गझल
वृत्त :- व्योमगंगा
लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी
वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी
झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ;
गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी
फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी
पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी
लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते
लोकनेते साफ खोटे बोलणारे पाहिले मी
वाचवावी लेक, मित्रा फार झाले बोलणे हे
वारसासाठी सुनेला जाळणारे पाहिले मी
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
October 5, 2018
बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी
वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेवूनी...१,
दूर जावूनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरिता
जग सारे ते घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता...२,
वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला तो वृक्ष
पिल्लासाठी ती गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य...३
शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी तो पडला होता
पिल्लामधली ती कुजबुज, असह्य दशेत ऐकत होता...४
कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे, क्षणांत भूमिगत झाले
स्थिर बघूनी पक्षी घरटे, अखेरचे ते अश्रू गळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 31, 2019
चमचमणाऱ्या लाटा भिजवी
वाळूचा शुभ्र किनारा
वाहतो त्या वरून अलगद
धुंद ओला समुद्रवारा
ऊन सोनेरी अलगद टिपती
माड तरु झुलता झुलता
अनाम आनंदी गाणे गाती
समुद्रपक्षी उडता उडता
निरवतेच्या अशा किनारी
बांबूची उबदार बने
त्यातून वाहे वारा घेऊन
सागराची अथांग स्वप्ने...
---आनंद
December 20, 2021
आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे,
नाहीसे का आज ओढाळ,--!!!
मंदमंद प्रेम प्रकाश,
हळूहळू नाहीसा होई,
जीवनीचा तम मग,
बघ, कसा वाढत जाई,--!!!
रोज रोज अमावस,
असे कसे चालायाचे,
रात्रंदिनी निष्प्रभ खास,
चंद्र - चांदणे मज भासे,---!!!
अनुभवल्या जिथे पोर्णिमा,
चंदेरी धवल लख्ख,
तेच प्रेमाभाळ वाटे,
धूसर तममय मख्ख,--!!!
कुठे गेला माझा चंद्र,
आणि त्याचे प्रेमळ चांदणे,
विरहार्त गीत गाई,
पक्षी एकाकी दिवाणे,--!!!
चंद्र चांदण्या भरून बहरे,
खरे तर रात्र लोभसवाणी,
जशी ती जवळ येते,
आठवांनी काळीज चरे,--!!!
या रम्य निरव एकांती,
पुन्हा एकदा तू जवळ यावे, पहिल्यासारखे लाजलाजूनी,
कवेत माझ्या सामावून जावे,--!!
पुन्हा एकदा व्हावा तो, लाजराबुजरा शृंगार ,
नदीस जसा सागर भेटतो,
बघत राहावे त्यांचे उफान,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 26, 2019
या बाई या
बकुळीच्या झाडाखाली
फुले वेचू या ।
ऊन पडले
पानफुल दिसे कसे
गोडगोडुले ।
गोडगोडुले
मोतियांचे दाणे कोणी
खाली पाडले? ।
रान हालले
पहाटेस शुक्रदेव
गाणे बोलले ।
June 11, 2026
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।१।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२।।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३।।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।४।।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।५।।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।६।।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।७।।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 16, 2015
कांदा नी भाकर
किती महागली
पोट कसे भरू
गळचेपी झाली
मेथीची जुडाई
पन्नाशीला आली
कोथिंबीर लुप्त
मी घिरट्या घाली
काही भाज्या तर
झाल्या महाराणी
गातात नेहमी
श्रीमंतीची गाणी
राब राबतो रे
शेतकरी शेता
दलाल पदरी
माप काहो घेता
ज्याचा आहे नफा
त्याला द्यानं जरा
फुले सुखी वाफा
दारी तर तरा
महागाई थांब
नको शोषू रक्त
विनवणी माझी
एवढीच फक्त
-- सौ. माणिक (रुबी)
December 2, 2019
(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -)
स्वातंत्र्य मिळाले
तेव्हा ते म्हणाले
गरिबी हटाव!
त्यानंतर
कित्येक पंतप्रधानांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मुख्यमंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
आमदाराने खासदारांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर त्यांच्या कित्येक
बगल बच्यांनी
आपली गरिबी हटवली
स्वातंत्र्य मिळून
पन्नास वर्षे झाली
गरिबी कुठे हटली?
यांची बिचारी गरिबी
पिढ्यान् पिढ्या
कधी हटणारच नाही
गरिबीचे यांनी
केले कुत्रे
लाचार लूत भरलेले
यांच्या गरीबीचे
कुत्रे मात्र
लठ्ठ लाचेचा पाव खाते!
गरीबीचा मंत्र
जपायचा
डोळे झाकून
दुनिया झुकते
झुकणारी जनता
गरीबच असते
दिसते तसे नसते
म्हणून जग फसते
गरिबी हटली
तर श्रीमंती
राज करील कसे?
-- विनायक अत्रे.
July 21, 2022
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।
जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
राजनीति अन् युद्धनीति ही ।
अवगत झाली सारी तिजला ।।१।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
नजीकच्या त्या देशामधूनी ।
रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
सामान्य जनाला जर्जर करुनी ।
हा हाः कार तो माजविला ।।२।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
परिस्थितीला जाणून घेतां ।
केवळ चौदा वर्षाकरीता ।।
राम वनी तो पाठवी माता ।
तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
माता आणि राजधुरंदर ।
दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
इतिहास जिने घडविला ।।४।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
रावणवृत्ती महा असूरी ।
नष्ट केली तिनेच खरी ।।
मार्ग निवडले जरी कांटेरी ।
यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
धाडीला नसतां राम वनीं ।
मारीला असता रावण कुणी ?
स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 8, 2021
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 22, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti