ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला
मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला
वाटप-रांगेत धरी जोर चांगला
लांगुलचालन करून जोड सांधला
संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला
पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला
अखेरीस कँडिडेट-टिळा लागला
धुंदीला नच पारावार राहिला
प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला
पक्षानें आज खरा पांग फेडला. १
‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला
‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला
खांद्यावर झेंडा पक्षीय बांधला
उच्चनाद करत युद्ध-शंख फुंकला
दक्ष पूर्ण, लक्ष ‘मंद’ आजुबाजुला
‘भांग’ चढे , ‘खचित जय असेल आपला’
वृद्धिंगत करिन पक्ष-यशद-शृंखला.
पण फडात ‘दंगली’त नविन मामला
षंढ विरोधकगण, नव-डाव मांडला
माझ्याविरुद्ध ‘फ्रंट्’ एकत्र बांधला
उमेदवार फक्त-एक उभा ठाकला
दंड थोपटुन लढावयास पातला.
कुत्र्यांचा घोळका कितीक भुंकला
माशी-थवा जरी कितीक शिंकला
कितिक जरी अरिनें धरबंध सोडला
द्वंद्वाचा निश्चय मी ठाम ठेवला
प्रतिद्वंद्व्या, बघच रंगढंग आगळा
जंगजंग पछाडले , मी नसे बुळा
रंक न मी, खूप money, गाडी-बंगला
चीत कराया पुंडां , सज्ज मम व्हिला. २
लढतीचा मी गुलाल उंच उधळला
संत न मी, पंथ स्वीकरी बुराभला
गुंडझुंड-संगतीत खेळ मांडला
संच-मंच-वृंद एकसंध जुंपला
तंत्रबद्ध जंत्री-आधार घेतला
मंत्रघोष यंत्रवत् ‘जय-जय’ निनादला
शिणती गात्रें, तरि विश्राम लांबला
गुंग रात्रिही , नसे प्रचार थांबला
धनसंचय उधळाया संगं आणला
बांध फोडला, न हात तंग ठेवला
साम-दाम-दंड-भेद योग्य मानला
डाव बघुन, जन-तांडा दंग जाहला. ३
क्लांत जरि, न शांतता, संघर्ष वाढला
मोजणीत जय नि पराजय हिंदोळला
आस-निराशेचा थांबे न जरि झुला
मुगुट मनीं धरलेला, मी न सोडला.
रिझल्ट अखेरिस, तो भूकंप थोरला !
हाय हाय ! जय खूपच लांब राहिला !
दंतओष्ठ खात गड बुलंद लढवला
झुंज शर्थिची, परि बलदंड जिंकला
मंथर मतदार, दिली वंचना मला
संपलेंच स्वप्न , पंथ बंद , खुंटला
गंतव्याचा प्रवास विफल, थांबला
भरण्यांआधीच सुयश-कुंभ सांडला. ४
‘कमिशन’नें उंच जधिं निकाल टांगला,
ब्रह्मांडच आठवलें तत्क्षणीं मला !
तोंच, चंगळींत जो आकंठ डुंबला
चाटुकार-संघ, सांगतां न, पांगला
गजबज-संबंध नुरे, ओस चौफुला
‘हॉल’ हा सबंध खायला-उठे ‘दिला’
एकांतच फक्त हा सन्मित्र राहिला
शब्दहीन होतसे आक्रंद मोकळा
रुदन जरि न, नेत्रानें थेंब सिंचला
हुंदका फुटे न, मी तुरन्त दाबला. ५
सुन्न करी ऐसा रिझल्ट जन्मला
अनंत-उदासी-कुठार-घाव घातला
‘सोंग’ कोणतें पुढें , महत्व ना मला
सिंह कसा कोल्ह्यांशी ‘जंग’ हारला ?
टांग मारतां नशीब, जीव आंबला
मात्र अंक प्रथम, नाट्यपूर्ण संपला.
खंक जाहलो पुरा, न खंत ही मला
मानभंग होइ म्हणुन प्राण खंगला
यत्न व्यर्थ सर्वसर्व , गर्व भंगला
हन्त हन्त ! अंत मी असा न कल्पला. ६
*
द्यूत-आरंभाआधीच काढ अर्गला
ऐक, श्रेष्ठ-गुरु अनुभव सांगतो सला
पंडित प्रकांड नको हें कथायला -
राजकारणाचा कर बंद चोचला.
दु:खांमधिं जीव जे सांडत सुखातला
‘पढतमूर्ख’, बोंबलुन ‘किताब’ त्यांजला
मतमतांत संचरि तव गल्बला-खुळा
जाण परी, पॉलिटिक्स ही बुरी बला
अंग बद्ध, पंख बंद, पंक-नद खुला
लांघण्यास लागतो ‘महंत’ ‘पोचला’
सज्जन तूं, उंचसखल-वक्र कां वळा ?
परवडेल कधि नच धंदा असा तुला
फुकट आत्महत्या ही, धुंड नच हिला
बंधु, शांत संथ पथ नि:शंक तुज भला. ७
चुकलो मी, चुनावीय घाट घातला
तूंतरि हरव न आनंद अंतरातला . ८
- - -
मंग : मग
फड : कुस्त्यांच फड
दंगल : कुस्यांची ‘दंगल’ (स्पर्धा)
जधिं : जेंव्हां
जंग : लढाई
दिला : दिलाला, मनाला, हृदयाला
सला : सलाह्, सल्ला
पंक : चिखल
किताब : ख़िताब, पदवी
चुनाव : इलेक्शन, निवडणूक
संगं : संगें, साथीनें, सोबतीनें
आस : आशा
कमिशन : इलेक्शन कमिशन
बुरी बला : वाईट, त्रासदायक अशी गोष्ट / बाब.
अर्गला : कडी
-- सुभाष स. नाईक
तू ऑनलाईन आलीस की
सुचते मला कविता
तू ऑफलाईन झालीस की
रुसते माझी कविता
तुझ्या एका रिप्लायसाठी
झुरते माझी कविता
तुझ्या एका स्माईलने
फुलते माझी कविता
-- विजय रतन गायकवाड
स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे.
तू असा, तू तसा,तू कायसा, कायसा,
अनंत रुपे भगवंता,
घेतोस कशी रात्रंदिवसा,--!!!
कधी वाऱ्याचा स्त्रोत तू,
कधी, खळखळणारे पाणी,
कधी खोल खोल दरी तू,
कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!!
शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी,
झऱ्याजवळ का धबधब्यात,
सोनेरी उन्हात राहशी,
का डोंगरातील कपारीत,--!!!
बाळाच्या हास्यात दडशी,
का अंधारल्या गुहेत,
प्राण्यांच्या दिमाखी बघावे,
का पक्ष्यांतील सौंदर्यात,--!!
जगातील आश्चर्यात पहावे,
की, माणुसकीच्या ओघात,
देवघरात असशी का तू,
का सज्जनाच्या हृदयांत,--!!!
फुलांतील सौंदर्य, गंध तू,
की फळातील मधुरपण,
माणसातील विवेक तू का, त्याच्यातीलच सूज्ञपण,
कुठे कुठे पाहू तुला,
न पाहताच भासशी तू,
आहेस अंतरातील खूण,
नि काळजांतील धून,--!!!
हिमगौरी कर्वे.©
आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,
खरंच मला वाटत नाही....
आत्ता माझ्या चेहऱ्यावर,
खरंच हसू येत नाही....
आत्ता तुझ्या आठवणी विना ,
मला काही आठवत नाही....
आत्ता वाटतं तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या सारखं,
कुणी गोड बोलत नाही....
एकाकी एकटा असतो,
कुणीही विचारत नाही....
आत्ता प्रिये पूर्वीसारखं,
नवं काय स्वप्नात नाही....
एकटेपणा आहे फक्त,
जगावसं वाटत नाही....
माझं प्रेम - माझी तू ,
काहीही नशिबात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
-- गजानन साताप्पा मोहिते
तो परत आलाय
केरळातून.
मान्सून सारखा!
मान्सून मित्र म्हणून येतो,
हा परत आलाय-
आपले यापूर्वीचे सर्व आयुध पचवून,
शत्रू म्हणून!
...
..
आम्ही असतो सरकारी दवाखान्यात
रांगेत उभे.
तिथला वैद्यकीय अधिकारी
देतो आम्हाला 'ऑगमेंटीन'लिहून.
अमॉक्सिसिलीन हे प्रतिजैवक जेव्हा थकतं
तेव्हा देण्याचे हे
एक उच्चतम प्रतिजैवक -ॲण्टीबायोटिक्स.
( ऑगमेंटीन खरंतर एक मुद्रा नाम.
मूळ औषध अमाॅक्सिसिलिन + पोटॅशियम क्लॅहूलानेट)
आपल्या सरकारी दवाखान्यात,
हे उच्चतम प्रतिजैवक सर्रास दिले जाते.
कधी अमाॅक्सिसिलीन संपलं म्हणून,
तर कधी औषधनिर्माण अधिकारी( फार्मसी ऑफिसर)
ऑगमेंटिनची मुदत (एक्सपायरी) जवळ आल्याचं लक्षात आणून देतो म्हणून.
( कारण हे मुदतबाह्य ठरलं तर,
वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी दोघांच्याही गळ्याला फास)
तर कधीच वरच्या साटेलोट्यामुळे,
सरकारी औषध भंडारं ऑगमेंटिननी भरली जातात म्हणून.
एकूणात,
हे वरच्या श्रेणीचे प्रतिजैवक गरज नसताना माथी पडत.
पण आम्ही,
असतो बाहेर पडत,
'भारीचं' औषध मिळालं या खुशीने.
.....
......
सरकारी दवाखान्यात ही तर्हा तर
खाजगीत?
खाजगीत असतो पर्याय
प्रतिजैवक वापरण्याचा किंवा न वापरण्याचा.
पण आम्ही,
धरतो हट्ट लवकरात लवकर बरे होण्याचा!
डॉक्टरला दिलेली फीस वाजवून वसूल करण्याचा!
अशा रीतीने,
आम्ही,
माथी मारून घेतो उच्चतम प्रतिजैवकं.
आता,
...तो परत आलाय् !
आपण विनाकारण आणि हट्टान घेतलेल्या
प्रतिजैवकांना पचवून,
'मल्टी ड्रग रेजिस्टंट'
हे बिरूद लावून!
.....
....
आम्ही,
सरसावत आहोत,
जुने संदी-कपारीतले मास्क शोधून,
ऐकून वाचून पाठ झालेल्या प्रतिजैवकांच्या
तलवारी परजून!
आणि हो,
कमरेला आजीबाईचा बटवा आहेच!
...
..
आम्ही,
आम्ही तयार आहोत
जातील-
तेवढे बळी द्यायला
आणि
वाचतील-
तेवढे वाचवायला!
नशिबाच्या हवाल्याने.
...
..
तो परत आलाय् !
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे ढोंग फोडायला!
स्वयं निर्णयाला आपली लायकीच नसल्याचं सिद्ध करायला!
तो परत आलाय्!
सामूहिक निर्णय नेटानं अमलात आणण्यातला आपला अप्रमाणिकपणा सिद्ध करायला!
आमच्याच मूर्खपणाच्या फलिताचा आरसा समोर धरून,
तो परत आलाय!
....
...
आणि आम्ही?
आमच्यातच मशगूल,
त्याच्या बदलत्या रूपाचं बारसं करण्यात,
आणि
पुढच्या पिढीला 'प्रतिपिंडांचं नपुसकत्व' बहाल करण्यात!
....
...
आम्ही- भारताचे लोक!!
वुई- द पीपल ऑफ इंडिया !!!
( सदर ललितातील 'विचार' नवीन नसला तरी, तातडीचा आणि प्रसारणावश्यक आहे. बहुभाषिक वाचकांनी भाषांतरित करून प्रसारित करण्यास हरकत नाही.)
-- मनोज महाजन.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतररुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाळा या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना, हर्ष माहीना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !
गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत.
चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी,
त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी ।।१।।
क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी,
बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी ।।२।।
कळले नाहीं मजला, ही त्याची रीत,
विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत ।।३।।
उपास तापास करुनी, देह शुद्ध केला,
भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला ।।४।।
गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत,
राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात ।।५।।
मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी,
अशांतता बघूनी मनातील, जात होता परतोनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही. त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.
स्त्रीचं ममत्व आणि प्रेम लोकांना कळतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
लहानपणी तो मोठी मोठी स्वप्न पाहतो
स्वतःच्या स्वप्नासाठी न जगता तो कुटुंबासाठीच जगतो
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मरमर करतो
पण बालवयातच ताईच्या शिक्षणासाठी
स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडतो
या बालवयातच त्याच्यावर जबाबदारीचं ओझं पडतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
तारुण्यात उसंत घ्यावी म्हणतो
तोवर कामाचा व्याप डोक्यावर चढतो
कुठे तरी चार पैशाची नोकरी मिळावी
म्हणून पुन्हा तो पायपीट करतो
काँलेजला रोज जातो पण अभ्यासात लक्ष देत नाय
कारण नोकरी शोध म्हणून रोज शिव्या देते आय...
या तारुण्यात पण त्याला तरुण म्हणून जगता येत नसतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
बायका-पोरांमध्ये आयुष्य सुखात घालवाव असं प्रत्येक पुरुषाला वाटतं
पण रोज सकाळी उठून संध्याकाळी झोपायला येणं एवढचं त्याचं रुटीन असतं
ट्रेन बस आणि आँफीस इतकेच त्याचे विश्व असते
चार प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी त्याला मात्र फुरसत नसते
रोज धक्के खात जगतो तो, मात्र आपल्याला आईच सगळ्यात जवळ असते
त्याच्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीत
आई मात्र रडून मोकळी होते
पण रोज संसाराच्या विचाराने
त्याची मात्र घुसमट होते
संसाराचं ओझं काय असतं हे त्याच्याशिवाय कोणालाचं माहित नसतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
बघता- बघता चिऊ- दादा इतके मोठे होतात
क्षणात विसरतात त्याला, अनं पोरकं करुन जातात
शेवटी चष्मा आणि काठी एवढेच सोबत राहतात
मग काही दिवसांनी चार खांदेकरीसुद्धा येतात
अलगद संसार सोडून तो सरणावरती चढतो
सगळ्यांना सुखात ठेऊन हा आयुष्यभर दुखाला कवटाळून बसतो
अपु-या त्याच्या स्वप्नाचं ते सरणंसुद्धा मग जळतं नसतं
पण कुटुंबासाठी जगलेल्या त्या पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं ?
- अमोल उंबरकर
Copyright © 2025 | Marathisrushti