नको रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना
तू विषण्णपणे हसला होतास
अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली
तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना
ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती
गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता
पाहून तू वेडापिसा झाला होतास
तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या अश्रूंना
केवळ मीच साक्षीदार होतो
पण नको, रायगडा तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
डोळ्यांत घुमारे, गळा दाटलेला नि मी निर्धारलो
धुमसती आग 'हरहर महादेव' नाही अजूनी विझली
पवित्र तुझ्या मातीशपथ ती मी जागवीन
निद्रिस्त निखाऱ्यावरील राख प्राणपणाने फुंकीन
शिंपणाने रक्ताच्या, स्वाभिमान मराठी फडकत ठेवीन
अन् तुजवरला एक पत्थर जिवंत पाहून तू कृतार्थलास
आतातरी रायगडा, तू रडू नकोस
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
न पाहवे बेईमानी पिढीची तुझ्याच, तुझ्याशी
न साहवे तुला मराठी रक्ताची उदासीनता
तुला जाणवे नाद टापांचा अजूनी
व्याकुळसी तू भारावसी फिरुनी फिरुनी
जिथे नित्यनेमे मिरवलेस पाऊल भाळी जयाचे
कुठे स्मरण कोणा इथे त्या महामानवाचे
तुझ्या वृद्ध डोळ्यांत अजून साकारे
तुला न अप्रूप ना अपूर्वाई तीनशेव्या सोहळ्याची
शल्य तुझे असावे- कारण तुला ठावे
पुनः स्मरणासाठी अजून वर्षे तीनशे जावयाची
पण आता आश्वस्त रायगडा तू रडू नको
कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते
-- यतीन सामंत
साथ तुझी सुटणार नाही….
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली नितीन प्रवीण शिंदे यांची हि कविता
थांग पाणावून गेला सागराचा
तीर जेथे, दूर तेथे जावयाचे.
चांदण्यांचे पंख लाभो, वा न लाभो
काजव्यांना सोबतीला घ्यावयाचे.
तूच नाही एकला मार्गस्थ येथे
जात आहे जन्म ओलांडीत जो तो.
पैल जायाचे कुठे ? ठाऊक नाही
गात आहे आसवे सांडीत जो तो.
राख आहे ही पहा येथे कुणाची ?
हे असे आयुष्य आहे नामधारी.
शून्य मागे, शून्य पुढती लागलेले
फेडणे आहे इथे थकली उधारी.
युद्ध आहे हे स्वतःशी, सज्ज हो तू
घे उचल गांडीव हाती, पार्थ हो तू.
का कसे ? हे प्रश्नं सारे फेर धरतील
प्रश्नं नाही...कृष्ण की तो, अर्थ हो तू.
तीच बोटे, त्याच हातांच्या मुठी या
ओंजळींना शाप आहे मागण्याचे.
नीज झालेली पुरेशी, ऊठ वेड्या
पातले संदेश दारी जागण्याचे.
- नितीन प्रवीण शिंदे
स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो
अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो....१,
पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे
थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे....२,
धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते
जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते....३,
पूरक बनती गुणधर्म परि, स्थिर असतो वा अस्थिर ते
विश्वचक्र फिरवित राहणे, निसर्गाचे तत्वची असते......४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जागा वाटपातील वाढती अस्वस्थता
तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून...
तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून...
-- आनंद
जाय जाय केलत्
जात पण नाय
कुतल्याच पिल्लू
दुधकाला खाय
लेशमाचं त्याच
मऊ मऊ अंग
तुटतच नाय
त्याचा माहा संग
कानाला धलून
खेलं गाल्या गाल्या
उगल्यात त्याला
मिशा काल्या काल्या
हातभल जीभ कसं
कालतय् बाहेल
बाबाला पाह्यलं त्
चय धूम पलंल
हाय हाय केलं त्
गुयं गुयं कलल्
युव युव केलं त्
गोंदा घोलंल
छोव छोव केलं त्
भोव भोव कलल्
मनीला पाह्यलं त्
तिच्या मागं पलल्
नजल् जली पलल्
माणुसबी दचकत्
गल्लीत मंग माहा
वट जातो वाल्हत्
© विठ्ठल जाधव
@शिरूरकासार, जि.बीड
मो.9421442995
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।
भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।
प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।
भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।
गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे ।
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।
सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।
साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।
पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
यथासांग विधीने मनी तोषला ।८।
संपत असता यात्रा घटना एक घडली ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।
धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।
आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।
यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।
केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti