बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?
उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.
एरवी बघताक्षणीच फस्त होणारे पिठलं भात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतय सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.
कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.
कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.
भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.
चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते... !!!
June 7, 2017
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 18, 2020
वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।
तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,
अर्पितो भाव माझे श्री हरी....
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२
अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,
अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४
अर्पितो भाव माझे श्री हरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 15, 2019
November 18, 2021
आहे मी ऋतू लयाचा
शहारता शिशिर सांगतो
हिरव्या ओल्या श्वासांना
मातीशी जोडून पांगतो...
सुस्तावल्या रात्रीस
अस्ताव्यस्त पांघरतो
आभासी धुक्याचे अस्तर
दिवसावर अंथरतो...
स्त्रोत चैतन्याचे सारे
कवेत घेत..आकसतो
भुंड्या झाडदिठ्यांना
बोचऱ्या गारव्यात डसतो
उत्पत्ती ला आहे इथे
शाप लयाचा तो कोसतो
रुक्ष देहीच्या गर्भात
बीज वसंताचे पोसतो...!!!
-सौ विदुला जोगळेकर
January 5, 2024
थांबव मानसी, चक्र वाढीचे,
कळ्यातूनी तू फुलतांना,
हासत खेळत तुरु तुरु चालणे,
शिशू म्हणूनी जगतांना ।।१।।
कौतुकाने ऐकतो तुज,
शब्द बोबडे बोलतांना,
हरखूनी जातो चाल बघूनी,
हलके पाऊल पडतांना ।।२।।
आनंद पसरे सभोवताली,
इवल्या त्या प्रयत्नांनी,
बदलूनी जाईल क्षणात सारे,
रुळलेल्या तव हालचालींनी ।।३।।
तुझ्यासाठी जे नवीन होते,
प्रयत्न तुझा शिकून घेणे,
अपूर्णतेची आमुची गोडी,
लोप पावेल पूर्णत्वाने ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 14, 2016
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 14, 2020
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook................
-- श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर)
February 15, 2016
आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,
खरंच मला वाटत नाही....
आत्ता माझ्या चेहऱ्यावर,
खरंच हसू येत नाही....
आत्ता तुझ्या आठवणी विना ,
मला काही आठवत नाही....
आत्ता वाटतं तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या सारखं,
कुणी गोड बोलत नाही....
एकाकी एकटा असतो,
कुणीही विचारत नाही....
आत्ता प्रिये पूर्वीसारखं,
नवं काय स्वप्नात नाही....
एकटेपणा आहे फक्त,
जगावसं वाटत नाही....
माझं प्रेम - माझी तू ,
काहीही नशिबात नाही....
आत्ता प्रिये तुझ्या विना,
काहीही जीवनात नाही....
-- गजानन साताप्पा मोहिते
December 25, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti