आम्रवनांतील शोभा बघत,
भटकत होतो नदी किनारी,
मैनेची ती ओरड ऐकूनी,
नजर लागली फांदीवरती ।।१।।
एक धामण हलके हलके ,
घरट्याच्या त्या नजीक गेली,
पिल्लावरती नजर तिची,
जीभल्या चाटीत सरसावली ।।२।।
मैनेच्या त्या मातृहृदयाला,
पर्वा नव्हती स्वदेहाची,
जगावयाचे जर पिल्लासाठी,
भीती न उरी ती मृत्यूची ।।३।।
युक्त्या आणि चपळाईने,
तुटून पडली त्या मृत्यूवरी,
रक्त बंबाळ केले शरीर,
चोंच मारीत धामणीवरी ।।४।।
हार मानून निघून गेली,
जखमी होऊनी शरीराने,
पिल्लामध्ये बसूनी मैना,
शांत करीते हृदय स्पंदने ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विना ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।१।।
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।२।।
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।३।।
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।।४।।
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।।५।।
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन घालू लागले ।।६।।
द्रोण मूर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।।७।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उठतां बसतां भेटे मज सारखा पांडुरंग
माझा सखा पांडुरंग ।।
नेत्र पाहती मूर्ती श्यामल
जिव्हा जपते ‘विठ्ठल विठ्ठल’
गातो हृदयाचा प्रत्येकच ठोका ‘पांडुरंग’ ।।
काम-क्रोध-मद-मोह बांधती
लोभ नि मत्सर हरती शांती
नाशतसे त्या सहा रिपूंचा धोका पांडुरंग ।।
संकटांचिया काट्यांमधुनी
नेई विठ्ठल बोट पकडुनी
दूर करितसे चिंता-भीती-शोका पांडुरंग ।।
अज्ञानाची अवस काज़ळी
विठू न येऊं देतो भाळीं
जीवनआभाळीं पसरी आलोका पांडुरंग ।।
मार्तंडाहुन तेजस दीप्ती
बह्मांडाहुन विस्तृत व्याप्ती
अनंत, उरतो भरुनी साती लोकां पांडुरंग ।।
आनंदाचें पेव विठू हा
चिरहर्षाची ठेव विठू हा
हृदयीं चिन्मय उन्मादाचा झोका पांडुरंग ।।
एकमेव-गणगोत विठ्ठलू
माझी जीवनज्योत विठ्ठलू
जन्ममृत्युच्या पल्याड जाण्यां मोका पांडुरंग ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी
चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी
आतंरिक ती शक्ती माझी, पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी
शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी,
निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी
दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी
परि विवेक हा जागृत होता, विश्लेषन जो करित राही
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी, मनास तेव्हा धीरच देयी
गीळून घेता अपयश सारे, खंत वाटली कधी न त्याची
समज आली मनास ही की, चूक असावी मार्ग निवडीची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दहनासाठी लाकडाचा प्रघात कधी सुरु झाला हे सांगणे कठीण आहे, पण काही समाजांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की फार पूर्वी गोवरी दहन हिच परंपरा होती, त्याची काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत, तसेच बऱ्याच वेळेस संभाषणात, "अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या" या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो, हेही लक्षात घेतले पाहिजे.
विदर्भात कोष्टी किव्वा हलबा समाजात पारंपारिक पद्धतीत दहनासाठी गोवरीचाच वापर करतात, आणि हि प्रथा त्यांच्यात हजारो वर्षापासून चालू आहे. मध्य प्रदेशात सर्व छोट्या गावात खूप सुंदर प्रथा आढळून आली, खेडेगावात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्या गावातील प्रत्येक घरातून किमान २५-५० गोवऱ्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांच्याकडे सुपूर्द केल्या जातात, अथवा स्वतःच्या घराबाहेर त्या घेऊन जाण्यासाठी ठेवल्या जातात, प्रेत यात्रा रस्त्यातून जाताना अश्या तर्हेने घराबाहेर जमा केलेल्या गोवऱ्यावरच मृत व्यक्तीचे दाह संस्कार केले जातात. ही प्रथा या गावातून अनादी काळापासून जोपासली जात आहे, यातून मृत व्यक्तीचा आदर केला जातो, तसेच याचा अर्थ असा आहे कि भारत भूमीत गोवरीवरच अंत्य संस्कार करण्याची प्रथा होती.
आपल्या देशात प्रत्येक लाकूड दाह्संस्कारच्या वेळेस उपस्थीत लोक गोवरीचा तुकडा टाकून, प्रतिकात्मक गोवरी दहन केले समजून घरी जातात, पण याच लोकांना पूर्ण गोवरी दहनाचा पर्याय दिला तरीही लाकडासाठीच हट्ट धरतात, यात सुशिक्षित - अशिक्षित हा भेदभाव नाही. समाज परिवर्तन करण्यास वेळ लागतोच हे आम्ही जाणून आहोत, त्यासाठी आमची संस्था जोमाने काम करत आहे, आणि त्यात अपेक्षित यश येऊ लागले आहे.
आता भारतीय समाज लाकूड दहानाकडे कधी वळला याचा मागोवा घेऊया.
साधारण १००० व्या शतकापासून यवन भारतावर वारव्वार हल्ला करू लागले आणि अधिक, अधिक भूमी काबीज करू लागले, त्या पूर्वी या देशात लोकसंख्येच्या ४-५ पट जास्त दुध देणाऱ्या गाई - म्हशी सारखी जनावरे होती, त्यामुळे दुध व दुग्ध पदार्थ कोणीही विकत नसत कारण प्रत्येक घरात ते मुबलक असे. आपण कृष्णाच्या मथुरा-वृंदावन कथांमधून हे वाचलेले आहेच, तसेच आपल्या पौराणिक कथेतही राजे लोक प्रजेला बक्षीस अथवा भेटीच्या रुपात गाई देत असत, याचा अर्थ गाईला अन्यनसाधारण महत्व होते हे सिद्ध होते, व गाय पूजनीय मानल्यामुळे तिची कत्तल होत नसे.
यवनांना गाईचे मांस खाणे निषिद्ध नसल्यामुळे, ज्या प्रदेशात त्यांनी हल्ला केला तिथल्या गाई मारून खाण्यास सुरुवात केली, त्यामुळे शेणाची उपलब्धता कमी झाली. तसेच लढाईमुळे मरणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कित्तेक पटीने वाढली, व सामुहिक दहनविधी करण्याची वेळ आली, अश्या विधीत मोठ्या प्रमाणात गोवऱ्या पुरवणे कठीण झाल्यामुळे, पर्याय म्हणून लाकडे वापरण्यास सुरुवात झाली, आणि लाकूड दहन या प्रथेने जन्म घेतला. येणाऱ्या काळात लढायांची संख्या वाढत गेली, मोठ्या प्रमाणात माणसे मारली जाऊ लागली, त्यामुळे सामुहिक दहन वाढत गेले, लाकडाचा वापर सर्रास होऊ लागला, व लाकूड दहन प्रथेला पूर्ण मान्यता मिळाली.
मी वेळोवेळी आधीच्या लेखातून सांगितले आहे, तरीही परत सांगतो की हिंदू धर्माच्या कोणत्याही ग्रंथात लाकूड दहनानेच मोक्ष मिळतो असे कुठेही लिहिलेले आढळले नाही. या ग्रंथात मोक्ष प्राप्तीसाठी दहन क्रिया आवश्यक आहे हे मात्र जरूर लिहिलेले आहे, याचा अर्थ हा होतो की दहनासाठी कोणतेही इंधन चालते.
आधुनिक जीवन शैलीचा विचार केल्यास ग्यास दाहिनी सोयीची आहे, ज्यामध्ये २ तासात रक्षा मिळते. ज्यांना याचा आक्षेप असेल त्यांनी गोवारीचा वापर करावा हि माझी आग्रहाची विनंती आहे. गोवारी दहनाचे फायदे मी या पूर्वीच्या लेखात दिलेले आहेत, आपल्या शंका समाधानासाठी ते जरूर वाचावे.
आज लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात पारंपरिक इंधन उपलब्ध होणे येणाऱ्या काळात फार कठीण होणार आहे, याचा विचार करता, आम्ही आणखी एक इंधन प्रकार समोर आणला आहे, हे शेतातील तुराटी, पराटी किव्वा agrowaste पासून बनवलेल्या विटा आहेत ज्याला मोक्षकाष्ठ असे नाव दिले आहे. याचा वापर नागपूर मध्ये मोठया प्रमाणात सुरु झाला आहे, ज्यामुळे पारंपरिक इंधनाचा होणारा तुटवडा कमी करण्यात यश आले आहे. यातून शेतकरी अर्थार्जन करू शकेल, ज्यातून त्याच्या प्रार्थमिक गरजा भागू शकतील, तसेच प्रदूषणावर आळा बसण्यास मोलाची साथ लाभेल.
विजय लिमये (9326040204)
सुंदर प्राची, सुंदर पश्चिमा
लालकेशरी उधळण सुंदर...
चराचराचे हे रूप अनोखे
संवेदनांची ती झालर सुंदर...
जीवन केवळ प्रवास इथला
प्रारब्धाची अटळ रेखा सुंदर...
सारीपाटाचेच फासे जीवनी
सारे, भगवंताच्या हाती दोर...
सुखदुःखांची साऊली भाळी
तिला झेलित, जगावे निरंतर...
आज मला हेच कळून चुकले
सत्यवास्तव जीवनाचे चिरंतर...
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र.२७६
२९/१०/२०२२
१
परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं
प्रभू भेटावा एके दिनीं ।।
करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता
केली शरीरा करीता ।।
जिंकू वा मरुं ही जिद्द
करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा
बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।
इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव
जाणले इतर मनाचे ठाव ।।
दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पूजेत जाई वेळ
ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।
प्रभू चिंतनांत जाई वेळ
वाट बघतो निरोपाची
ओढ फक्त जगदंबेची ।।
खंत येवून मन विचारे
कां न प्रभू भेटला ?
ह्याची रुख रुख मनाला ।।
२
आत्मचिंतन करिता
जाणले मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार
कर्म करी त्यास साकार ।।
ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण
हीच ईश्वरी खूण ।।
ईश्वरप्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत
' आनंद ' हाच भगवंत ।।
नशा नशिली तूझ्या प्रेमाची,
अंग अंग सरसरली,
शृंगारले मन हे माझे,
जेव्हा तू घट्ट मिठी मारली !
मोहरुन सर्वांग आले,
तूझ्या एका स्पर्शाने,
ऊर दाटून आला,
तूझ्या रोमांचित गंधाने !
दिवानी मी तुझीच प्रियकरा,
पूर्णत्वाने वेडावलेस,
बांध फुटला भावनांचा,
कुशीत तुझ्या विसावले !
कवेत तू माझ्या अथांग,
मी तुला घट्ट कवटाळले,
‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास,
उतावीळ मी, अधीर झाले !
– श्वेता संकपाळ.
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी
कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१,
भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील
जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२,
चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत
झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत...३,
जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे
विश्वाचा खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti