आणि पेटवेलही,
    अनेक मशालींना ,
    आणि
    धगधगत ठेवेल ती ज्वाला,
    प्रकाशासाठी युगेणयूगे ,
    लेखनातून, विचारातून,
    तर कधी,
    व्यक्त होऊन सडेतोडपणे,
    अंधार गिळण्यासाठी.
    तेव्हा तू फक्त,
    तूझ्या प्रकाशाचा वापर कर ,
    तुझे पोट भरण्यासाठी,
    तुझे अस्तित्व टिकविण्यासाठी,
    जगाला प्रकाश देण्याचा,
    विचार देखिल करू नकोस,
    कारण विश्व अफाट आहे ,
    आणि
    तू फक्त काजवा आहेस,
    गतीमंद आणि मतीमंद सुद्धा .
    फार फार तर,
    तू शृंगारलंकार बन,
    तिचा केसारंभ गजरा खुलवण्यासाठी,
    एका लावण्यवतीचा,
    पुर्वी, राणी-महाराणी,
    सुंदरी आणि नर्तिकाही,
    तेच करीत होत्या,
    लावण्य खुलवत होत्या,
    आणि म्हणूनच,
    इतिहासानेही दखल घेतली,
    तुझ्या प्रकाशाची,
    शेवटी तूही प्रकाशाचा,
    एक स्ञोत आहेसच,
    पण लक्षात ठेव,
    तू फक्त काजवा आहेस.
    -–ॲ‍ड सर्जेराव साळवे,
    69, राज नगर मुकुंदवाडी औरंगाबाद
    मो.नं,: ८८०५०१३०८४