तू विसावलीस क्षणक्षण जेथे
तो वृक्षही तुझीच वाट पाहतो
पानोपानी तुझा स्पर्श लाघवी
अजुनही अविरत झुळझुळतो
शहारणारा, मस्त धुंद गारवा
तनामनाला, अलवार झोंबतो
तू अशी ही कोमली नार सुंदरा
तुझ्या रुपात, माहोल शृंगारतो
नको नां, आता खेळू जीवाशी
त्या वृक्षातळी मीही वाट पाहतो
जीवनी, प्रीती एक ब्रह्मसुखदा
साक्षात्कार, जीवाजीवा भावतो
नाते अगम्य राधेचे अन मुरलीचे
सत्यभास, अंतराला सुखावितो
-- वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. १७९
२७/७/२०२२
August 29, 2022
लाखोल्या अन् शिव्या शाप ते, देत सूटतो कुणी रागाने
शब्दांचा भडीमार करूनी, तिर मारीतो अती वेगाने
बोथट बनूनी विरून जाती, निकामी होई शब्द बिचारे
स्थितप्रज्ञाचे बाह्य कवच ते, परतूनी लावी त्यांना सारे
स्थितप्रज्ञाचे कवच तूटते, अहंकार तो जागृत होता
शब्दाने परि शब्द वाढते, वादविवाद हा होऊन जाता
शब्द करिती अघाद मनी, होवून जाते जखम तयांची
काल ओघाने विरती शब्द, परि निशानी राहते कायमची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 11, 2020
समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई
सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई....१,
मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी
त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी....२,
ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी
हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी.....३,
मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते
देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते....४,
दिसून येतो ऊर्जा वापर, देह बुद्धी वा मनी
संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 18, 2017
गजानना आनंदें धरतीवर येता।
आगमनाचा मोठा आनंद देता!
विद्येची देवता आराध्य तुम्ही देवा!
मखरात बसविता घ्यावा विसावा!
मोदक लाडूंची दिली तुम्हा रास !
भक्तांना सुखदायक तुमचा सहवास!
चौसष्ट कलांचा अधिपती राजा गणराज!
शब्दसुमनांचा कसा चढवावा साज!
निर्गुण रूप सदा भावते लोचनास!
आत्मस्वरूप दिसावे जसे भक्तास!
तुच सख्य आपले जाणून घ्यावे!
भक्तावरी मायेचे कृपाछत्र धरावे!
संकट होते दूर पाप नाशती
महिमा अगाध तुझा मंगलमूर्ती !
काय वर्णावी अजाणतेपणी किर्ती
प्रतिभा प्रदान करावी तुम्ही दोन हाती !
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 8, 2026
आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान
त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥
"वालाचं बिर्ढ" नेहमीच "नंबर वन", त्याचा पहिला मान
दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥
चवीष्ट लोभसवाणं "बिर्ढ" खाणा-यांची भूकही वाढवतं
ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥
कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा सर्व्हे करत सुटायचं
काकीला/मावशीला/मामीला, "तुझ्या यादीत माझे पण 5 किलो लिहून टाक", हक्कानी सांगायचं ॥4॥
वाळवणं, तेल लावणं, भरणं हे सगळे सोपस्कार करणं सास्वा-सुनांचं आवडीचं काम,वालाचं मनासारखं कोडकौतुक झाल्याशिवाय हातांना त्यांच्या नसतोच आराम ॥5॥
तेवढ्याच प्रेमाने भिजवून, ऊपसून, सोलून शिजवून, गृहिणीला मिळतं आगळं समाधान,खवय्ये मंडऴींबरोबर जणू काही गोंडस स्मित करतं भरलेलं पान ॥6॥
चपाती-प्रेमी मंडळी, "बिर्ढ" केलं की मात्र शेवटी पुन्हा बिर्ढ-भात घेणारच
भरपेट जेऊन, "वाह मस्त" अशी ऊत्स्फूर्त तारीफ हमखास तोंडातून काढणारच ॥7॥
रूचीपालट म्हणून अधूनमधून मुगाचं, चवळीचं, चण्याचं बिर्ढही आपल्याकडे असतं,नाॅनव्हेजचा वार नसला तरी आपलं हे "बिर्ढ" सगळं निभावून नेतं ॥8॥
संकष्टीला, सणावाराला बिना कांदा-लसणाचंही सगळे आवडीने खातात
शिल्लक राहिलेलं दुस-या दिवशीही "बिर्ढ आहे नं गं, वाढ नं," म्हणून आवर्जून मागून घेतात ॥9॥
मनापासून करतो, उत्साहाने, आवडीने व आग्रहाने खाऊ घालतो
आनंदी चेहरे बघून तृप्त होतो, म्हणूनच कदाचित आपण स्वत:ला कायस्थ म्हणवतो ॥10॥
-----सौ.वर्षा कुळकर्णी खोपकर-----
May 16, 2017
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 28, 2020
घड्याळ होते भिंतीवरती
टिक टिक करुन चाले
सतत दिसली चाल काट्यांची
एकाच दिशेने हाले
धावत होता एक तुरु तरु
दुजा हळूच धांवे
छोटा जाड्या मंद असून
पळणे ना ठावे
पळत असती पुढे पुढे
समज देती काळ-वेळेचा
किती राहील शिलकीमध्ये
प्रवास आपुला जीवनाचा
जीवन चक्रापरि फिरती
घड्याळ्यामधले सारे काटे
जाणीव करुन देती सतत
आपण कोठे अन् जीवन कोठे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 28, 2020
April 24, 2012
इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले.
April 15, 2022
(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
August 16, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti