तूच माझी राधिका,तूच माझी प्रेमिका,
मोहिनी माझी तू ,
तूच माझी सारिका, --!!!
मुसमुसते प्रेम तू ,
सौंदर्य ओसंडून वाहे,
मदनाची रती तू ,
भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,--!!!
कमनीय सिंहकटी तुझी,
बाहूत माझ्या सामावे,
लाल कोवळे ओष्ठद्वज,
डाळिंबीची जणू फुले,--!!!
मोहक बांधा तुझा,
जाता-येता खुणावे ,
कुंतलाचे मानेवर ओझे,
पाठीवरचा तीळ झाके, --!!!
आरस्पानी रंग-गोरा,
काळजां घायाळ करतो,
गोड गुलाबी कायेवर,
लज्जेचा गेंदा फुलतो,--!!!
मिटून घेशी शृंगारात,
संकोची तू कासवी,
मदनाची बाधा होता,
फुलून येते रातराणी,--!!!
*ऐहिक तू भोगिनी,
मजसाठी मात्र योगिनी,
भोग--योगाच्या संयोगी,
अलौकिक तू कामिनी*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
कुणी तरी असावं...
हाकं मारताच परत येणारं
डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं .......
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं.....
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं......
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं.....
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं...
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं......
- दिप....
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
चावी
एकदाच तिने माझ्या भेदक या नजरेला नजर दिली
माझ्याकडे पहात गालात लाल गोड हसली ….
बागेतील तारका-
दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो
वेड्यासारखा मी पुटपुटतो
माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥
तुझ्यावर जगणारी पाहून
टोपीखालची बांडगूळं
मी उगा विव्हळतो
माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥
तुझ्या वेदनेची कळ
माझ्या काळजात उठते
माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा
माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥
तूच माझा जिव्हाळ्याचा
एकमेव अर्थ जगण्याचा
सत्ताधांना मग का न कळावा
माझा भारत, माझा भारत ॥ ४ ॥
अर्थ दुबळेपणाचा नसतो
तुझ्या सोशिक शांततेला
जिथे ज्योतीतही सामर्थ्य वणव्याचे
तो माझा भारत, माझा भारत ॥ ५ ॥
इथे असते गार सावली
-भव्य हिमालयाच्या छातीची
इथे सौंदर्याला येतो-
-गंध मोहक पावित्र्याचा
इथे निष्पापतेला जोड असते
--समर्थ अशा निर्भयतेची
इथे शांतिपूजक तुम्हां कवटाळतो
--माझा भारत, माझा भारत ॥ ६॥
परकी-संस्कार छायेतल्यांना
उमगत नाही भारताचा गाभा
अखंड इथे पाझरवतो वात्सल्यझरा
माझा भारत, माझा भारत ॥ ७।।
गुलामगिरीच्या निशाण्या अन्
बाळगिती, म्हणती निर्लज्जतेने
ज्ञानकक्षा की हो रुंदावल्या
हजारो अनामिक हुतात्म्यांचा
अपमान पाहून व्यथित होतो
माझा भारत, माझा भारत ॥ ८॥
गलिच्छ डाग पारतंत्र्याचा
पुसला अपुल्या रक्ताने
त्यांच्याशी कायम कृतज्ञ
माझा भारत, माझा भारत ।। ९ ।।
झगमगाटाहून दूर एकांती
स्मरतो भक्तीभावाने लोकमान्यांना
'मोडेल पण वाकणार नाही'
माझा भारत, माझा भारत ॥ १० ॥
माझ्या काळजाचा तुकडा
विसावा जेव्हा त्याच्या जखमेला
तेवढ्यानेही तो गद्गद्तो
माझा भारत, माझा भारत ॥ ११ ॥
शत्रूलाही 'सांभाळणाऱ्या खुर्चीचे
का न कळे, न जुळे आपल्याच मातीशी
पुकारतो दोन्ही हाती त्यांना
माझा भारत, माझा भारत ॥ १२ ॥
वैयक्तिक स्वार्थ जेव्हा तुडवतो
हजारो निष्पाप आशाआकांक्षा
अन्यायाने पेटून उठतो
माझा भारत, माझा भारत ॥ १३ ॥
माझ्या भारताला पोहोचतो
टाहो त्याच्या, कणाकणाचा
भरल्या नयनी तो तळमळतो
माझा भारत, माझा भारत ॥ १४॥
माझ्या भारताला आज-
गरज समर्थ हातांची
या शक्तींनो देऊ शाश्वती--
उज्वल उद्याच्या भवितव्याची
हाक तुम्हाला, तुमच्यासाठी-
आसुसलेल्या देशाची
माझा भारत, माझा भारत ॥ १५ ॥
सुवर्णधूर निघो हजार वाटा
हजार हातांनो अविरत झटा
समर्थतेच्या कळसास नेऊ या
माझा भारत, माझा भारत ॥ १६ ॥
कृष्णाची करांगुली कुणी मला द्या
ज्याने नेईन मी हा गोवर्धन
पुन्हा वैभवशिखरी विराजमान
माझा भारत, माझा भारत ॥ १७॥
-- यतीन सामंत
मे ९, २०१६ च्या लोकसत्ता, मुंबई एडिशनमधील ‘गोवंशप्रतिपालकांचा विजय’ हा लेख वाचला. उत्कृष्ट व्यंग. हे व्यंग आमच्यासारख्या वाचकांना समजलें, पण ज्यांना कळायला हवें, त्यांना तें कळलें असेल काय ? एनी वे, तें जें असेल तें असो, आपण यानिमित्तानें , ‘गाय’ या विषयाची थोडीशी चर्चा करूं या.
पुढें जाण्यापूर्वी, मला हें स्पष्ट करणें आवश्यक वाटतें की, एक म्हणजे, मी स्वत: शाकाहारी आहे , आणि दुसरें म्हणजे, माझा कुठल्याही राजकीय पक्षांशी किंवा धार्मिक संस्थांशी कसलाही संबंध नाहीं. हें स्पष्ट करण्याचें कारण असें की, मी ही चर्चा केवळ वैचारिक, तर्काधिष्ठित, दृष्टिकोनातून करत आहे ; माझा अन्य कांहीही उद्देश नाहीं. ( हें स्पष्ट न केल्यास, चर्चेला कुणी नसता-रंग देऊं शकतो, व त्यामुळे चर्चेला विनाकारण नको-ती दिशा मिळण्याचा धोका असतो. तो टाळायला हवा).
साधारणपणें १०,००० वर्षांपूर्वी मानवसमूह हा, Hunter-Gatherers, ( म्हणजे शिकार करणारे व फळफळावळ वगैरे गोळा करणारे ) या स्थितीपासून , Pastural-Agricultural (प्राणिपालन करणारे, शेती करणारे) या स्थितीला आला. जे प्राणी सर्वात आधी मानवानें माणसाळवले (domesticated) , त्यातील एक महत्वाचा प्राणी म्हणजे गाय. गायीचें महत्व दुधदुभत्यासाठी तर होतेंच , पण बैलाची माता म्हणूनही तिचें महत्व मानवाला कळून आलें. बैल हे, माल वहायला, शेतीसाठी नांगर ओढायला, प्रवासासाठी गाडी ओढायला, पाण्यासाठी विहिरीचा रहाट फिरवायला, असे विविध प्रकारें उपयोगी होते. त्यामुळे, तत्कालीन भारतीय समाजात गायीला अतिशय महत्व प्राप्त झालें, व ती पूज्य मानली गेली. महाभारतातही, घोषयात्रा, गोग्रहण वगैरे प्रसंगांवरून, त्या काळीं गायींना असलेलें महत्व दिसून येते. पांडव वनवासात असतांनाचा, कौरवांचा ‘घोषयात्रा’ प्रसंग घ्या. घोषयात्रा म्हणजे, ‘Cattle-Lifting expedition’ (संदर्भ : आर्. एन्. दांडेकर). तसेंच, पांडव अज्ञातवासात असतांनाचा कौरवांचा ‘गो-ग्रहण’ प्रसंग घ्या. कौरवांनी विराटाच्या राज्यावर आक्रमण केलें, तें त्याचें राज्य काबीज करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या गायींचें हरण करण्यासाठी ! पुरातन वाङमात ’कामधेनू’ च्या अपहरणासंबंधीच्या कथा आहेत, ज्या घटनेमुळे युद्धेंही उद्भवली. त्या जमान्यात गाय ही संपदाच मानली गेली होती. गो-धन, गो-दान, हे शब्द त्याचेंच द्योतक आहेत. पुरातन काळापासून गोमूत्र, व गोमय ( गायीचें शेण) यांना पवित्र मानलें गेलेलें आहे.
गो, गौ, धेनु इत्यादींशी संबंधित शब्द आपली संस्कृती व भाषा यांचें अविभाज्य अंग बनले आहेत. त्यांच्यावरून गाईचें तत्कालीन महत्व कळून येतें. उदा. गो-कुल, गो-प, गो-पी, गो-पाल, गो-विंद, गो-पती, गो-पुर, गो-त्र (cow-pen), गो-ष्ठ (cow-pen), गो-व्रज (cow-pen), गो-शाला (cow-stall), गो-कील (नांगर), गो-वर्धन (डोंगराचें नांव), गो-रज (मुहूर्त), गो-धूलि_वेला (संध्याकाळची वेळ) , गो-मुख, गो-ग्रास, गो-रस (दूध), गो-मय (शेण), गो-चर (उदा. दृग्गोचर), गो-मंत (ज्याप्रमाणें बुद्धिमंत, धीमंत, श्रीमंत, तसेंच) , गो-मेद (a type of precious stone), गो-खी (आंत हात घालून जप करण्यासाठी, जपमाळेची थैली), वगैरे वगैरे ; तसेच मराठीतील गुराखी (गौ-रक्षक), गो-वर्या (शेण्या), इत्यादी शब्द ; धेनुसूदन (बलराम), धेनुवल्लभ, गोरक्षनाथ (गोरखनाथ), गायधनी, गोकर्ण, गायतोंडे अशी व्यक्तिनामें व आडनांवें ; गुरखा (गौ-रक्षक) हें जमातीचें नांव; गो-कर्ण_महाबळेश्वर (एक तीर्थक्षेत्र), गो-रखपुर, गो-ध्रा, गो-हाटी, गांवाबाहेरील चरण्यासाठी राखून ठेवलेलें ‘गायरान’, ही शहरांची नांवें व स्थलनामें ; गो-मती हें नदीनाम ; सर्व गायीशी संबंधित आहेत. (संदर्भ : रोमिला थापर, व्ही.एस्. आपटे, इतर लेखक, व मी).
पण वैदिक काळ व महाभारत काळाला आता कांहीं सहस्रकें उलटून गेलेली आहेत, (म्हणजे, किमान ३००० ते ६००० वर्षें). याचाच अर्थ असा की, त्या काळानंतर, कमीत कमी १५० ते ३०० पिढ्या गेल्या आहेत. ( बाप रे! ) . आतां , विक्रम संवत् म्हणा, शालिवाहन शक म्हणा, किंवा इसवी सन म्हणा, या सर्वांचीही जवळपास २००० वर्षें उलटली आहेत ,( म्हणजे, १०० पिढ्या). आतां यंत्रयुग आहे. अजूनही, अगदी-खेडें असलेल्या कांहीं ठिकाणी बैल वापरतात, पण जवळजवळ सर्वत्र आतां शेतीसाठी लहनमोठी यंत्रें वापरली जातात. प्रवासासाठी बैलगाड्या नव्हेत, तर एस्. टी., मोटार, रेल्वेगाडी वगैरे साधनें आहेत. गो-पालन सुद्धा आतां , एक_गाय-दोन_गायी अशाप्रकारें न होतां, एक धंदा म्हणून अनेक गायी (व म्हशी) पाळून केलें जातें. त्यामुळें, गो-पूजन व गो-रक्षण य परंपरा खरें तर कालबाह्य झालेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, गाय हा फक्त एक उपयुक्त पशू आहे. सावरकर यांचे विचार नेहमीच विज्ञाननिष्ठ असत. त्यामुळे, त्यांचें गायीबद्दलचे कथन, हें कोणाही खोलवर-विचार-करणार्या माणसाला पटल्याशिवाय रहाणार नाहीं. मग, किती दिवस आपण हजारो वर्षें जुन्या, कालबाह्य परंपरेला धरून बसणार आहोत ?
दुसरी एक , आणि अधिक महत्वाची बाब. आणि ही तर अजिबात दुर्लक्षित करून चालणारच नाहीं. हा मुद्दा, ‘क्लब ऑफ रोम’ या multi-disciplined शास्त्रज्ञांच्या संघटनेनें , ‘Limits to Growth’ नामक त्यांच्या, इ.स. १९७० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या, इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये मांडलेला आहे. तो मुद्दा थोडक्यात असा की, मानववंश Exponential-progression प्रमाणें वाढत आहे, तर उत्पादन केलें जाणारें धान्य Arithmatic- progression प्रमाणें वाढत आहे , आणि त्यामुळे दोहोंमधील तफावत वाढत जाते आहे. म्हणून, कांहीं काळानें धान्याची सार्या जगात कमतरता होणार आहे. त्यातून, आणखी असें की, जगभरातील शेतीलायक-भूमीला कांहींतरी Limit, मर्यादा, आहे. म्हणजेच, एका विशिष्ट पातळीनंतर धान्य-उत्पादन फारसें वाढणें शक्य नाहीं. या सर्वाचा परिणाम असा की, लवकरच, सर्व जगातील धान्य-उत्पादन हें पृथ्वीवरील माणसांसाठी अपुरें पडणार आहे. म्हणजेच, या बाबतीत, Crisis नक्कीच येणार आहे, आणि ही स्थिती, दूरच्या-भविष्यात नव्हे तर, या २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतच येऊं शकेल !! भारताच्या दृष्टीनें, याला लागूनच एक उपविचार असा की, शाकाहारी असणें ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, पण, जर सगळी मानवजातच शाकाहारी बनली, तर हा crisis कितीतरी-पटींनी वाढेल, आणि मग, त्याला अधिक-लवकर सामोरें जावें लागेल. म्हणूनच, सावरकर म्हणत की, मांसाहार करणें मानवजातीसाठी आवश्यक आहे. (आणि हें त्यांनी जवळजवळ ९०-१०० वर्षांपूर्वी , म्हणजे, १९२०-१९३० च्या दशकात म्हटलेलें आहे, हें ध्यानात घ्यावें). हें सांगतांना , सावरकारांना, जात आडवी नाहीं आली, धर्म आडवा नाहीं आला, सनातन परंपरेला ते चिकटून बसले नाहींत ; केवळ तर्काधिष्ठित व विज्ञाननिष्ठ विचारातून या निष्कर्षापर्यंत ते आले. आपणही, तेंच करायला नको कां ?
सावरकर इतके पुढारलेल्या विचारांचे असूनही , त्यांच्याभोवती सनातनी-विचारांच्या मंडळींचा जमाव गोळा झाला होता. लोकशाही राज्यप्रणालीचा एक drawback असा आहे की, मतांच्या माध्यमातून राज्य करायचें म्हणजे कोणालाच दूर लोटतां येत नाहीं. सध्याच्या राज्यकर्त्यांचेंही तेंच झालेलें आहे. त्यामुळे, त्यांना गो-प्रतिपालन, गो-रक्षण, या कालबाह्य गोष्टींचा अवलंब करावा लागत आहे, असें दिसतें.
पण , आपण जेव्हां फासळ्या वर आलेल्या, खंगलेल्या, अर्धमेल्या गाईंना पहातो, ज्यांना रहायला नीट, स्वच्छ, ऐसपैस जागा नाहीं, खायला पुरेसें मिळत नाहीं, तेव्हां आपल्याला त्यांचीच नव्हे, तर त्यांच्या मालकांचीही कणव येते ! मालकाला स्वत:लाच बिचार्याला पुरेसें खायला मिळत नाहीं, त्याचें पोट खपाटीला गेलें आहे, उद्याचें दूर, आजचाच दिवस कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न आहे , तर मग तो गायींना काय कायला देणार ? ‘आई जेवूं घालीना, बाप भीक मागूं देईना’ अशी त्या गाईंचीच नव्हे तर त्यांच्या मालकांचीही स्थिती झालेली आहे.
अशा वेळी, १९ व्या शतकातील अमेरिकन (USA) West बद्दल वाचलेल्या माहितीची आठवण येते. त्यातून शिकण्यासारखें बरेंच आहे. हजारो गाईंचे (steers) कळपच्या कळप मैलोन् मैल चालवून एका भागातून दूरवर दुसर्या एकाद्या शहरापर्यंत न्यायचें , म्हणजे कांहींदा अपघात हे व्हायचेच. अशा वेळी जर एखाद्या steer चा किंवा घोड्याचा पाय मोडला तर, बरोबरचे काऊबॉईज् त्या जखमी जनावराच्या डोक्यात गोळी घालून त्याला मारत. असेंच एकदा एकानें आपल्या जायबंदी झालेल्या घोड्याला मारल्यावर, दुसर्या एका नवख्यानें त्याला विचारलें, ‘त्याला मारून टाकलेस, तुझें त्याच्यावर प्रेम नाहीं कां’ ? त्यावर तो उद्गारला की, ‘प्रेम आहे म्हणूनच तर डोक्यात गोळी घालून त्याला क्षणार्धात मारलें, नाहींतर तो खितपत पडला असता व अखेरीस जिवंतपणीच गिधाडांचें खाद्य झाला असता’. या गोष्टीवरून आपण कांहीं बोध घेणार आहोत कां ?
अर्धमेल्या गाईंना तसेंच अर्धमेल्या स्थितीत खितपत ठेवायचें की त्यांना त्यांच्या नरकातून मुक्ती द्यायची ?, हें शांत मनानें ठरवायला हवें, भावनांच्या किंवा परंपरांच्या आहारी जाऊन नव्हे. गाईंना खाद्य देणाच्या सरकारी योजनांबद्दल आपण बोलूंया नको, कारण त्या किती कागदावरच रहाणार आणि किती कृतीत उतरणार, हा प्रश्नच आहे. आणि, कितीही केलें तरी, फाटल्या आभाळाला सरकार ठिगळ लावूं शकणार आहे कां ? त्यातून पुढला प्रश्न, आणि तोही अतिशय महत्वाचा असा, की, अर्धमेल्या माणसांना जगविण्यासाठी कार्यक्रमांचे अवलंबन करायचें की अर्धमेल्या गाईंसाठी ? हें आपणच ठरवायचें आहे.
अखेरीस, असें म्हणावें लागेल की, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे ; त्यामुळे, ज्यांना शाकाहारी रहायचें आहे, त्यांनी रहावें, पण मांसाशन करणार्यांवर दडपण आणूं नये, हेंच उचित होईल. समाजाच्या दृष्टीनें म्हणाल तर, दूरगामी विचार करून, मानवांसाठी खाद्याचा प्रश्न Long-term दृष्टीनें ध्यानात घेऊन, या विषयावर राज्यकर्त्यांनी dispassionately निर्णय घेणें, व जनतेला तो समजावून देणें, आवश्यक आहे. सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.
- सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.
लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. मिनाक्षीमध्ये त्यामुळे दैत्य व ब्राह्मण ह्या दोघांचे वैचारीक व भावनिक गुणधर्म उतरले होते. सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव
शुर्पणखा पडले. ह्याच नांवाने ती पूढे ओळखली जावू लागली.
तीने लक्ष्मणाला बघीतले. ती लक्ष्मणावर मोहित झाली. तीने लक्ष्मणाकडून प्रेम व तीच्याशी विवाह करण्याची अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणाने तीचा विचार फेटाळून लावला. दोघांचा वैचारीक संघर्ष झाला. लक्ष्मण हा त्याच्या विचारावर ठाम होता. तर ती अत्यंत आग्रही होती. ती असूरी वृत्तीची होती. एक गर्व, अभिमान, व अहंकार याने ती भारलेली होती. लक्ष्मण आपल्या विचाराला साथ देत नाही, हे समजताच ती आक्रमक झाली. घटनेचे रुपांतर हातघाईवर झाले. लक्ष्मणाच्या हातून तीला शारिरीक इजा झाली. तीच्या चेहऱ्यावर वार लागला. नाकाला दुखापत झाली. शुर्पणखा किंचाळत तेथून पळून गेली. ती खवळली होती. सुडाने पेटली होती. तीच्यावर वार करणाऱ्याला नष्ट करण्याचे तुफान तीच्यांत पेटले होते. पण तशी ती असाहाय्य होती.
ती त्याच क्षणी तीचाच भाऊ रावण याच्याकडे गेली. नुकताच घडलेला सर्व वृतांत त्याला सांगितला. तीने त्याच्याकडे मदतीची अपेक्षा केली. रावण लंकाघीश होता. एक पराक्रमी बलाढ्य होता. युद्धांत त्याने सर्व देवाना देखील पराजीत केले होते. नवग्रह यांना बंदी केले होते. त्याक्षणी त्याकाळी रावणाला आपल्या सामर्थ्याची जाण होती. त्याच बरोबर प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ होता. बहीण शुर्पणखा हीची विटंबना झालेली त्याच्या लक्षांत आली. परंतु हा संघर्ष केवळ त्यांच्यातील दोघांचा होता. एका बलाढ्य राजाने तीच्यासाठी ह्या अवहेलनेत सहभाग घ्यावा ही अत्यंत क्षुल्लक बाब त्याचासाठी होती. त्याने स्वताः कोणतीही मदत देण्यास ठाम नकार दिला. शुर्पणखा निराश झाली. रावणाकडून तीला मदत मिळण्याची शक्यता नव्हती मात्र ती चतूर होती, शाहाणी होती थोडीशी राजकारणीही होती. तीने रावणाला दुसऱ्या मार्गाने छेडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली " रावणा एका गोष्टीची मी तुला आज आठवण देऊ इच्छीते. रामाची पत्नी सीता ही त्यांच्या बरोबर आहे. ती अतीशय देखणी आहे. सुंदर आहे. तुला ती तुझी राणी म्हणून खूपच शोभणारी आहे. तू तीला घेऊन ये. वेळ पडल्यास तू तुझ्या बळाचा शक्तीचा वापर कर. " रावणाला हा सल्ला मुळीच आवडला नाही. रावण एक महान राजा होता. मन्दोदरी ही त्याची पत्नी होती. महाराणी होती. तो तीला अत्यंत आदराने व प्रेमाने वागवीत असे.
२. मन्दोदरी देखील एक आदर्श स्त्री म्हणून समजली गेली. तीचे नांव पंचकन्या म्हणून प्रसिद्ध आहे. मान्यता पावलेली आहे. ( तारा, सीता, मंदोदरी, अहील्या, द्रौपदी ).
अशा महान मन्दोदरीचा रावण हा पती. रावण चवचाल, वाईट नजर असलेला कोठेही संदर्भ रामायणात नाही. शुर्पणखेच्या विचीत्र व विक्षीप्त अशा विचारसरणीला रावणाने रागाने धुडकावून लावले. शुर्पणखा निराश झाली. तरीही तीने आपला विचार सोडला नाही. ती अतीशय चाणाक्ष्य होती. तीचे सर्व वार खाली जात होते. हे जाणून तीने वेगळीच चाल खेळली. तीला हे संपूर्ण माहीत होते की रावण तीचा भाऊ जेवढा पराक्रमी तेवढाच अत्यंत अहंकारी व अभिमानी स्वभावाचा आहे. तीने शांत होत त्याला एक आठवण करुन दिली. त्याच्या मनाला छेडले. " रावणा आठव तुझा त्या सभाग्रहांत झालेला उपमर्द. तु जनक राजाच्या मुलीच्या स्वयंवरासाठी गेला होतास. तेथे ठेवलेल्या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणे हा पण ठेवलेला होता. दिसायला सोपा परंतु अत्यंत आवघड ही गोष्ट होती. तेथील जमलेल्या कुणालाही ते धनुष्य किंचीत देखील हालवता आले नव्हते. तू तो प्रयत्न केलास. तू ते धन्युष्य उचललेस. त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करु लागलास. परंतु ते प्रचंड जड असल्या कारणाने तुझा तोल गेला. तू पडलास. सारी सभा, तेथील जमलेले राजे तुला हासले. त्या हासण्यांत वधू मुलगी सीता ही देखील सहभागी झाली होती. ती पण कुत्सितपणे हासली. तुझा असा अपमान झाला होता. ते अपयश हा एक डाग होता. " मी याचा बदला घेईन " अशी गर्जना करीत तू त्यावेळी स्वयंवर मंडप सोडून गेलास. आठव ते सारे. जागृत कर तुझ्या ठेच पोंहोंचलेल्या स्वाभिमानाला. ज्या स्त्रीने तुझी हेटाळणी केली, त्यावेळी जी तुला हासली तीच सीता मला वनांत दिसली. ती राम लक्ष्मणाबरोबर आहे. मला दिली गेलेली वागणूक कदाचित् तुला क्षुल्लक वाटेल. भले तू राम लक्ष्मण यांना कोणतीही शिक्षा करु नकोस. परंतु त्या सीतेला प्रथम लंकेत घेऊन ये. तीला बंदीवासांत ठेव. तीला योग्य ती शिक्षा कर. हेच तुझ्या जनक राज्याच्या दरबारांत स्वयंवराच्या वेळी झालेल्या अपमानाचे परिमार्जन असेल. "
रावण हे सर्व वर्णन ऐकत होता. त्याच वेळी तो शिवधनुष्य पेलता न आल्यामुळे पडला, सभागृहातील इतर राज्यांचे हासणे, सीतेचेही कुत्सीतपणे बघत हासणे, हे प्रसंग आठवू लागला. त्याचा अहंकार चेतावला गेला. बहीणीच्या विचारामधला गर्भीत आशय त्याच्या लक्षांत आला. राम लक्ष्मणाचा येथे कोणताच सहभाग नव्हता. त्यांच्याशी संघर्ष करण्यासारखे त्याला कांहीच वाटले नाही. मात्र जो त्याचा अपमान सीतेकडून स्वयंवरप्रसंगी झाला, तो दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. तीला लंकेच्या एका महान राजाचा अपमान करण्याची सजा दिली गेलीच पाहीजे. रावणाच्या मनांत हे पक्के झाले. आत्मविश्वास, सैनबळ, युद्धनिती, ही रावणाची नेहमीची चाल असे. परंतु ह्या गोष्टी त्यानी टाकल्या. शिवाय राम लक्ष्मण ह्याना तो फक्त दोन विरपुरुष समजत होता. ते फार पराक्रमी आहेत असा कोणताच प्रभावी प्रसंग तोपर्यंत दिसण्यांत आला नव्हता. त्यांच्याशी युद्ध करण्याची संकल्पना त्याला त्याक्षणी आलीच नाही. त्याचे फक्त एकच ध्येय बनू लागले. आणि ते म्हणजे सीतेला लपून, पळवून आणणे. व बंदी करणे. राम लक्ष्मणाशी संघर्ष टाळणे. येथेच त्याने कपटनिती अनुसरली. शुर्पणखेच्या विचारांना त्याने एका दृष्टीकोणातून मान्यता दिली.
त्या तथाकथीत कुकर्मासाठी तो एकटाच निघाला. फक्त एक सहकारी त्याचा मामा मारीच ह्याला त्याने बरोबर घेतले. ते ह्या साठी की एखादे मायावी रुप घेऊन राम लक्ष्मणाला सीतेपासून तात्पूरते अलग करता यावे. आणि तसेच घडले देखील.
३. मारीच ह्याला मायावी शक्ती आवगत होती. तो सुवर्ण हरीण बनला. सातेच्या हट्टापायी राम त्याला पकडण्यासाठी धावला. रामाचा आवाज काढीत त्याने लक्ष्मणाला मदतीला बोलाऊन घेतले. अशा तऱ्हेने मारीचने राम लक्ष्मणाला सीतेपासून वेगळे केले.
रावणाने साधूचा वेष धारण केला. कारण सीतेला त्याचा विश्वास वाटावा. लक्ष्मणाने आपल्या दिव्य शक्तीने सीतेच्या रक्षणासाठी झोपडी भोवती आखलेली लक्ष्मण रेषा ह्याची पण जाण त्याला आली होती. त्यानेच सीतेला भिक्षा देण्यासाठी पद्धतशीर ती लक्ष्मणरेषा ओलांडण्यासाठी उद्युक्त केले. ह्याच दुर्दैव क्षणाला सीता फसली. ती जीवनांत येणाऱ्या संकटाला समजू शकली नाही. ती जागृत राहीली नाही. गाफील राहीली. हीच सतर्क न राहण्याची तीची चूक तीला पुढील संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागली. थोड्याशा चुका, छोटासा चुकीचा अंदाज, अविच्यारी निर्णय, जीवनामध्ये कसे तुफान निर्माण करतो हे ह्याचे उदाहरण. अशीच अनेक उदाहरणे आपण सतत बघत असतो. अनुभव घेत असतो. हे सत्य आहे. आपल्या अशा चुकांचे बोल आपण नशीबाला, दैवाला लावतो. कारण ही वृत्ती व प्रवृती असते. कुणीही त्याची जीम्मेदारी स्वतःवर घेत नसतो. येथे तर सीता ही महान व दिव्य भूमिकेतली होती. मग सारे खापर रावणाच्या माथी मारणे सहज व सोपे होते.
रावणाने डाव साधला. सीतेला शक्तीनीशी उचलले. पुष्पक विमानानी आकाशमार्गे तो तेथुन निसटला. थेट लंकेत आला. रावणाने सीतेला बळजबरीने पळविले. हे सत्य होते. परंतु त्याने तीच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. कोणताही अतिप्रसंग केला नाही. अथवा विनयभंग केला नव्हता. लंकेला सीतेला बंदीस्त करुन वेगळे अशोक वनांत ठेवण्यांत आले. तीला राजमहलमध्ये केंव्हाच ठेवले नव्हते. ज्या परिसरांत राजा रावण स्वतः रहात होता, त्या वास्तुपासून दुर अंतरावर त्याने सीतेची राहण्याची सोय केली होती. अशोक वनांत अनेक फळझाडे, फुलझाडे, लता वेली, पशुपक्षी, पाण्याचे झरे इत्यादी यांचा विलक्षणसुंदर निसर्ग निर्मण केला होता. त्या आनंदमय वातावरणांत सीतेला प्रसन्नतेने राहता येईल याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली. अनेक दासदासी यांचा पहारा तीच्या सभोवताली ठेऊन तीच्या रक्षणाची संपूर्ण काळजी घेतली जात असे. ( दुर्दैवाने ह्या दासीना राक्षसीनी ही उपाधी लाऊन त्या वातावरणाला दुषित करण्याचा प्रयत्न केला गेला. ) सीतेच्या सहवासांत असलेल्या रावणाच्या सेविकांनी सीतेला अतिशय प्रेम जीव्हाळा व आदराची वागणूक दिली. तीच्या सर्व वैयक्तीक गरजा सतत पूर्ण करण्यांत लक्ष दिले. अर्थात ह्या सर्व बाह्य सुखसोई केलेल्या होत्या. तरी सीता स्वतःला निराश, दुःखी, असहाय्य आणि सतत असुरक्षीत समजे. ती आनंदी केंव्हाच झाली नाही.
झालेल्या अपमानाचा बदला, एक सुडाची तिव्र भावना, अहंकाराला बसलेली ठेच, ह्याचा प्रचंड मानसिक परीणाम रावणाच्या मनावर होणे केव्हांही गैर म्हणता येणार नाही. ती एक मानवी जीवनाची नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणावी लागेल. रावण हा कांही संतमहात्मा नव्हता.की त्याने पडती बाजू घेत उदारमनाने सर्व सहन करावे. एक बलाढ्य पराक्रमी राजा, त्याच्या हातून अशाच प्रकारे होणार हे निरीक्षण असते. परंतु तो जेंव्हा राजा ह्या भूमिकेमधून सिंहासनावरुन उतरतो व रावण ह्या भूमिकेत येतो, त्यावेळी त्याच्या स्वभाव विशेषावर प्रकाश टाकणे योग्य होईल. सीतेला त्याने अत्यंत सन्मानाने अशोक वनांत बंदीस्त केले होते. तीच्यावर केंव्हाही, व कधीही अत्याचार, अन्याय, जबरदस्ती, वा भावनीक हल्ला केला नाही. तीला केव्हांही स्पर्श देखील केला नाही. सीतेला तीच्या विचारांचे संपूर्ण स्वातंत्र दिले गेले होते.
४. जर सीतेचा सहकार असेल, मान्यता असेल, उत्स्फूर्त इच्छा असेल तरच रावण तीला राणी मंदोदरीच्या रांगेत बसण्याची परवानगी देणार होता. राणीचा सन्मान मिळणार होता. रावण शक्तीशाली होता. लंकाधीश राजा होता. सीतेवर बळजबरी करुन हे त्याला साध्य करणे ही क्षुल्लक बाब होती. परंतु रावणाच्या महान व अध्यात्मिक व्यक्तीमत्वाला हे केव्हांच मान्य नव्हते.
रामायणाचा शेवटचा संदर्भ समजणे महत्वाचे ठरते. घडत जाणाऱ्या सर्व प्रसंगाच्या शेवटी जी घटना घडली ती देखील चिंतनीय बाब ठरते. राम रावण युद्ध झाले. रावण मारला गेला. सीतेची सुखरुप सुटका झाली. आयोध्येला परतण्यापूर्वी रामाने सीतेच्या पावित्र्याची शंका घेत, अग्नी परीक्षा घेतली. सीता त्यांत यशस्वी झाली. ती संपूर्ण पावित्र्याची देवता ठरली. सीतेची अग्नीपरीक्षा ही जशी तीची महानता दर्शीत करते, त्याच प्रमाणे ती राजा रावण ह्याच्या बंधणात देखील किती सुरक्षीत होती व पवित्र जीवन जगू शकली हे तिव्रतेने दाखविते. राजा रावण ह्याची महानता आपण खऱ्या अर्थाने जाणली पाहीजे.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वाटत राहत तुझ्याशी
खूप बोलावं भरभरून
जगातील अकल्पित गूढ
आणि चमत्कारी विषयांवर
पण ओठातून शब्दच
बाहेर पडत नाही
तुझा अबोला कधी
विनाकारण तुटत नाही
मला ज्ञान असताना
भूत भविष्य वर्तमानाचे
तुझ्याशी बोलावे असे
काही घडत नाही
आज ना उद्या
जगाला उत्तरे हवी
तुझ्या माझ्या नात्याची
त्या नात्यातील गुढतेची
कारण आपले नाते
खरचं साधे नाही
© निलेश बामणे
Copyright © 2025 | Marathisrushti