नभांगणी मेघ जमू लागले,
बघतां बघतां, बरसू लागले, तुझ्यासाठी रे नयन,
असे सतत तरसू लागले,--!!!
धरणी संजीवनात नहाते,
अंगांग तिचे जसे भिजे,
प्रेमवर्षावी तुझ्या बघ,
पंचप्राण तसे आसुसले,--!!!
वाऱ्यावादळांनी होई जसे, रोमांचित तन धरणीचे,
तसेच तुझे येणे भास
कणकण उठती शहाऱ्यांचे-!!!
धरणीचे स्वरूपच हिरवे,
तरो -ताजेपण तिचे,
काया होत टवटवीत,
तसेच हिरवेपण भरले,--!!!
माझे स्त्रीत्व,; तुझे येणे,
तुझे माझे एकरूप होणे,
धरणीचे पावसात भिजणे,
मग तिला राहील काय उणे,--?
उपजही जशी बदले,
धरणी कृतार्थ किती रे,
तिचे लेकुरवाळेपण
बनते जणू परिपक्व रे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी
भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी
पावसाळी ऋतु जणू , मेघ मल्हाराची ताण
माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं
डोळे भरले नभाचे, धरणीच्या प्रीतिपोटी
खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी
नदी, नाले आळविती, पशु-पक्ष्यांची तहान
वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण
अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी
असा ये रे ! तू बेताचा, होऊ दे रे ! आबादानी
डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
२३ जलै २०२२
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
सुर्य किरणें रानभर
ऐस पैस पसरली
झाडा खाली वेडी
सावली घुटमलली
फुलून रानभर वेली
गंध फुलाचा दरवलतो
फुलपाखराचा थवा
त्यावरती भिरभीरतो
घालीत शिल
रानपाखरे गाती गाणे
मन वेडे करती
मनमोहन किलबीलणे
@ शरद शहारे
कविता
जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।।
हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।।
दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।।
सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।।
आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।।
ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।।
' घेणे ' सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।।
' देण्या ' मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले ।।४।।
सुधारुन घे आतां तरी । अनुभवाने चूक आपली ।।
उर्वरित वर्षे जाऊं दे । त्यागवृत्ती मध्यें सगळी ।।५।।
भोगातले सुख कसे ते । क्षणांत येई क्षणांत जाई ।।
त्यागातील समाधान परि । उशीरा लाभून सदैव राही ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अजुनही एकांतात
कधी तिला आठवते
कोवळ्या त्या मनाचे
सुंदर गोड स्वप्न ते...
त्याला पाहुन
तिचं मन झुरलं होतं
कळलं नव्हतं तिला
पण ह्रुदय हरवलं होतं
बसल्या बसल्या बोटानं
वहीत रेषा ओढत होती
स्वतःच्या नावापुढे
त्याच नाव जोडत होती
झुरलेल मन तिचं
शब्द शोधत होतं
भावनां व्यक्त करण्यास
बळ शोधत होतं
ओठांवरच्या शब्दांना
कंठ नाहीच फूटला
हळुहळू मोगऱ्याचा
तो बहरही ओसरला
अल्पायुषी भावना ती
अशी न झुरता मेली
रेंगाळलेल्या पावलांनी
बोहल्यावर ती चढली
दूर राहिलेल्या वाटेसाठी
मन नाही अडखळलं
वास्तवाच्या हिरवळीवर
अगदी आनंदान रमलं...
अजूनही एकांतात
कधी तिला आठवते
पडलेले गोड स्वप्न ते
हसुन झटकून टाकते.
- डॉ.सुभाष कटकदौंड
मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ?
माझा बाप म्हणतो...
लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं...
मी मनात म्हणतो बापाला...
तुम्ही आम्हालाच काढलं नसत
तर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला...
लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतात
किती हा मूर्खपणा ?
ती तर लग्न न करताही हल्ली होतात...
पोरं होण्याचा आणि मोठं होण्याचा काही संबंध आहे का ?
मला वाटत राहत आपल्या देशात फक्त बापच मोठा होतो...
बाकीच्यांना फक्त प्रश्नच पडतो
मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ?
कवि - निलेश बामणे ( बी डी एन )
Copyright © 2025 | Marathisrushti