कावळ्याचे नवे फेसबुक
भलतेच आले बघा रंगात
रोजरोज न जाता शाळेत
शिका म्हणे नेटच्या घरात
कोल्होबाचे व्हॉट्सऍप
करते करामती भारी
जंगलातील बित्तंबातमी
येते लगेच स्क्रीनवरी
सिंहाचे यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करा म्हणे
जंगली कविता म्हणतो
लाईक्स वाढवा म्हणे
सारा सोशल मिडिया
जंगलात शिरला आहे
म्हातारीचा मोबाईल
वाघानंं पळवला आहे!
जंगलातील शांतता
मोबाईलने भंगली
कोल्हेकुई,डरकाळी
नेटवर्कने थांबली!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं. ९४२१४४२९९५
माझ्यातला चांगुलपणा
मी पुन्हा जागवला
प्रेमभाव अंतरीचा
पुन्हा मी जोपासला
मनातली वैरभावना ती
कशी कावरी-बावरी झाली
प्रेमाच्या सानिध्यात
फार काळ नाही टिकली
खूनशी वृत्ती ती
मन पोखरत राहीली
चांगुलपणाला घाबरून
प्रेमाला शरण आली
तिरस्काराचे ते पेटते बाण
होते जरी सुटलेले
आपुलकीच्या ओलाव्याने
आपसुकच ते विझलेले
रोषानेही मग आपला
रस्ता तेंव्हा बदलला
द्वेषालाही अस्तित्वाचा
जणु उबग आला
स्वार्थाला स्वतःचीच
लाज वाटू लागली
मानवतेची ओळख मनाला
नव्याने पटू लागली
अहंकारानेही आपली
मान खाली घातली
सुंदरता माझ्या मनाची
तेव्हा मला दिसली
तुटलेले दूखावलेले
जवळ आले ते सारे
जिवन जगण्याचे सूत्र
सापडले मला ते खरे.
- डॉ. सुभाष कटकदौंड
लेखक : सिद्धू चिलवंत – आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा=पोपट)
-- मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
आई तुझे प्रेम,
अनंत त्याचे दाम ।
तुलनेसी ब्रम्हांडी,
जड तुझीच पारडी ।।१।।
पुंडलीक तुझ्यासाठी,
विसरला जगत् जेठी,
कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ,
शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।
बलीदानाची तू मूर्ती,
'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी कीर्ती,
कष्ट करुनी वाढविले छोटे,
विसरती तुला होऊन मोठे ।।३।।
सोडीनी एकटे तुजसी,
पंख फुटता उडे आकाशी,
निरोप देऊन प्रेमाचा,
कळस गाठला महानतेचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता
निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा
मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या
कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥
मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा
उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा
मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर
गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे सांत्वनपर || २ ||
तुझी नित्यनेमे भडकती चिता मी स्वये पाहिलेली
शोकसभेत तुझ्या हरेक सांत्वनाला तुला साथ केली
दुर्दैवाची झडप मिटते ज्याच्या नशीब नामक झरोक्याची
कसा जीवनांधकाराला छेद मिळावा आशा नामक किरणांचा ॥ ३ ॥
तुझ्या जीवनमूल्यांची उघड तुडवणूक तुला पाहवेना
पराभूत स्वप्नांचे शल्य तुझ्या, उरी तुला साहवेना
तुझ्या भग्न रुपापुढे अतृप्त आकांक्षा-आत्मे नाचताना
पाहून तुझ्या आदर्शाचे ठिक्कर कोळसे तुला राहवेना ॥ ४ ॥
युगायुगांची विदीर्णता ही, नित्य भंगणारी स्वप्ने
नैराश्यात घुसमटणारे आत्मे नि उदास उद्ध्वस्त मने
-- यतीन सामंत
वेलींना आधार होता,
वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला,
कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तरूवेलींना,
धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी,
सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों,
सोडूनी घ्या आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी ||
चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले
दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले ||
नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी ||
आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता
पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता ||
काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति, देखील ती
नाव प्रभुचे त्या वातावरणी, कुणी न घेती ||
प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी, चित्त तयाचे स्वछंदी
रहात होता सुंदर बंगलीं, अतिशय आनंदी ||
छंद तयाला फुलझाडांचा, बाग केली छान
विविधतेची झाडे झुडपे, दिसे शोभावान ||
दिवसभराचे कष्ट करुनी, फुलवित असे बाग
सुवास सारा दरवळूनी, डोलती तेथे नाग ||
पक्षी आणि प्राणी जमवूनी, संग्रहालय दिसले
आवाजांचे सूर निघूनी मग, मधूर ते भासले ||
मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
आनंदाला सिमा पडेल, कशी तेथे मग ||
सारे होते नयन मनोहर, त्या वातावरणीं
संबोधित होता त्या वास्तूला "निसर्ग " तो म्हणूनी ||
वेड लागुनी तन्मय झाला, सौंदर्याच्या ठायीं
निसर्गातील रस सदैव, शोषित तो राही ||
नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना ||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti