पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
या हो स्वागताला
उंबरठ्यासी बाराच्या
सरता येता जल्लोष झाला//१//
दिन उगवला
नभात प्रभा फाकल्या
संकल्पांचा क्षण उजळला//२//
कुनिती,अनिती
विस्मरणात गाडल्या
आल्या की प्रगती,सुनिती//३//
शंखनाद होता
हा परिस स्पर्श झाला
नाही मिळणार कुठे गोता//४//
गुलाबी,शराबी
नव वर्षाची पहाट
पहा नसेल कुठे खराबी
//५//
सकारात्मकता
असो विचारात सदा
वाढो विश्वातली आत्मियता//६//
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
कधी तिचा “चुकतो अंदाज”… आणि तांदूळ होतात जास्त दुसऱ्या दिवशी सगळे करतात … फोडणीचा भात फस्त
हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम
हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम ।।
संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी
आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी
मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।
आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती
नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल, मुक्ती
स्वानंऽद हे, आनंऽद दे, चरणीं करुं दे मुक्काम ।।
- - -
- सुभाष स. नाईक
कारखान्या विष, सोडले हवेत
गादी पैसे खात, सुजलेली
वाहनी गराडा, या भूतलावरी
लोट धुरांवरी, स्वार असे
प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन
पृथ्वी जे आसन, डळमळे
रसायनी शेती, विषच पेरले
बियाणे रूजले, संकरीत
बोडखे डोंगर, देखवेना डोळा
कोणा कळवळा, येईल का?
पाणी जो मागतो, नित्य देवाकडे
लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे
तडातडा तोडी, बांधावरी झाड
जरा नाही चाड, वृक्षाप्रती
तोडलेली झाडे, विकती चोरून
हप्ता खाती कोण, नसे जाण
रस्ता केला मोठा, झाडावरी घाला
नसे बोलबाला, तोंडदाबी
धरणात लावी, खोटी झाडवल्ली
पंचनामी उगली, पैपाणीच
जुनाच तो खड्डा, खोदा नव्यानं
पुन्हा हे रोपण, दरवर्षी
फोटो काढा मोठा, टाका नेटवरी
येतो जो पुढारी, पेपरात
वृक्ष लागवड, लुटती अनुदान
कोटींचे उड्डाण, गल्लाभरू
कैक पिढ्या येथे, झाल्या गारद
दुष्काळी साद, सालोसाल
जो मराठवाडा, तो टंँकरवाडा
ऊसतोडी खोडा, सर्वकाळ
हातात कोयता, सोडू एकदाचा
ओघळ पाण्याचा, देई झाड
फ्रीजचा जो येथे, पहा धुमाकूळ
पेयांचा बक्कळ, तो बाजार
माणसाने येथे, वृक्ष जपावेत
झाडं पुजावेत, मनोमनी
शाश्वत वास्तव, नसे काही इथे
व्यवस्था कुतथे, दैनंदिन
वृक्षाने पाऊस, पावसाने वृक्ष
ठेवू जरा दक्ष, मानवता
फेकूनिया बिया, भूतलावरी या
मळा फुलवूया, फळपिके
प्रत्येकाने इथे, एक झाड वाढावे
जीवन जगावे, समाधानी
वृक्षसंमेलन ते, भरे देवराई
फुलेल वनराई, डोंगरात
असे आशावादी, जोडोनिया वन
भविष्याचे धन, समजूनी
नवरीने नव्या, ओलांडीले माप
एक झाड जप, आठवणी
मृतका स्मृती, झाड जे लावती
पितृ ते जेवती, समाधानी
झाड झाड जपा, सावलीत बसा
मग पहा घसा, कंठगळा
हिरवाईने जे, नेत्र सुखावती
स्मरण करती, कैक पिढ्या
बांधुनिया चंग, हिरवाई रंग
नेत्रसुखी दंग, होऊ सर्व
वारकरी भाऊ, दोन झाडं लावू
मग आरती गाऊ, विठोबाची
झाडांचे रक्षण, करा संरक्षण
मानवी लक्षण असो द्यावे
असे माझा भाव, तोच माझा देव
तेथं माझा गाव, वृक्ष नाव
हिरवी चादर, बहरे फूलपान
गर्द होई रान, हिरवाई
वृक्षसंमेलनी, करती जे श्रम
करतो नमन, त्या हातांना
-- विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
(वृक्षवाढीसाठी लढणाऱ्या हातांना समर्पित...)
भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
मध्यभागात येऊन जसा,
चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!
काही काळ दर्शना तुझ्या,
जीव कासावीस माझा,
कोलाहल माजतां उरां,
नुरला कुठलाही आसरा,--!!!
न्यारी प्रेमाची खुमारी,
चंद्राने अशी वाढवतां,---
स्वर्ग दोन बोटे राहिला ,
जशी ग्रहणाची सांगता,--!!!
मात देत सकल अंधारा,
उगवशील माझ्या राजा,
जरी तु होशी झाकोळतां,
उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!
तारे वारे आणि चंद्रा,
सांगते रे मी कितीकदा,
सूर्यदेवाची करते पूजा,
तो एकमेव माझा त्राता,--!!!
चांद मध्ये असा डोकावतां,
खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!
काय वर्णू त्याचा महिमा,
माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
न कोणी धजावे लावण्यां, हाता,
महाराणी शोभे सम्राटां,--!
ग्रहण येवो काही अथवा,
फिकिर नाही मजला,
प्रियकर एवढा तेजाळतां,
अंधाराचीही नाही तमा,--!!!
© हिमगौरी कर्वे
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले,
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला,
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।।
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti