(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एकतेची शपथ

    चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची
    आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥

    प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना
    प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥
    हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला
    प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥

    हा हिंदूचा देश मुलांनो आहे भूमी गौतम बुद्धाची
    इस्लाम-ईसाई सर्वांस शाश्वती बात कशास हो युद्धाची ॥
    दुभंगलेली मने सांधूनि विभागलेले हात जोडूया
    एकदिलाने एकमनाने भूमीचे या पांग फेडूया ॥ २ ॥

    भारत माझी जात आणिक धर्मही माझा भारत आहे
    एक धर्म नि एक कुळीचे आपण एकच आपला मांडव आहे
    एक ईश्वर एकच अक्षर, एक सदा काळीज अपुले आहे
    एकतेचा मंत्र जपोनी, शांतीचा आपला जयघोष आहे ॥ ३ ॥

    एकोप्याने जवळ येऊ या, एक होऊ या प्रवाहाने
    एकजूटीने उत्कर्ष साधू या मिळून होऊ या एक मने
    खांद्यास मग भिडवून खांदा एक घेऊ या शपथ साथीहो
    एकमुखाने, एक लयीने गर्जत राहू जयजय हिंदुस्थान हो ॥ ४ ॥

    रामायणाचे करुनी पारायण आदर्शाचे करुया मंथन
    विषमतेला बूजवून; अस्मानी झेपाऊ या उदंड उन्मन
    संकोचित तणांना खुडूनी फुलवू प्रेमाच्या विश्वकळ्यांना
    समर्थतेची रुजवून स्वप्ने जोपासूया निरोगी मनांना ॥ ५ ॥

    बंधुभावाशी नाते अतूट होवो अडसर जातीचा नको
    सर्वांप्रती असू द्या समान आदर आनंदाला मग पार नको
    हातात गुंफूनी हात करुया मोहक मोत्यांच्या माळा
    समर्थतेच्या कळसास नेऊया गोवर्धन होऊन सारे गोळा ॥ ६॥

    -- यतीन सामंत

  • शब्दाची ठिणगी

    ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,
    आकाशाला जाऊनी भिडती,
    नष्ट करूनी डोंगर जंगल,
    हा: हा: कार तो माजविती ।।१।।

    शब्दांची ही ठिणगी अशीच,
    क्रोधाचा तो वणवा पेटवी,
    मर्मघाती तो शब्द पडतां,
    अहंकार तो जागृत होई ।।२।।

    सूड वृत्तीचा जन्म होवूनी,
    वातावरण दूषीत होते,
    संघर्षाचा अग्नी पेटूनी ,
    जीवन सारे उजाड करीते ।।३।।

    कारण जरी असे क्षुल्लक,
    विनाश व्याप्ती होई भयकंर,
    केवळ तुमचे प्रेमळ शब्द,
    दुष्ट चक्र थांबवी सत्वर ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गजल की कविता

    गजल आहे की कविता आहे
    गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !!

    राग आहे की ताल आहे
    सूर शब्दांची धमाल आहे !!

    देव आहे की भक्त आहे
    आरोळीतला मृदंग टाळ आहे !!

    मी आहे की तू आहे
    डोक्यावर ठेवलेली झाल आहे !!

    आवाज आहे की सुर आहे
    एक गळ्यातला स्वर आहे !!

    रक्ताची आहे की भावनांची आहे
    जी आहे ती अस्सल आहे !!

    -- विश्वनाथ शिरढोणकर
    इंदूर, म.प्र

  • वेठबिगार

    महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा
    निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा
    आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा
    सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा
    भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा
    परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा
    इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप
    लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत

    असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला - भागला
    नि निघतो घड्याळ्याच्या ठोक्याबरोबर लगबगीने गलबला
    जीव गुदमरवणाऱ्या गर्दीत मिसळून बेकाबू कोलाहलात
    जीर्ण शरीरे सरकू लागतात, विटक्या मनाचं ओझं पेलत
    थिजत्या आकांक्षांना सोबत घेऊन विझत्या आशेला
    आणि कदाचित राखेआडला निखारा उरी जपलेला
    घरट्याच्या ओढीनं निघून, प्रवासाच्या शक्तीपाताने शिणून
    परततात आयुष्याची चिपाडं, निष्प्राण कलेवर बनून

    पूर्ण पिट्ट्या पाडून घेऊन, काळं करुन दिवस पळताना
    रात्र सामावे त्यांच्या गुपितांना, पापांना नि दिवसाच्या तापांना
    आपापल्या बंदिस्त तुकड्यात, मग निवांत होऊन
    अतृप्त आत्मे निजतात गाढ, खूपशी स्वप्ने उशाशी घेऊन
    रात्रीच्या कुशीच्या उबेत, क्लांत जीव आश्वस्त निजे
    भाळी लावूनी चंद्राचा टिळा, रात्र मग जागे, जोजवे
    प्रेमाने थोपटे कपाळी अंकांना देता मंद मंद झोके
    रात्र प्रहर - प्रहरांनी पिके, होत जाती रंग फिके

    दिवस अस्पष्ट कुजबुजू लागे, झुंजुमुंजु होऊ लागे
    काळोखाच्या दाट दडपणाला निर्धाराने सारुन मागे
    धास्तावून जीव मग होतो जागा, विखुरली गात्रं गोळा करीत
    पुन्हा प्रवासास दिशाहीनतेच्या टोकापासून, टोकापर्यंत
    निघतो वेठबिगार पाठी थैली मारुन उत्साहाचा उसना आभास लेऊन
    झापडांना ओढून डोळ्यांवर नि नीट जोखडात मान देऊन
    पुन्हा होतं चक्र सुरु जगाच्या प्रचंड चरकाचे
    पिळायला थेंब शेवटचे, शुष्क जीवनातल्या आशेचे
    आणि नेलं जातं वाहून जू इमाने इतबारे जगाच्या अंतापर्यंत
    गुलामांच्या असहाय पिढीपासून पुन्हा पुढल्या पिढीपर्यंत

    -- यतीन सामंत

  • तू माझी माऊली !

    तू माझी माऊली । मी वो तुझा तान्हा ।
    पाजी प्रेमपान्हा । पांडुरंगे ।।

    तू माझी गाऊली । मी तुझे वासरु ।
    नको पान्हा चोरु । पांडुरंगे ।।

    तू माझी हरिणी । मी तुझे पाडस
    तोडी भवपाश । पांडुरंगे ।।

    तू माझी पक्षिणी । मी तुझे अंडज
    चारा घाली मज । पांडुरंगे ।।

  • महिला दिन साजरा होतो

    महिला दिन साजरा होतो..
    पण महिला होतात व्यक्त मनातून,बोलतात अंतरातून, मोकळ्या होतात सहजतेतून ???
    खरच महिला दिन साजरा होतो का शुभेच्छा देऊन ???
    तिच्या मूक वेदनेची हळवी सल
    की निःशब्द भावनांची जखम
    तिच्या हास्यमागे करुण दुःख
    की हसऱ्या डोळ्यांत दुःखद ओल
    तिच्या अव्यक्त मनात असंख्य काहूर
    की तिच्या खोट्या आनंदात दुःखी चाहूल
    सहन करतीये ती आज वर्षानुवर्षे अंतरातून
    स्त्री आहे भारतीय होतात संस्कार
    तिच्यावर मग लहानपणापासून
    मनाच्या तळात साचलं काही तर भाव
    विरतात तिचे नाजूक निःशब्द बंधात..

    -- स्वाती ठोंबरे.

  • कठीण खेळ

    चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।

    दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?

    निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।

    फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?

    चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।

    आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।

    देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।

    हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आनंदी भाव हाच भगवंत

    बागेतील तारका-

  • अतृप्ती

    रिमझिमत्या पावसात
    माझ्या गर्द केसात मोगरा माळताना
    तू दाखवलीस स्वप्नं...
    रुणझुणत्या चुड्याची
    भरजरी शालूच्या स्पर्शाची
    पराक्रमी राजपुत्रानं
    नजर करावं गुलबकावलीचं फूल
    हळव्या राजकन्येला
    तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली
    तुझी शपथ, तेव्हा वाटलं
    पायतळी मंझिल आली !
    आणि मग -
    हातीच्या गुलाबाची
    पाकळी पाकळी पडावी गळून..
    तसे क्षण गेले निसटून
    नि कसली अगम्य ओढ
    मनात राहिली दाटून?
    चालत्या पावलांना मी विचारते,
    "तुम्हाला काय हवंय बाबांनो?'
    कालचा मोगरीचा गंध
    तस्सा ताजा --टवटवीत...
    की पूर्ती झालेली सारी स्वप्ने.....
    की त्याही पलिकडचं काही... अरुप.... अनाम..
    जे काय तेही नक्की कळत नाही.....
    साऱ्याच सुखाचा असा अर्थ शोधत राहिलास
    तर हाय हृदया !
    तुझ्या अतृप्तीला सीमा नाही।
    तुझ्या अतृप्तीला. सीमा नाही !!

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ३

    माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्‍या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला ९-१० वर्षांचा होईपर्यंत मी आजोळी (आईच्या माहेरी) डोंबिवलीला वाढलो. डोंबिवली म्हणजे मुंबईपासून ५० कि.मि.वर ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. मध्य रेल्वेवर ठाणं आणि कल्याण या दोन मोठया गावांच्या मधे आणि रेल्वेच्या लोकल सेवेने मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर. १९६५ – १९७० च्या सुमारास देखील डोंबिवली फार वेगळं होतं. त्यावेळी ते उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचं, मुंबईच्या धकाधकीपासून दूर पण तरीही सोईस्कर अंतरावर वसलेलं असं एक छोटंसं वसतिस्थान होतं. गावाच्या सुसंस्कृत वातावरणाची साक्ष पटवण्यासाठी पु.भा. भावे आणि शं.ना.नवरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक / नाटककार डोंबिवलीला आपलं घर मानून रहात होते.

    आजीच्या घरातून पाठीमागे भाताची शेती दिसायची. पुढच्या अंगणात पेरू, चिंचा, जांभूळ आणि पपईची झाडं होती. त्यामुळे घरची फळं खाण्याचा आनंद उपभोगला होता. आजीच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेलाच भाजीवाले, फळवाले टोपल्या घेऊन विकायला बसायचे. त्यावेळी डोंबिवलीत व आजूबाजूच्या खेड्यांमधे आगरी लोकांची वस्ती खूप होती. आगरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. कमरेला जेमतेम फडकी गुंडाळलेले आगरी पुरुष आणि चापूनचोपून नेसलेल्या रंगीबेरंगी लुगडयातल्या आगरी बायका कायम दिसायच्या. सगळे रापलेले आणि काटक. पुरुषांच्या कमरेला उघडे कोयते आणि बायकांच्या केसात भरपूर फुलं. काही आगरी बायका आजीकडे वर्षानुवर्षे घरकामाला होत्या. कुणी शेतातले तांदूळ घेऊन यायचं, कुणी वरी, तर कुणी करवंद. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड, टरबुजांनी भरलेल्या बैलगाडया घेऊन आजूबाजूच्या खेडयांतून आगरी लोक यायचे. आजीच्या घरासमोरच बैलगाडया सोडून बैलांना बांधून ठेवलं जायचं. या बैलगाडया घेऊन येणारे काही आगरी लोक आजीच्या चांगले ओळखीचे झाले होते. मग ते कधी कधी विकायला आणलेल्या कलिंगडांची रास आजीच्या घरातच लावून जायचे.

    आजीच्या घरासमोरचं अंगण मातीचं होतं. दर आठवडा पंधरवडयाने ते शेणानं सारवलं जायचं. समोरच्या रस्त्याच्या कडेला भाजीवाल्यांनी इतस्तत: टाकून दिलेला सडका भाजीपाला खायला गावातली भटकी गाई-गुरं यायची. ती कधी मधी आजीच्या अंगणात फुलझाडं खायला किंवा अंगणात वाळत टाकलेलं काही हुंगायला यायची. मग त्यांना आरडा ओरडा करून हुसकावून लावलं की मोठंच काम केल्यासारखं मला वाटायचं. शाळेतनं आलं की संध्याकाळी हुंदडतांना आसपास मोकाट गुरांचा वावर कायम असायचा. त्यातले काही सांड कधी कधी एकमेकांवर नाक फेंदारून आणि शिंगं रोखून चालून जायचे आणि त्यांच्या झुंजीमुळे सगळीकडे धुरळा उडायचा. आसपासचे लोक आरडा ओरडा करून, दगडं काठया मारून त्यांना पळवून लावायला बघायचे. मग तो सगळा गलका ऐकून आजी किंवा मामा धावत बाहेर यायचे आणि आम्हा मुलांना घरात घेऊन जायचे.

    त्याकाळी डोंबिवली गावाच्या थोडसं बाहेर गोग्रासवाडी म्हणून एक गोशाळा होती. आजूबाजूला भरपूर झाडी आणि शेतं असलेलं ते एक शांत आणि सुंदर ठिकाण होतं. कधीतरी काही सणानिमित्ताने किंवा केवळ सहलीसाठी आजी आणि आजूबाजूच्या बायका आम्हा मुलांना तिकडे घेऊन जायच्या. त्या श्रद्धाळू बायकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं त्या गाई वासरांना हिरवं गवत आणि गूळ खायला द्यायचो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून नमस्कार ठोकायचो.

    माझ्या मामांना भटकण्याची खूप आवड. त्यामुळे शनिवार-रविवारी आसपासच्या खेडयांमधे, टेकडयांवर, खाडयांवर मामांबरोबर मी खूप भटकलो. कल्याण किंवा मुंब्र्याच्या खाडीवर जायचं, करवंदाच्या जाळीमधून फिरून करवंद खायची, शेतांच्या बांधांवरून चालायचं, पावसात भिजायचं हे सारं भरपूर केलं.
    एकंदरीत १९६० च्या दशकातल्या डोंबिवलीने मला एका छोटयाशा गावातलं स्वछंद बालपण उपभोगू दिलं. त्या निमग्रामीण वातावरणाचा रंग माझ्या नकळत माझ्या अंतरंगावर पक्का बसला आणि मग पुढे शहरी वातावरणाचे, रंगाचे, कितीही थर त्यावर चढले तरी तो मूळ निमग्रामीण वातावरणाचा गाभा काही पुसला गेला नाही.

    १९७१ साली आजोळ सोडून मी माटुंग्याला (मुंबई) आई वडिलांकडे रहायला आलो. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या, त्या काळच्या मुंबईतल्या अग्रगण्य शाळेमध्ये पाचवीपासून शिकू लागलो. दादासाहेब रेग्यांसारख्या (मुलांसाठी “दादा”) शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या या शाळेने, मराठी माध्यमाची कास धरून, मध्यमुंबईतल्या कमीत कमी दोन पिढयांवर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय संस्कार केले.