|| हरी ॐ ||
वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान,
त्याचे नाही कधी चुकले भान!
या वर्षी येताना मनात शंका नाना,
आनंदाने स्वागत होईल ना?
शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण,
पीक गेले हातचे शेत झाले वैराण!
माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात,
आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!
वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या,
नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!
पल्लवल्या आशा मराठवाडा-विदर्भकरांच्या,
आला जीवात जीव थोडा सगळ्यांच्या!
आनंदाने नाचली माझी पोरं,
नद्या नाल्यांना आला मोठा पूर!
दीड दिवसाने आला दिवस पुनर्मिलाप
काहींचा नदी तलाव समुद्रात
काही कागदाच्या लागद्यांचे
घरच्याघरी आरामात!
पुनर्मिलापा दिवशी समुद्रावर जमले माझे भाऊबंध
आरतीत कोणाचेच नव्हते लक्ष!
आता आपले विसर्जन प्रदूषणयुक्त समुद्रात,
दुसरे ठिकाण नाही लक्षात आले वाटतं?
सुख दु:खाच्या गप्पागोष्टी जोरात,
एक म्हणाला मला आकारतांना पीओपी वापरतात !
किती आग होते माझ्या शरीराची
एवढे कमी म्हणून रासायनिक रंगाने रंगवतात !
एक दुसऱ्याला म्हणाला
त्याला आकारतांना मऊ कागदाचा लगदा
गोंद व्हायटिंग पावडर
आणि नैसर्गिक रंगांचा वापर !
शाडूचा म्हणाला हल्ली मला जास्त मागणी,
पण माती आता मिळणे कठीण, रंग झाले महाग,
वजनानेही मी जास्त वजनदार,
त्यामुळे वाढला कागदाच्या लगद्याचा डिमांड !
जगदीश पटवर्धन
टेबलावर ठेवले होते
बॉसने काहीतरी लिहून
हाताखालच्या लोकांनी
निरनिराळे अर्थ काढले त्यातून
कुणास काहीच समजेना,
म्हणून असिस्टटने केली विचारणा
चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले
मला काय म्हणावयाच होत तेव्हा,
समजत नाही आता,
ती आहे एक नवकविता
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कळेना कसे जडले रे मन
आज हरपले माझे रे भान।।धृ।।
फुलात दिसतो,मनी हसतो
क्षणात जीव उगाच
फसतो
मन अजुनही आहे रे सान
आज हरपले माझे रे भान।।१।।
घरात होतसे तुझाच भास
दिलवरा श्वासात तुझी आस
साद ऐकण्या आतुरले कान
आज हरपले माझे रे भान।।२।।
तळमळ वाढे उगाच जीवा
हळहळ दाटे मनात प्रिया
कंठात दाटूनी आले रे प्राण
आज हरपले माझे रे भान।।२।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते
आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते
ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते
प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते
मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी
परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं
मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार
ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आई ग ......
तू असतीस तर
दारी मोगरा फुलला असता
स्वागतकक्षी फुलदाणीमध्ये
गेंद टपोरा झुलला असता ।
हृदयाच्या पायघड्यांवरूनी
नेले असते देवघराशी
हळदीच्या पाऊलखुणांची
उठली असती घरभर नक्षी ।
मायेच्या नजरेने मजला
पुसलें असते गूज कालचे
लाज लाजरी नजर हासरी
उत्तर देते तुजला त्याचे ।
ताटा भोवती असती महिरप
पाटा खाली असते स्वस्तिक
वेढी विरोद्या लग्नचुड्याचे
झाले असते अपूर्व कौतुक ।
तू असतीस तर
घरास आपल्या असते घरपण
अवेळीच हे प्रौढपणाचे
नसते आले मजवर दडपण ।
मायेच्या वर्षावाखाली
मोहरून मी गेले असते
कसे कुठे ह्या ठेवू लाडकीस
असे तुलाही झाले असते ।
तू नसलीस तरी तुझीच छाया
फिरत रहाते माझ्या भोवती
वस्तू वस्तू अन् वास्तू तुनी या
दिसते मजला तुझीच मूर्ती ।
मध्य रेल्वे माझं नाव
वय माझं शंभरवर,
काय सांगू बाबांनो आता
कशी लागली मला घरघर…
इंग्रजांच्या काळात
खूप होती माझी बडदास्त
फेऱ्याही होत्या कमी
अन् माणसंही नव्हती जास्त…
रुळावरून धडधडत आले
की लोक मला घाबरायचे
एक भोंगा वाजवताच
दूर दूर पळायचे…
पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
सगळंच तंत्र बदललं
शहरांचा झाला विस्तार
माझं महत्त्व वाढलं…
मी खूप खुशीत होते
दिवसरात्र धावत होते
नोकरदारांच्या प्रवासाची
नित्य काळजी वाहत होते…
पश्चिम उपनगरवासीयांच्या सेवेत
माझी बहीण तत्पर होती
धाकटीची भरधाव प्रगती
सगळ्यांचेच डोळे दीपवत होती…
आम्ही दोघी मुंबईची
लाइफलाइन होऊन गेलो
भावालाही सोबत घेऊन
पनवेलपर्यंत जाऊन पोहोचलो…
पण मरमर राबणाऱ्या,
टार्गेट अचिव्ह करणाऱ्या
अन् इन हँड सॅलरी पाहून
मनात चरफडणाऱ्या
कॉर्पोरेट एम्प्लॉयीगतच माझीही गत झाली
बडी बडी स्वप्नं (बोनस, इन्सेन्टिव्ह, TVP) दाखवून
‘बेसिक’चीच काशी केली…
स्वतंत्र खातं, स्वतंत्र बजेट,
वरवर सगळंच होतं छान,
पण मतांच्या राजकारणात
विकासाला नव्हतं स्थान…
उत्तरेचे मंत्री कुल्हडबाजीत रमले होते,
भाडेवाढीचं नाव काढताच हुल्लडबाजी करत होते
अधिकारीही उत्तरेचेच,
त्यांना मूळ प्रश्नच कळत नव्हते
बुडाखाली कार असल्याने
त्यांचे काहीच अडत नव्हते…
माझी मात्र आता दमछाक होऊ लागली होती,
प्रत्येक स्टेशनावरची गर्दी पाहून धडकी भरू लागली होती…
कधी कर्जत, कधी कसारा
कधी स्लो कधी फास्ट,
अप-डाउन करताना वाटतं
हीच फेरी ठरेल लास्ट…
हाडं खिळखिळी झालीयत, पायही लटपटतात,
चुकून कधी पटरी सुटली तर सगळे जण खवळतात…
तुम्हाला मी लेकरं मानते
चीडचीड तुमची मला कळते
चाकरमान्यांचे हाल पाहून
माझेही मन हळहळते…
त्यांच्या कर्माची फळं
आपल्याला भोगावी लागत आहेत,
भ्रष्टाचाराचा चारा खाऊनही
ते तिकडे चैनीत आहेत…
किती करायची अॅडजस्टमेंट
आता सहन होत नाही,
तुमच्यात अडकलेला जीव
रामही म्हणू देत नाही…
तुम्हीच आहात माझी लाइफ
माझ्यावर नका रे रुसू,
म्हातारी झाले रे पोरांनो
‘मरे’ म्हणून नका हसू…
घरच्या आजी-आजोबांना
तुम्ही देता ना रे औषध,
मग या पणजीला जगवण्यासाठी
काहीतरी करा की झटपट…
तुमच्या सेवेत धावत राहणं
हाच माझा ध्यास आहे
व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना
आता ‘प्रभू’कृपेची आस आहे!
कुठुनशी येते नित्य कविता
मलाच माझे कळतच नाही
झुळझुळते वास्तव शब्दांचे
कसे ते मजला कळत नाही
निर्बंधी मी क्षण टिपतो सारे
मनशब्दां बांध घालित नाही
सत्य दृष्टांता स्वछंदी गुंफितो
इमले कल्पनांचे रचित नाही
भावनांच्या त्या शब्दफुलांवर
मी अन्याय कधी करीत नाही
शब्दशब्द, दानच दयाघनाचे
मी अलगद वेचणे सोडित नाही
शब्दभावनांच्या अथांग सागरी
मी डूंबायाचे कधी सोडित नाही
मुक्त सचैल, सदैव नाहत रहतो
ते सुखस्वानंदी मी हरवित नाही
मीच वेडा, सर्वा वाचित जातो
त्यावीण, जगणे उमगत नाही
ठुमकत, ठुमकत येते कविता
मग हात तिचा मी सोडित नाही
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५५
११/१०/२०२२
क्षण क्षणाने रंगुन गेला,?
क्षण क्षणात भंगुन गेला,?
क्षण क्षणांत रोम दाटले,?
क्षण क्षणांचे मोती झाले !?
क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,?
क्षण क्षणात चिंब न्हाले,?
क्षण क्षणांत क्षणिक झाले !?
क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,?️
क्षण क्षणात स्मृती भासले,?
क्षण क्षणात वाहत गेले !?️
क्षणात हसले , क्षणात रडले,?
क्षणात रडूनी हासू उडवले,?
क्षण क्षणांत मुरून विरले,?
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !?
-- श्वेता संकपाळ.
२७-०६-२०१९
मन माझे हिंदोळ्यावरी
बघते धरू आभाळ,
विहरते किती उंच
ठाऊक खितीज मृगजळ !
मना मनाच्या साखळ्या
गुंतता गुंती गुंता,
सोडविण्या त्या सगळ्या
हैराण जीव पुरता !
मना मनाचे द्वैत
भांडते आतल्या आत,
भांड भांडूनिया भूस
नकळे कशात अंत !
होण्या मन मोकळे
फिरे गरगरा भोवर्यावाणी,
पळे इकडून तिकडे,
मग भटके रोनोमाळी !
मन गेले बुद्धीकडे
विचाराव्या यावरील उपया,
फिरवी बुद्धी प्रेमाने
मनाच्या डोक्यावरुनी हात !
सांगतसे बुद्धी मनाला
युक्तीच्या गोष्टी चार,
शांती, तृप्ती, प्रेम, आनंद
मान मनाचा आधार !
झुलू नको हिंदोळ्यावर
सोडविण्या मनातील गुंता,
तुझ्या मनाचा लगाम
दे माझ्या हाता !
-- जगदीश पटवर्धन
तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी,
प्यावे तरी मरणार, नाही प्यावं तरी मरणारचं
-गिरीश.
Copyright © 2025 | Marathisrushti